शेतक-यांचे समाधान होईपर्यंत
जमिनीला हात लावणार नाही
-जिल्हाधिकारी शैलेश नवाल
वर्धा, दि.20 :-नागपूर-मुंबई महाराष्ट्र समृध्दी
महामार्गासाठी शेतक-यांच्या जमिनीचे भुसंपादन नव्हे तर भूसंचयन करण्यात येणार
आहे. यामधुन शेतक-यांना विकसित भूखंड देण्यात येईल. या भूसंचयनासाठी लागणारी जमीन
जोपर्यंत शेतक-यांच्या शंकाचे पूर्ण निरसन करुन त्यांचे समाधान होत नाही
तोपर्यंत शेतक-यांच्या जमिनीला हात
लावणार नाही असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. आर्वी येथे
शेतक-यांशी संवाद साधतांना त्यांनी हे स्पष्ट केले. महाराष्ट्र समृध्दी महामार्गासंदर्भात आर्वी तालुक्यातील शेतकरी –भूधारकांशी प्रशासनाच्या वतीने संवाद साधुन त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. यावेळी आमदार अमर काळे, उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता यु.व्ही. डाबे, तहसिलदार विजय पवार, पंचायत समिती सभापती ताराबाई ताडाम उपस्थित होत्या.
प्रारंभी जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र समृध्दी महामार्गाबाबत. सादरीकरण करुन शेतक-यांना माहिती दिली. कोणताही विकास हा एकतर्फी न होता तो भागीदारीचा विकास व्हायला हवा आणि त्यासाठी शेतक-यांचा जास्तीत जास्त फायदा करुन देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतक-यांच्या शेतातील पाईपलाईन, विहिर, विंधनविहीर, झाडे यांचेही सर्वेक्षण करुन त्यांची नोंद घेवून त्याचा मोबदला दिला जाईल. असेही त्यांनी यावेळी शेतक-यांचे शंका निरसन करतांना स्पष्ट केले. ज्या शेतक-यांच्या सातबारावर ओलिताची नोंद नाही ती सर्वेक्षणाच्या वेळी करुन घेण्यात येईल. तसेच कृषी समृध्दी केद्रामध्ये शेतक-यांना विकसित भुखंड हे लॉटरी काढून देण्यात येतील.
यावेळी त्यांनी शेतीचे आताचे दर आणि विकसित भुखंडाचे दर यातील तफावत उदाहरणाव्दारे पटवून दिली. तसेच शेतक-यांच्या शंकाचे निरसन केले.
आमदार अमर काळे म्हणाले लोकप्रतिनिधी म्हणुन लोकांचे हित बघणे जबाबदारी असुन शेतक-यांच्या विकासाठी या प्रकल्पासंदर्भात सकारात्मक भूमिका असेल. पण लोकांचे समाधान झाले तरच भूसंचयन करु देणार असुन शेतक-यांच्या काही प्रश्नांची उत्तर अजुनही शासनाकडे नाहीत. त्यासंदर्भात शासनाकडून स्पष्ट सुचना आल्या तरच भुसंचयन करणे शक्य होईल. शेतक-यांचे प्रश्नासंदर्भात मुख्यामंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य गजानन निकम, कार्यकारी अभियंता श्रीमती अन्सारी, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment