वर्धा, दि.7- माजी सैनिकांच्या कुटूंबियांसाठी तसेच त्यांच्यावर अवलंबित करीता घ्वज निधीतून अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांना अधिक गती मिळावी यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी ध्वजनिधीच्या उद्दिष्टपुर्तते करीता संकल्प करुन सढळ हस्ते मदत केली पाहीजे. असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी केले.
आज येथील विकास भवनात ध्वजदिन 2011 निधी संकलनाचा शुभारंभ अप्पर जिल्हाधिकारी भागवत यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा मुद्रांक अधिकारी सुभाष बुटले, माजी सैनिक कल्याण अधिकारी शशिकांत देशपांडे व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी फ्ला.ले.धनंजय सदाफळ आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
गेल्या वर्षी ध्वजनिधीच्या संकलनाचे उद्दिष्ट 126 टक्के झाल्याचे नमूद करुन भागवत म्हणाले की या निधीतून अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात यामध्ये शासकीय अधिकारी व कर्मचा-यांचे मोठे योगदान असते मात्र सामाजिक दायीत्व म्हणून समाजातील प्रत्येक घटकांनी या ध्वज निधीला मदत केली पाहीजे. या निधीच्या माध्यमातून माजी सैनिकांच्या पाल्यांचा विवाह, आरोग्यावरील खर्च, शालेय शिक्षणाचा खर्च, वसतीगृह खर्च, प्रतीपुर्ती आदी अनेक बाबीवर खर्च करण्यता येतो. देशाच्या संरक्षणात माजी सैनिकाचे मोठे योगदान असते. त्यांच्या शौर्यगाथेच्या स्मृतीला उजाळा देऊन त्यांनी विनम्रपणे अभिवादन केला.
याप्रसंगी बोलतांना माजी सैनिक अधिकारी मेजर देशपांडे म्हणाले की घ्वजनिधीत शासकीय अधिकारी व कर्मचा-यांचे योगदान फार मोठे असून माजी सैनिकांनी व समाजातील प्रत्येक घटकांनी या निधीसाठी मोलाचा वाटा उचलावा असे आवाहन केले.
प्रास्ताविक करताना फ्ला. ले. सदाफळ म्हणाले की माजी सैनिकांना व तयांच्या कुटूंबियाना घ्वजनिधीचा वापर करण्याबाबत माहिती कळावी यासाठी या दिवसाचे महत्व अधिक आहे. शासनाने माजी सैनिकांचे पुर्नवसना सोबतच अनेक कल्याणकारी योजना कार्यान्वीत केल्या असून त्यामध्ये अंशदायी स्वास्थ्य योजना नव्याने कार्यान्वित झाली आहे. माजी सैनिकांच्या कल्याणकारी योजनेसाठी या वर्षी 14 विविध बाबीवर 5 लक्ष 75 हजार रुपये खर्च झाले असून त्यामध्ये माजी सैनिकांच्या पाल्यावर तसेच अवलंबितावर गंभिर आजारासाठी 40 हजार, शालेय शिक्षणासाठी 41 हजार, महाविद्यालयीन शिक्षणासाठी 63 हजार, व्यवसायीक शिक्षणासाठी 1 लाख 34 हजार, शिष्यवृत्तीसाठी 56 हजार या महत्वपूर्ण बाबीचा त्यामध्ये समावेश आहे. यावर्षी 6 माजी सैनिकांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यात आले असून, यावर्षी ध्वजनिधी संकलनाचे उद्दिष्ट 33 लक्ष रुपये जिल्ह्याला देण्यात आले आहे. समाजातील घटकांचा ध््वजनिधीसाठी सकारात्मक विचार असून आतापर्यंत उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यावर्षीसुध्दा उद्दीष्ट पुर्ततेसाठी प्रत्येकांनी संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
तत्पूर्वी माजी सैनिकांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचे वाटप व माजी सैनिकांच्या विरमातेचा सत्कार साळी चोळी देवून मान्यवरांनी केला.
या कार्यक्रमाचे संचलन अरुण दंवगे व आभार प्रदर्शन संजय देशपांडे यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने माजी सेनिक व त्यांच्यावर अवलंबित कुटूंब सहभागी झाले होते.