Friday 16 February 2018



कृषी, शिक्षण, आरोग्य व  रोजगारासाठी वार्षिक योजना निधीचा उपयोग करा
- सुधीर मुनगंटीवार
जिल्हा नियोजन समिती राज्यस्तरीय बैठक
वर्धा दि 16(जिमाका):-  जिल्हा वार्षिक योजनेचा निधी हा नियोजनपूर्वक  जिल्ह्याच्या  विकासासाठी खर्च झाला पाहिजे. या निधीचा उपयोग मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी व्हायला हवा. कृषी,आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या क्षेत्रामधील पायाभूत सुविधा बळकट करून सामान्य नागरिकांच्या समस्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करा. वाढीव निधी देताना या घटकांना अधिक प्राधान्य दिले जाईल असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
आज नागपूर येथे विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात नियोजन समितीची राज्य स्तरीय  बैठक संपन्न झाली.  यावेळी गृह, वित्त व नियोजन राज्य मंत्री दिपक केसरकर, खासदार रामदास तडस, अशोक नेते, आमदार पंकज भोयर, समीर कुणावर, अप्पर मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती,  विभागीय आयुक्त अनुप कुमार,  नियोजन उपसचिव विजयसिंह वसावे,  जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, नियोजन उपायुक्त बी. एस. घाटे उपस्थित होते.
वर्धा जिल्ह्याचा जिल्हा वार्षिक योजना प्रारूप आराखडा 102 कोटी 4 लक्ष रुपयांचा  आहे. जिल्ह्याने 210 कोटी 68 लक्ष रुपयांची अतिरिक्त मागणी यावेळी केली. यामध्ये जिल्हाधिकारी यांनी अतिशय आवश्यक बाबींसाठी किमान 85 कोटी देण्याची  आग्रहाची  विनंती केली. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील खर्चाच्या आराखड्याची प्राथमिकता असणाऱ्या विषयांची मांडणी केली. 
शहराच्या हद्दीत येणारे अनियंत्रित वाढ असणारी गावे व त्यांच्या समस्या यावर यावेळी चर्चा झाली. शौचालय  बांधकाम, पांदण रस्ता निर्मिती , वायगाव हळद निर्मिती, आदींसाठी वाढीव निधीची मागणी त्यांनी केली. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेली पांदण रस्ता योजना मॉडेल म्हणून राज्यस्तरावर स्विकारावे अशी मागणी विभागीय आयुक्तांनी यावेळी केली. जिल्ह्यामध्ये बचत गटाचे बळकटीकरण, तलाव तेथे मासोळी, मायक्रो ए टी एम, बचत गटांना सेतू केंद्राचे वाटप, रूरल मॉल व आठवडी बाजार आदी  उपक्रमाबाबत जिल्हाधिकारी यांनी माहिती दिली. यावेळी  खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर यांनी जिल्ह्यामध्ये तालुकास्तरीय क्रीडा क्षेत्रातील प्रोत्साहन योजना, ग्रामपंचयात जनसुविधा व मोठ्या ग्रामपंचायतींना  नागरी सुविधा यासाठी निधी देण्याबाबत चर्चा केली.
श्री मुनगंटीवार यांनी यावेळी जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधाना बळकटी आणणा-या योजनांना प्राधान्य देण्याची सूचना केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि नियोजन भवन इमारतीसाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे सांगितले. तसेच या दोन्ही इमारती सेवाग्राम विकास आराखडा कामासोबतच  पूर्ण करण्यात येतील असेही सांगितले. आमदार पंकज भोयर यांनी जिल्हा ग्रंथालयाची इमारत पूर्ण झाली असून इमारतीच्या उदघाटनासाठी पालकमंत्री यांनी वेळ देण्याची विनंती केली.




Wednesday 14 February 2018



            आपद्ग्रस्ताना प्रशासनाची तात्काळ मदत
वर्धा, दि 14:-  जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पाऊस व  गारपिटीमुळे काही गावात नुकसान झाले असून घरांची पडझड आणि गारपिटीमुळे जखमी झालेल्या नागरिकांना आर्वी महसूल प्रशासनाने तात्काळ पाहणी करून  आपद्ग्रस्ताना मदत  केली. आर्वी  तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी यांनी धाव घेऊन नागरिकांना वेळीच दिलासा दिला.
          12 फेब्रुवारी
  रोजी रोहणा आणि विरुळ सर्कल मध्ये गारपिटीमुळे काही घरांची पडझड आणि शेतमालाचे नुकसान झाल्याची माहिती सायंकाळी  7 वाजता  समजताच नायब तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, विरुळचे  मंडळ अधिकारी  आनंद देवकर, भास्कर कुकडे आणि रोहणा तलाठी  एकापुरे यांचे पथक रवाना झाले. पथकाने जखमी लोकांना योग्य व तातडीने उपचार करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात  संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून पूर्वकल्पना दिली.  तिथे पोहचल्यावर खाजगी गाडीने लोकांना दवाखान्यात दाखल केले. रोहणा पासून वाई आणि पुढे पिंपळधरी मार्गात अनेक झाडे व विद्युत तारा  पडून रस्ता बंद झालेला होता.  तो पथकाने खुला केला आणि पथक पिंपळधरी येथे पोहोचले.
            पिंपळधरी येथे पथकाने तेथील घरांची पडझड झालेल्या स्थानिक नागरिकांची जिल्हा परिषद
  शाळा व अंगणवाडी येथे राहण्याची सोय केली. तसेच रोहणा प्राथमिक आरोग्य केंद्रात उर्वरित जखमींना दाखल केले. पिंपळधरी येथील नागरिकांची जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय संबंधित स्वस्त धान्य दुकानदार ,प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते  यांच्या मार्फत केली. रोहणा येथील खाजगी मंडप डेकोरे्टर्स कडून अंथरून व  पांघरूण उपलब्ध करून दिले. नंतर पथक रोहणा गावातील  पडझड झालेल्या ठिकाणी गेले आणि लोकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून पुढे गौरखेडा गावातील पाहणी करण्यासाठी रवाना झाले .
       तसेच 13 फेब्रुवारी  रोजी आर्वीचे  तहसीलदार विजय पवार  यांच्यासह नायब तहसीलदार म्हस्के आणि मंडळ अधिकारी  देवकर यांचे पथक  सकाळी 10 वाजता  पिंपळधरी या गावात दाखल झाले. पथकाने  सोबत नाश्ता,बिस्कीट पुडे आणि  पाणी नेले होते. ते तेथील आपद्ग्रस्ताना वितरित केले. आपद्ग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे तलाठी रोहणा यांच्यामार्फत चालू केले आणि नागरिकांच्या जेवणाची सोय तिथे करण्यात आली. नागरिकांना स्थानिक समाजसेवा गटामार्फत ब्लॅंकेट उपलब्ध करून दिले. नागरिकांना सानुग्रह अनुदान स्वरूपात तात्काळ 10 किलो धान्य(तांदूळ व गहू)आणि 5 लिटर केरोसीन प्रति कुटुंब या प्रमाणे उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा  यांच्या उपस्थितीत देण्यात आले.नागरिकांच्या रात्रीच्या जेवणाची सोय तेथेच करण्यात आली आणि पथक इतर नुकसानग्रस्त सायखेडा,गौरखेडा,मारडा भागाची पाहणी करण्यास गेले.
                                                                        0000