Saturday 2 October 2021

 

               गांधी हे देशासह जगासाठी सत्य, शांती व  अहिंसेचे प्रेरक

                                           -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Ø  सेवाग्राम आश्रमात बापूना केले अभिवादन

वर्धा, दि 2 ऑक्टो (जिमाका) :-  महात्मा गांधी हे देशासह जगासाठी सत्य, शांती, अहिंसेचे प्रेरक राहिले आहे. सेवाग्राम आश्रम हे प्रेरणास्थान आहे. आश्रमातील स्मारके जास्तीत जास्त काळ टिकली पाहिजे असे नियोजन करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी सेवाग्राम आश्रमाला भेट देत  बापुकुटीत प्रार्थना करून गांधीजींना अभिवादन केले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुढे म्हणाले, महात्मा गांधी यांनी आदर्श आणि त्यागमय जीवन जगुन जगातील हजारो लोकांना प्रेरित केले. शिवाय आजही गांधींचे विचार जगाला प्रेरित करत आहे. आज महात्मा गांधींची जयंतीदिनी सेवाग्राम इथे येऊन मी स्वतःला धन्य मानत असल्याचे सांगितले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे गांधी आश्रमात आगमन होताच खासदार रामदास तडस यांनी त्यांचे स्वागत केले. तर आश्रमप्रतिष्ठानच्या वतीने आश्रमप्रतिष्ठानचे अध्यक्ष टी आर एन प्रभू यांनी स्वागत केले.यावेळी  जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी प्रशासनाचे वतीने राज्यपालांचे स्वागत केले. आ. पंकज भोयर, जि. प. अध्यक्ष सरिता गाखरे, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा,उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार रमेश कोडपे, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपूल जाधव, मिलिंद भेंडे, अविनाश देव आदींची उपस्थिती होती.

                                                                  0000













 

प्र.प.क्र -686                                                                              दि. 2.10.2021

                        भारतीय संस्कृतीतील श्रेष्ठ मुल्यांचा

                        महात्मा गांधी यांच्या विचारात सारांश

                                                -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

 

Ø  वर्धेतील राष्ट्रीय परिसंवादात वैश्विक सांप्रदायिकतेवर विचारमंथन

Ø  दीपोत्सव उपक्रमाच्या माध्यमातून नव्या जाणिवांचा जागर

Ø  राज्यपालांच्या उपस्थितीत महात्मा गांधी यांना भावपूर्ण अभिवादन

वर्धा, दि २ (जिमाका) :- भारतीय समाजात प्रदीर्घ काळापासून सुरु असलेल्या विविधांगी चिंतनाचा तसेच अनेक महान प्रेषितांनी मांडलेल्या तत्वज्ञानाचा संपूर्ण सारांश महात्मा गांधी यांच्या शिकवणीत आहे. त्यामुळे आज जगात विघटनकारी शक्ती सक्रिय झाल्या असतांना गांधी विचारच सा-या जगाला दिशादर्शक ठरु शकतो. असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज येथे केले. 

            राष्ट्रपिता महात्मा गांधी याच्या जयंतीनिमित्ताने आज येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातर्फे ‘गांधी का दर्शन  : वैश्विक सांप्रदायिकता का समाधान  विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाचे तसेच दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.  विद्यापीठाच्या कस्तुरबा सभागृहात आयोजित या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह प्रसिध्द अभिनेते नितीश भारद्वाज आणि कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु श्रीनिवास वरखेडी यांची उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी हिंदी विद्यापीठाचे कुलगुरु रजनीशकुमार शुक्ल होते.

            महात्मा गांधी यांच्या विचाराचे औचित्य जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात असल्याचे सांगून राज्यपाल पुढे म्हणाले, गांधी विचारांचा जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात प्रभाव आहे. कारण इथल्या संस्कृतीतील श्रेष्ठ विचारांचे गांधीजी हे समग्र रुप आहे. त्यामुळे गांधी समजून घेणे आज अतिशय महत्वाचे आहे. सत्य आणि अहिंसा ही दोन्ही मुल्ये परस्परपुरक आहेत. याच सत्यावर आधारलेला सत्याग्रह  बापुजींनी सुरु केला. या लढयात अहिंसा हे त्यांचे महत्वाचे शस्त्र होते. त्या माध्यमातून मोठया शक्तीशी त्यांनी संघर्ष केला. स्वत:च्या वैयक्तिक जीवनात त्यांनी या मुल्यांचे निष्ठेने आचरण केले. त्यामुळे त्यांच्या विचारांना कृतीशीलतेचे मोठे अधिष्ठान लाभले आहे.

गांधीजींनी ज्या मुल्यांचा पुरस्कार केला ती त्रिकालाबाधित श्रेष्ठ आहेत, असे सांगतांना राज्यपाल म्हणाले आज विविध समस्यांनी त्रस्त झालेले जग भारताकडे मोठया आशेने पाहत आहे. अशा जगाला मार्गदर्शन करण्याची शक्ती गांधीजींच्या विचारात आहे. प्रत्येकाला रोजगार देण्यासाठी आत्मनिर्भरतेचा आग्रह हा त्यांच्या  नई तालीम या संकल्पनेचे आधुनिक रुप आहे. विविध मुल्यांचा अंगीकार करणारा भारताचा नागरिक जगासाठी मार्गदर्शक व्हावा हे स्वप्न त्यांनी पाहिले.  या शिकवणीची मुळे ही त्यांच्या संस्कारात आढळतात त्यामुळे पूजा आणि  चर्चा यापलीकडे गांधी विचारांचे जीवनात प्रत्यक्ष आचरण करणे गरजेचे आहे तरच सांप्रदायिकता समाप्त होऊ शकेल. हिंदीच्या प्रचारप्रसारासाठी गांधीजींनी दिलेल्या योगदानाचा यावेळी त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

 

आत्मविश्वासपूर्ण शिक्षण देण्याऐवजी रोजगाराभिमुख शिक्षण दिल्यामुळे काही प्रश्न निर्माण झाल्याचे सांगून श्री नितीश भारव्दाज म्हणाले, भारतीय संस्कृतीचा श्रेष्ठ वारसा लक्षात घेऊन त्याबाबत व्यापक विचारमंथन व्हावे. देशातील विद्यापीठानी याबाबत सकारात्मक प्रयत्न करुन संपूर्ण व्यवस्थेला  विश्वास दयावा. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात याबाबत काही कृतीशीलता दर्शविल्यास पुढील 25 वर्षात निश्चितच चित्र बदलेल त्यासाठी अनुकुल अशा जाणिवांचे दीप इथल्या हृदयात प्रज्वलित करावेत. आज आपले प्रयत्न योग्य दिशेने सुरु आहेत.

असत्याकडून सत्याकडे होणारा जाणिवांचा प्रवास अधिक व्यापक करण्यासाठी गांधीविचार महत्वाचा असल्याचे सांगतांना कुलगुरु वरखेडी म्हणाले, गांधीजी हे पूर्णत: एक नव्या वर्गाचे प्रतिनिधी होते. महर्षी, देवर्षी आणि राजर्षी या व्यक्तीमहानतेच्या संकल्पनाच्या पारंपारिक चौकटीपलीकडे जाऊन त्यांचा आपल्याला विचार करावा लागतो. ते या दृष्टीने महात्मा होते. सांप्रदायिकता ही मानवतेला दानवतेकडे नेते. सत्यांचा एकच एक चेहरा असू शकत  नाही. अनेक चेहरे असू शकतात. असे मानणारे महात्मा गांधी सत्योपासक होते. त्यांच्या नई तालीम मधील विचारांचा नव्या शैक्षणिक धोरणात अंगीकार करण्यात आला आहे.

 विद्यापीठाचा दीपोत्सवाचा उपक्रम हा अग्नीमधील शक्तीला  दीपकाचे विधायक रुप देणारा असून ज्यायोगे इथल्या  अंतरगातील अंधार दूर होऊ शकेल, असेही ते म्हणाले.

            विद्यापीठाकडून आयोजित होत असलेल्या दीपोत्सवाचे यंदाचे चौथे वर्ष आहे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कुलगुरु  रजनीशकुमार यांनी या उपक्रमाची माहिती दिली. गेल्या वर्षभरात यानिमित्ताने आयोजित परिसंवादाचा असलेल्या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयंत उपाध्याय यांनी केले. तर कुलसचिव कादर नवाज खान यांनी आभार मानले. प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी अभिवादन केले. 

                                                          000

 





                       गांधीजींनी रुजवलेला करुणेचा झरा करुणाश्रमच्या रुपात जिवंत

                                                                 -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

 

वर्धा, दि 2 ऑक्टोबर (जिमाका) महात्मा गांधींनी देशवासीयांमध्ये प्राण्यांप्रती करुणेचा भाव निर्माण केला. याच करुणेचा जिवंत झरा आज वर्धेत करुणाश्रमाच्या रूपाने पहायला  मिळत आहे. हीच बापुना खरी श्रद्धांजली असलयाचे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. 

आज राज्यपाल वर्धेच्या दौऱ्यावर असताना त्यांनी वन्यजीवांची शुश्रूषा करणाऱ्या करुणाश्रम आश्रमाला भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आश्रमात प्राण्यांची शुश्रूषा करणाऱ्या सेवकांचा सत्कार केला तसेच संस्थेला 10 लाखाची मदतही जाहीर केली.

        देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हाच गांधीजींच्या स्वतंत्रता आंदोलनाचा एकमेव उद्देश नव्हता, असे सांगून ते म्हणाले, देशाचे नागरिक आत्मनिर्भर  व्हावेत यासाठी सुद्धा त्यांनी संस्थांची निर्मिती करून विचारांची पायाभरणी केली. देशाचा विकास होण्यासाठी  देशात शांतीपूर्ण वातावरण असायला पाहिजे या हेतूने महात्मा गांधींनी सर्व आंदोलने अहिंसात्मक पद्धतीने केलीत असेही श्री कोश्यारी यावेळी म्हणाले.

आश्रमाचे संचालक आशिष गोस्वामी, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे - वर्मा, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार,  उपवन संरक्षक राकेश सेपट उपस्थित होते.