Friday 23 December 2011

विस्‍तार अधिकारी पदासाठी मुलाखत


   वर्धा, दि. 23- जिल्‍हा परिषद, वर्धा अंतर्गत विस्‍तार अधिकारी (शिक्षण) वर्ग तीन आणि श्रेणी दोन या पदासाठी दिनांक 6 जून 2010 रोजी घेण्‍यात आलेल्‍या लेखी परीक्षेमधून उत्‍तीर्ण झालेल्‍या व मुलाखतीस पात्र ठरलेल्‍या उमेदवारांच्‍या मुलाखती मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा परिषद, वर्धा यांचे कार्यालयात दिनांक 5 जानेवारी 2012 रोजी सकाळी 10 वाजता घेण्‍यात येणार आहे.
     तरी पात्र उमेदवारांना सदर मुलाखतीची स्‍वतंत्ररित्‍या मुलाखत पत्र पोष्‍टाचे प्रमाण पत्राव्‍दारे पाठविण्‍यात आलेली आहेत याची पात्र उमेदवारांनी नोंद घ्‍यावी. असे सचिव, जिल्‍हा निवड समिती तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्‍हा परिषद, वर्धा यांनी कळविले आहे.
                      00000

शेतक-यांना मदत वाटपाची सुचना


 वर्धा,दि.23-जिल्‍ह्यात सर्व शेतक-यांना सुचित करण्‍यात येते की, मागील जानेवारी 2011 पासुन जिल्‍ह्यात कृषि विभागा मार्फत जुलै 2008 ते ऑक्‍टोंबर 2010 या कालावधीत झालेल्‍या  नैसर्गीक आपत्‍तीमुळे पिकांचे नुकसान झाले अशा 50 टक्‍के चे वर नुकसान झालेल्‍या क्षेत्राला मदत वाटपाची कार्यवाही सुरु आहे. जुलै 2008 ते ऑक्‍टोंबर नोव्‍हेंबर 2010 या कालावधीत नैसर्गीक आपत्‍तीमुळे 57074.18 हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे 50 टक्‍के चे वर नुकसान झाले त्‍या करीता रुपये 27.26 कोटी रुपयाची वाटपा करीता आवश्‍यकता असताना शासनाकडून आतापर्यंत जिल्‍ह्याला वाटपा करीता रुपये 26.31 कोटी रुपये प्राप्‍त झालेत व प्राप्‍त  रक्‍कमेपैकी दिनांक 15 डिसेंबर 2011 पर्यंत रुपये 23.83 कोटी मदत निधीचे वाटप 144723 शेतक-यांना झाले आहे. प्राप्‍त निधीपैकी अजुनही जवळपास रुपये 2.48 कोटी निधीचे वाटप होणे बाकी आहे. 
      ब-याचशा शेतक-यांची जमीन गावात असते परंतु शेतकरी शहरात राहत असल्‍यामुळे त्‍यांच्‍याशी संपर्क न झाल्‍यामुळे त्‍यांचे बँक खाते क्रमांक संबंधित तालुका कृषि अधिकारी यांना न मिळाल्‍यामुळे नुकसान भरपाईची रक्‍कम त्‍यांचे बँक खात्‍यात जमा करता आली नाही किंवा काही शेतक-यांनी त्‍यांचे बँक खाते क्रमांक तालुका कृषि अधिकारी कार्यालयास दिले परंतु मागील बरेच वर्षापासून त्‍या खात्‍यात व्‍यवहार होत नसल्‍यामुळे खाते रद्द झाल्‍याचे निदर्शनास आले आहे. त्‍यामुळे मोठी रक्‍कम वाटपा अभावी शिल्‍लक आहे.
     जिल्‍ह्यातील सर्व शेतक-यांना आवाहन करण्‍यात येते की ज्‍या शेतक-यांच्‍या शेती पिकाचे जुलै 2008 ते ऑक्‍टोंबर नोव्‍हेंबर 2010 या कालावधीत 50 टक्‍के चे वर नुकसान झाले व ज्‍यांची नांवे सर्व्हेक्षण अहवाल आहे अशा शेतक-यांनी तात्‍काळ नजिकच्‍या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी किंवा गावच्‍या कृषि सहाय्यकाशी दिनांक 31 डिसेंबर 2011 पर्यंत संपर्क करुन आपले बँक खाते पासबुक दाखवुन खाते नंबर नोंद करावा म्‍हणजे त्‍यांचे खात्‍यात नुकसान भरपाईची रक्‍कम जमा करता येईल.दि. 31 डिसेंबर 2011 पर्यंत राहिलेले वाटप पुर्ण करुन शिल्‍लक राहणारी रक्‍कम शासनास परत करण्‍यात येईल. त्‍यानंतर येणा-या शेतक-यांचा हक्‍क राहणार नाही याची नोंद घ्‍यावी. असे आवाहन जिल्‍हा अधीक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी केले आहे.

Thursday 22 December 2011

रस्‍ते अपघातांची आपत्‍ती ....!

वाहनांचा अपघात ही मानव निर्मित आपत्‍ती आहे. छोट्या बाबी आपण लक्षात घेतल्‍या आणि त्‍यावर अंमलबजावणी सुरु केली तर अपघातांचे प्रमाण निश्चितपणे कमी करु शकतो.                        
आपल्‍या आसपासच्‍या परिसरात कोणकोणत्‍या प्रकारची आपत्‍ती येवू शकते याप्रती आपण सजग राहणे तसेच आपण त्‍या आपत्‍तीतून सुटका करुन घेण्‍याची पूर्वतयारी करणे त्‍याचा सराव करणे व आलेल्‍या आपत्‍तीत प्रत्‍यक्ष काम करणे म्‍हणजे आपत्‍ती व्‍यवस्‍थापन होय.
     काही आपत्‍ती आपण टाळू शकतो याची जाणीव आपणास हवी रस्‍त्‍यांवर होणारे अपघात आणि त्‍यात होणारी प्राण व वित्‍तहानी टाळता येते. यासाठी आपण वाहन सुस्थितीत आहे की नाही याची मुळात तपासणी धरुन निघतानाच करावी. वाहनाला ब्रेक व्‍यवस्थित आहे याची खात्री केल्‍याशिवाय वाहन रस्‍त्‍यावर नेऊ नये.
     रस्‍त्‍यावर चारचाकी वाहनात असाल तर आपण सिटबेल्‍ट जरुर लावला पाहिजे. चुकून अपघात झाल्‍याच्‍या  स्थितीत आपल्‍या सुरक्षिततेसाठी ते आवश्‍यक असते. दुचाकी वाहनातही आपण ब्रेक-इंडीकेटर यांची तपासणी व सुयोग्‍य वापर याकडे लक्ष द्यायला हवे. दुचाकी वाहन धारकांनी हेल्‍मेट जरुन वापरावे. यामुळे अपघाताच्‍या स्थितीत प्राणहानीचा धोका टळतो.
     अपघाताला मुख्‍यत्‍वे मानवी चुकाच कारणीभूत ठरत असतात. यात चुकीच्‍या पध्‍दती ओव्‍हरटेक करणे, इंडीकेटर न दाखवता वाहन अचानक वळविणे या खेरीज अति गतीने वाहन चालविणे ही अपघातांची मुख्‍य कारणे आहेत. वाहनाच्‍या  गतीमुळे झालेल्‍या अपघातांचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे.
     वळणे असलेल्‍या रस्‍त्‍यावर वेगात वाहन वळते त्‍यावेळी ते दुस-या बाजूला ओढले जाते. जितकी गती अधिक तितके ओढले जाण्‍याचे प्रमाण अधिक त्‍यामुळे घाटांमध्‍ये अनेकदा अपघात होतात.
     छोट्या छोट्या बाबींमधून आपण अपघाताची ही आपत्‍ती दूर ठेवू शकतो आणि आपण ती ठेवायलाच पाहिजे.
                                     - प्रशांत दैठणकर

26 रोजी राष्‍ट्रीय ग्राहक दिन


     वर्धा,दि.22-शासन व ग्राहक चळवळीतील संघटना यांचे संयुक्‍त विद्यमाने दि. 26 डिसेंबर 2011 रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय,वर्धा येथे राष्‍ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम आयोजीत करण्‍यात आला आहे.
    कार्यक्रमाचे अध्‍यक्ष जिल्‍हाधिकारी जयश्री भोज असून, प्रमुख अतिथी म्‍हणून अपर जिल्‍हाधिकारी संजय भागवत, जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्‍यक्ष आर.बी.सोमानी, जिल्‍हा पुरवठा अधिकारी आर.ए.अनभोरे, उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक, तसेच प्रमुख वक्‍ते म्‍हणून नागपूर विद्यापिठाचे विधी शाखा अधिष्‍ठाता अशोक पावडे, अखिल भारतीय ग्राहक कल्‍याण  परिषदेचे विदर्भ शाखेचे सचिव अजय भोयर हे मार्गदर्शन करणार आहेत.
     या काकर्यक्रमास बहुसंख्‍येने जनतेने उपस्थित राहण्‍याचे आवाहन तहसिलदार सुशांत बनसोडे, अखिल भारतीय ग्राहक कल्‍याण परिषदेचे अध्‍यक्ष उशा फाले आणि तालुका ग्राहक पंचायतचे अध्‍यक्ष शिवचरण मिश्रा यांनी केले आहे.
                            00000 

डायल 102



      खास दूरध्‍वनी क्रमांक आपणास हमखास पाठ होतात. जसं पोलिसांना दूरध्‍वनी लावायचा तर 100 हा क्रमांक आहे आणि अग्‍नीशामक दलाचा 101 तसा आता पुढील काळात 102 हा क्रमांक गरोदर माता आणि नवजात बालकांचे आरोग्‍य यासाठी कायमस्‍वरुपी व 24 तास सेवेत उपलब्‍ध राहणार आहे.त्‍याबाबत माहिती देणारा हा लेख.                  - प्रशांत दैठणकर                                                         

     शासनाने गर्भवतींचे मृत्‍यू राखण्‍यासाठी तसेच जन्‍मलेल्‍या बालकांना सदृढपणा यावा ते आजारी होवू नयेत. आजारी पडल्‍यास पूर्ण शासनखर्चाने त्‍यांची काळजी घेता यावी याकरिता जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत खास दूरध्‍वनी क्रमांक उपलब्‍ध करुन देण्‍यात आला आहे.
     या कार्यक्रमात गरोदर स्त्रियांना प्रसूती साठी तसेच 30 दिवसांपर्यंतच्‍या नवजात आजारी बालकांना मोफत आरोग्‍य सेवा पुरवणे असे ध्‍येय्य ठेवलेले आहे.
     गरोदरपणात, बाळंतपणात व प्रसुती पश्‍चात 42 दिवसांपर्यंत सेवा देण्‍यात येईल. सामान्‍य प्रसुतीसाठी 3 दिवस शस्‍त्रक्रियेव्‍दारे बाळंतपण झाल्‍यास सात दिवसापर्यंत मोफत आहार देण्‍यात येईल. घरापासून प्राथमिक आरोग्‍य केंद्र किंवा शासकीय रुग्‍णालयापर्यंत संदर्भ सेवेसाठी जाण्‍यासाठी तसेच प्राथमिक आरोग्‍य केंद्र शासकिय
रुग्‍णालयातून घरी परत जाण्‍यासाठी मोफत वाहन व्‍यवस्‍था करण्‍यात येईल. मोफत प्रयोगशाळा तपासण्‍या, रक्‍त पुरवठा व औषधोपचार करण्‍यात येईल. कोणत्‍याही सेवेचे शुल्‍क आकारले जाणार नाही अशी यात सोय आहे.
      30 दिवसापर्यंतच्‍या जनवजात आजारी बालकांसाठी मोफत औषधोपचार करण्‍यात येईल. घरापासून प्राथमिक आरोग्‍य केंद्र किंवा शासकिय रुग्‍णालयापर्यंत, संदर्भ सेवेसाठी प्राथमिक आरोग्‍य केंद्र किंवा शासकिय रुग्‍णालयापर्यंत जाण्‍यासाठी तसेच रुग्‍णालयातून घरी परत जाण्‍यासाठी मोफत वाहन व्‍यवस्‍था करण्‍यात येईल, तसेच रक्‍त पुरवठा व प्रयोगशाळा तपासण्‍या, औषधोपचार मोफत करण्‍यात येतील.
     गरोदर माता व नवजात अर्भकांच्‍या तपासण्‍या, उपचार व आहार इतयादी सेवा पूर्णपणे मोफत देण्‍यात येईल. ज्‍यामुळे बाल मृत्‍यू व माता मृत्‍यू कमी होण्‍यास मदत होईल. जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय, वर्धा येथे 24 तास सेवा देण्‍यासाठी कॉल सेंटर सुरु करण्‍यात आले असून त्‍याचा टोल फ्री क्रमांक 102 किंवा (07152)245198 असा आहे. या क्रमांकावर कोणीही कितीही वाजता तात्‍काळ प्रसंगी फक्‍त बाळंतपणाच्‍या माता व अति आजारी बालकांकरीता संपर्क करु शकतात. संपर्क करणा-यांनी पूर्ण नांव, पत्‍ता व जवळची खूण सांगितल्‍यानंतर जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयाकडून तेथून जवळ असणा-या रुग्‍णालयाची रुग्‍णवाहिका पाठविण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात येईल. या कार्यक्रमामुळे प्रत्‍येक बालकाची आणि त्‍याच्‍या मातेची अखंड काळजी घेतली जाणार आहे. त्‍यासाठी हा `डायल 102`  लक्षात ठेवायचा इतकच.
-         प्रशांत दैठणकर

पेन्‍शन अदालत


     वर्धा, दि. 22- भारतीय डाक विभाग, वर्धा व्‍दारा दि. 31 डिसेंबर 2011 रोजी सकाळी 11 वाजता अधिक्षक, डाकघर कार्यालयामध्‍ये पेन्‍शन अदालत आयोजित करण्‍यात आली आहे.

     पेन्‍शन संबंधीच्‍या ज्‍या तक्रारीचे निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्‍तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची या पेन्‍शन अदालत मध्‍ये दखल घेतल्‍या जाईल. तक्रारीचा  उल्‍लेख सर्व तपशीलासह केलेला असावा.

     संबधितांनी पेन्‍शन बाबतची आपली तक्रार अधिक्षक, डाकघर, वर्धा यांचे नांवे दिनांक 28 डिसेंबर 2011 अथवा तत्‍पूर्वी पोहचेल अशा बेताने पाठवावी. तदनंतर आलेल्‍या  तक्रारीचा विचार केला जाणार नाही. तक्रारकर्त्‍यांना पेन्‍शन अदालतीसाठी स्‍वःखर्चाने उपस्थित राहावे लागेल. असे अधिक्षक, डाकघर, वर्धा यांनी कळविले आहे.

उद्योग मित्र समिती सभा


वर्धा, दि. 22- राज्‍यस्‍तरीय उद्योग मित्र समितीची बैठक दिनांक 7 जानेवारी 2012 रोजी दुपारी 2 वाजता बाबुभाई चिनाय कमिटी रुम, 2 रा मजला, इंडियन मर्चंट चेंबर, आय.एम.सी. मार्ग, चर्चगेट, मुंबई  येथे विकास आयुक्‍त (उद्योग) तथा अध्‍यक्ष, उद्योग मित्र यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आयोजित करण्‍यात आली आहे.
या बैठकीस राज्‍यस्‍तरीय  महामंडळाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व शासनाचे वरीष्‍ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
 उद्योजकांना आणि संघटनांना बैठकीच्‍या कार्यसुचीवर घ्‍यावयाचे प्रश्‍न व त्‍याची परिपूर्ण माहिती शेखर नाईक, निमंत्रक, उद्योग मित्र यांचे नावे उद्योग संचालनालय, नवीन प्रशासन भवन, दुसरा मजला, मंत्रालयासमोर मुंबई (दूरध्‍वनी क्र.022-22026755 किंवा फॅक्‍स क्र. 022-22026826 ई-मेल diumitra@maharashtra.gov.in   येथे दिनांक 26 डिसेंबर 2011 पर्यंत कार्यालयास पोहचेल अश्‍यारीतीने पाठविण्‍यात यावी. या तारखेपर्यंत प्राप्‍त होणा-या प्रश्‍नांचा समावेश कार्यसुचीवर होईल याची नोंद घेण्‍यात यावी.
     अधिक माहितीसाठी वा.दौ.देसले, उद्योग उपसंचालक, (उमि) यांचेशी दुरध्‍वनी क्र.022-22044107 वर संपर्क साधावा.असे महाव्‍यवस्‍थापक, जिल्‍हा उद्योग केंद्र,वर्धा यांनी प्रसिध्‍दी पत्रकाव्‍दारे कळविले आहे.

राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान अंतर्गत प्रशिक्षण

वर्धा,दि.22- राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान अंतर्गत उपविभागीय कृषि अधिकारी, वर्धा यांचे मार्फत  वर्धा, सेलू, देवळी तालुक्‍यातील शेडनेट हाऊस धारक शेतक-यांना  पूणे येथे आयोजित किसान प्रदर्शनीला भेट देण्‍यासाठी रवाना झाले असून, त्‍यांना  अत्‍याधुनिक तंत्रज्ञान, सुधारित औजारे, विविध पिक पध्‍दती, नाविन्‍यपूर्ण उपक्रम, सिंचनाच्‍या विविध पध्‍दती, नविन संशोधित वाण  याविषयी माहिती मिळणार आहे.
 शेतक-यांना पाच दिवसाचे राज्‍यांतर्गत उच्‍च तंत्रज्ञानाचे  प्रशिक्षण केंद्र तळेगांव (दाभाडे) जि. पूणे येथे प्रशिक्षण मिळणार आहे.
प्रशिक्षणामध्‍ये शेडनेट हाऊस व पॉली हाऊस मधील भाजीपाला काकडी, कारली, ढोबळी मिरची, ब्रोकोली व फुले जर्बेरा, कार्नेशियम, निशिगंध, गुलाब याविषयावर अत्‍याधुनिक प्रशिक्षण, लागवड तंत्रज्ञान व किड रोग व्‍यवस्‍थापन , एकात्मिक अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, फळाफुलांचे काढणी पश्‍चात तंत्रज्ञान ग्रेडींग व पॅकींग व विक्री व्‍यवस्‍था  इत्‍यादी विषयावर सविस्‍तर मार्गदर्शन शेतक-यांना मिळणार आहे. शेतक-यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केल्‍यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाव्‍दारे कृषि क्षेत्रात कमी पाण्‍यात गट समुहाने फळपिकाचे उत्‍पादन करुन चांगली विक्री व्‍यवस्‍था निर्माण करणे व एकंदरीत उत्‍पादन व उत्‍पन्‍नात  भर घालुन जीवनमान उंचावेल.
 ज्‍येष्‍ठ सामाजिक कार्यकर्त्‍या सिंधुताई सपकाळ यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी कृषि मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आवटे, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, उप विभागीय कृषि अधिकारी संतोष डावरे, तालुका कषि अधिकारी येवले उपस्थित होते.

Wednesday 21 December 2011

गांधी ; जनसंपर्काच्‍या यशाचे ब्रांडिंग मॉडेल


पब्लिक रिलेशन्‍स सोसायटी ऑफ इंडियाच्‍या वतीने येत्‍या 23-25 डिसेंबर दरम्‍यान नागपूर आणि वर्धा येथे 33 व्‍या अखिल भारतीय जनसंपर्क संमेलनाचे आयोजन करण्‍यात आले आहे. वर्धा येथे 24 रोजी महात्‍मा गांधी आणि जनसंपर्क या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्‍यात आले आहे. या आयोजनाविषयी सांगाताहेत महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी बी.एस.मिरगे.                                                        

महात्‍मा गांधी यांना केवळ राजकीय चष्‍म्‍यातून बघणे, त्‍यांच्‍या  व्‍यक्तित्‍व आणि कृतित्‍वाच्‍या इतर आयामांपासून अनभिज्ञ राहणे होय. एवढी वर्ष लोटल्‍यानंतर सुध्‍दा त्‍यांच्‍या व्‍यक्तित्‍वाच्‍या विशाल वटवृक्षाचे बरेच असे पैलू आहेत ज्‍याच्‍याशी अजून स्‍पर्शही झाला नाही. ते शोधणे, जाणून घेणे आणि त्‍यांचे मूल्‍यांकन करणे वर्तमान संदर्भात प्रासंगिक होत चालले आहे. गांधी विचार वाडःमयातून बरेच काही देशाने  आणि जगाने घेतले आहे.
आज जन-समन्‍वयात आलेली घसरण यामुळे गांधींच्‍या विशाल जनसंपर्काला विचारात घेण्‍याची आवश्‍यकता वाटत चालली आहे. जन-भागिदारी, जन-समन्‍वय किंवा जन-संपर्काच्‍या शिवाय बहुआयामी कार्याचे यश असंदिग्‍धच वाटते.
     गांधी आपल्‍या व्‍यक्‍तीमत्‍वात आणि आपल्‍या कर्मात समन्‍वय, सहयोग आणि जन-संपर्क या सूत्राचे उदाहरण बनले होते. असे नसते तर गांधी एवढ्या मोठ्या  जगासाठी यशाचे मानक उदाहरण झाले नसते. त्‍यांचा समन्‍वय, सहयोग आणि संपर्क हा एक ब्रांड झाले होते. आजच्‍या वैश्र्विकरणाच्‍या काळात त्‍यांचा तो समन्‍वयधर्मितेचा जनसंपर्क आवश्‍यक वाटू लागला आहे आणि काही अंशी तो स्‍थापितही झाला आहे.

     जनसंपर्काची भूमिका एक ब्रांड रोल प्रमाणे विविध कार्याच्‍या यशात सहयोगी होत असते. ही संकल्‍पना केंद्रस्‍थानी ठेवून 33 व्‍या अखिल भारतीय जनसंपर्क संमेलनाच्‍या  नागपुर चॅप्‍टरने आपल्‍या चर्चेचा विषय `रोल ऑफ पब्लिक रिलेशन्‍स इन ब्रांडिंग `असा ठेवला आहे. या संमेलनात जनसंपर्क, पत्रकारिता आणि जाहिरात या त्रयींची तारतम्‍यता कोणत्‍याही ब्रांडला व्‍यावहारिक ठरविते, यावर विशेष चर्चा होणार आहे.
     पब्लिक रिलेशन्‍स सोयटी ऑफ इंडियाच्‍या नागपूर चॅIप्‍टरने 232,24 आणि 25 डिसेंबर असे तीन दिवस हे आयेाजन केले आहे. यापेकी 24 डिसेंबर रोजी वर्धा येथील महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात गांधीजींचा जनसंपर्क या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्‍यात आले आहे.
     हे आयोजन महात्‍मा गांधींच्‍या जनसंपर्काचा व्‍यापक आणि संमेलनाच्‍या महत्‍वाच्‍या उद्देशांची पूर्तता करण्‍याचाच एक भाग होय. इथे हे सांगणे महत्‍वाचे वाटते की वर्धा ही संतांची अशी कर्मभूमी आहे. जेथून गांधीजींनी स्‍वातंत्र्याच्‍या यशासाठी जनसंपर्काच्‍या माध्‍यमातून देशाला एक ब्रांड दिला होता. महानगर मुंबईला जावून त्‍यांनी `डू ऑर डाय`चा नारा दिला होता आणि हाच ब्रांड पुढे जावून यशाचा सूत्रधार ठरला होता.
     संमेलनाच्‍या या महत्‍वाच्‍या श्रृंखलेत महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयाने ` गांधीजींची पत्रकारिता आणि वर्तमान संदर्भ` या विषयावर दि. 21 डिसेंबर 2011 रोजी एक निबंध स्‍पर्धा आयोजित केली होती.

     हे आयोजन संमेलनाच्‍या  त्रिदिवसीय श्रृंखलेत महत्‍वाचे यासाठी आहे की गांधीजींच्‍या पत्रकारितेची मिशनरी भावना आजच्‍या बांडिंग मीडियातही प्रतिध्‍वनित होत आहे. अशाप्रकारे हे संमेलन ब्रांड आणि व्‍यवहार यांची आधारशीला स्‍थापित करणार असे म्‍हटले तर अतिशयोक्‍ती होणार नाही.

सेवाग्राम येथे स्‍वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम


        वर्धा,दि.21-महाराष्‍ट्र उद्योजकता विकास केन्‍द्र, वर्धा तर्फे सेवाग्राम येथे दि. 5 ते 16 जानेवारी 2012 या कालावधीत स्‍वयंरोजगार विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले आहे.
या प्रशिक्षणात शेळी पालन, दुग्‍ध उत्‍पादन, गाई-म्‍हशी पालन, कमीकल उद्योगसंधी (डिटर्जंट, लॅट्रीन अॅसिड, फिनाईल, लिक्विड, ब्‍लू लिक्विड सोप, अगरबत्‍ती, मेणबत्‍ती, मसाले, तिखट, हळद, धने पावडर, वेफर्स, पॉपकॉर्न, पेप्‍सी, जेष्‍ठमध सुपारी ई.) उद्योगांविषयी माहिती तज्ञ व्‍यक्‍तीव्‍दारे व टि.व्‍ही.वर दाखविण्‍यात येईल.
 उद्येाजकीय गुण, उद्योजकीय व्‍यक्तिमत्‍व विकास, उद्योग व्‍यवसाय निवडण्‍याची प्रक्रिया, बाजारपेठ पाहणी, प्रकल्‍प अहवाल, विविध शासकीय योजनांची माहिती , जिल्‍हा उद्योग केन्‍द्राच्‍या येाजना, विशेषकरुन पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, महात्‍मा फुले महामंडळाच्‍या योजना व त्‍यामध्‍ये कर्ज प्रकरण तयार करण्‍याची, लघुउद्योग नोंदणी इत्‍यादी विषयांवर शासकीय अधिकारी वर्गाव्‍दारे मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे.
 उमेदवार 18 ते 45 वयोगटातील किमान 8 वी उत्‍तीर्ण असावा. इच्‍छुक उमेदवारांनी दि. 2 जानेवारी 2012 रोजी दुपारी 12 वाजता स्‍थळ बी.डी. इंजिनियरींग कॉलेज, सेवाग्राम येथे एक दिवसीय  निःशुल्‍क उद्येाजकता प्रेरणा शिबीर ठरविण्‍यात आले आहे. या प्रशिक्षणास प्रथम येणा-यास प्रथम प्रवेश या पध्‍दतीने फक्‍त 30 प्रशिक्षणार्थीस प्रवेश देण्‍यात येणार आहे.
कार्यक्रम समन्‍वयक नजमा पठाण , महाराष्‍ट्र उद्योजकता विकास केन्‍द्र व्‍दारा जिल्‍हा उद्योग केन्‍द्र, वर्धा यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकाव्‍दारे कळविले आहे.

Tuesday 20 December 2011

विभागीय युवा महोत्सववावर यजमान वर्धेकरांचेच वर्चेस्वी


वर्धा, दि.21- नागपूर विभागीय युवा महोत्‍सवावर वर्धा जिल्‍ह्याचे वर्चस्‍व राहिले असून महोत्‍सवात 9 पैकी 5 स्‍पर्धांचे जेतेपद वर्धेकरांनी मिळविले. हे विजेते आता राज्‍यातील युवा महोत्‍सवासाठी रवाना होत आहे.
येथील सत्‍यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालयात हा महोत्‍सव पार पडला. याचे यजमानपद यंदा वर्धा जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला देण्‍यात आले होते. या महोत्‍सवात नागपूर विभागातील 6 जिल्‍ह्यातील युवक सहभागी झाले होते.
महोत्‍सवाचे उदघाटन निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी नटराज पूजन व दिपप्रज्‍वलन करण्‍यात आले.
उदघाटनप्रसंगी वसंतराव जळीत, वासुदेवराव गोंधळे, निरज दुबे, गौरीशंकर टिबडीवाल आणि बाळकृष्‍ण टिबडीवाल तसेच जिल्‍हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये आदींची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन ज्‍योती भगत यांनी केले.  
या महोत्‍सवासाठी विकास काळे, वसंत जळीत, सुरेश चौधरी, ज्‍योती भगत, माधुरी खाडे, सोनाली मंथनवार, स्मिता हेडावू, वासुदेवराव गोंधळे, जीवन बांगडे, अजय हेडावू, रवी खाडे, सुरेश सालबर्डे, दामोदर राऊत, श्‍याम केदार, सुनील तितरे, नीरज दुबे तसेच श्रीराम मेंढे हे परीक्षक होते.
या महोत्‍सवाच्‍या यशस्वितेसाठी क्रीडाधिकारी घनश्‍याम वरारकर, विनोद ठिकरे, अनिल बोरवार तसेच जिल्‍हा क्रीडा संकुलाचे रवी काकडे आदींनी  परिश्रम घेतले.
स्‍पर्धेतील विजेते खालील प्रमाणे
शास्‍त्रीय गायन – अभिषेक मारोडकर, वर्धा. शास्‍त्रीय वाद्य- तबला- दिनेश खांडेकर,वर्धा. हार्मोनियम-किशोर काळे, वर्धा, गीटार – सुरेंद्र टेंभुर्णे, नागपूर. शास्‍त्रीय नृत्‍य- आदीती बोरवटकर, नागपूर, लोकनृत्‍य–श्रृंखला युवा मंच, भंडारा, लोकगीत- लोकधारा कला मंच, वर्धा, एकांकीका- षड्स गांधार गृप, भंडारा आणि वक्‍तृत्‍व–रत्‍नाकर शिरसाट, वर्धा.



नागपूर विभागीय युवक महोत्‍सवाला वर्धा येथे शानदार सुरुवात

वर्धा,दि.20- नागपूर विभागीय युवा महोत्‍सवाला आज येथील बजाज जिल्‍हा ग्रंथालयात सुरुवात झाली. महोत्‍सवाचे उदघाटन निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे यांच्‍या हस्‍ते  झाले.
उदघाटनप्रसंगी वसंतराव जळीत, वासुदेवराव गोंधळे, निरज दुबे, गौरीशंकर टिबडीवाल आणि बाळकृष्‍ण टिबडीवाल तसेच जिल्‍हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 एकांकिका वक्‍तृत्‍व स्‍पर्धा , नृत्‍य, तालवाद्ये आदींसह समुहगीत, समूहनृत्‍य आदी विविध गटात युवक आपले नैपुण्‍य दाखविणार आहेत.
 या महोत्‍सवासाठी विकास काळे, वसंत जळीत, सुरेश चौधरी, ज्‍योती भगत, माधुरी खाडे, सोनाली मंथनवार, वासुदेवराव गोंधळे, जीवन बांगडे, अजय हेडावू, रवी खाडे, सुरेश सालबर्डे, दामोदर राऊत, श्‍याम केदार, सुनील तितरे, नीरज दुबे तसेच श्रीराम मेंढे हे परीक्षक आहेत. कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत यांनी केले.
 या महोत्‍सवाच्‍या यशस्वितेसाठी क्रीडाधिकारी घनश्‍याम वरारकर, विनोद ठिकरे, अनिल बोरवार तसेच जिल्‍हा क्रीडा संकुलाचे रवी काकडे आदी परिश्रम घेत आहेत.

Monday 19 December 2011

क्रीडा प्रबोधिनीमध्‍ये प्रवेशासाठी कार्यशाळा


     वर्धा,दि.19-क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत सुरु असलेल्‍या विविध क्रीडा प्रबोधिनीमध्‍ये क्रीडा नैपुण्‍य चाचण्‍याव्‍दारे प्रवेश देण्‍यात येतो. महाराष्‍ट्रात शिक्षण व क्रीडा क्षेत्राचा दर्जा उंचावण्‍यासाठी आणि राज्‍यातून जास्‍तीत जास्‍त आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्‍यासाठी वैज्ञानिक पध्‍दती, अद्यावत उपकरणे आणि प्रशिक्षण यावर अधिकाधिक प्रमाणात भर देण्‍याची गरज आहे. या उद्देशाने राज्‍यातील खेळ परंपरा अंतःसामर्थ्‍य व खेळ सुविधा लक्षात घेवुन पुणे येथे शिवछत्रपती क्रीडापीठाची स्‍थापना केलेली आहे.

     बॅटरी ऑफ टेस्‍टव्‍दारे निवड क्रीडा नैपुण्‍य चाचण्‍या शाळा स्‍तरावरुन तालुकास्‍तर, जिल्‍हास्‍तर आणि राज्‍यस्‍तरीय चाचण्‍याचे आयोजन करण्‍यात येणार आहे. यासाठी दि. 22 डिसेंबर 2011 रोजी दुपारी 2 वाजता जिल्‍हा क्रीडा संकुल, वर्धा येथे क्रीडा नैपुण्‍य चाचण्‍याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात येणार आहे.

     जिल्‍ह्यातील सर्व शाळेतील क्रीडा शिक्षक, तालुका क्रीडा संयोजक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्‍हा क्रीडा अधिकारी,वर्धा यांनी कळविले आहे.

विद्यार्थ्‍यांचे ओळखपत्र

           वर्धा, दि. 19-सहामाही प्रमाणपत्र अभ्‍यासक्रम राबविणा-या तसेच पुरवणी परिक्षेला बसलेल्‍या सर्व संस्‍था प्रमुखांना व संबधीत विद्यार्थ्‍यांनी त्‍यांची सहामाही परिक्षा व पुरवणी परिक्षा दिनांक 10 जानेवारी 2012 पासून सुरु होत आहे.

      संस्‍था प्रमुखांनी विद्यार्थ्‍यांची ओळखपत्र दिनांक एक जानेवारी 2012 पर्यंत जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, वर्धा येथून घेवून जावी. त्‍यानंतर घेऊन जाणा-या संस्‍थाप्रमुखांचे विद्यार्थी परिक्षेस न बसल्‍यास ती त्‍यांची वैयक्‍तीक जबाबदारी राहील, याची संस्‍थाप्रमुखांनी नोंद घ्‍यावी. असे जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.

फळबाग लागवड विकास कार्यक्रम


     वर्धा,दि.19-राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान अंतर्गत फळबाग लागवड विकास कार्यक्रम सन 2011-12 या आर्थीक वर्षात जिल्‍ह्यात 90 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड करण्‍याचे लक्षांक प्राप्‍त  झाले आहे. पपई 50 हजार हेक्‍टर व केळी (टिश्‍यू कल्‍चर 40 हेक्‍टर  क्षेत्रावर लागवड करावयाचे आहे. पपई या पिकासाठी हेक्‍टरी एकूण 30 हजार रुपये व केळी फळपिकांसाठी हेक्‍टरी एकूण 41 हजार रुपये अनुदान दोन वर्षात देय राहील.

     योजने अंतर्गत लाभार्थ्‍यांची निवड, लागवड क्षेत्र मर्यादा, तांत्रीक मंजूरी, प्रशासकीय मंजूरी लाभार्थीच्‍या जबाबदा-या व इतर सर्व निकष रोजगार हमी योजना फळबाग लागवडीचे शासन निर्णयाप्रमाणे राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी रासायनिक खते. रोपसंरक्षण औषधे, शेतक-यांनी स्‍वतः खरेदी केल्‍यास खरेदीची पावतीची नोंद घेऊनच अनुज्ञेय अनुदान अदा करण्‍यात येईल. साहित्‍य खरदेी संबधीच्‍या पावत्‍या संबधीत कृषि सहाय्यक यांचेकडे देण्‍यात याव्‍यात. अधिक माहितीसाठी संबधीत तालुका कृषि अधिकारी,मंडळ कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा व राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान योजनेच्‍या जास्‍तीत जास्‍त शेतक-यांनी लाभ घेण्‍याचे आवाहन जिल्‍हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

नोंदणीकृत संस्‍थाकडून अर्ज आमंत्रित


     वर्धा, दि. 19 – शैक्षणिक वर्ष 2012-13 करीता महाराष्‍ट्र राज्‍य व्‍यवसाय शिक्षण परीक्षा मंडळामार्फत संगणक, पॅरा-मेडीकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, इलेक्‍ट्रीकल, मेकॅनिकल, सिव्हिल, अॅग्रकल्‍चर, ऑटोमोबाईल, केमिकल, इन्‍स्‍ट्युमेंटेशन, आहार, टेक्‍सटाईल, भाषा, खेळ, सौंदर्यशास्‍त्र, मुद्रण, चर्मकला (लेदर), वाणिज्‍य, हस्‍तकला, अॅपारेल, कला, मासमेडीया, टुरिझम, हॉस्‍पीटॅलिटी, जेम अॅण्‍ड ज्‍वेलरी, एव्‍हीएशन, म्‍युझीक, परफॉर्मींग आर्ट तसेच इतर गटातील 6 महिने, 1 व 2 वर्ष कालावधीचे एकूण 1090 अभ्‍यासक्रमामधील प्रमाणपत्र अभ्‍यासक्रम सुरु करणेसाठी अर्ज मागविण्‍यात येत आहे.
     नियमित शुल्‍कासह अर्ज विक्री व स्विकृती दि. 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2011 पर्यंत असून विलंब शुल्‍कासह अर्ज विक्री व स्विकृती दि. 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2012 पर्यंत राहील.

     अर्जासहीत माहितीपुस्तिका, अभ्‍यासक्रमाची यादी जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचेकडे मिळेल. माहितीपुस्‍तिकेची किंमत रुपये 500 असून रक्‍कम दिलेल्‍या लेखाशिर्षामध्‍ये कोषागारात भरल्‍याची चलन प्रत अर्जासोबत जोडावी. अर्ज व माहितीपुस्तिका संकेत स्‍थळावरुन डाऊनलोड करु शकता.अधिक माहितीसाठी जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण प्रशिक्ष्‍ण अधिकारी,वर्धा यांचेशी संपर्क करावे.

कृषि मित्र नेमणुका


        वर्धा,दि.19- कृषि तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापन यंत्रणा अंतर्गत  अत्‍यावश्‍यक गरजुनुरुप गावपातळीपासूनचे नियेाजन व विस्‍तार कार्यक्रम अंमलबजावणीसाठी जिल्‍ह्यात कृषि मित्रांची नेमणूक करावयाची आहे. कृषि मित्र हा शेतीतील कौशल्‍य सिध्‍द केले असून, कृषि विस्‍तार  येाजना व गाव, खेडे यातील महत्‍वाचा दुवा असेल. कृषि मित्राचे किमान शिक्षण माध्‍यमीक अथवा उच्‍च माध्‍यमीक स्‍तरावरील असावे. कृषि मित्राला शेतकरी संघटन, शेतकरी समुह तयार करणे, गांव पातळीवरील माहितीबाबत विषय विशेषज्ञ यांचेशी संपर्कात राहणे ग्रामसभेस हजर राहणे, प्रसार माध्‍यमाच्‍या मदतीने माहिती देणे, आधुनिक शेतीचा प्रसार करणे, तसेच कृषि विभागामार्फत सांगितलेली कामे इ. कामे करावयाची आहे.
    निवड झालेल्‍या कृषि मित्रांना वार्षीक रु. 4000 चे मानधन देण्‍यात येणार असुन दैनिक अॅग्रोवणचा पुरवठा तसेच कृषि विषयक माहिती देण्‍यात येणार आहे.
     कृषि मित्राच्‍या नेमणुकीसाठीचा अर्ज संबंधीत तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाकडे आठ दिवसाच्‍या आत करावयाचा असुन उपविभागीय स्‍तरावरील समिती मार्फत दोन गावाकरीता एक याप्रमाणे ग्रामपंचायतीच्‍या  ठरावानुसार कृषि मित्राची निवड करण्‍यात येणार आहे.