Saturday 31 December 2011

माहिती व जनसंपर्क महासंचालक पदी पी.टी.नलावडे


             मुंबई दि. 31:  भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागात सह सचिव पदावर कार्यरत असलेल्या पी.टी.नलावडे यांची  माहिती जनसंपर्क महासंचालक या पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
            सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने आज नियुक्तीचे हे आदेश निर्गमित करण्यात आले.
            याव्यतिरिक्त झालेल्या नियुक्त्या अशा आहेत. अतिरिक्त विभागीय आयुक्त, औरंगाबाद याठिकाणी कार्यरत असलेल्या आर.एन.शिनगारे यांची नियुक्ती  व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, नागपूर येथे, अतिरिक्त विभागीय आयुक्त, नाशिक येथील डी.आर.बन्सोड यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला येथे, गोंदियाचे जिल्हाधिकारी ए.के.झाडे यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मुंबई येथे, वाशिम चे जिल्हाधिकारी यु.एस.राठोड यांची नियुक्ती महासंचालक, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, अमरावती येथे तर ठाण्याचे अतिरिक्त आदिवासी आयुक्त पी.डी.करवंदे यांची नियुक्ती व्यवस्थापकीय  संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई येथे करण्यात आली आहे.
याशिवाय जिल्हाधिकारी रत्नागिरी एम.बी.गायकवाड यांची नियुक्ती संचालक, माहिती व तंत्रज्ञान, मंत्रालय, मुंबई येथे पदोन्नतीने करण्यात आली आहे, (अधिकालिक वेतनश्रेणीत पद उन्नत करुन)  नियोजन विभागाच्या सहसचिव श्रीमती आय. ए. कुंदन यांची  संचालक आपत्ती व्यवस्थापन प्रभाग महसूल वन विभाग  पदी  नियुक्ती करण्यात आली आहे.

अपघात अश्रुंचे कारण, सुरक्षा सुखाचे कोंदण रस्‍ते सुरक्षा पंधरवड्याचे आज वर्धेत उदघाटन


      वर्धा,दि.31- दरवर्षीप्रमाणे 1 ते 15 जानेवारी दरम्‍यानच्‍या कालावधीत रस्‍ता सुरक्षा पंधरवडा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला असून, याचे उदघाटन उद्या दि. 1 जानेवारी 2012 रोजी सकाळी 10 वाजता बजाज चौक येथे वाहतूक नियंत्रण शाखेच्‍या मैदानात होत आहे.
     23 वा रस्‍ता सुरक्षा सप्‍ताहाचे उदघाटन के.आर.बजाज उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग व  अविनाश कुमार पोलीस अधिक्षक यांच्‍या अध्‍यक्षतेखाली तसेच विजय खोराटे मुख्‍याधिकारी नगर परिषद , लक्ष्‍मीनाराण सोनवणे शिक्षणाधिकारी यांच्‍या उपस्थितीत संपन्‍न होणार आहे.
     उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्‍हाण यांनी ही माहिती दिली. हे पंधरवड्याचे 23 वे वर्ष आहे. अॅक्‍सीडेन्‍ट ब्रिंग टिअर्स सेफ्टी ब्रिंग्‍ज चिअर अर्थात अपघात अश्रुंचे कारण, सुरक्षा सुखाचे कोंदण असे या वेळेचे ब्रीदवाक्‍य आहे.
     या पंधवड्यातील कार्यक्रम असे राहणार आहेत.
    दि. 1 जानेवारी 2012 रेाजी रस्‍ता सुरक्षा अभियानाचे उदघाटन, दि. 2 जानेवारी रोजी वाहनांना व बैलगाडयांना रिफ्लेक्‍टर टेप लावणे, दि.3 जानेवारी रोजी वाहन चालकांची नेत्र तपासणी, 4 जानेवारी रोजी मोटार वाहन चालक, स्‍कूलबस चालक प्रशिक्षण व पार्कींग व रहदारी नियमाविषयी प्रबोधन, दि. 5 जानेवारी  विद्यार्थ्‍यांचे रस्‍ता सुरक्षा विषयी वत्‍कृत्‍व, चित्रकला व निबंध स्‍पर्धा, दि. 6 जानेवारी रोजी वाहन चालक व पोलीस कर्मचारी यांचेकरीता धोकादायक रसायन हाताळणी संबंधी प्रात्‍यक्षिक व प्रशिक्षण,दि.7 जानेवारी टोलनाक्‍यावर माहिती पुस्‍तीकेचे वाटप तसेच सिनेमा केबलवर स्‍लाईड शो, दि. 8 जानेवारी 2012 रोजी सार्वजनिक बांधकाम  विभागासोबत ब्‍लॅकस्‍पॉटची दुरुस्‍ती करणे व तुटलेले दुभाजक दुरुस्‍ती करणे, दि. 9 जानेवारी टि.व्‍ही.चॅनल, रेडिओवर परिसंवाद कार्यक्रम तसेच सिनेमा टॉकिजमध्‍ये स्‍लाईड शो दाखविणे, दि. 10 जानेवारी आर.एस.पी. रॅली ऑडीओ, व्हिडीओ प्रदर्शन व विद्यार्थ्‍यांना वाहतुक नियमांची माहिती व प्रशिक्षण, दि.11 जानेवारी  चौका-चौकात झेब्राक्रॉसींग पादचारी व जनतेला माहिती देणे तसेच चौकात बोर्ड लावणे, दि. 12 जानेवारी  पत्रके वाटप व चालकाची जनजागृती,    दि. 13 जानेवारी वाहन चालक, पेालीस व वाहतुक कर्मचारी यांना प्रथमोपचार प्रशिक्षण मार्गदर्शक डॉ. मोहन अडयाळकर, दि. 14 जानेवारी रस्‍ता सुरक्षा अभियान संबंधी सेमिनार,आणि दि. 15 जानेवारी 2012 रोजी समारोप कार्यक्रम होईल.

सोमवार 2 जानेवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन


    वर्धा, दि.31 – सोमवार दि. 2 जानेवारी 2012 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय वर्धा येथे नेहमी प्रमाणे महिन्‍याच्‍या पहिल्‍या सोमवारी होणारा लोकशाही दिन होईल. मागील महिन्‍यात नगरपालिका /नगर परिषद निवडणूक आदर्श आचारसंहिता असल्‍याने लोकशाही दिन रद्द करण्‍यात आला होता.
      आचारसंहिता आता संपली आहे त्‍यामुळे सोमवार दि. 2 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता लोकशाही दिन होईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्‍यावी, असे जिल्‍हाधिकारी कार्यालयाव्‍दारे कळविण्‍यात  आले आहे.

ग्रामबिजोत्‍पादनांत सहभागी शेतक-याची कार्यशाळा


   वर्धा,दि.31-विकास भवन वर्धा येथे नुकतेच (दि.22 डिसे.) विविध योजने अंतर्गत राबविण्‍यांत येणा-या ग्रामविजोत्‍पादन कार्यक्रमात भाग घेणा-या शेतक-यांची कार्यशाळा जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांचे अध्‍यक्षतेखाली आयोजीत करण्‍यांत आली होती. या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्‍याकरीता कृषि विज्ञान केंद्र सेलसुरा येथील डॉ. नेमाडे, जिल्‍हा बिज प्रमाणिकरण यंत्रणा वर्धा चे गावंडे उपस्थित होते

      प्रथम गावंडे यांनी बियाणे कायदा 1966 नुसार ग्रामबिजोत्‍पादनाच्‍या सर्व कायदेशीर बाबी समजावुन सांगीतल्‍या व ग्रामबिजोत्‍पादक शेतक-यांनी कार्यक्रमात भाग घेण्‍यासाठी काय कार्य करावयास पाहिजे याबाबत सविस्‍तर मार्गदर्शन केले. डॉ. नेमाडे यांनी ग्रामबिजोत्‍पादन घेताना शेतक-यांनी कोणकोणत्‍या तांत्रिक बाबी लक्षात घ्‍यावयास पाहिजे यावर सविस्‍तर मार्गदर्शन केले.

      भाऊसाहेब ब-हाटे यांनी शेवटी कृषि विभागामार्फत ग्रामबिजोत्‍पादक    शेतक-यांना रुपये 1000 प्रति क्विंटल बियाणे उत्‍पादनावर अनुदान देत असल्‍याचे व सन 2011-12 मध्‍ये प्रायोगिक तत्‍वावर कडधान्‍य पिकाचे ग्रामबिजोत्‍पादन अंतर्गत उत्‍पादन झालेल्‍या  बियाण्‍याला बियाणे शेतक-यांना विक्री केल्‍यानंतर प्रति क्विंटल रुपये 1200 विक्री अनुदान देण्‍यात येणार असल्‍याचे विषद केले. तसेच जिल्‍ह्यात ग्रामबिजोत्‍पादना अंतर्गत कार्यरत पाच गटांना बियाणे प्रक्रीया युनिट 50 टक्‍के अनुदानावर देण्‍याचे नियेाजन असल्‍याचे सांगीतले.

     कार्यशाळेला 80 ग्रामबिजोत्‍पादक व 50 अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेत 27 शेतक-यांना ग्रामबिजोत्‍पादनासाठी रुपये 95 लक्ष 8 हजार रुपयाचे वाटप करण्‍यात आले. कार्यशाळेत सन 2010-11 वर्षात  हरबरा पिकाचे ग्रामबिजोत्‍पादन कार्यक्रमात भाग घेतलेल्‍या शेतक-यांना अनुदानाचे धनादेशाचे वाटप भाऊसाहेब ब-हाटे यांचे हस्‍ते करण्‍यात आले. कार्यशाळेचे संचालन धर्माधिकारी यांनी केले.

Friday 30 December 2011

योजनांची माहिती देणारे चित्ररुपी भिंतीपत्रकाचे उदघाटन जिल्‍हाधिका-यांचे हस्‍ते संपन्‍न


     वर्धा, दि.30- कृषि विभागामार्फत राबविण्‍यात येणा-या विविध योजनांची आढावा बैठक  जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात आयोजित करण्‍यात आले. सदर बैठकीचे औचित्‍य साधून कृषि विभागामार्फत समुह व गट शेतीसाठी   शेतक-यांना होणारे फायदे व विविध योजनांची  माहिती देणारे चित्रारुपी पोष्‍टर तयार करण्‍यात  आले. या पोष्‍टरचे उदघाटन जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी नुकतेच केले.    
     सामुहिक शेती करण्‍यासाठी पुढील प्रमाणे असून त्‍यामध्‍ये गटामध्‍ये सहभागी होण्‍यासाठी सभासद स्‍वतः शेतकरी असावा. गटाची नोंदणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी वर्धा कार्यालयात आत्‍मा संस्‍थेकडे रु. 500 भरुन करावी लागेल. गटामध्‍ये साधारण 10 ते 15 सभासद असावे. शेतकरी गट हा एकच शेती विषयक कार्यक्रम घेणारा असावा. गटातील शेतकरी एकाच गावातील व एकाच आर्थिक स्‍तरावरचे असावे. गटाचे नावे बँकेत स्‍वतंत्रा खाते उघडावे लागेल. त्‍यात दर महिण्‍यात होणारी बचत जमा करावी लागेल व  गटाचे नियमित बैठका घेणे बंधनकारक राहील.
     सामुहीक शेतीचे शेतक-यांसाठी फायदे पुढील प्रमाणे असून त्‍यामध्‍ये  गटात शासनाचया योजनांचा लाभ प्राधान्‍याने धेता येईल. गटातील सदस्‍यांना  शेतीसाठी लागणा-या बि, बियाणे, खते, औषधी, इत्‍यादी स्‍वस्‍त दारात उपलब्‍ध होवू शकतील. गटातील सदस्‍यांनी शेतमालाचे संघटीतरीत्‍या  विक्री केल्‍यास मालाला चांगला भाव मिळेल. गटाच्‍या माध्‍यमातून कृषि मालावर प्रक्रीया केल्‍यास शेतमालाचे मुल्‍य  वाढ होवून शेतक-यांना जास्‍तीचा नफा मिळेल. गटातील सदस्‍या कडून दरमहा बचत केल्‍यामुळे गटाजवळ निधी उपलब्‍ध राहील व त्‍या निधीतून गटातील सदस्‍यांना व तातडीच्‍या कामासाठी तात्‍काळ कर्ज मिळू शकेल.

     राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान अंतर्गत पॉवर ऑपररेड मशीनमध्‍ये रोटावेटर खरेदीच्‍या 50 टक्‍के अनुदान 60 हजार रुपये चा चेक नंदकिशोर तोटे यांना जिल्‍हाधिकारी यांचे हस्‍ते देण्‍यात आला. कृषि विभागामार्फत राबविल्‍या जाणा-या आत्‍मा,राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान, पाणलोट प्रकल्‍प, आय.आर.डी.एफ प्रकल्‍पाचा अध्‍यक्षाच्‍या व सदस्‍याच्‍या समवेत आढावा घेण्‍यात आला व विविध घटकाच्‍या बाबीवर चर्चा करण्‍यात आली. असे जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी वर्धा कळवितात.

मुलां-मुलिंमध्‍ये भेदाभेद करु नका - डॉ. थोरात

     वर्धा,दि.30-अनेक क्षेत्रांत मुलिंनी नेत्रपदक शिखरे पदक्रांत केली असून मुलिंना मुलासारखे समान अधिकार शासनाने प्रदान केले आहे. अद्यापही प्रसवपूर्व स्त्रिभ्रृन हत्‍येचे प्रमाण वाढलेले असून दर हजारी मुलींचे प्रमाण घटत होत आहे. ही बाब समाजासाठी चिंतेची असून ती दूर करण्‍यासाठी प्रसवपूर्व निदान तंत्राच्‍या गैर प्रकाराला आळा घालून मुलांमुलिंमध्‍ये भेदाभेद करु नका असे आवाहन आरोग्‍य विभागाच्‍या माजी उपसंचालक डॉ. पुष्‍पा थोरात यांनी केले.

      जिल्‍हा समान्‍य रुग्‍णालयाच्‍या सभागृहांत प्रसवपूर्व निदान तंत्र व गर्भधारण पूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र या विषयी समुचित प्राधिकरण संबधित अधिका-यांसाठी कार्यशाळा संपन्‍न झाली त्‍याप्रंसगी त्‍या बोलत होत्‍या.
     यावेळी जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाशकुमार, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक रत्‍ना रावखंडे, नागपूरचे डॉ. शिवकुमार चव्‍हाण , अतिरीक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. सोमलकर व डॉ. शर्मा मंचावर उपस्थित होते.
     ग्रामीण भागापेक्षा नागरी भागात मुलांच्‍या प्रमाणात वाढ झाली असल्‍याचे सांगून डॉ. थोरात म्‍हणाले की गेल्‍या काही वर्षात अनेक भागामध्‍ये प्रसवपूर्व निदान करणा-या केंद्राची वाढ झाली असून त्‍यातील काही केंद्रे गर्भ चिकित्‍सा करण्‍यासाठी निदान तंत्राचा गैरवापर करतात. त्‍यामुळे मुलिंच्‍या प्रमाणात घट होताना दिसत आहे. वास्‍तविक गर्भलिंग निदान करणे हा कायद्याने गुन्‍हा समजण्‍यात येतो. अशा प्रवृत्‍ती टाळण्‍यासाठी स्‍वंयंसेवी संस्‍थे सोबत आता समुचित प्राधिका-यांना व संबधित अधिका-यांना प्रसवपूर्व निदान केंद्राची तपासणी करण्‍याचे अधिकार दिले आहे यामध्‍ये दोषींवर गुन्‍हा  नोंदवून कार्यवाही सुध्‍दा होऊ शकते. यावेळी त्‍यांनी विस्‍ताराने  नियमनाचे सादरीकरण करुन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
     यावेळी बोलताना डॉ. चव्‍हाण म्‍हणाले की विकृत स्‍वरुपाचे बाळ, मतीमंद व इतर असाध्‍य आजाराचे बाळ जन्‍माला येऊ नये यासाठी प्रसवपूर्व निदान तंत्राचा वापर या चांगल्‍या कामासाइी होऊ शकतो. मात्र अलिकडे स्त्रिभृण हत्‍यासाठी या तंत्राचा गैरवापर होत आहे. त्‍यामुळे भविष्‍यात समाजस्‍वास्‍थावर विपरीत परिणाम होऊ शकते असेही ते म्‍हणाले.
    प्रास्‍ताविक करताना जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. रावखंडे म्‍हणाले की 2001 च्‍या जनगननेनुसार महाराष्‍ट्रात दर हजारी पुरुषांमागे 922 असे सित्रायांचे प्रमाण आहे. तर जिल्‍ह्यामध्‍ये 928 व 2011 च्‍या जनगणने प्रमाणे स्त्रियांचे प्रमाण 916 असे घटते प्रमाण  आहे. यावेळी त्‍यांनी पी.एन.डी.टी. कायदा व नियमाच्‍या तरतूदी, संस्‍थाची नोंदणी, डॉक्‍टर व केंद्रधारकावर बंधने, नियंत्रण व पर्यवेक्षण कार्यप्रणाली, लोक जागृतीचे कार्य, समुचित जिल्‍हा व तालुका पातळीवरील प्राधिकरणाचे अधिकार, कायद्यातील तरतुदींचा भंग केल्‍यास गुन्‍ह्याचे स्‍वरुप, गर्भधारणापूर्व व प्रसवपुर्व निदान तंत्र अधिनियिम 2003 च्‍या तरतूदी व दक्षता पथकाची माहिती तपशिलाने त्‍यांनी यावेळी दिली.
     कार्यशाळेचे संचलन डॉ. शर्मा यांनी व आभार डॉ. रवि धकाते यांनी केले. यावेळी महसूल विभागातील अधिकारी व वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते.  

शेती भावाचे अंदाजपत्रका विषयी कार्यशाळा


     वर्धा, दि. 30- विकास भवन वर्धा येथे दि. 22 डिसेंबर 2011 रोजी कृषि अर्थशास्‍त्र  व सांख्यिकी विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला व जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा यांचे संयुक्‍त विद्यमाने जिल्‍ह्यात कार्यरत जिल्‍हा कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचा-यांकरीता शेतक-यांना शेती भावाचे अंदाजबाबत जागृती या विषयावर कार्यशाळा आयेाजीत केली होती.
     कार्यशाळेत डॉ. पंजाबराव कृषि विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्‍यापक ए.एस.टिंगरे यांनी पिकाचे पेरणीपूर्वी व पिकाचे काढणीपूर्वी  प्रत्‍येक शेत मालाचे भावाचा अंदाज कसा काढण्‍यात येतो याबाबत सविस्‍तर माहिती दिली व काढलेल्‍या  अंदाजीत भावाची माहिती विद्यापीठामार्फत सर्व दैनिक वृत्‍तपत्रात प्रसिध्‍द करत असल्‍याचे सांगीतले. विद्यापीठामार्फत जाहीर होणारे पुढील 5-6 महिन्‍याचे अंदाजीत भाव काढण्‍याचे काम मागील 4 वर्षापासून सुरु असून विद्यापीठाने वर्तविलेले अंदाजे भाव व प्रत्‍यक्ष त्‍या -त्‍या महिन्‍यात  असलेले बाजारभाव जवळपास 90 टक्‍के बरोबर येत असल्‍यामुळे विद्यापीठाकडून जाहीर होणारे पूर्व अंदाजीत भावाचे भरवशावर शेतक-यांनी शेतमाल केव्‍हा विकावा म्‍हणजे मालाला जास्‍तीत जास्‍त भाव मिळेल याची माहिती कृषि विभागामार्फत शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यात यावे असे आवाहन केले.
     या कार्यशाळेत जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी, भाऊसाहेब ब-हाटे यांनी सांगितले की विद्यापिठाने प्रत्‍येक अंदाजाचे वेळी शेतकी विभागचे ई-मेल वर माहिती टाकल्‍यास विभगामार्फत अंदाजीत भाव शेतक-यापर्यंत पोहचविण्‍याचे काम कृषि विभागामार्फत करण्‍यात येईल.
     कार्यशाळेला कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Thursday 29 December 2011

विहिरी वर पंप बसविण्‍याच्‍या योजनेचा लाभ घेण्‍याचे आवाहन


    वर्धा,दि.28- कृषि विभाग जिल्‍हा परिषद वर्धा मार्फत अनु.जाती व नवबौध्‍द शेतक-यांचे शासकीय योजने अंतर्गत तसेच खाजगी सिंचन विहीरीवर विद्युत कनेक्‍शन व विद्युत पंप 100% अनुदानावर वाटपाच्‍या  योजनेस मंजुरी मिळाली असुन, सदर योजना मार्च 2012 पर्यत पुर्ण करावयाचे आहे. त्‍या करिता अनुदानाची मर्यादा रु 50,000/- आहे.
या योजने करिता पात्र लाभार्थी निवडीचा प्राधान्‍य क्रमानूसार रोजगार हमी योजना अंतर्गत जवाहर विहिरी, रोजगार हमी योजना म.ग्रा.रो.ह.यो. तसेच अनु.जाती/नवबौध्‍द शेतक-यांना विहिर पुर्ण बांधुन देण्‍यात आलेली आहे व विहिरीस पुरेशे पाणी आहे. असे लाभार्थी (ज्‍यात महिला लाभार्थींना प्रथम प्राधान्‍य) कृषि विभागामार्फत अनु.जाती उपयोजना अंतर्गत बांधुन दिलेल्‍या विहिरी. अनुसूचित जातीच्‍या खाजगी मालकीची विहिरी. विदर्भ विभागातील शेतकरी पॅकेज अंतर्गत बांधण्‍यात आलेल्‍या विहिरी यांचा समावेश आहे.
 योजनेचा लाभ घेवु इच्‍छीणा-या शेतक-यांनी तालुक्‍यातील पंचायत समितीच्‍या कृषि विभागाशी संपर्क साधावा व आवश्‍यक कागदपत्राची पुर्तता करुन घ्‍यावी, असे आवाहन कृषि विकास अधिकारी आर.के.गायकवाड यांनी केले आहे.

वर्धेत तीन दिवसीय ग्रंथोत्‍सवाचे आयोजन


वर्धा,दि.28-महाराष्‍ट्र राज्‍य साहित्‍य व संस्‍कृती मंडळ आणि जिल्‍हा माहिती कार्यालय वर्धा याचे वतीने दिनांक 12, 13, 14 जानेवारी 2012 रोजी ग्रंथोत्‍सवाचे आयोजन होणार आहे.
     या ग्रंथोत्‍सवात नामांकिंत कवि व लेखक सहभागी होणार असून, ग्रंथोत्‍सवाची समिती नुकतीच स्‍थापन करण्‍यात आली आहे. या समिती चे अध्‍यक्ष जिल्‍हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर असून, सचिव म्‍हणून जिल्‍हा ग्रंथपाल सुरज मडावी राहणार आहे. या समितीचे समन्‍वयक म्‍हणून मिलींद आवळे यांची नियुक्‍ती करण्‍यांत आली आहे.
आयोजन समितीचे सदस्‍य म्‍हणून प्रगतीशिल लेखक संघाचे अध्‍यक्ष राजेद्र मुंडे, विदर्भ साहित्‍य संघ शाखा वर्धाचे अध्‍यक्ष संजय इंगळे तिगांवकर, वर्धा जिल्‍हा पत्रकार संघाचे अध्‍यक्ष प्रविण धोपटे, यशवंतराव दाते स्‍मृती संस्‍थेचे अध्‍यक्ष प्रदिप दाते समन्‍वय संस्‍थेचे प्रा. शेख हाशम, साहित्‍यीक डॉ. प्रविण वानखेडे, साहित्‍यीक प्रा.नवनीत देशमुख, साहित्‍यीक डॉ. किशोर सानप, महात्‍मा गांधी विद्यालय वर्धेचे प्राचार्य पद्माकर बाविस्‍कर, कस्‍तुरबा कला महाविद्यालयाच्‍या प्राचार्य स्मिता वानखेडे
नियंत्रित सदस्‍य म्‍हणून निवासी उपजिल्‍हाधिकारी राजेश खवले व जि.प.चे शिक्षणाधिकारी लक्ष्‍मीकांत सोनवणे यांचा या समितीमध्‍ये समावेश करण्‍यांत आला आहे. असे जिल्‍हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर कळवितात.

Tuesday 27 December 2011

वर्धा जिल्‍ह्यात 37(1) आणि (3) कलम लागू



   वर्धा, दि.27- वर्धा जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी जिल्‍हा दंडाधिकारी जयश्री भोज यांना प्रदान केलेल्‍या  अधिकारान्‍वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) आणि 3 लागू केले आहे.
     या कलमाचा अंमल दि. 10 जानेवारी 2012 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत राहणार असून, या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्‍ती विरुध्‍द कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल असे आदेशात नमूद आहे.
                          00000

संपूर्ण स्‍वच्‍छता अभियानावर आतापावेतो 64 टक्‍के खर्च - शेखर चन्‍ने


    वर्धा,दि.27-जिल्‍ह्यात संपूर्ण स्‍वच्‍छता अभियान ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्‍यात येत असून, या अभियानावर आतापर्यंत 64.27 टक्‍के खर्च करण्‍यात आला असल्‍याची माहिती जि.प.मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने यांनी दिली.
     जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांच्‍या कक्षामध्‍ये संपूर्ण स्‍वच्‍छता अभियान कार्यक्रम आढावा बैठक संपन्‍न झाली त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्‍प  अधिकारी बी.एम.मोहन, उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी विपूल जाधव व इतर अधिकारी उपस्थित होते.

     संपूर्ण स्‍वच्छता अभियाना अंतर्गत केंद्र शासनाने वर्धा जिल्‍ह्याकरीता एकूण 22 कोटी 70 लक्ष 99 हजार रुपयाच्‍या प्रकल्‍पास मंजूरी प्रदान केली होती त्‍यापैकी 15 कोटी 18 लक्ष रुपये आतापावेतो प्राप्‍त झाले आहे. 14 कोटी 39 लक्ष 34 हजार रुपये आतापर्यंत खर्च झाला असून, या खर्चामध्‍ये वैयक्तिक शौचालय, शालेय स्‍वच्‍छता गृह, आंगणवाडी स्‍वच्‍छता गृह, सार्वजनिक स्‍वच्‍छता गृह, घनकचरा व द्रव्‍य व्‍यवस्‍थापन, उत्‍पादन / विक्री केंद्र, प्रशासकीय व इतर अनुशांगिक खर्चाचा समावेश आहे. या खर्चाची टक्‍केवारी 64.27 आहे. असे यावेळी सांगण्‍यात आले.

     या आढावा बैठकीत संपूर्ण जिल्‍ह्यात जनजागृती अभियाना अंतर्गत 47 लक्ष 55 हजार रुपयांच्‍या खर्चाला मंजूरी, संगणक खरेदीला मंजूरी, वाहन भाडे तत्‍वावर घेण्‍यास मंजूरी, एल.सी.डी. प्रोजेक्‍टरच्‍या दुरुस्‍तीला मंजूरी प्रदान केली.

     याप्रसंगी संपूर्ण स्‍वच्‍छता अभियाना अंतर्गत कार्यकरत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Monday 26 December 2011

2012-13 या वित्‍तीय वर्षासाठी 118 कोटी 33 लक्ष रुपयाच्‍या प्रारुप आराखड्यास मंजूरी- राजेंद्र मुळक


     वर्धा,दि.26- येथील विकास भवन येथे जिल्‍हा नियोजन समितीची बैठक संपन्‍न झाली. यावेळी 2012-13 या वित्‍तीय वर्षासाठी  कमाल आर्थिक मर्यादेत राहून, जिल्‍हा नियोजन समितीने 118 कोटी 33 लक्ष रुपये खर्चाच्‍या आराखड्यास मंजूरी प्रदान करण्‍यात आली असल्‍याची माहिती वित्‍त व नियोजन तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिली.
     यावेळी मंचावर खासदार दत्‍ताजी मेघे, पाणी पुरवठा राज्‍यमंत्री रणजित कांबळे, आमदार दादाराव केचे, आमदार अशोक शिंदे, जिल्‍हाधिकारी जयश्री भोज व मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने उपस्थित होते.
     जिल्‍हा वार्षीक योजनेच्‍या आराखड्याबाबत अधिक माहिती देताना पालकमंत्री मुळक म्‍हणाले की 2012-13 च्‍या पुढील वित्‍तीय वर्षासाठी 118 कोटी 33 लक्ष     16 हजार रुपये खर्चाच्‍या आराखड्यास  मंजूरी प्रदान करण्‍यात आली असून त्‍यामध्‍ये सर्वसाधारण योजने मध्‍ये 69 कोटी 12 लक्ष आदिवासी उपयोजने मध्‍ये 20 कोटी 50 लक्ष 16 हजार व अनुसूचित उपयोजनेमध्‍ये 28 कोटी 71 लक्ष रुपयाचा समावेश आहे. सर्वसाधारण योजनेमध्‍ये अंमलबजावणी करणा-या अधिका-यांनी 107 कोटी 57 लक्ष 46 हजार, आदिवासी उपयोजनेसाठी 34 कोटी 10 लक्ष 24 हजार व अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 27 कोटी 71 लक्ष रुपयाची मागणी केली होती. त्‍यापैकी वरील प्रमाणे कमाल आर्थिक मर्यादेत राहून यातील अतिरीक्‍त मागणी 52 कोटी 72 लक्ष 56 हजाराची नोंद करण्‍यात आली आहे. असल्‍याने ही मागणी राज्‍य स्‍तरावरील बैठकीत आवश्‍यक त्‍या कारणासह चर्चा करण्‍यात येईल.
     सर्वसाधारण योजने अंतर्गत कृषि व संलग्‍न  सेवेसाठी प्रस्‍तावित अनुदान  9 कोटी 63 लक्ष 30 हजार असून कमाल आर्थिक मर्यादेत 8 कोटी 20 लक्ष 80 हजार मंजूरीसाठी पात्र ठरविण्‍यात आले. अरिीक्‍त मागणी 1 कोटी 42 लक्ष 50 हजार आहे. ग्रामीण विकास कार्यक्रमा अंतर्गत 17 कोटी 38 लक्ष 36 हजार रक्‍कम प्रस्‍तावित केली असून कमाल आर्थिक मर्यादेत 11 कोटी 88 लक्ष  36 हजाराला मंजूरी प्रदान करण्‍यात आली. उर्वरीत 5 कोटी 50 लक्ष रुपयाची अतिरीक्‍त मागणी प्रस्‍तावित आहे. पाटबंधारे या शिर्षकाअंतर्गत 7 कोटी 45 लक्ष 30 हजार प्रस्‍तावित करण्‍यात आले असून, कमाल मर्यादेनुसार 3 कोटी 47 लक्ष 80 हजार रकमेला
मंजूरी प्रदान करण्‍यात आली तर 3 कोटी 97 लक्ष 50 हजार रुपयाची अतिरीक्‍त मागणी करण्‍यात आली आहे. विद्यूत विकास वितरण कार्यक्रमा अंतर्गत अंमलबजावणी अधिका-यांनी    5 कोटीची मागणी केली असून, कमाल मर्यादे अंतर्गत 2 कोटीची मागणी मंजूर करण्‍यात आली. उर्वरीत 3 कोटीची अतिरीक्‍त मागणी नोंदविण्‍यता आली आहे. उद्योग विकासा अंतर्गत 50 लक्ष रुपयांची मागणी करण्‍यात आली असून कमाल मर्यादेत 45 लक्ष रुपये मंजूर करण्‍यात आले. उर्वरीत 5 लक्ष रुपयाची अतिरीक्‍त मागणी नोंदविण्‍यात आली. वाहतूक व दळणवळणासाठी 25 कोटी 75 लक्ष रुपये प्रस्‍तावित करण्‍यता आले त्‍यापेकी कमाल आर्थिक मर्यादे अंतर्गत 14 कोटी 62 लक्ष 66 हजार रुपये मंजूर करण्‍यात आले असून, 11 कोटी 12 लक्ष 34 हजार रुपये अतिरीक्‍त मागणी नोंदविण्‍यात आली आली आहे. सर्वसाधारण आर्थिक सेवा योजने अंतर्गत 7 कोटी 52 लक्ष 59 हजार रुपये प्रस्‍तावित करण्‍यात आले  त्‍यापैकी 7 कोटी 22 लक्ष 95 हजार रुपये  नियतव्‍यय मंजूर करण्‍यता आला असून, 29 लक्ष 56 हजाराची अतिरीक्‍त मागणी नोंदविण्‍यात आली आहे. सामाजिक व सामुहिक सेवा अंतर्गत 34 कोटी 32 लक्ष 99 हजार रुपये प्रस्‍तावित करण्‍यात आले होते. त्‍यापैकी  21 कोटी 24 लक्ष 43 हजार रुपयाला मंजूरी प्रदान करण्‍यात आली असून, विकास कामावर एकूण  12 कोटी 95 लक्ष 56 हजाराची अतिरीक्‍त मागणी नोंदविण्‍यात आली आहे.
जिल्‍ह्यातील विकास कामांची प्रगती समाधानकारक असून, चालू वर्षामध्‍ये आतापर्यंत सर्वसाधारण योजनेवर 27 कोटी 69 लक्ष 26 हजार रुपये , अनुसूचित जाती उपयोजनेवर 4 कोटी 32 लक्ष 57 हजार व आदिवासवी उपाययोजनेवर     8 कोटी 41 लक्ष 90 हजार रुपये खर्च झालेला असून, 64 प्रतिशत खर्च झालेला आहे.
पुढील आर्थिक वर्षामध्‍ये नाविण्‍यपूर्ण योजना प्रस्‍तावित असून यामध्‍ये  तिर्थक्षेत्राचा विकास, नविन आरोग्‍य केंद्राचा समावेश आहे. यावेळी खर्चाच्‍या पूर्नविनीयोजनाला मंजूरी प्रदान करण्‍यता आली. यावेळी 2011-12 मध्‍ये झालेल्‍या आतापावेतो खर्चाचा आढावा मंत्री महोदयांनी घेतला.
यावेळी खासदार दत्‍ताजी मेघे, राज्‍यमंत्री  रणजित कांबळे व इतर जिल्‍हा नियोजन समितीच्‍या सदस्‍यांनी चर्चेत भाग घेवून समसयांचे निराकरण केले . तसेच त्‍यांनी उपयुक्‍त सुचना सभागृहात सादर केल्‍या.
यावेळी जिल्‍हा नियेाजन समितीचे सदस्‍य, विभाग प्रमुख मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

Friday 23 December 2011

विस्‍तार अधिकारी पदासाठी मुलाखत


   वर्धा, दि. 23- जिल्‍हा परिषद, वर्धा अंतर्गत विस्‍तार अधिकारी (शिक्षण) वर्ग तीन आणि श्रेणी दोन या पदासाठी दिनांक 6 जून 2010 रोजी घेण्‍यात आलेल्‍या लेखी परीक्षेमधून उत्‍तीर्ण झालेल्‍या व मुलाखतीस पात्र ठरलेल्‍या उमेदवारांच्‍या मुलाखती मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा परिषद, वर्धा यांचे कार्यालयात दिनांक 5 जानेवारी 2012 रोजी सकाळी 10 वाजता घेण्‍यात येणार आहे.
     तरी पात्र उमेदवारांना सदर मुलाखतीची स्‍वतंत्ररित्‍या मुलाखत पत्र पोष्‍टाचे प्रमाण पत्राव्‍दारे पाठविण्‍यात आलेली आहेत याची पात्र उमेदवारांनी नोंद घ्‍यावी. असे सचिव, जिल्‍हा निवड समिती तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्‍हा परिषद, वर्धा यांनी कळविले आहे.
                      00000

शेतक-यांना मदत वाटपाची सुचना


 वर्धा,दि.23-जिल्‍ह्यात सर्व शेतक-यांना सुचित करण्‍यात येते की, मागील जानेवारी 2011 पासुन जिल्‍ह्यात कृषि विभागा मार्फत जुलै 2008 ते ऑक्‍टोंबर 2010 या कालावधीत झालेल्‍या  नैसर्गीक आपत्‍तीमुळे पिकांचे नुकसान झाले अशा 50 टक्‍के चे वर नुकसान झालेल्‍या क्षेत्राला मदत वाटपाची कार्यवाही सुरु आहे. जुलै 2008 ते ऑक्‍टोंबर नोव्‍हेंबर 2010 या कालावधीत नैसर्गीक आपत्‍तीमुळे 57074.18 हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे 50 टक्‍के चे वर नुकसान झाले त्‍या करीता रुपये 27.26 कोटी रुपयाची वाटपा करीता आवश्‍यकता असताना शासनाकडून आतापर्यंत जिल्‍ह्याला वाटपा करीता रुपये 26.31 कोटी रुपये प्राप्‍त झालेत व प्राप्‍त  रक्‍कमेपैकी दिनांक 15 डिसेंबर 2011 पर्यंत रुपये 23.83 कोटी मदत निधीचे वाटप 144723 शेतक-यांना झाले आहे. प्राप्‍त निधीपैकी अजुनही जवळपास रुपये 2.48 कोटी निधीचे वाटप होणे बाकी आहे. 
      ब-याचशा शेतक-यांची जमीन गावात असते परंतु शेतकरी शहरात राहत असल्‍यामुळे त्‍यांच्‍याशी संपर्क न झाल्‍यामुळे त्‍यांचे बँक खाते क्रमांक संबंधित तालुका कृषि अधिकारी यांना न मिळाल्‍यामुळे नुकसान भरपाईची रक्‍कम त्‍यांचे बँक खात्‍यात जमा करता आली नाही किंवा काही शेतक-यांनी त्‍यांचे बँक खाते क्रमांक तालुका कृषि अधिकारी कार्यालयास दिले परंतु मागील बरेच वर्षापासून त्‍या खात्‍यात व्‍यवहार होत नसल्‍यामुळे खाते रद्द झाल्‍याचे निदर्शनास आले आहे. त्‍यामुळे मोठी रक्‍कम वाटपा अभावी शिल्‍लक आहे.
     जिल्‍ह्यातील सर्व शेतक-यांना आवाहन करण्‍यात येते की ज्‍या शेतक-यांच्‍या शेती पिकाचे जुलै 2008 ते ऑक्‍टोंबर नोव्‍हेंबर 2010 या कालावधीत 50 टक्‍के चे वर नुकसान झाले व ज्‍यांची नांवे सर्व्हेक्षण अहवाल आहे अशा शेतक-यांनी तात्‍काळ नजिकच्‍या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी किंवा गावच्‍या कृषि सहाय्यकाशी दिनांक 31 डिसेंबर 2011 पर्यंत संपर्क करुन आपले बँक खाते पासबुक दाखवुन खाते नंबर नोंद करावा म्‍हणजे त्‍यांचे खात्‍यात नुकसान भरपाईची रक्‍कम जमा करता येईल.दि. 31 डिसेंबर 2011 पर्यंत राहिलेले वाटप पुर्ण करुन शिल्‍लक राहणारी रक्‍कम शासनास परत करण्‍यात येईल. त्‍यानंतर येणा-या शेतक-यांचा हक्‍क राहणार नाही याची नोंद घ्‍यावी. असे आवाहन जिल्‍हा अधीक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी केले आहे.

Thursday 22 December 2011

रस्‍ते अपघातांची आपत्‍ती ....!

वाहनांचा अपघात ही मानव निर्मित आपत्‍ती आहे. छोट्या बाबी आपण लक्षात घेतल्‍या आणि त्‍यावर अंमलबजावणी सुरु केली तर अपघातांचे प्रमाण निश्चितपणे कमी करु शकतो.                        
आपल्‍या आसपासच्‍या परिसरात कोणकोणत्‍या प्रकारची आपत्‍ती येवू शकते याप्रती आपण सजग राहणे तसेच आपण त्‍या आपत्‍तीतून सुटका करुन घेण्‍याची पूर्वतयारी करणे त्‍याचा सराव करणे व आलेल्‍या आपत्‍तीत प्रत्‍यक्ष काम करणे म्‍हणजे आपत्‍ती व्‍यवस्‍थापन होय.
     काही आपत्‍ती आपण टाळू शकतो याची जाणीव आपणास हवी रस्‍त्‍यांवर होणारे अपघात आणि त्‍यात होणारी प्राण व वित्‍तहानी टाळता येते. यासाठी आपण वाहन सुस्थितीत आहे की नाही याची मुळात तपासणी धरुन निघतानाच करावी. वाहनाला ब्रेक व्‍यवस्थित आहे याची खात्री केल्‍याशिवाय वाहन रस्‍त्‍यावर नेऊ नये.
     रस्‍त्‍यावर चारचाकी वाहनात असाल तर आपण सिटबेल्‍ट जरुर लावला पाहिजे. चुकून अपघात झाल्‍याच्‍या  स्थितीत आपल्‍या सुरक्षिततेसाठी ते आवश्‍यक असते. दुचाकी वाहनातही आपण ब्रेक-इंडीकेटर यांची तपासणी व सुयोग्‍य वापर याकडे लक्ष द्यायला हवे. दुचाकी वाहन धारकांनी हेल्‍मेट जरुन वापरावे. यामुळे अपघाताच्‍या स्थितीत प्राणहानीचा धोका टळतो.
     अपघाताला मुख्‍यत्‍वे मानवी चुकाच कारणीभूत ठरत असतात. यात चुकीच्‍या पध्‍दती ओव्‍हरटेक करणे, इंडीकेटर न दाखवता वाहन अचानक वळविणे या खेरीज अति गतीने वाहन चालविणे ही अपघातांची मुख्‍य कारणे आहेत. वाहनाच्‍या  गतीमुळे झालेल्‍या अपघातांचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे.
     वळणे असलेल्‍या रस्‍त्‍यावर वेगात वाहन वळते त्‍यावेळी ते दुस-या बाजूला ओढले जाते. जितकी गती अधिक तितके ओढले जाण्‍याचे प्रमाण अधिक त्‍यामुळे घाटांमध्‍ये अनेकदा अपघात होतात.
     छोट्या छोट्या बाबींमधून आपण अपघाताची ही आपत्‍ती दूर ठेवू शकतो आणि आपण ती ठेवायलाच पाहिजे.
                                     - प्रशांत दैठणकर

26 रोजी राष्‍ट्रीय ग्राहक दिन


     वर्धा,दि.22-शासन व ग्राहक चळवळीतील संघटना यांचे संयुक्‍त विद्यमाने दि. 26 डिसेंबर 2011 रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय,वर्धा येथे राष्‍ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम आयोजीत करण्‍यात आला आहे.
    कार्यक्रमाचे अध्‍यक्ष जिल्‍हाधिकारी जयश्री भोज असून, प्रमुख अतिथी म्‍हणून अपर जिल्‍हाधिकारी संजय भागवत, जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्‍यक्ष आर.बी.सोमानी, जिल्‍हा पुरवठा अधिकारी आर.ए.अनभोरे, उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक, तसेच प्रमुख वक्‍ते म्‍हणून नागपूर विद्यापिठाचे विधी शाखा अधिष्‍ठाता अशोक पावडे, अखिल भारतीय ग्राहक कल्‍याण  परिषदेचे विदर्भ शाखेचे सचिव अजय भोयर हे मार्गदर्शन करणार आहेत.
     या काकर्यक्रमास बहुसंख्‍येने जनतेने उपस्थित राहण्‍याचे आवाहन तहसिलदार सुशांत बनसोडे, अखिल भारतीय ग्राहक कल्‍याण परिषदेचे अध्‍यक्ष उशा फाले आणि तालुका ग्राहक पंचायतचे अध्‍यक्ष शिवचरण मिश्रा यांनी केले आहे.
                            00000 

डायल 102



      खास दूरध्‍वनी क्रमांक आपणास हमखास पाठ होतात. जसं पोलिसांना दूरध्‍वनी लावायचा तर 100 हा क्रमांक आहे आणि अग्‍नीशामक दलाचा 101 तसा आता पुढील काळात 102 हा क्रमांक गरोदर माता आणि नवजात बालकांचे आरोग्‍य यासाठी कायमस्‍वरुपी व 24 तास सेवेत उपलब्‍ध राहणार आहे.त्‍याबाबत माहिती देणारा हा लेख.                  - प्रशांत दैठणकर                                                         

     शासनाने गर्भवतींचे मृत्‍यू राखण्‍यासाठी तसेच जन्‍मलेल्‍या बालकांना सदृढपणा यावा ते आजारी होवू नयेत. आजारी पडल्‍यास पूर्ण शासनखर्चाने त्‍यांची काळजी घेता यावी याकरिता जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत खास दूरध्‍वनी क्रमांक उपलब्‍ध करुन देण्‍यात आला आहे.
     या कार्यक्रमात गरोदर स्त्रियांना प्रसूती साठी तसेच 30 दिवसांपर्यंतच्‍या नवजात आजारी बालकांना मोफत आरोग्‍य सेवा पुरवणे असे ध्‍येय्य ठेवलेले आहे.
     गरोदरपणात, बाळंतपणात व प्रसुती पश्‍चात 42 दिवसांपर्यंत सेवा देण्‍यात येईल. सामान्‍य प्रसुतीसाठी 3 दिवस शस्‍त्रक्रियेव्‍दारे बाळंतपण झाल्‍यास सात दिवसापर्यंत मोफत आहार देण्‍यात येईल. घरापासून प्राथमिक आरोग्‍य केंद्र किंवा शासकीय रुग्‍णालयापर्यंत संदर्भ सेवेसाठी जाण्‍यासाठी तसेच प्राथमिक आरोग्‍य केंद्र शासकिय
रुग्‍णालयातून घरी परत जाण्‍यासाठी मोफत वाहन व्‍यवस्‍था करण्‍यात येईल. मोफत प्रयोगशाळा तपासण्‍या, रक्‍त पुरवठा व औषधोपचार करण्‍यात येईल. कोणत्‍याही सेवेचे शुल्‍क आकारले जाणार नाही अशी यात सोय आहे.
      30 दिवसापर्यंतच्‍या जनवजात आजारी बालकांसाठी मोफत औषधोपचार करण्‍यात येईल. घरापासून प्राथमिक आरोग्‍य केंद्र किंवा शासकिय रुग्‍णालयापर्यंत, संदर्भ सेवेसाठी प्राथमिक आरोग्‍य केंद्र किंवा शासकिय रुग्‍णालयापर्यंत जाण्‍यासाठी तसेच रुग्‍णालयातून घरी परत जाण्‍यासाठी मोफत वाहन व्‍यवस्‍था करण्‍यात येईल, तसेच रक्‍त पुरवठा व प्रयोगशाळा तपासण्‍या, औषधोपचार मोफत करण्‍यात येतील.
     गरोदर माता व नवजात अर्भकांच्‍या तपासण्‍या, उपचार व आहार इतयादी सेवा पूर्णपणे मोफत देण्‍यात येईल. ज्‍यामुळे बाल मृत्‍यू व माता मृत्‍यू कमी होण्‍यास मदत होईल. जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय, वर्धा येथे 24 तास सेवा देण्‍यासाठी कॉल सेंटर सुरु करण्‍यात आले असून त्‍याचा टोल फ्री क्रमांक 102 किंवा (07152)245198 असा आहे. या क्रमांकावर कोणीही कितीही वाजता तात्‍काळ प्रसंगी फक्‍त बाळंतपणाच्‍या माता व अति आजारी बालकांकरीता संपर्क करु शकतात. संपर्क करणा-यांनी पूर्ण नांव, पत्‍ता व जवळची खूण सांगितल्‍यानंतर जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयाकडून तेथून जवळ असणा-या रुग्‍णालयाची रुग्‍णवाहिका पाठविण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात येईल. या कार्यक्रमामुळे प्रत्‍येक बालकाची आणि त्‍याच्‍या मातेची अखंड काळजी घेतली जाणार आहे. त्‍यासाठी हा `डायल 102`  लक्षात ठेवायचा इतकच.
-         प्रशांत दैठणकर

पेन्‍शन अदालत


     वर्धा, दि. 22- भारतीय डाक विभाग, वर्धा व्‍दारा दि. 31 डिसेंबर 2011 रोजी सकाळी 11 वाजता अधिक्षक, डाकघर कार्यालयामध्‍ये पेन्‍शन अदालत आयोजित करण्‍यात आली आहे.

     पेन्‍शन संबंधीच्‍या ज्‍या तक्रारीचे निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्‍तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची या पेन्‍शन अदालत मध्‍ये दखल घेतल्‍या जाईल. तक्रारीचा  उल्‍लेख सर्व तपशीलासह केलेला असावा.

     संबधितांनी पेन्‍शन बाबतची आपली तक्रार अधिक्षक, डाकघर, वर्धा यांचे नांवे दिनांक 28 डिसेंबर 2011 अथवा तत्‍पूर्वी पोहचेल अशा बेताने पाठवावी. तदनंतर आलेल्‍या  तक्रारीचा विचार केला जाणार नाही. तक्रारकर्त्‍यांना पेन्‍शन अदालतीसाठी स्‍वःखर्चाने उपस्थित राहावे लागेल. असे अधिक्षक, डाकघर, वर्धा यांनी कळविले आहे.

उद्योग मित्र समिती सभा


वर्धा, दि. 22- राज्‍यस्‍तरीय उद्योग मित्र समितीची बैठक दिनांक 7 जानेवारी 2012 रोजी दुपारी 2 वाजता बाबुभाई चिनाय कमिटी रुम, 2 रा मजला, इंडियन मर्चंट चेंबर, आय.एम.सी. मार्ग, चर्चगेट, मुंबई  येथे विकास आयुक्‍त (उद्योग) तथा अध्‍यक्ष, उद्योग मित्र यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आयोजित करण्‍यात आली आहे.
या बैठकीस राज्‍यस्‍तरीय  महामंडळाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व शासनाचे वरीष्‍ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
 उद्योजकांना आणि संघटनांना बैठकीच्‍या कार्यसुचीवर घ्‍यावयाचे प्रश्‍न व त्‍याची परिपूर्ण माहिती शेखर नाईक, निमंत्रक, उद्योग मित्र यांचे नावे उद्योग संचालनालय, नवीन प्रशासन भवन, दुसरा मजला, मंत्रालयासमोर मुंबई (दूरध्‍वनी क्र.022-22026755 किंवा फॅक्‍स क्र. 022-22026826 ई-मेल diumitra@maharashtra.gov.in   येथे दिनांक 26 डिसेंबर 2011 पर्यंत कार्यालयास पोहचेल अश्‍यारीतीने पाठविण्‍यात यावी. या तारखेपर्यंत प्राप्‍त होणा-या प्रश्‍नांचा समावेश कार्यसुचीवर होईल याची नोंद घेण्‍यात यावी.
     अधिक माहितीसाठी वा.दौ.देसले, उद्योग उपसंचालक, (उमि) यांचेशी दुरध्‍वनी क्र.022-22044107 वर संपर्क साधावा.असे महाव्‍यवस्‍थापक, जिल्‍हा उद्योग केंद्र,वर्धा यांनी प्रसिध्‍दी पत्रकाव्‍दारे कळविले आहे.

राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान अंतर्गत प्रशिक्षण

वर्धा,दि.22- राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान अंतर्गत उपविभागीय कृषि अधिकारी, वर्धा यांचे मार्फत  वर्धा, सेलू, देवळी तालुक्‍यातील शेडनेट हाऊस धारक शेतक-यांना  पूणे येथे आयोजित किसान प्रदर्शनीला भेट देण्‍यासाठी रवाना झाले असून, त्‍यांना  अत्‍याधुनिक तंत्रज्ञान, सुधारित औजारे, विविध पिक पध्‍दती, नाविन्‍यपूर्ण उपक्रम, सिंचनाच्‍या विविध पध्‍दती, नविन संशोधित वाण  याविषयी माहिती मिळणार आहे.
 शेतक-यांना पाच दिवसाचे राज्‍यांतर्गत उच्‍च तंत्रज्ञानाचे  प्रशिक्षण केंद्र तळेगांव (दाभाडे) जि. पूणे येथे प्रशिक्षण मिळणार आहे.
प्रशिक्षणामध्‍ये शेडनेट हाऊस व पॉली हाऊस मधील भाजीपाला काकडी, कारली, ढोबळी मिरची, ब्रोकोली व फुले जर्बेरा, कार्नेशियम, निशिगंध, गुलाब याविषयावर अत्‍याधुनिक प्रशिक्षण, लागवड तंत्रज्ञान व किड रोग व्‍यवस्‍थापन , एकात्मिक अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, फळाफुलांचे काढणी पश्‍चात तंत्रज्ञान ग्रेडींग व पॅकींग व विक्री व्‍यवस्‍था  इत्‍यादी विषयावर सविस्‍तर मार्गदर्शन शेतक-यांना मिळणार आहे. शेतक-यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केल्‍यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाव्‍दारे कृषि क्षेत्रात कमी पाण्‍यात गट समुहाने फळपिकाचे उत्‍पादन करुन चांगली विक्री व्‍यवस्‍था निर्माण करणे व एकंदरीत उत्‍पादन व उत्‍पन्‍नात  भर घालुन जीवनमान उंचावेल.
 ज्‍येष्‍ठ सामाजिक कार्यकर्त्‍या सिंधुताई सपकाळ यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी कृषि मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आवटे, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, उप विभागीय कृषि अधिकारी संतोष डावरे, तालुका कषि अधिकारी येवले उपस्थित होते.