Saturday 5 January 2019










गुणवंत शेती करायला लागतील तेव्हा शेती उद्योगाला प्रकाशवाट मिळेल
                                             - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
- कृषी महोत्सवाचे उदघाटन

-

          वर्धा दि 5 (जिमाका ) :- नोकरी सोडून जेव्हा अनेक गुणवंत विद्यार्थी शेती करायला  तयार होतील तेव्हाच शेतीतील अंधाराला प्रकाशाची वाट मिळेल. शेतीतील उत्कर्षाची ती नांदी असेल आणि लालबहादूर शास्त्रींनी दिलेला जय जवान जय किसान चा नारा तेव्हाच खऱ्या अर्थाने पूर्णत्वास जाईल, असे प्रतिपादन अर्थ, नियोजन व वन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार  यांनी केले.
 
         पोलीस मैदान येथे कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
  5 दिवस चालणारया कृषी महोत्सवाचे उदघाटन श्री मुनगंटीवार यांचे हस्ते झाले, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार रामदास तडस, आमदार रामदास आंबटकर, आमदार डॉ पंकज भोयर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कांचन नांदूरकर,  नगराध्यक्ष अतुल तराळे
कृषी सभापती मुकेश भिसे, शिक्षण व आरोग्य सभापती
  जयश्री गफाट, सुनीता कलोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, पंचायत समिती सभापती नीता गजाम , वर्धा पंचायत समिती सभापती महानंदा ताकसांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
            यावेळी बोलताना ते म्हणाले की,कृषी विद्यापीठांनी राजुरी विद्यापीठासारखे अडीच एकरात साडेचार लाख उत्पन्न मिळवून देण्याचे संशोधन करावे. यासाठी पाहिजे तेवढा निधी बजेट मधून देण्यात येईल. राज्याच्या तोजोरीवर शेतकऱ्याचा पहिला हक्क आहे. त्यामुळे शेती उदयोग फायद्याचा करण्यासाठी असे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचवीणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
       शेतीच क्षेत्र जे पूर्वी सरासरी 4. 28 हेक्टर होतं ते आता 1.44 हेक्टर एवढं कमी झालं आहे. त्यातही बहुपिक पद्धती संपुष्टात आली असून अधिक उत्पन्न घेण्याच्या नादात आपण शेतीला विषयुक्त केलेलं आहे. त्यामुळे शेतीला विषमुक्त, करण्यासाठी सेंद्रिय शेतीची नितांत गरज आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा देशात सेंद्रिय शेतीसाठी पदम पुरस्कार देण्यात आला. मातीची सेवा केल्याशिवाय त्यातून सोन निघू शकत नाही हे सांगताना ते म्हणाले की, जगात कितीही शोध लागले तरी शेतीशिवाय अन्नधान्याचा पिकवण्याचा शोध अद्याप लागलेला नाही. त्यामुळे जगाचे पोट भरण्याची ताकद फक्त आणि फक्त शेतकऱ्यांमध्ये आहे.
त्यामुळे शेतकऱयांनी सुद्धा जे जगाच्या बाजारात विकू शकतो त्याचे उत्पादन घ्यावे असे आवाहन केले.  भूमातेची सेवा करणारया  शेतकऱ्यासाठी हा कृषी महोत्सव धन प्राप्त करणारे पर्व ठरावे अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. श्री मुनगंटीवार यांनी यावेळी महित्सवात लागलेल्या स्टॉलची पाहणी केली.
        यावेळी बोलताना खासदार रामदास तडस म्हणाले,  नाशिकच्या धर्तीवर विदर्भातील शेतमाल एक्स्पोर्ट करायला हवा.  फळबाग लावण्यासाठी प्रोत्साहित करून विदर्भातील शेतकरी सधन करण्याचे काम होत आहे. नाविन्यपूर्ण योजनेतून 'गोट मार्केट' ला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 
         कृषी महोत्सवाची सुरुवात अर्थमंत्र्यांनी केली असे डॉ पंकज भोयर म्हणाले. मागील वर्षी जाहीर केलेल्या कृषी भवनाचे आज  भूमिपूजन झाले. यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उओलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले. पाटील यांचे सीताफळ अंबानी विकत घेतात पण कृषी विभागालाच याची माहिती नाही . शेतकऱ्यांच्या समस्यांची गंभीरपणे दखल घेतली जात नाही.याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.  कामचुकार अधिकाऱ्यांकडे संपूर्ण विभाग बदनाम होत असतो असेही ते म्हणाले.  शेतकरी आत्महत्येचा जिल्ह्याला लागलेला कलंक पुसण्याचे काम अधिकाऱयांनी करावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
 
           यावेळी सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱयांचा पुरस्कार देण्यात आला यामध्ये विक्रमी सीताफळाची उत्पादन घेणारे  समुद्रपूर तालुक्यातील हळदगाव येथील  सुरेश पाटील, पवनारचे कुंदन वाघमारे  सुल्तानपूर हिंगणघाट चे रतनलाल बोरकर, भाजीपाला व फुलशेतीमध्ये  जया उघडे यांना  प्रथम क्रमांकाचे  पारितोषिक, सुधाकर शेंडे धानोली गावंडे, गोपाळ वाघमारे सेंद्रिय शेतीसाठी  सविता येळणे,  श्रीकांत  सर्वाधिक कापुस उत्पादन घेणारे  येरणगाव येथील महेश मुधोळकर यांना प्रथम पुरस्कार देण्यात आला. तसेच गुलाबीबॉण्डअळींचे व्यवस्थापन , विविध पिकांवरील रोगांचे व्यवस्थापन  आणि  कृषी विषयक योजनाची माहिती देणाऱ्या माहिती  पुस्तिकेचे  विमोचन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  यांनी केले. महोत्सवाला शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


000






देश निर्मितीत बांधकाम कामगाराचा वाटा मोठा
                                             सुधीर मुनगंटीवार
Ø बांधकाम कामगार नोंदणी मेळावा
वर्धा , दि. 05 : देश निर्मितीत बांधकाम कामगाराचा वाटा मोठा आहे. यासाठी देशाच्या निर्माणासाठी घाम गाळणा-या कामगारासाठी शासन विविध योजना राबवित आहे. गेल्या चार वर्षात शासनाने या येाजनेत दुप्पट वाढ केलेली असून यामुळे कामगार मंडळाकडे कामगारांच्या नोंदणीत सहापट वाढ झालेली आहे.  या नोंदणीधारक कामगारांना  विविध योजनेचा लाभ देण्यात येत असल्याचे  वित्त, नियोजन व वन मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज बांधकाम कामगाराच्या मेळाव्यात केले.
आज सार्वजनिक ग्रंथालयाच्या  सभागृहात आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमानी बांधकाम कामगारा संघटनेच्या वतीने आयोजित बांधकाम कामगार मेळाव्याला  इमारत व बांधकाम कामगार मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, खासदार रामदास तडस,  जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, आमदार, डॉ. पंकज भोयर, आमदार समिर कुणावार, आमदार रामदास आबंटकर,  माजी खासदार दत्ता मेघे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, नगर परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप ठाकूर यांची उपस्थिती होती.
 
शासनाने सत्तेत आल्यावर प्रथम मंत्र्याच्या वाहनावरील लाल दिवे हटवले. लाल दिव्यावर प्रेम करण्यापेक्षा   लाल रक्ताच्या माणसाला विकासाच्या मुख्यप्रवाहात आणणे  हे उद्दिष्ट ठेवले. यासाठी शासन दिनदुबळे, कष्ठकरी, सामान्य माणूस हा केंद्र बिंदू  समजून  राज्य शासन योजना  राबवित आहे. बांधकाम कामागारांनी महामंडळाकडून ‍मिळालेल्या पैशाचा सदुपयोग केला पाहिजे. कारण हा  पैसा मेहनतीचा आणि कष्टाचा आहे, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले, बांधकाम कामगारांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत  निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे यावेळी श्री. मुनगंटीवार म्हणाले. 
यावेळी मंत्रीमहोदयांना जिल्हयातील कामगार संघटनानी  जिल्हयात कामगार भवन उभारण्यात यावे तसेच कामगारांना पेंशन लागु करावी अशी मागणी केली असता श्री. मुनगंटीवार यांनी कामगार भवनाची मागणी पूर्ण करुन  कामगार भवनासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. या कामगार भवनामध्ये  कामगाराच्या मुलांना  शिक्षण, संगणक, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र तयार करण्यात येईल अशी  ग्वाही  यावेळी दिली. तसेच पेंशन बाबत  केंद्र पेंशन कायदयानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात पुर्वी 2 लाख बांधकाम कामगाराची नोंदणी होती. गेल्या चार वर्षात आता 13 लाख नोंदणी झालेली असून या नोंदणी करण्यात आलेल्या सर्व बांधकाम कामगार व त्याच्या पाल्यांना महामंडळाकडून विविध योजनेचा लाभ देण्यात येत असल्याचे श्री यादव म्हणाले.
यावेळी मान्यवरांचे हस्ते 500 बांधकाम कामगारांना निधीचे प्रमाणपत्र देण्यात आले.
                             00000



Thursday 3 January 2019








चार वर्षांत राज्य शिक्षणात तिसऱ्या क्रमांकावर
  शिक्षणमंत्री विनोद तावडे
Ø शिक्षणाची वारीचे थाटात उदघाटन
Ø  100 आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करणार
Ø  गोंदिया हा शाळाबाह्य विद्यार्थी जिल्हा घोषित
Ø  राज्य शासन ओपन बोर्ड सुरू करणार
           वर्धा, दि 3 जिमाका :-  कोणतंही मुलं नापास होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखायला आपण कमी पडतो आणि म्हणून आपल्या सोयीसाठी त्याच्या कपाळावर नापास चा शिक्का मारतो.  विद्यार्थ्याना  कौशल्यावर आधारित प्रशिक्षित करण म्हणजे शिक्षण अस मानून राज्य शासन शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवित आहे. त्याचा परिणाम म्हणजे 4 वर्षात  राज्य शिक्षणाच्या बाबतीत देशात 16 व्या क्रमांकावरून 3  क्रमांकावर आले आहे आणि यावर्षी ते प्रथम क्रमांकावर राहील.विद्यार्थी घडविणे हा मूळ उद्देश असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले.
      आज वर्धा येथिल  चरखा घर येथे आयोजित  'शिक्षणाची वारी'  या उपक्रमाचे  उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार डॉ. पंकज भोयर, समीर कुणावर, विभागीय आयुक्त संजीव कुमार , शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी,  जिल्हाधिकारी शैलेश नवाल, नगराध्यक्ष अतुल तराळे,जिल्हा परिषद उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, शिक्षण व आरोग्य सभापती  जयश्री गफाट, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, पंचायत समिती सभापती महानंदा ताकसांडे शिक्षण विभागाचे संचालक सुनील मगर उपस्थित होते.
      राज्यात शिक्षण क्षेत्रात विविध गुणात्मक बदल केल्यामुळे अनेक शिक्षकांनी त्याचे  स्वागत करून ते राबविल्यामुळे आज शिक्षणात गुणात्मक बदल दिसतोय. वर्धेत 1 हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून जिल्हा परिषद शाळेत आणण्याचा काम जिल्हा परिषद शिक्षकांनी केले आहे. हा त्या जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढली आहे याचा परिणाम असून यावर श्रेय शिक्षकांना जातेयं असे श्री तावडे यावेळी म्हणाले. इंगजीतून शिक्षणाला विरोध नाही हे स्पष्ट करताना ते म्हणाले की मराठी भाषा  ही डोळे असून इंग्रजी भाषा  ही चष्मा आहे. त्यामुळे दृष्टी असल्याशिवाय  दूरदृष्टी येणार नाही म्हणून मातृभाषेतून शिक्षणाला त्यांचा नेहमीच पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
 
          जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांची शोक्षणातील प्रगती वाढावी म्हणून स्वखर्चाने विविध उपक्रम राबविले.त्यांना शाबासकी देण्यासाठी आणि त्यांचे प्रयोग राज्यभर पोहचून इतर शाळांनी तसेच उपक्रम राबवून राज्याला शैक्षणिक दृष्ट्या प्रगत करावे, यासाठी शिक्षणाची वारी हा उपक्रम सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात 64 हजार शाळा शिक्षक आणि लोकप्रतिनिधिंच्या च्या लोकवर्गणीतून डिजिटल झाल्या आहेत. आता केंद्र शासन देशातील 15 लाख शाळांमध्ये डिजिटल बोर्ड हा उपक्रम सुरु करणार आहे. राज्य शासन नापास विद्यार्थ्यांसाठी वन टू वन करिअर समुपदेशन करून त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन देत आहे. घोकंपट्टी परीक्षा पद्धतीमुळे महाराष्ट्र संशोधक तयार करण्यात कमी पडले आहे. त्यामुळे मागील 4 वर्षांपासून इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचा अभ्यासक्रम बदलला आहे. तसेच यापुढे विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात शिक्षकाची उपलब्धता होणार असल्यामुळे शिक्षकांना विविध उपक्रम राबविण्यासाठी वेळ मिळेल असेही त्यांनी सांगितले.
 
     यावेळी विनोंद तावडे यांनी शिक्षक , विद्यार्थी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या शिक्षण विषयक प्रश्नांना उत्तरे दिलीत. यावेळी श्री विद्यामंदिर येथील विद्यार्थिनीने दफ्तराच्या ओझ्याचा प्रश्न उपस्थित केला तेव्हा श्री तावडे यांनी शाळेच्या मुख्याध्यापकाना यावर नियमांची अंमलबजावणी करण्यास  सांगितले.
100 आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करणार
       महाराष्ट आंतराष्ट्रीय शैक्षणिक बोर्डाची स्थापना करून राज्य शासनाने यावर्षी 13 शाळा सुरू केल्यात. पुढील वर्षात 100 शाळा सुरू करणार असल्याचे श्री तावडे यांनी सांगितले. याचा अभ्यासक्रम डॉ. रघुनाथ  माशेलकर,  डॉ काकोडकर, विजय भटकर, सोनम वांगचोक सारख्या शास्त्रज्ञानी तयार केला आहे असेही त्यानी यावेळी सांगितले.
ओपन बोर्डची स्थापना करणार
     काहीं विद्यार्थी संगीत, अभिनय, गायन ,खेळ यामध्ये रस असतो. पण शाळेमुळे त्यांना त्यांच्या या सुप्त गुणांवर लक्ष देता येत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांचे त्या- त्या क्षेत्रात उत्तम  करियर घडविण्यासाठी आणि शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी असे ओपन बोर्ड त्याला मदत करेल.
बालरक्षक चळवळ
      राज्यात बालरक्षक चळवळीच्या माध्यमातून कोणतेही मुलं शाळाबाह्य राहू नये यासाठी काम करीत आहे. या माध्यमातून गोंदिया जिल्हा हा शाळाबाह्य विद्यार्थी मुक्त जिल्हा झाला आहे असे श्री तावडे यांनी सांगितले.



         यावेळी आमदार पंकज भोयर आणि आमदार समीर कुणावर यांनीही वारीसाठी शुभेच्छा दिल्यात.
यावेळी अनटोल्ड स्टोरी या दिव्यांगाणी त्यांच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी केलेल्या यशोगाथेच पुस्तक प्रकाशन करण्यात आले. दीप्ती बेले या कान्हापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींचा दिपकाव्य कविता संग्रह, शुभांगी वासनिक यांच्या रत्नाची खाण आणि सार्थक जीवनासाठी संस्कार पार्व या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

      शिक्षणाची वारी मध्ये विविध शाळांचे 55 स्टॉल लावण्यात आले आहेत . 10 जिल्हे या वारीला जोडले असून 6 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या वारीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक सुनील मगर यांनी प्रस्ताविकातून केले. कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत यांनी तर आभार  शिक्षण उपसंचालक सतिश मेंढे यांनी  मानले.
                                                                        0000



Wednesday 2 January 2019






               सुनंदा चौधरी  यांचा  मुख्यमंत्र्यांशी संवाद
• स्वतःच घर मिळाल्यामुळे आता आईच्या घरी राहावे लागणार नाही
• विविध आवास योजनेतील लाभार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद

·        आवास योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार 5 ब्रॉस रेती
           वर्धा दि. 2 (जि.मा.का.):   पंडित दिनदयाळ उपाध्याय योजनेतून जागा खरेदीसाठी पन्नास हजार मिळाले, प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधण्यासाठी पैसे मिळाले अन स्वच्छता गृहासाठी रोहयोमधून अनुदान मिळाले त्यामुळे आम्हाला आता आईच्या घरी  राहावे लागणार नाही अशी भावनिक प्रतिक्रिया उमरी मेघे  येथे हक्काचे स्वतःचे पक्के घर मिळालेल्या सुनंदा अनिल चौधरी  यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केली.

       आज मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील विविध घरकुल योजनेतील लाभार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधुन त्यांच्या भावना आणि योजनेतील अडचणी जाणून घेतल्या. यावेळी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हिडीओ कॉन्फरन्स सभागृहातुन  उमरी मेघे येथील सुनीता अनिल चौधरी,  कविता निरंजन  दखणे, कविता आणि जितेश कोट्टेवार रा. समर्थ वाडी, सविता सुरेशराव गायकवाड  रा वर्धा यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी प्रधानमंत्री आवास योजना
(ग्रामीण, शहरी ), रमाई आवास योजनेतील एकूण 19
  लाभार्थी उपस्थित होते.

          सुनीता चौधरी यांचे 2010 मध्ये लग्न झाले असून त्यांच्या यजमानांचे स्वतःचे घर नसल्यामुळे  लग्नानंतर आईच्या घरी एका छोट्याश्या खोलीत त्यांचा संसार सुरू आहे. त्यांचे यजमान गवंडी काम करत असूनही आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे स्वत:चे घर बांधू शकत नसल्याचे दुःख होते. घर बांधायला त्यांच्याकडे जागाही नव्हती. पंडित दीनदयाळ घरकुल जागा खरेदी योजनेतून त्यांना घरासाठी 50 हजार रुपयांची जागा उपलब्ध करून दिली. तसेच 2018 मध्ये त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले. सद्यस्थितीत त्यांचे  घर स्लॅब पर्यंत बांधून झाले असून मार्च महिण्यात नवीन घरात गृहप्रवेशाचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे त्यांनी  मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना सांगितले. 
 
          कविता निरंजन दखणे  यांनी  आपण पूर्वी  मातीच्या कच्या घरात राहत होतो. 2017 -18 मध्ये  प्रधानमंत्री आवास योजनेमुळे पक्के घर मिळाले. आता मी माझे पती आणि दोन मुल अतिशय आनंदात या घरात राहत असून या घरासाठी 1 लाख 20 हजार रुपये अनुदान मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना सांगितले.
           आरती जितेश कोट्टेवार म्हणाल्या वर्धेतील गजबजलेल्या राजकला टॉकीजवळ  आजूबाजूला सर्व मोठी घरे असताना केवळ माझेच एक झोपडे होते. त्यांच्या घराकडे बघून माझेही पक्के घर असावे असे वाटत होते. मात्र आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे घराचे स्वप्न पूर्ण  होईल असे ध्यानीमनी नव्हते. पण प्रधानमंत्री आवास योजनेत घर मंजूर झाले असून घराचे बांधकाम सुरू आहे. दुसरा टप्प्याचा निधी मिळाला नाही असे सांगितले.  यावेळी मुख्यमंत्र्यांनी वर्धा जिल्ह्यात रेतीचा प्रश्न आहे का? अशी विचारणा केली. त्यावर कोट्टेवार यांनी रेती उपलब्ध नसल्यामुळे दुप्पट भावाने खरेदी करावी लागत असल्याची वस्तुस्थिती मांडली. यावर घरकुल योजनेतील घरे बांधताना मुख्यतः वाळूची समस्या भेडसावत होती. आता  ५ ब्रास पर्यंतची वाळू कोणतीही रॉयल्टी न घेता या योजनेतील लाभार्थ्याना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे हा प्रश्न सुटेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच पुढील हफ्तेही लवकरच मिळतील अशी ग्वाही दिली.
             धुणीभांडी करणाऱ्या सविता गायकवाड यांनी घरकुल मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गरिबांना स्वत:चे हक्काचे घर देण्यासाठीच ही योजना असल्याचे सांगितले.
  तसेच लाभार्थ्यांचे कुंटूंब, मुलांचे शिक्षण आणि घराच्या बांधकामाविषयी मुख्यमंत्र्यांनी आस्थेने विचारपूस केली.
          राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १२ लाख घरांचे २०१९ च्या अखेर पर्यंत नियोजन असून आता पर्यंत ६ लाख घरे बांधली आहेत. उर्वरित ६ लाख घरे यावर्षात पूर्ण होतील. मातीच्या, कुडाच्या घरात राहणाऱ्या, पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन जीवन जगणाऱ्या गरिबांचे स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत ही योजना सुरू राहील असे सांगून मुख्यमंत्र्यांनी घर पूर्ण करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या अधिकारी ,कर्मचारी यांचे अभिनंदन केले. मजबूत भारत करण्यासाठी, सर्वाना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू असेही त्यांनी  यावेळी सांगितले..
                                                    0000