Friday, 21 October 2011

असंसर्गिय आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी विदर्भातील सहा जिल्ह्याची निवड - सुदीप बंदोपाध्याय


   महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक  जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा,  दि.21ऑक्टोंबर 2011
-----------------------------------------------------------------------------------------------
     
वर्धा,दि.21-बदलत्या जीवन शैलीमुळे देशातील अनेक लोकांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह, रक्तदाब व कर्करोगासारखे असंसर्गिय आजार बळावत असून या आजारावर नियंत्र व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी देशातील 21 राज्यामध्ये 100 जिल्ह्याची निवड करण्यात आली असून, यामध्ये विदर्भातील 6 जिल्ह्याची निवड करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री सुदीप बंदोपाध्याय यांनी दिली.
     असंसर्गजन्‍य आजारावर नियंत्रण व प्रतिबंधात्मक प्रभावी उपाय योजनेसाठी वर्धा जिल्ह्यासह भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती व वाशिम या जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. ही योजना प्रभावीपणे कार्यरत आहे अथवा नाही याची शहानिशा करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री बंदोपाध्याय आज येथील सामान्य रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली. तत्पूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कक्षाचे त्यांच्या हस्ते  उदघाटन केल्यानंतर आयोजित असलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
     यावेळी अतिरीक्त संचालक डॉ. एस.सी.गुप्ता, उपसंचालक डॉ. पवार, प्रभारी जिल्हाधिकारी संजय दैने, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर चन्ने, एन.पी.सी.डी.सी.एस.च्या सल्लागार डॉ. श्रीमती राणा, डॉ.आमले व डॉ. कठाणे आदी मान्यवर उपस्थित होते.                    केंद्र शासनाने गावपातळीवर अनेक आरोग्य अभियान यशस्वीपणे राबविण्यात येत असल्याचे सांगून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री बंदोपाध्याय म्हणाले की राष्ट्रीय असंसर्गिय रोग नियंत्रण कार्यक्रम गाव पातळीपर्यंत राबवून निरोगी राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला पाहीजे. हा कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हा सामान्य राग्णालयात आधुनिक यंत्रसामुग्री देण्यात आली असून, तज्ञ डॉक्टरांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या कार्यक्रमा अंतर्गत ग्रामीण आरोग्य केंद्रातील पारिचारीक व वैद्यकिय अधिका-यांना व परिचारीका यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी केन्द्र शासनाने पुरेशी तरतूद केली असून,  आगामी अर्थसंकल्पात अधिकची तरतूद केली जाईल असेही ते म्हणाले.
     यावेळी उपसंचालक डॉ. पवार, अतिरीक्त संचालक गुप्ता यांनीही मार्गदर्शन केले.
     प्रास्ताविक करताना जिल्हा शल्य चिकित्सक रावखंडे म्हणाल्या की असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात सेवा देण्यासाठी वैद्यकीय अधिका-यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.हा कार्यक्रम 1 ऑगस्ट 2011 पासून सामान्य रुग्णालयात कार्यान्वित झाला आहे. आरोग्य केंद्राना 161 ग्लूकोमीटरचे वितरण जिल्हा आरोग्य अधिका-यां मार्फत करण्यात आले असून वैद्यकिय अधिकारी व परिचारीका यांना प्रशिक्षण सुध्दा देण्यात आले आहे. या कार्यक्रमा अंतर्गत दाखल झालेल्या रुग्णांना संदर्भ सेवे करीता नागपूर येथे संदर्भित करण्यात येत असून पुरेसा मणुष्य बळासाठी पदे भरण्याची कार्यवाही सुरु असल्याचे त्या म्हणाल्या.      
यानंतर राज्यमंत्री बंदोपाध्याय यांनी रुग्णालयातील संपूर्ण रुग्ण कक्षाला भेट देवून पाहणी केली तसेच रुग्णासोबत चर्चा केली. त्यांनी नालवाडी येथे उपआरोग्य  केंद्राला भेट देवून असंसर्गिक रोग नियंत्र कार्यक्रमाबाबत वैद्यकिय अधिकारी, परिचारीका यांच्या कडून माहिती जाणून घेतली.
     या कार्यक्रमाचे संचलन डॉ. जयचंद मुन यांनी केले तर आभार जिल्हा आरोग्य अधिकारी राठोड यांनी मानले.
     या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी व सामान्य नागरिक उपस्थित होते.
                   000000

सेवाग्राम व पवनार आश्रमाला भेट


महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र. 575  जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा,  दि.21ऑक्टोंबर 2011
-----------------------------------------------------------------------------------------------
         
     वर्धा, दि. 21- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री सुदिप बंदोपाध्याय यांनी आज महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमातील बापुकुटीला भेट देवून आश्रमाचे अध्यक्ष मा.म.गडकरी यांच्याकडून माहिती जाणून घेतली तसेच त्यांनी महात्मा गांधीजीच्या स्मृतीचे दर्शन घेतले.
     नागपूरला जाताना पवनार येथील आचार्य विनोबा भावे यांच्या परमधाम आश्रमाला भेट देवून त्यांच्या समाधीचे दर्शन घेवून अभिवादन केले.
                     00000000

जिल्हा आदिवासी सुत गिरणीची मतदार यादी प्रसिध्दीची सुचना


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा,  दि.21ऑक्टोंबर 2011
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
            
     वर्धा, दि.21- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व महाराष्ट्र विनिर्दीष्ट सहकारी संस्थेच्या  समित्यावरील निवडणूका नियम 1971 मधील नियम 4 ते 5 नुसार रानी दुर्गावती वर्धा जिल्हा आदिवासी सहकारी सुत गिरणी मर्यादित येरला तहसिल हिंगणघाट जिल्हा वर्धा या विनिर्दीष्ट सहकारी संस्थेच्या  निवडणूकी करीता मतदारांच्या प्रारुप याद्या तयार करुन शुक्रवार दि. 21 ऑक्टोबर 2011 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.
या मतदार यादीची प्रत तपासणीसाठी जिल्हाधिकारी, वर्धा यांचे कार्यालय (निवडणूक विभाग), जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वर्धा यांचे कार्यालय, रानी दुर्गावती वर्धा जिल्हा आदिवासी सहकारी सुत गिरणी मर्यादित येरला तहसिल हिंगणघाट जिल्हा वर्धा या ठिकाणी उपलब्ध आहे.
     मतदार यादीमध्ये जर नावे समाविष्ट करावयाची असतील किंवा नावाबाबत हरकत, आक्षेप घ्यावयाचा असेल किंवा यादीमधील नोंदीबाबत फेरफार अथवा दुरुस्ती सुचवावयाची असेल तर तसा दावा किंवा आक्षेप जिल्हाधिकारी, वर्धा निवडणूक विभाग यांचेकडे शुक्रवार दिनांक 4 नोव्हेंबर 2011 पय्रंत लेखी सादर करावा. अथवा पोष्टाने पाठवावयाचा असल्यास तसा प्रत्येक दावा किंवा आक्षेप महाराष्ट्र सहकारी संस्थेचया समित्यावरील निवडणूक नियम 1971 च्या नियम 6 च्या तरतुदीनुसार दिनांक 4 नोव्हेंबर 2011 पर्यंत मिळेल अशा रितीने पाठवावा. यानंतर आलेला दावा किंवा आक्षेप विचारात घेतला जाणार नाही.तसेच मतदार यादीबाबत प्राप्त झालेल्या हक्क व आक्षेपांचा निपटारा करण्याची शेवटची तारीख शनिवार दि.19 नोव्‍हेंबर 2011 आहे. मतदार यादी अंतिमरित्या प्रसिध्दी दि.बुधवार दि. 30 नोव्हेंबर 2011 आहे.असे जिल्हाधिकारी,वर्धा यांनी कळविले आहे.
                          00000

Thursday, 20 October 2011

पोलीस हुतात्मा स्मृती दिना निमित्ताने आदरांजली


     महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक   जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा,  दि.21ऑक्टोंबर 2011
----------------------------------------------------------------------------------------------
           
वर्धा,दि.21- अखंड देशासाठी त्यागाची भावना ठेवून कर्तव्यावर असलेले देशातील अनेक जवान शहिद होत असतात. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा स्मृती दिन म्हणून पाळला जातो. आज सकाळी येथील  पोलीस मुख्यालयामध्ये हिंगणघाट येथील केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलातील शहीद झालेले जवान चंद्रशेखर यांचे पिता सुरेश कोरे आई गीता कोरे व पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांनी शहीद स्मृती स्तंभावर पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.
     याप्रसंगी  पोलीस उपअधिक्षक (गृह) एम.जी. नळे, पोलीस उपअधिक्षक मनोज पाटील, ठाणेदार बाबा डोंगरे, व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.
     शहिद स्मृतीला उजाळा देताना आपल्या भाषणात अविनाश कुमार म्हणाले की 21 ऑक्टोबर हा दिवस देशातील सर्व पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी यांचया दृष्टीने अत्यंत महत्वाचा व पवित्र असा दिवस समजला जातो. 21 ऑक्टोबर 1959 रोजी पोलीस दलातील 10 शिपाई लडाख हद्दीत भारत आणि तिबेट सिमेवर व 16 हजार फुट उंचीवर दोन हजार पाचशे मैलाच्या हॉटग्रीन या सिमेवर बर्फाच्छादीत अत्यंत निर्जन कडाक्याच्या थंडीत गस्त घालीत असताना धोकादायक पध्दतीने दबा धरुन बसलेल्या चिनी सैनिकाच्या हल्ल्यात शहिद झाले. या दिवसाची आठवण राहावी तसेच देशामध्ये आतंकी हल्ल्यात नक्षलवादी कार्यवाहीत, समाजकंटक व हिंसक कृत्ये करणा-या कडून कर्तव्यावर असलेल्या शहीद जवानाच्या स्मृतीला उजाळा देण्यात येतो. आपल्या मातृभुमीचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्र निष्ठा ठेवून अनेक जवान शहीद होत असतात त्यांना या दिवशी कृतज्ञतापर्णू स्मरण करण्यात येते तसेच त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करुन अभिवादन करण्यात येत असते असेही ते म्हणाले.
     यावेळी 21 पोलीसांनी हवेमध्ये तीन राऊंड फैरी झाडून शहिदांना मानवंदना दिली तसेच पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी शहीद स्मृती स्तंभावर पुष्प वाहून आदरांजली वाहीली व अभिवादन केले. याप्रसंगी 1 सप्टेंबर 2010 ते आगस्ट 2011 या दरम्यान देशातील शहीद झालेल्या जवानांचे नावाचे वाचन पोलीस उपनिरीक्षक यादव यांनी केले. शिस्तबध्द झालेल्या या कार्यक्रमाचे संचलन व आभार पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी केले.
                          00000
     

पालकमंत्री राजेंद्र मुळक यांचा दौरा


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा  दि.20 ऑक्टोंबर 2011
-----------------------------------------------------------------------            
                  
     वर्धा, दि.20- राज्याचे वित्त व नियोजन, उर्जा, जलसंपदा, संसदीय कार्य आणि उत्पादन शुल्क राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र मुळक यांचा वर्धा जिल्ह्याचा दौरा कार्यक्रम असा आहे.
     शुक्रवार दि. 21 ऑक्टोबर 2011 रोजी सकाळी 11.30 वाजता शासकीय वाहनाने केडीके कॉलेज येथून हिंगणघाट ,जि.वर्धा कडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता हिंगणघाट, जि. वर्धा येथे आगमन. दुपारी 12.30 ते 13.30 हिंगणघाट काँग्रेस कमिटी बैठकीस उपस्थिती. (स्थळ: लक्ष्मी मंगल कार्यालय, हिंगणघाट). दुपारी 13.30 वाजता हिंगणघाट येथून सिंदी, जि.वर्धाकडे प्रयाण. दुपारी 14 वाजता सिंदी, जि. वर्धा येथे आगमन. दुपारी 14 ते 15 सिंदी काँग्रेस कमिटी बैठकीस उपस्थिती. (स्थळ : विठ्ठल रुखमाई मंदीर, बाजार चौक, सिंदी). त्यानंतर दुपारी 15 वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.
                           0000

शिवाजीराव मोघे यांचा दौरा


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा  दि.20 ऑक्टोंबर 11
-----------------------------------------------------------------------            
                 
वर्धा, दि. 20- राज्याचे सामाजिक न्याय, विमुक्त भटक्या जमाती, इतर मागासवर्गीयांचे कल्याण व व्यसनमुक्ती कार्य मंत्री  तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा यांचा वर्धा जिल्हा दौरा असा आहे.
     सोमवार दि. 24 ऑक्टोंबर 2011 रोजी दुपारी 3 वाजता यवतमाळ येथून वर्धा येथे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे राखीव. त्यानंतर दुपारी 4 वाजता मा. मुख्यमंत्री यांचे समवेत मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहाच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. त्यानंतर सोयीनुसार यवतमाळकडे प्रयाण करतील.
                        0000

राज्यमंत्री रणजित कांबळे यांचा दौरा


     महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक  जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा  दि.20 ऑक्टोंबर 11
-----------------------------------------------------------------------            
            
      वर्धा,दि.20- राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता, पर्यटन, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री श्री. रणजित कांबळे यांचा वर्धा जिल्ह्याचा दौरा कार्यक्रम असा आहे.
      गुरुवार दि. 20 ऑक्टोबर 2011 रोजी सायंकाळी 6.30 वाजता  मुंबई येथून जेट एअरवेजच्या विमानाने नागपूर मार्गे वर्धा येथे आगमन , राखीव व मुक्काम.
      शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोंबर 2011 रोजी सकाळी     11 वाजता राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्त ग्राम अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा स्थळ पंचायत समिती सभागृह वर्धा. सकाळी 11.30 ते 3 वाजता वर्धा नगरपरिषद बाबत कार्यकर्त्यांशी चर्चा.(संदर्भ : किरण उरकांदे, अध्यक्ष, वर्धा जिल्हा काँगेस कमिटी) दुपारी 3 वाजता वर्धा येथे राखीव.त्यानंतर सायंकाळी वर्धा येथून शासकिय वाहनाने नागपूरकडे प्रयाण आणि  नागपूर येथे आगमन, रविभवन येथे राखीव व मुक्काम.
      शनिवार दिनांक 22 ऑक्टोंबर 2011 रोजी भंडारा येथून शासकीय वाहनाने सायंकाळी 5.30 वाजता वर्धा येथे आगमन,राखीव व मुक्काम.
रविवार दिनांक 23 ऑक्टोंबर 2011 रोजी यवतमाळ येथून वर्धा येथे आगमन, राखीव व मुक्काम.
     सोमवार दिनांक 24 ऑक्टोंबर 2011 रोजी दुपारी 3 वाजता मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणा-या कार्यक्रमास उपस्थिती. देवळी, जिल्हा वर्धा येथे मागासवर्गीय मुलांकरीता बांधण्यात आलेल्या वसतिगृहाचा लोकार्पण सोहळा. देवळी नगरपरिषद आणि महाराष्ट्र औद्योगिक वसाहत देवळी, जि. वर्धा येथील उद्योगांना पाणी पुरवठा करण्यासाठी योजनेचे भूमीपुजन. सर्वसाधारण रस्ते विकास अनुदानाअंतर्गत देवळी नगर परिषद, जि. वर्धा येथील विविध विकास कामांचे भुमीपूजन.स्थळ: देवळी,जि.वर्धा.त्यानंतर वर्धा येथे राखीव व मुक्काम.
मंगळवार दि. 25 आक्टोबर 2011 रोजी सकाळी 10 वाजता पवनार पाणी पुरवठा योजनेचे भुमीपूजन. सकाळी 11.30 वाजता सिंदी (आर) पाणी पुरवठा योजनेचे भूमीपुजन / प्राथमिक आरोग्य केंद्र भूमीपुजन. सांयकाळी 4 वाजता  कापसी तिर्थक्षेत्र विकास कामाचे भुमिपूजन. वर्धा येथे राखीव व मुक्काम.
000000

दूध ग्राहकांना सुचना


     महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक  जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.20 ऑक्टोंबर 11
---------------------------------------------------------------------------            
                  
      वर्धा, दि.20- शासकिय दूध योजना वर्धा मार्फत वर्धा व हिंगणघाट येथे 500 मि.ली. पिशवीतून दूध विक्री करण्यात येते. सध्या 500 मि.लि. पॉलीफिल्मचा साठा संपुष्ठात आल्याने हिंगणघाट व वर्धा येथे दूध ग्राहकांना 1000 मि.लि. पॉलीफिल्म मधून 500 मि.ली.दूधाचा पुरवठा करण्यात येईल. असे दुग्धशाळा व्यवस्थापक, शासकिय दूध योजना, वर्धा यांनी कळविले आहे.
                        000000

पोलिस हुतात्मा स्मृती दिन


     महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक  जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.20 ऑक्टोंबर 11
---------------------------------------------------------------------------            
                              
      वर्धा,दि.20- पोलिस मुख्यालय वर्धा येथे हुतात्मा स्मृती दिन कार्यक्रम शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे. पोलिस दलात कर्तव्य बजावताना शहीद झालेला पोलिस कर्मचा-यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी कवायत करुन स्मृती दिन दरवर्षी आयोजित करण्यात येत असतो.
      गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत वर्धा जिल्ह्यातील चंद्रशेखर कारे यांची आई गीता सुरेश कोरे व वडील सुरेश माधवराव कोरे यांच्या उपस्थित हा कार्यक्रम होणार आहे असे पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी कळविले आहे.

दिवाळी साजरी करताना पर्यावरणाचा विचार करा


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा      दि.20 ऑक्टोंबर 11
---------------------------------------------------------------------------------------------           
          
 वर्धा,दि.20-विद्यार्थ्यांसाठी दिवाळीचा सण जवळ आला आहे. लवकरच शाळांना सुटी लागणार आहे. सुटीत काय धमाल करावयाची याबाबत योजना तयार होत असतील. दिवाळी हा महाराष्ट्रातील महत्वाचा सण आहे. कोणताही सण म्हटला की, ती एक आनंदाची पर्वणीच असते. त्यात दिवाही म्हणजे मिठाई, फराळ, भेटवस्तु, किल्ले , रांगोळ्या, आकाश कंदिल, फटाके इ. गोष्टी आपल्या डोह्यासमोर येतात. त्यातही प्रामुख्याने दिवाळी म्हणजे मुलांसाठी फटाक्यांचेच जास्त आकर्षण वाटते. तथापि, फटाके तयार करण्यामागील पार्श्वभूमी व फटाक्याच्या आतिषबाजीमुळे होणारे दुष्परिणाम याची फारच थोड्या जणांना माहिती आहे.
फटाके मुलांकडून असुरक्षित परिस्थितीत दिवसरात्र मेहनतीने तयार करवुन घेतले जातात. आपल्या मौजेसाठी त्यांनी विषारी वातावरणात काम करुन त्यांचे जीवन धोक्यात घालावे असे आपणास वाटते का ?
फटाके उडविल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदुषण होते. फटाक्यांचा
 अवाजामुळे लहान मुलांच्या श्रवण शक्तीवर परिणाम होतो. तसेच त्यामुळे भावनिक व मानसिक ताण वाढवून सर्वांना विशेषत: वृध्द व आजारी व्यक्तींना त्रास होतो तरीही आपण मोठ्या प्रमाणावर फटाके उडवावेत असे आपणांस वाटते का ?
        फटाके उडविल्यानंतर त्यामधुन विषारी वायु उत्सर्जित होवुन दृष्टीदोष, दमा,लजी, हृदयरोग, फुफ्फुसाचा कर्करोग इ. रोगांना आमंत्रण मिळते. तसेच त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हवेचे प्रदुषण होते हे प्रदुषण आपण टाळु शकतो का ?
फटाके बनविण्यासाठी मुख्यत्वे कागदाचा वापर होतो व कागदाच्या निर्मितीसाठी वृक्षतोड करण्यात येते. अशा रितीने केवळ आपल्या हौसेसाठी आपण पर्यावरणाचा विनाश करणे योग्य आहे का ?
      विद्यार्थ्यांनी सर्व बाबींचा विचार करा, मिठाई, आवडीची पुस्तके, किल्ले, रांगोळ्या, आकाश कंदिल, भेटवस्तु  आदींच्या  सहाय्याने दिवाळी साजरी करावयाची का फटाके उडवुन ? तुमचे तुम्हीच ठरावा ! गरज भासल्यास पर्यावरणपुरक व सुरक्षित दिवाळी बद्दल आई बाबांकडे हट्टही धरा.
      फटाक्यावर बंदी, जीवन आनंदी !
                                 00000

गरज वैज्ञानिक विचारांची




            विज्ञान आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. असं असून देखील आपण विज्ञानाबाबत सजग नाहीत. एकाच वेळी 18 व्या आणि 21 व्या शतकातला आपला देश. चांद्र्यान बघायला आम्ही बैलगाडीतून जातो. जगात एक महासत्ता म्हणून उभं राहण्यासाठी विज्ञानाप्रती जाणीवा बदलण्याची वेळ आली आहे.                                                  -    प्रशांत दैठणकर

        आज आपण धावपळीच्या युगात आहोत आणि आपल्या आसपास यंत्रांचा गराडा पडला आहे. केवळ असा गराडा नव्हे तर ही यंत्र आज आमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनली आहेत. मोबाईल असो की मोटारसायकल या सर्वांनी आपलं आयुष्य सहज बनवलं आहे. गुहेतला तो आदीमानव आजचा मानव या वाटचालीत विज्ञानाचा मोठा वाटा आहे. विज्ञानात ही यंत्र घडवली आणि मानववंशाची प्रगती शक्य झाली असच म्हणता येईल.
            गुहेत थंडीचा मुकाबला करताना दगडांच्या घर्षणानं जी ठिणगी पडली ती विज्ञानाचीही पहिली ठिणगी होती त्यानंतर मानवानं चाकाचा शोध लावला हे चाक आज प्रगतीचं चाक आहे. या प्रगतीच्या विज्ञान चक्राबाबत आपण कुतूहल ठेवावं त्याचा अभ्यास करावा हे अपेक्षित आहे. एकदा शोध लागला ते चाक पुन्हा नव्यानं शोधण्याची गरज नाही हे देखील स्पष्टच आहे.
            भारतात वैज्ञानिकांची मोठी परंपरा राहीलेली आहे. कणाद असो की आर्यभट्‌ट यांनी आपल्या संशोधनांनी जगाला आगळी दिशा दिली आहे. सर्वात प्राचीन सभ्यता म्हणून भारताचा जसा आपल्याला अभिमान आहे तसाच अभिमान विज्ञानाबद्दल हवा. आपल्या मुलांना डॉक्टर आणि इंजिनिअर बनवण्याची स्वप्नं बघणारे पालक    विज्ञानाबाबत जागरुक आहे का ?  या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आहे.
एखादं खेळणं आणून दिल्यावर त्याची रचना कशी आहे अशा कुतुहलापोटी ते लहान बालक त्या खेळण्याचं` डिसेक्शन `       करुन बघतं त्यावेळी त्याचं कुतुहल किती जणांना दिसतं ?खेळणं तोडलं म्हणून पुन्हा `खेळणं आणणार नाही तुला` असं  धमकावणा-या पालकांची संख्या दुर्दैवानं अधिक आहे. त्याच्या या कुतुहलातूनच त्याचा वैज्ञानिक दृष्टीकोण लक्षात येवू शकतो आणि त्यातून त्याला आवड निर्माण झाली तरच इंजिनिअरिंग अथवा मेडिकलचं शिवधनुष्य त्याला पेलता येणं शक्य होईल हे आपण ध्यानी घ्यावं.                                                                 
                         विमान आकाशात कसं  तरंगतं ?, पक्षी उडू शकतात तर आपण का नाही ? रेडिओत छोट्याशा जागेत माणूस कुठे बसत असेल ? टि.व्ही.त दिसणारे चेहरे टिव्हीच्या मागे उभे असतात का ? हे सारे प्रश्न आपणास बालपणी पडले होतेच ना पण आपल्या पाल्यानं तोच प्रश्न विचारला तर त्याला विमानतळावर नेणारे किंवा रेडिओ स्टेशनवर घेऊन जाणारे किती असतात ?  त्यांना बावळटपणाचे प्रश्न म्हणून झटकलं तर मुल देखील पुढच्यावेळी भितीपोटी कुतुहल दाबून टाकतो आणि आपणच सोपी गोष्ट अवघड करुन टाकतो.
            कुतूहल ही वैज्ञानिक दृष्टीकोणाची पहिली पायरी असते त्याची उकल झाल्यावर पुन्हा कुतूहल निर्माण होणं ही पुढच्या प्रवासाची सुरुवात असते. यात आपणच ठरवायचं की जबाबदार पालक व्हायचं की मुलांवर जबाबदारी ढकलायची  ? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
            विज्ञानाच्या कक्षा आता खूप रुंदावल्या आहेत. अंतराळ विज्ञान, हवाई विज्ञान, समुद्री विज्ञान, वैद्यक शाखा, यांत्रिक शाखा, रसायन विज्ञान, भौतिक विज्ञान तसेच विज्ञान-तंत्रज्ञान, जीव विज्ञान अशा अनेक शाखा आहेत आणि प्रत्येक शाखा वेगळा अभ्यास आणि अनुभूती तसेच आनंद देणारी पण तिथवर मुलांना नेता 100 मार्कांचा विषय या संकुचित दृष्टीकोणातून आपण पाल्याचं क्षेत्र मर्यादीत करत तर नाही ना ? असं प्रत्येकानं स्वत:ला विचारावं.
            विख्यात अणूशास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम हे विज्ञानाचा अभ्यास करुनच देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले असं ठसठशीत उदाहरण समोर असतानाही भारतीयांनी विज्ञानाकडे डोळसपणे बघितलं नाही असं दुर्दैवानं म्हणावं लागतं एकीकडे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात मनुष्यबळ अपुरं पडतय आणि दुसरीकडे बेरोजगारांच्या रांगा हटत नाहीत अशी परिस्थिती आहे.
            देशाचं पहिलं चांद्रयान उडणार आहे हे पाहण्यासाठी आपला देश अभिमानानं बैलगाडीतून जातोय इतका मोठा विरोधाभास आहे. आम्ही आजही एकाचवेळी 18 व्या आणि 21 व्या शतकात जगतोय कारण आमची विज्ञानाबाबत अनास्था हेच आहे.
            अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपान सारख्या देशात जी संपन्नता आली ती निश्चितपणे त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोणामुळे आली आहे आणि आपल्यालाही प्रगत आणि संपन्न व्हायचय, जगातील एक महाशक्ती व्हायचंय तर आपणही या विज्ञानाची कास धरणं आवश्यक आहे.                                - प्रशांत दैठणकर