वर्धा,दि.2-विदर्भ विकास कार्यक्रमा अंतर्गत या वर्षात मध्ये जिल्ह्यातील शेतक-यांसाठी शेतीपुरक व्यवसाय करण्याकरीता कौशल्य वृध्दी संदर्भात प्रशिक्षण देवून शेतातील उत्पादकता वाढविण्याचे उद्दिष्ट विचारात घेवुन कौशल्य विकास प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यात राबविण्यात येणा-या 75 शेतीशाळेच्या माध्यमातुन प्रत्यक्ष शेतक-यांचे शेतावर प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यातुन शेतक-यांना शेतीपुरक व्यवसायाचे कौशल्य शिकावयाचे आहे. सदर कार्यक्रम राबविण्याचे अनुषंगाने दिनांक 30 नोव्हेंबर 2011 रोजी विकास भवन वर्धा येथील कृषि विभाग, पशुसंवर्धन विभाग, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय,रेशीम विकास, कृषि समृध्दी, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, सामाजिक वनीकरण इत्यादी संलग्न विभागात क्षेत्रीय स्तरावर काम करणारे अधिकारी व कर्मचा-यांची कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. कार्यशाळेला कृषि व संलग्न विभागाचे 235 अधिकारी व कर्मचारी तथा विविध कृषि पुरक व्यवसायात तज्ञ असणारे 22 शेतकरी उपस्थित होते.
कार्यशाळेचे उदघाटन अप्पर जिल्हाधिकारी भागवत यांनी दिप प्रज्वलन व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पुजन करुन केले. प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी केले.
योजनेबाबत व आयोजित करावयाच्या शेती शाळेबाबत सादरीकरण केले. त्यांनतर भागवत यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन केले. यावेळी सर्व संलग्न विभागाने कौशल्य विकास व शेतीशाळा बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी प्रत्यक्ष कोशल्य आधारीत शेतीशाळा कशा आयोजीत करावयाच्या याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रत्येक विभागानी शेतीशाळा आयोजनाचे नियेाजन करुन कार्यक्रम सादर केला. त्याप्रमाणे 2011-12 मध्ये जिल्ह्यात कृषि विभागा मार्फत 40, पशुसंवर्धन विभागाच्या 12, दुग्धव्यवसाय 10, रेशीम उद्योग 2, सामाजिक वनीकरण 2, शेतीशाळा घेण्याचे निश्चित करण्यात आले. उर्वरीत 9 शेतीशाळेत मत्स्य उत्पादन, मधुमक्षीका पालन, ठिंबक सिंचन संच देखभाल दुरुस्ती, कृषि अवजारे देखभाल दुरुस्ती घेण्याचे नियेाजन संबंधीत विभागाकडून करण्याचे ठरले. कार्यक्रमाचे संचालन व आभार संतोश डाबरे यांनी केले.
00000