'माझी
कन्या भाग्यश्री' चा 482 मुलींना लाभ
1
कोटी 20 लक्ष रुपये मुलींच्या नावे मुदती ठेव
वर्धा ,दि 4 जुलै (जिमाका ) लिंग निवडीस
प्रतिबंध करून
मुलीचा जन्मदर वाढविणे आणि मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून राज्य
शासनाने 'माझी कन्या भाग्यश्री'
ही योजना समाजातील सर्व घटकांसाठी सुरू केली. 1 ऑगस्ट 2017 पासून या योजनेची
नव्याने अंमलबजावणी सुरू झाली असून जिल्ह्यात दोन वर्षात 482 मुलींना
योजनेचा लाभ मिळाला आहे.
राज्यातील सरासरी लिंग गुणोत्तर प्रमाण
कमी झाले होते. बीड सारख्या जिल्ह्यात हे प्रमाण 1000 मुलांमागे 850 मुलीं पेक्षा
ही कमी होते.
भविष्यातील ही धोक्याची घंटा बघता राज्यशासनाने मुलींचा जन्मदर वाढावा, स्त्री
भ्रूण हत्या थांबाव्यात, मुलीच्या जन्माचा उत्सव व्हावा आणि जन्मलेल्या मुलींना
चांगले शिक्षण मिळावे यासाठी मुलीच्या पालकांना मदत आणि प्रोत्साहन म्हणून
‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना सुरू
केली. 2017 पूर्वी ही योजना केवळ दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या मुलींसाठी
राबविण्यात येत होती.
मात्र या योजनेची व्याप्ती वाढवून,
यामध्ये बदल करून, कुटुंबाचे
उत्पन्न साडे सात लाख रूपये असणाऱ्या समाजातील सर्व घटकांसाठी योजना लागू करण्यात
आली. . यामध्ये खासकरुन 1 ऑगस्ट 2017 ला आणि त्यानंतर
जन्मलेल्या एक किंवा दोन मुलीसाठी या योजनेचा लाभ घेता येतो. यासाठी एक
किंवा दोन मुलींनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या दाम्पत्य या योजनेच्या
लाभासाठी पात्र ठरते.
लाभाचे स्वरूप:- एका मुलींनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या दाम्पत्याच्या मुलीच्या नावे 50 हजार रुपये बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवण्यात येतात. यामध्ये दर सहा वर्षांनी व्याजाची रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी काढता येते.मुलगी 18 वर्षाची झाल्यावर आणि इयत्ता 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या मुलीला मूळ मुद्दल आणि त्यावरील व्याज अशी एकत्रित रक्कम देण्यात येते. यासाठी 18 वर्षापर्यंत मुलगी अविवाहित असणे आवश्यक आहे. दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळ्या मुली झाल्यास दोन्ही मुली पात्र ठरतात. 1 ऑगस्ट 2017 नुतर दोन मुलींना जन्म झाला. असल्यास आणि कुंटूंब नियोजन शस्त्रक्रिया केली असल्यास दोन मुलींच्या नावे प्रत्येकी 25 हजार रुपये मुदती ठेव योजनेत गुंतविण्यात येतात.
सदर योजनेनंतर्गत जिल्ह्यात 482
लाभार्थ्यांना 1 कोटी 20 लक्ष 50 हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. मुदती
ठेव चे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले आहेत. यामध्ये वर्धा 159,
सेलू 55, समुद्रपूर 37, हिंगणघाट 54, आर्वी 55, देवळी 48, आष्टी 48
आणि कारंजा 26 मुलींच्या नावे या योजनेतून बँकेत मुदती ठेव ठेवण्यात आली
आहे.
ही योजना 7 लक्ष 50 हजारपर्यंत
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्या समाजाच्या सर्व घटकातील मुलींसाठी लागू आहे.
तसेच बालगृहातील अनाथ मुलींनासुद्धा या योजनेत सामावून घेण्यात आले आहे. दत्तक
घेणाऱ्या पालकांना योजनेच्या अटी प्रमाणे ही योजना लागू आहे. मुलींच्या जन्माचे
स्वागत करणाऱ्या, केवळ एक किंवा दोन मुली असणाऱ्या पालकांनी या योजनेचा लाभ
घ्यावा.
ज्योती कडू
बालविकास प्रकल्प अधिकारी
नागरी प्रकल्प वर्धा