Saturday 1 October 2011

वाचन... नव्या वळणावर


वाचन संस्कृती ही महाराष्ट्राची ओळख आहे. मात्र आजच्या संगणकयुगात वाचनाचं प्रमाण कमी होताना दिसत आहे अशी टिका सातत्याने होताना दिसते. `ग्रंथ हेच आपले खरे मित्र ` असा सुविचार केवळ शाळेच्या भिंतीवर लिहिण्यासाठी नाही. वाचन संस्कृती घटत नाही तर वाचकांची रुची बदलत आहे. या बदलाकडे आपण डोळसपणे बघायला हवं. तशी वेळ मात्र आज आली आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगामुळे नव्या वाचकांमध्ये कार्पोरंट लूक आला असल्याने मुळ साहित्याचे वाचक कमी व्हायला लागले आहेत. माध्यम विस्ताराच्या जमान्यात 1982 साली दुरदर्शनचे प्रक्षेपण विस्तारले त्यानंतर चारच वर्षात घराघरात टिव्ही दिसायला लागले. या नव्या माध्यमाची `क्रेझ` इतकी होती की सर्वजण `कृषी दर्शन ` सारखा कार्यक्रम देखील आवडीने बघत असत. त्यानंतर डाऊनलिंकींगच्या सुरुवातीने वाहिन्यांची संख्या वाढवत नेली. पुढचा प्रवास भाषिक वाहिन्या आणि वृत्त वाहिन्यांचा होता. या मोठ्या प्रमाणातील बदलाने घरातील लायब्ररीची वर्गणी केबलकडे वळली.
दुसऱ्या बाजूला साहित्य आणि त्यावरील वाद-वादंग, मानापमान नाट्य यामुळे पूर्वीचा असणारा वाचक देखील आज निराश झालेला दिसतो. या सोबतच साहित्याचं व्यावसायिकरण झपाट्याने होताना दिसत आहे. या सर्वांचा परिणाम एकूणच वाचन संस्कृतीवर दिसतोय.आपण आणि आपलं करिअर याबाबत आजची तरुण पिढी चांगली जागरुक झाली आहे. सोबतच इंग्रजीचा प्रभाव वाढला आहे. यामुळे त्या स्वरुपाचं लिखाण मोठ्या प्रमाणावर वाचलं जातय. आजच्या पिढीला वि.स.खांडेकर यांच्या कथांमधील कोमल आणि निर्मळ प्रेमाच्या आणाभाका आणि तशी पात्रं वाचण्यापेक्षा यशाचा मंत्र देणाऱ्या जिग  झिगलर आणि शिव खेरा यांच्या पुस्तकात अधिक रस असल्याचं दिसतय.
मोठ्या शहरांमधून आलेली `कॉल सेंटर्स ` मॉल्स यांच्या जोडीला आक्रमकपणे मार्केटींग करणाऱ्या वित्तीय संस्था यामध्ये कमालीची स्पर्धा आहे. या शर्यतीत धावताना `इन्स्टन्ट` आणि शॉर्ट याकडे साऱ्यांचं लक्ष असतं. हा बदल वृत्तपत्र माध्यमानं चटकन टिपला अन् त्यावर हुकूम पुरवण्यांचा मारा सुरु केल्याने सकाळी जे हातात पडतं तेच वाचतो असं म्हणणारी पिढी आज आहे. 500 पानांचा ग्रंथ वाचण्यापेक्षा त्यांना चटकन वाचता येईल असा लेख जादा आवडतो.       
वाचन संस्कृतीवर पहिला मोठा हल्ला टि.व्ही.ने केला. आठ दिवस वाचूनही संपत नाही अशा कादंबऱ्या वाचण्यापेक्षा तासाभरात दृश्य स्वरुपात `डिस्कव्हरी ` चॅनेलवर येणारी डॉक्युमेंटरी त्यांना पसंत असते. हिटलर असो वा चर्चिल त्याबाबत भारतीय पुस्तकांत अभावानेच माहिती असते परंतु ती माहिती अशा वृत्तपटातून मिळत असते. या वृत्तपटांच्या विविधतेने एक प्रकारचं आगळं ग्रंथभांडार आपणास उपलब्ध होतंय हे या पिढीनं जाणलय असं म्हणायला हरकत नाही.
वाचन संस्कृतीवर पुढचं मोठं आक्रमण अर्थातच इंटरनेट आणि मोबाईलच्या माध्यमातून आलेल्या सोशल नेटवर्कींगचं आहे. मोबाईल जोवर आधुनिक नव्हते तोवर एस.एम.एस. वर भाषेची वाट लावून संवाद साधणारी नवी पिढी आता वायरलेस ऍ़प्लीकेशन प्रोटोकॉल अर्थात वॅप ने व्यापलेली दिसतात. या तंत्रज्ञानानं इंटरनेट खिशात आलय त्यात फेसबूक, व्टीटर सारखी माध्यमं उपलब्ध आहेत आणि आता थ्री जी तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यानं सोबत टिव्ही त्यात आला. खोली एव्हढ्या मोठ्या संगणकापासूनचा तंत्रज्ञानाचा प्रवास खिशात 16 गिगाबाईट क्षमतेचा मोबाईल संगणक इथवर आलाय त्यामुळे आजची तरुण पिढी त्यात रेंगाळताना दिसते. तंत्रज्ञान झपाट्याने प्रगत होतय त्यामुळे येणाऱ्या काळात `वाचन संस्कृती ` कोठे आहे याचा शोध नक्की घ्यावा लागणार असं चित्र आज आहे.
आपल्या मुलांमध्ये विविध कलागुण विकसित व्हावेत यासाठी आज पालकवर्ग धडपडताना दिसतो. त्यांच्या प्रयत्नात मुलांना रिकाम्या वेळात छंदवर्गात अडकून रहावं लागतं परिणामी मुलं गाण्याची स्पर्धा, नृत्य स्पर्धा यात बिझी होवून जातात परिणामी त्यांना वाचन करायलाच जर वेळ मिळत नसेल तर आवड निर्माण होण्याची आणि ती जोपासले जाण्याची शक्यता दूरच आहे.
शहरात वाढलेली अंतरं आणि त्यासोबतच मुलांचा शाळा आणि शिकवणीत जाणारा वेळ यातून त्यांना वाचायला मिळणारा वेळ कमी झालय. याप्रती असणारा दृष्टीकोण पालकांनी बदलला नाही तर वाचन संस्कृती टिकणार नाही. मुलांनी नेमकं काय वाचावं याचा आपण विचारपूर्वक आढावा घेऊन त्यांना तशी पुस्तकं उपलब्ध करुन द्यायला हवी. संस्कारक्षम वयात वाचनाचे संस्कार झालेच नाहीत तर पुढे त्याला याबाबत आस्थाही वाटणार नाही.
- प्रशांत दैठणकर