महसूल दिनी उत्कृष्ट कार्याबद्दल कर्मचा-यांचा गौरव
वर्धा, दि. 1 - महसूल कार्यालयात आलेल्या शेतक-यांना व सामान्य जनतेला प्रभावी व परिणामकारक सेवा देवून महसूल विभागाबद्दल जनमानसात चांगली प्रतिमा निर्माण करा असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांनी आज सुवर्ण जयंती राजस्व अभियान व महसूल दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात केले.
विकासभवन येथे जिल्हाधिकारी कार्यालयात, उपविभागीय महसूल कार्यालय व तहसिल कार्यालयाच्या वतीने महसूल दिनाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी शेतक-यांना सातबारा व फेरफार तसेच राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजना व भूस्वामी असल्याचे प्रमाणपत्र तसेच महसूल विभागात उत्कृष्ट कार्य करणा-या नायब तहसिलदार ते कोतवाला पर्यंतच्या सर्व कर्मचा-यांचा गौरव यावेळी करण्यात आला.
शेतक-यांना महसूल कार्यालयात आल्याबरोबर सातबारासह इतर आवश्यक
दस्ताऐवज त्वरीत मिळावे ही मापक अपेक्षा असते. महसूल विभागाची ही नियमित जबाबदारी असून प्रशासन गतीमान करण्यासाठी आधुनिक तंत्राचाही वापर करुन जनतेला अधिक जलद व परिणामकारक सेवा देण्याचा संकल्प महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी करावा असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांनी केले.
सुवर्ण जयंती राजस्व अभियाना अंतर्गत आठ दिवसात अकृषक परवानगी, फेरफार व वारसान हक्काच्या नोंदी एक महिन्यात पूर्ण करणे प्रत्येक महिन्यात दहा टक्के गावात चावडी वाचनाचा कार्यक्रम, मृत व्यक्तींच्या नावे रेकार्डवर राहणार नाही याची दखल तसेच प्रत्येक गावात विशेष शिबीराच्या माध्यमातून सातबारा व इतर प्रमाणपत्राचे वाटप करताना चित्रीकरण करुन वाटपातील उणीवा दूर करा अशा सुचनाही जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांनी अधिकारी व कर्मचा-यांना दिल्यात.
दिप प्रज्वलीत करुन महसूल दिनाचे उदघाटन जिल्हाधिका-यांच्या हस्ते झाले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती विजया बनकर, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, उपविभागीय महसूल अधिकारी हरिष धार्मिक, तहसिलदार सुधांशु बन्सोड आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय महसूल कार्यालय व तहसिल कार्यालयातील उत्कृष्ट सेवेबद्दल कर्मचा-यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती विजया बनकर यांनी महसूल विभाग अधिक गतीमान करण्यासाठी सुवर्ण जयंती राजस्व अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत असून या अभियाना अंतर्गत सर्व महसूल विभागात विविध उपक्रम राबवून जनतेला अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी सुवर्ण जयंती राजस्व अभियाना अंतर्गत राबविण्यात येणा-या विविध उपक्रमाची प्रभावी अंमलबजावनी करावी असेही यावेळी सांगितले.
प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांनी करुन या योजने अंतर्गत 59 लाख 85 हजार 461 दाखल वाटप करण्यात आल्याचे तसेच समाधान योजनेच्या माध्यमातून प्रभावीपणे महसूल सेवा जनतेपर्यंत पोहचविण्यात आले असून हा उपक्रम आजपासून सुरुवात होत असल्याचे यावेळी सांगितले. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा व महाविदृयालयात जातीचे व रहिवासी प्रमाणपत्र वाटप करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचलन अजय धर्माधिकारी यांनी तर आभार प्रदर्शन तहसिलदार सुधांशु बनसोड यांनी मानले. या कार्यक्रमास महसूल विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तहसिल कार्यालयात महसूल दिन
वर्धा जिल्ह्यातील सर्वतहसिल कार्यालयात महसूल दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कुटूंब अर्थसहाय्य योजना, नैर्सगिक आपत्तीमध्ये सापडलेल्या कुटूंबाना अर्थसहाय्य, संगणीकृत सातबारा, वर्ग एक व दोन प्रकरणाचे अंतीम आदेश वाटप, तसेच जात प्रमाणपत्र व उत्पन्नाचे दाखले देण्यात आले.
0000