* पोळ्यातील बैलजोडी सजावट स्पर्धेतील शेतक-यांना बक्षीस
* रोठा येथील ऐतिहासीक देवस्थानाला पर्यटनाचा दर्जा
* गावांना जोडणा-या रस्त्यांची प्राधान्याने दुरुस्ती
वर्धा, दि. 14- ग्रामीण भागात पोळ्यासह विविध उत्सव व सणांच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृती व परंपरा जोपासण्याचे काम होत असून, ही परंपरा कायम ठेवण्यासाठी स्वंयसेवी संस्थांच्या माध्यमातून विविध उपक्रम आयोजीत करावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम व पाणी पुरवठा विभागाचे राज्यमंत्री रणजित कांबळे यांनी कले.
रोठा येथे पोळ्या निमित्त शेतक-यांसाठी आयोजित सुदृढ बैलजोडी व बैलांच्या सजावटीसाठी विविध पुरस्कारांचे वितरण केले. त्याप्रसंगी आयेाजीत कार्यक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ज्ञानेश्वराव ढगे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सभापती धैर्यशिलराव जगताप, वर्धा लायन्स क्लबचे अनिल मिश्रा, सरपंच डॉ. विजय चौधरी, छोटू चांदूरकर, विजय नरांजे, दिनकरराव लोखंडे,श्रीमती हेमलता मेघे आदी उपस्थित होते.
नागरीकरण मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे ग्रामीण भागातील सण व उत्सवाची परंपरा कमी होत असल्याचे सांगताना राज्यमंत्री रणजित कांबळे म्हणाले की, पोळ्यानिमीत्त वर्षभर शेतक-यांसोबत शेतीवर राबणा-या बैलांची आपण पुजा करतो तसेच गायीसह पशुधनाचेही आपण पुजन करतो. शेती व शेतीवर राबणारा कष्टकरी समृध्द व्हावा तसेच ग्रामीण भागातील संस्कृतीचे संवर्धन व्हावे यासाठी बैलजोडी सजावट स्पर्धासारखे विविध उपक्रम राबवावे. अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली. रानूमाता देवस्थानला पर्यटनाचा दर्जा
वर्धा जिल्ह्यातील रोठा येथील सुप्रसिध्द रानूमाता मंदीराच्या विकासाला प्राधान्य देण्यात येणार असून येथे येणा-या यात्रेकरुंना मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी क वर्ग पर्यटनाचा दर्जा देण्यात येईल. तसेच जिल्हा नियेाजन विकास निधीमधून या देवस्थानाचा विकास करण्यात येईल अशी घेाषणाही रणजित कांबळे यांनी केली.
रोठा ही ग्रामपंचायत 1960 मध्ये स्थापन झाली असून, ग्रामपंचायतीची ईमारत जिर्ण झाल्यामुळे नवीन ग्रामपंचायत इमारत बांधणे, नागठाणा ते सिंदी मेघे तसेच वायफळ पर्यंतचा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात येईल. पावसामुळे अंतर्गत खराब झालेल्या रस्त्यांची कामेही प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल. अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री रणजित कांबळे यांनी केली.
जिल्हा परिषद अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे यांनी वर्धा जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याचे पाण्यासह रस्ते विकासाला प्राधान्य दिल्यामुळे जिल्ह्याचा सर्वांगीन विकास झाला आहे.
लायन्स, लॉयनेस लिओ क्लब यांच्या वतीने रोठा येथे पोळ्याच्या दिवशी शेतक-यांसाठी सुदृढ बैलजोडी व बैलजोडी सजावट स्पर्धा आयेाजीत करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये गावातील मोठ्या संख्येने शेतकरी कुटूंब सहभागी झाले होते. स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या हरीभाऊ एकनाथ सावळे या शेतक-यांचा शाल, श्रीफळ भेट वस्तू तसेच बैलांच्या गळ्यातील आकर्षक घंट्याची माळा राज्यमंत्री रणजित कांबळे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आल्या.
बैलजोडी सजावट स्पर्धेमध्ये व्दितीय क्रमांक रामभाऊ सावळे, तृतीय महादेव लक्ष्मण जांभुळकर तसेच दिलीप गाडगे, नारायण पुरषोत्तम ढगे, महादेवराव पिटकुले, नरेंद्र काळे, या शेतक-यांनाही त्यांच्या बैलजोड्यासाठी केलेल्या उत्कृष्ट सजावटीसाठी शाल,श्रीफळ, भेट वस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. परिक्षक म्हणून दिनकरराव लोखंडे यांनी काम बघितले.
प्रारंभी लायन्स क्लबचे अनिल मिश्रा यांनी प्रासताविकात स्पर्धा आयोजनाची भुमीका सांगितली. सरपंच डॉ. विजय चौधरी यांनी स्वागत करुन ऐतिहासीक रानुमाता देवस्थानला पर्यटनाचा दर्जा, ग्रामपंचायत भवन, गावात सिमेंट रस्ते, तसेच नागठाणा येथील रस्त्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली.
यावेळी हेमलता मेघे, महंमद अक्तार कुरैशी, श्रीमती गौतमी मेश्राम, अंजुभाऊ वरडकर, महेन्द्र तेलरांधे, हरीष वाघ, मनिश गंगमवार, ग्रामसेवक संदीप भोसले, अक्तर कुरैशी आदी उपस्थित होते.
0000