सेतू केंद्र तपासणीसाठी विशेष पथकाची नियुक्ती
वर्धा, दि, 12,(जिमाका):- जिल्हयातील नागरिकांना विविध प्रमाणप्रत्रासाठी
जिल्हयात तालुका स्तरावर सेतू केंद्र
तसेच गावपातळीवर आपले सरकार सेवा केंद्रसुरु करण्यात आले. काही केद्रांवर मध्यस्थामार्फत
जास्तीची रक्कम घेतली जात असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी शैलेश
नवाल यांनी विशेष पथकाची नेमणूक केली आहे. यापथकामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी
एस.बी. पांचाळ, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिक्षक प्रमोद कदम यांचा समावेश आहे.
सदर पथकाने पुलगाव आर्वी येथील केंद्रावर तपासणी करुन कारवाई केली.
सदर तपासणी पथक जिल्हयातील सर्व केंद्रावर केव्हाही अचानक भेट देऊन खोटेपणा आढळून आल्यास त्या ठिकाणी सुध्दा
संबंधितांवर कारवाई करेल. तसेच सेतू, सुविधा, केंद्र महा ई-सेवा केंद्र तसेच आपले
सरकार सेवा केंद्राची परवाणगी रद्द करण्यात येईल.
या केंद्रावरुन नागरिकांना विविध सेवा पुरविण्यात
येतात. प्रत्येक सेवेसाठी शासनाने निश्चित शुल्क ठरवून दिले आहे. आकारुन दिलेल्या
निश्चित शुल्कापेक्षा सेतू केंद्र चालकाव्दारे किंवा आपले सेवा केंद्राव्दारे पुरविण्यात
येणा-या सेवेसाठी जास्त शुल्क आकारल्यास नागरिकांनी लेखी तक्रार पुरव्यासह अथवा
18002332383 या टोल फ्री क्रमांकावर दाखल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.