वर्धा, दि.26- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 62 व्या वर्धापणदिना निमित्त आज येथील जिल्हा क्रीडा स्टेडीयमच्या प्रागंणात वित्त व नियोजन तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेद्र मुळक यांनी ध्वजारोहन करुन मानवंदना दिली.
या प्रसंगी खासदार दत्ताजी मेघे, न.पा. अध्यक्ष आकाश शेंडे, जिल्हाधिकारी जयश्री भोज, जिल्हा पोलीस अधिक्षक अविनाशकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री मुळक संदेश देतांना म्हणाले की, इंग्रजांनी देशातील सत्ता सोडल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान लिहून 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने स्विकृत केले व 26 जानेवारी 1950 पासून संविधानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली.
विविध भाषा, विभिन्न राज्यांनी नटलेला हा आपला भारत देश विकासाच्या शिखरावर आरुढ होऊन नेत्रदीपक प्रगती साधली आहे.
भारतीय संविधान हा मौलीक ठेवा असून, देशाने सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष व लोकशाहीचे मुल्ये स्विकारलेली आहेत. सामाजिक, आर्थिक व राजनैतिक, न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तींची प्रतिष्ठा व राष्ट्राची आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी, बंधूता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्ण निर्धार करण्याचे मुल्य भारताच्या संविधानामध्ये समाविष्ट आहे.
या संविधानाच्या मुळ उद्देशावर आज अखंड देश एकसंघ उभा आहे. राज्याच्या जडणघडणीत पुरातन काळापासून अनेक समाज सुधारकांनी आपले आयुष्य खर्च करुन समाजाला दिशा देण्याचे कार्य केले. तसेच राष्ट्रपिता महात्मागांधी याच्या पावन स्मृतीने तसेच भुदान चळवळीचे प्रणेते यांचे मोलाचे योगदान व स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले बलिदान देश विसरु शकत नाही. या पावन दिवशी त्यांचे स्मरण करुन व अभिवादन करतो तसेच देशाच्या प्रगतीत अनेक मान्यवरांनी बहूमोल वाटा उचलल्या बद्दल त्यांचे आभार मानतो. देशाच्या प्रगतीत गौरवपूर्ण वाटचाल सुरु असून, त्यासाठी कटिबध्द होण्यासाठी आपण प्रतिज्ञा घेवूया असेही ते पूढे म्हणाले.
या प्रसंगी पूरुष व महिला पोलीस दल तसेच गृहरक्षक दलाचे जवान देवळी येथील जावधिया हायस्कुल वर्धा येथील न्यू इग्लिश हायस्कूल, स्वावलंबी विद्यालय, मॅाडेल हायस्कुल, भारत ज्ञान मंदीरम चे विद्यार्थी व विद्यार्थीनी नेत्रदिपक पथसंचलन करुन मानवंदना दिली.
यावेळी कमला नेहरु शाळा, केसरीमल कन्या शाळा, बि.डी.एस.कॅानव्हेंट शाळा वर्धा, पोलीस नियंत्रक पथक, पोलीस शिघ्र कृतीदल व सामान्य रुग्णालयाचे वतीने वाहनावर रथचित्र व देखावे प्रदर्शित करण्यात आले होते.
यावेळी अनेक महाविद्यालयाने देशभक्तीवर गिते व रंगारंग कार्यक्रम सादर करुन प्रेक्षकांच्या डोळयाचे पारने फेडले. यामध्ये लोकविद्यालय, भारत ज्ञान मंदिरम, केसरीमल कन्या शाळा, सुशिल हिमंतसिंगका विद्यालय, न्यू इग्लिश हायस्कूल, रत्नीबाई विद्यालय व जगजीवनराम विद्यालय, आनंदराव मेघे विद्यालय व अग्रगामी विद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
यावेळी मोठयासंख्येने अधिकारी, कर्मचारी नागरीक विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते.