वर्धा,दि.14- माय मराठीचा उगम हा 6 व्या शतकापासून प्रारंभ झाला असून, ती भाषा विकसीत होत होत आज साडेसत्तावन टक्के लोकांची बोली भाषा झाली आहे. सुलभ सोयीने बोलणारी मराठी भाषा ही शहरापासून ते ग्रामीण लोकांपर्यंत बोली भाषा ठरली आहे. या भाषेवर किती आक्रमण व संक्रमण झाले असले तरी मराठी भाषेच्या बदलत्या प्रवाहात आपली माय मराठी भाषा टिकूण राहणार असल्याचे परखड मत डॉ. सुभाष खंडारे यांनी व्यक्त केले.
ग्रंथोत्सवाच्या कार्यक्रमात काल मराठी भाषेचे बदलते स्वरुप, वर्तमान व भविष्य या परिसंवादामध्ये ते अध्यक्ष पदावरुन बोलत होते. या प्रसंगी प्रा. शेख हासम , प्रा. राजेंद्र मुंडे ,डॉ. सतिश पावडे, डॉ. वंदना पळसापुरे, डॉ. किरण नाकतोडे, डॉ. दिपक पुनसे, प्रा. सरोज देशपांडे, प्रा. दिगंबर साबळे, प्रा. सचिन सावरकर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
वर्तमान व भविष्य काळात मराठी भाषा लूप्त होईल अशी भिती व चिंता करण्याचे कारण नाही असे सांगून प्रा. खंडारे म्हणाले की, मराठी ही बोली भाषा असल्यामुळे ती ग्रामीण भागात सर्वाधिक बोलल्या जाते. या भाषेचे जतन व संवर्धन मोठ्या प्रमाणावर पूर्ण क्षमतेने समतेने ग्रामीण क्षेत्रात होत असते. ग्रामीण क्षेत्राच्या घडामोडी व व्यवहार याच भाषेतून होत असल्यामुळे ती भाषा जग असेपर्यंत जीवंत राहणार आहे. शहरात मात्र या मराठी भाषेत संक्रमण होत असून, त्यासाठी चिंता करण्याचे कारण नाही. मराठी मानसाकडे ही बोलीभाषा प्रकर्षाने बोलली जाते. सांस्कृतीक भाषा ही विशिष्ट लोकापुरती मर्यादित होती व आजही ती आहे. सामान्य लोकांची ती बोलीभाषा ठरलेली नसल्यामुळे अनेकांना ती अवगत झाली नाही. त्यामुळे याभाषेचे संवर्धन करणे ही काळाची गरज ठरते. देशात अनेक भाषा आहेत त्याचे दाखले देवून डॉ.खंडारे म्हणाले की, आजही अनेक प्रांतातातील आपआपल्या माय बोलीतून बोलून ती व्यक्ती स्वाभीमानाने व्यवहार करीत असते. मराठी भाषेला उदंड इतिहास असून, ही भाषा अधिक व्यापक व प्रगल्भ होण्यासाठी शिक्षक व प्राध्यापकांनी संशोधनात पुढाकार घेवून मराठी भाषेचे स्थान अधिक बळकट नव्हे तर विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी प्रयत्नीशिल असावे असेही ते म्हणाले.
या परिसंवादात सर्व वक्त्यांचा हाच सुर दिसून आला की मराठी भाषा प्रगल्भ होऊन त्याची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रत्येकांनी मोलाचा वाटा उचलावा. मराठी साहित्याला वाचक वर्ग मिळवून देण्यासाठी मराठी मानसाने योगदान द्यावे. शैक्षणिक क्षेत्रात अनेक आमुलाग्र बदल होत असून, जागतिकीकरणामध्ये तसेच संगणकीय युगामध्ये मराठी साहित्याकडे दुर्लक्ष होत आहे. ही बाब सर्वांच्या चिंतनाची असली तरी संगणक युगात मराठीचे नवनवे संशोधन करुन मराठी भाषेला व्यापकता मिळवून देण्याची गरज आहे. शासनाचे उपक्रम मराठी भाषेतच राबविले जातात. ते अधिक लोकाभिमुख झाले पाहीजे. शासनाचे लोकराज्य मासिक नवनविन उपक्रम घेऊन वाचकांच्या ज्ञानात भर पाडते त्यांचे ते उपक्रम योजना मराठी माणसाला दिशादर्शक ठरतात. मराठी भाषेला अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी शासन स्तरावर प्रयत्न झाले पाहीजे असा अभिप्राय अनेक मान्यवरांनी व्यक्त केला. यामध्ये प्रा.शेख हासम, प्रा. राजेंद्र मुंढे, डॉ. सतीश पावडे, डॉ. वंदना पळसापूरे, डॉ. किरण नाकतोडे, डॉ. दिपक पुनसे , प्रा. राजेश देशपांडे, प्रा. दिगांबर साबळे यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा. सचिन सावरकर यांनी वक्त्यांच्या भाषणातून आषय काढून उपस्थितांसमोर त्याची बाजू ठेवली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, ग्रंथपाल सुरज मडावी व विदर्भ साहित्य संघ वर्धा शाखेचे अध्यक्ष संजय इंगळे तिगांवकर, प्रदिप दाते, मुरलीधर बेलखोडे व साहित्यप्रेमी उपस्थित होते.
तत्पूर्वी नवनित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी श्रोतेवर्ग उपस्थित होते.
000000