वर्धा,दि.27-जिल्ह्यात संपूर्ण स्वच्छता अभियान ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्यात येत असून, या अभियानावर आतापर्यंत 64.27 टक्के खर्च करण्यात आला असल्याची माहिती जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर चन्ने यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षामध्ये संपूर्ण स्वच्छता अभियान कार्यक्रम आढावा बैठक संपन्न झाली त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी बी.एम.मोहन, उप मुख्यकार्यकारी अधिकारी विपूल जाधव व इतर अधिकारी उपस्थित होते.
संपूर्ण स्वच्छता अभियाना अंतर्गत केंद्र शासनाने वर्धा जिल्ह्याकरीता एकूण 22 कोटी 70 लक्ष 99 हजार रुपयाच्या प्रकल्पास मंजूरी प्रदान केली होती त्यापैकी 15 कोटी 18 लक्ष रुपये आतापावेतो प्राप्त झाले आहे. 14 कोटी 39 लक्ष 34 हजार रुपये आतापर्यंत खर्च झाला असून, या खर्चामध्ये वैयक्तिक शौचालय, शालेय स्वच्छता गृह, आंगणवाडी स्वच्छता गृह, सार्वजनिक स्वच्छता गृह, घनकचरा व द्रव्य व्यवस्थापन, उत्पादन / विक्री केंद्र, प्रशासकीय व इतर अनुशांगिक खर्चाचा समावेश आहे. या खर्चाची टक्केवारी 64.27 आहे. असे यावेळी सांगण्यात आले.
या आढावा बैठकीत संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती अभियाना अंतर्गत 47 लक्ष 55 हजार रुपयांच्या खर्चाला मंजूरी, संगणक खरेदीला मंजूरी, वाहन भाडे तत्वावर घेण्यास मंजूरी, एल.सी.डी. प्रोजेक्टरच्या दुरुस्तीला मंजूरी प्रदान केली.
याप्रसंगी संपूर्ण स्वच्छता अभियाना अंतर्गत कार्यकरत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment