दिव्यांगांसाठी नागपूरला होणार
संयुक्त पुर्नवास केंद्र
-केंद्रीय मंत्री थावरचंद्र गेहलोत
Ø 532 दिव्यांगांना साहित्याचे वितरण
वर्धा,
दि.20 :-दिव्यांगांना
येणा-या अडचणी लक्षात घेऊन त्यांची आरोग्य तपासणी, प्रशिक्षण, स्वंयंरोजगारासाठी
कर्ज पुरवठा योजना, यासारख्या सर्व
योजनांचा लाभ एकाच ठिकाणी घेता यावा म्हणुन नागपूरला संयुक्त पुर्नवास केंद्र
सुरु करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. कर्मचा-यांची नियुक्ती झाल्यावर
तीन महिन्यात हे केंद्र अंपगासाठी कार्यान्वित होईल. अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता
मंत्री थावरचंद गेहलोत यांनी दिली.
दिव्यागांसाठी निःशुल्क साहित्य
वितरणाचा कार्यक्रम आज सावंगी मेघे येथील दंत महाविद्यालयाचे सभागृहात सामाजिक न्याय
आणि अधिकारिता मंत्रालय ,एलिम्को कंपनी आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त
विद्यमाने घेण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करतांना श्री गेहलोत बोलत होते. या
कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, सामाजिक न्याय व अधिकारिता
मंत्रालयाचे संयुक्त सचिव अविनाशकुमार अवस्थी , जिल्हाधिकारी शैलेश नवाल, शिक्षण सभापती वसंतराव आंबटकर
उपस्थित होते.
यावेळी श्री गेहलोत यांचे हस्ते
अपंगांना तीन चाकी सायकल, व्हील चेअर,
श्रवणयंत्र, एमएसआयईडी कीट, ब्रेलकाठी, ब्रेलकीट इत्यादी साहित्याचे वितरण करण्यात
आले. यावेळी बोलतांना ते म्हणाले, आतापर्यंत दिव्यागांना शिष्यवृत्ती देण्यात
येत नव्हती. मात्र पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी दिव्यांगांच्या सर्वांगिण विकासासाठी
काही योजना नव्याने सुरु केल्या. त्यामध्ये 2014-15 पासुन अपंगांसाठी शिष्यवृत्ती
योजना सुरु केली आहे. याचा लाभ पूर्वमाध्यमिक व उच्च माध्यमिक आणि पदवीधर
विद्र्यार्थी घेऊ शकतात .
त्याचबरोबर 80 टक्के पेक्षा जास्त
अंपग असणा-या व्यक्तींना मोटराईज्ड ट्रायसिकल देण्याची योजना सुरु केली आहे.
यामध्ये केंद्र सरकार 25 हजार अनुदान देते उर्वरित 12 हजार रुपये आमदार ,खासदार
निधीतून उपलब्ध करुन दिल्यास दिव्यांग याचा सुध्दा लाभ घेऊ शकतात. देशात
आतापर्यंत दोन हजार शिबिराच्या माध्यमातून 5 लाख पेक्षा जास्त दिव्यांगांना
विविध दैनंदिन साहित्याचे वितरण करण्यात आले. कर्णबधिर मुलांसाठी कॉकलिअर इम्प्लॉटची सुविधा उपलब्ध करुन दिली
असून यासाठी 6 लाख रुपये अनुदान केंद्र शासन देते. आतापर्यंत 355 मुलांवर इम्प्लाट केले असून
आता ती मुले चांगल्याप्रकारे ऐकू व बोलू शकत आहे.
याशिवाय केंद्र सरकार राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय क्रिडा केंद्र स्थापित
करण्याचा विचार करीत आहे. यामुळे दिव्यांगांमध्ये असलेल्या क्रिडागुणांचा विकास होईल. त्याचबरोबर दिव्यागांसाठी
विशिष्ट प्रकारचे ओळखपत्र बनविण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे दिव्यांग कोणत्याही शहरात कुठल्याही योजनेचा लाभ घेऊ शकतील असेही ते यावेळी म्हणाले.
वर्धा जिल्हयाच्या उर्वरित तीन तालुक्यातील दिव्यांगांचे सर्वेक्षण करुन लवकरच
त्यांनाही साहित्याचे वितरण करण्यात येईल, अशी हमी त्यांनी यावेळी दिली.
यावेळी खासदार रामदास तडस यांनी वर्धा
जिल्हयातील 532 दिव्यांगांना केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने साहित्याचे वितरण केले
याबद्दल सामाजिक न्याय मंत्री थावरचंद
गेहलोत यांचे प्रति आभार व्यक्त केले. केंद्र शासनाने आतापर्यत 71 नविन योजना
सुरु केल्या याचा लाभ नागरिकांना घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच उर्वरित
तीन तालुक्यातील दिव्यांगाना सूध्दा साहित्य वितरण करण्यासाठी लवकरच
कार्यक्रम आयोजित करण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी आमदार समिर कुणावार, जिल्हाधिकारी
शैलेश नवाल आणि सामाजिक न्याय विभागाचे संयुक्त सचिव अविनाशकुमार अवस्थी यांनीही
यावेळी मार्गदर्शन केले.
या
कार्यक्रमात 117 व्यक्तींना तीन चाकी सायकल, 48 व्हील चेअर, 2 सीपी चेअर,
132 कुबडया, 39 वृध्द व्यक्तींना काठी, 10 अंध व्यक्तींना काठी, 32 ब्रेल किट, 178 कर्ण यंत्र, बालकांसाठी
7 रोलेटर , मानसिक विकलांग व्यक्तींना एम.एस.आय.ई.डी. किट 176, कृष्ठ रुग्णांसाठी
ए.डी.एल. किट 7 , अशा एकुण 748 साहित्याचे 532 व्यक्तींना वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन ज्योती
भगत यांनी केले कार्यक्रमाला प्रशासकिय
अधिकारी , लोकप्रतिनिधी, लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते