Saturday 7 January 2012

रेतीघाट लिलाव स्‍थगिती


    वर्धा,दि.7–वर्धा जिल्‍ह्यातील रेतीघाट लिलाव सन  2011-2012 दिनांक 9 जानेवारी 2012 रोजी ठेवण्‍यात आलेला होता. दि. 3 जानेवारी 2012 रोजी जिल्‍हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आचार संहिता लागू झाल्‍यामुळे निवडणूक आयोगाकडे रेतीघाट लिलावाबाबत खुलासा मागविण्‍यात आला आहे. आयोगाकडून खुलासा प्राप्‍त  होईपर्यंत सदर रेतीघाट लिलावास याव्‍दारे स्‍थगिती देण्‍यात येत आहे. सर्व रेतीघाट लिलाव इच्‍छुकांनी याबाबतची नोंद घ्‍यावी. असे जिल्‍हाधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.
                       

मन: शांती आणि अपघात... !



     यांत्रिक चुकांपेक्षा मानवी चुकांनी अधिक अपघात होतात. या चुकांचे कारण मानवी मनाच्या वृत्तीत आणि काही सवयींमध्ये आहे. या मनावर ताबा मिळवता आला आणि शांतचित्त, प्रसन्न विचारांनी एकाग्रतेने व सावधपणे वाहन चालविले तर अपघात टळू शकतात. सुरक्षा सप्ताहानिमित्त हा खास लेख.
                                                -प्रशांत दैठणकर   
      रस्त्यावर होणा-या अपघातात यांत्रिकी चूका कमी आणि मानवी चूका अधिक असल्याचे दिसून येते. या चुका कधी मृत्यूचे कारण ठरतात तर कधी आयुष्यभराच्या अपंगत्वाच्या. या चुकांपैकी काही नेमकेपणाने सांगायच्या झाल्या तर यात पहिला क्रमांक मद्यपानाचा आहे. त्या सोबत वेगाचं असणारं वेड देखील अनेकदा अपघाताचं कारण ठरतं. माणसांकडून यात भर पडली आणि गेल्या काही वर्षात यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले ते मोबाईल फोनचा वापर करण्यामुळे.
       फाजिल आत्मविश्वास हे देखील अपघाताचे एक कारण ठरते. त्यासोबतच स्पर्धा करण्याची वृत्ती देखील अपघातास कारणीभूत असते. या दोन्ही बाबींप्रमाणे वेगाचं वेड हा देखील मानवी मनाचाच एक पैलू आहे. मनात वेगवेगळे विचार घोळत असतील तर त्या स्थितीत एकाग्रता न राहिल्यानेही अपघात होत असतो.
     आपल्याला सा-या जगाची घाई आहे अशा थाटात वाहन चालवण्याची सवय बहुतेक जणांना असते. अशी ही घाई आणि फाजिल आत्मविश्वास यामुळे गाडी ओव्हरटेक करताना गतीचा अंदाज चुकल्याने अनेक अपघात होतात. अनेकदा आपल्याला जे वाहन ओव्हर टेक करायचे आहे. त्याची लांबी आणि गती यामध्ये गल्लत करुन घेतल्याने अपघात होतात.
     उभ्या ट्रकवर पाठीमागून वाहन आदळण्याचे प्रमाण अपघातात खूप अधिक आहे. अशा प्रकारचे अपघात हे झोप येत असतानाही हट्टीपणा करुन गाडी चालवायची यामुळे होतो. जर ते वाहन उभे आहे तर आपण एकाग्रतेने लक्षपूर्वक गाडी चालवली तर असे अपघात कमी होतील. या अपघातांचे आणखी एक कारण म्हणजे प्रचंड गतीने वाहन चालवण्याची असणारी सवय. या गतीमुळे अचानक एखाद्या वळणावर समोर उभ्या वाहनावर आपले वाहन आदळून अपघात होवू शकतो याचं भान आपण ठेवायलाच हवं.
     अपघाताचं आणखी एक कारण म्हणजे अप्रशिक्षित व्यक्तीने वाहन चालवणे. गाडी पुसण्यासाठी असणारा क्लीनर आपल्याकडे ड्रायव्हर होताना दिसतो अशा पध्दतीने वाहनचालक होण्याचे योग्य प्रशिक्षण नसेल तर अनेकदा वाहन अनियंत्रित होण्याचे कारण कळत नसल्याने अशा व्यक्ती अपघात करतात.
     वाहन चालविणे ही एक कला आहे. वाहन चालवण्याचं प्रशिक्षण घ्यावं आणि सशस्त्र आणि प्रसन्न मनाने स्टिअरिंग हाती घेवून मनावर ताबा ठेवला तर निमे अपघात टळतील.
                                                     -प्रशांत दैठणकर

Friday 6 January 2012

सुरक्षित वाहतुकीसाठी स्‍वयंशिस्त पाळावे - जयश्री भोज

             वर्धा,दि.6– अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाएत असून याला कारण वाहन चालकाचा बेजवाबदारपणा असणे. अपघातामुळे अनेकवेळा जीवीत हानी होत असून, अनेक प्रसंगी अपंगत्‍व सुध्‍दा येत असते. अपघाताला आळा घालण्‍यासाठी वाहनचालकांनी सुरक्षित वाहतुकी सोबत मनातील एकाग्रता आणि स्‍वंयशिस्‍त  पाळावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी याप्रसंगी केले.
पुस्‍तीकेचे विमोचन करताना जिल्‍हाधिकारी जयश्री भोज 
     जिल्‍हाधिकारी यांच्‍या कक्षात सुरक्षित वाहतूकीसाठी स्‍वयंशिस्‍त हाच पर्याय या विषयावर एक चार पानी पुस्‍तीका काढण्‍यात आली होती, त्‍या पुस्‍तीकेचे विमोचन जिल्‍हाधिकारी भोज यांच्‍या हस्‍ते संपन्‍न झाले त्‍याप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या.
    यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्‍हाण, सहाय्यक परिवहन अधिकारी राजेंद्र निकोसे  व पोलीस निरीक्षक शशीकांत भंडारे आदि मान्‍यवर उपस्थित होते.
     वाहन चालविणे सुरक्षित तर जीवन सुरक्षित, असा अभिप्राय देवून जिल्‍हाधिकारी जयश्री भोज म्‍हणाल्‍या  की, नागरीकांनी वाहतूकीचे नियम काटेकोरपणे पाळल्‍यास अपघाताच्या  प्रमाणात नक्‍कीच  लक्षणीय घट होऊ शकते.
    यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चव्‍हाण म्‍हणाले की, `स्‍वयंशिस्‍त हाच पर्याय` या विषयावरील पुस्‍तकांमध्‍ये पादचारी, मोटार सायकल चालविण्‍या-या  मुलांना, सायकल स्‍वारांना , कार, ट्रक चालकासाठी तसेच मोबाईल धारकांसाठी आणि  सर्व वाहन चालकासाठी महत्‍वाच्‍या सुचना दिलेल्‍या असून, पावसाळ्यात वाहन चालकांनी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देण्यात आली आहे. सदर्हू पुस्तीका जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत मुलांच्या वाचण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. या पुस्तकामुळे विद्यार्थ्याना वाचणातून मार्गदर्शन मिळून भविष्यात वाहन चालविणे सोयीचे होईल असे ते म्हणाले.
    यावेळी अधिकारी उपसिथत होते.
                              00000

Thursday 5 January 2012

राष्‍ट्रीय ग्राहक दिन उत्‍साहात साजरा


    वर्धा,दि.5–तहसिल कार्यालय, अन्‍न नागरी पुरवठा विभाग व ग्राहक चळवळीतील संधटना यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने नुकताच (दिनांक 26 डिसेंबर) राष्‍ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्‍साहाने साजरा करण्‍यात आला.
     याप्रसंगी मंचावर जिलहा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्‍यक्ष आर.बी.सोमानी, जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे  सुषमा जोशी अखिल भारतीय ग्राहक कल्‍याण परिषद विदर्भ विभागाचे सचिव अजय भोयर व अधिष्‍ठाता अशोक पावडे आदी मान्‍यवर उपसिथत होते.
     ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहकांनी सतर्कता बाळगण्‍याची गरज आहे. उत्‍पादन विक्रेत्‍या सोबत ग्राहकांनी खरेदी केलेली वस्‍तू योग्‍य व वाजवी दरांमध्‍ये आकारली असल्‍याचे विक्रेत्‍याकडून ग्राहकांनी पावती घेणे आवश्‍यक आहे. यावेळी ग्राहकांचे हक्‍क याविषयी मार्गदर्शन उपस्थित पाहूण्‍यांनी केले.
     यावेळी वजनमापे व अन्‍न  व औषधी विभागातर्फे प्रदर्शनी लावण्‍यात आली.
     या कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
                              00000

युवकांनो व्‍हाय धीस कोलवरी .....!


     व्‍यक्‍ती संपन्‍न तर राष्‍ट्र संपन्‍न असं सूत्र आहे. आजची युवक पिढी एका बाजूला कोलवरी डी म्‍हणत फेसबूक वापरत आहे. दुस-या बाजूला नोकरीची मानसिकता सर्वांमध्‍ये दिसते. संपत्‍तीची संकल्‍पना (Concept of wealth ) युवकांनी समजून घेऊन त्‍यानुरुप वाटचाल केली तरच देश संपन्‍न बनेल. राष्‍ट्र महासत्‍ता बनेल असं चित्र आहे. 12 जानेवारीच्‍या युवक दिनानिमित्‍त काही विचार.
                                     - प्रशांत दैठणकर                                                        
      येणा-या  काळात आपला देश आर्थिक महासत्‍ता बनणार आहे. या वाक्‍याला आधार अर्थात आजची युवा पिढी. युवक ही शक्‍ती  आहे. आणि आजमितीस आपला देश सर्वाधिक युवकांचा देश आहे. युवक राष्‍ट्र घडवतात. या पिएीची आजची स्‍वतःची अशी कहाणी आहे. एका बाजूला तंत्रज्ञानाच्‍या प्रगतीतून अनेक बाबी साध्‍य करताना जग बोलवतय तर दुस-या बाजूला प्रगतीचे मार्गच सापडत नाही अशा मार्गावर आजचा युवक दिसतो.
     फेसबूकवर अनेक जण पडीक आहेत. इंटरनेटचा नेमका वापर अभ्‍यासाऐवजी मनोरंजनासाठी होताना दिसतोय. एमबीएचे कोर्स शोधण्‍याऐवजी `कोलवरी डी` मध्‍ये अधिक जणांचे लक्ष आहे की काय अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आपणास दिसते.
     तारुण्‍य, चैतन्‍याचा एक झरा, मंतरलेले दिवस एक कैफ, धुंदी, मस्‍ती आणि यात बुडवून घेण्‍याचा काळ हे चैतन्‍य सकारात्‍मक असलं पाहिजे. 15 ऑगस्‍टला स्‍वातंत्र्य दिन साजरा करताना ही पिढी कुठे आहे याचा शोध घ्‍यावाच लागतो. न्‍यू इअर आणि व्‍हॅलेंटाईन डे जल्‍लोषात साजरा करणारे 15 ऑगस्‍टला पिकनिक करताना दिसतात हे दुर्दैव आहे.
     राष्‍ट्र घडवायचं तर राष्‍ट्र आणि त्‍याचा इतिहास जाणून घ्‍यायला पाहिजे. फेसबूकवर टिका करणे किंवा फोटो पोस्‍ट करणे या माध्‍यमातून देशभक्‍ती दाखवणे ही राष्‍ट्रभक्‍ती होत नाही. आपण राष्‍ट्राला महाशक्‍ती किंवा महासत्‍ता बनवायचं स्‍वप्‍न बघतोय तर आपली कृती देखील त्‍याच दिशेने जाणारी हवी.
     राष्‍ट्राला पुढे नेताना राष्‍ट्रीय तसेच आंतरराष्‍ट्रीय घटना घडामोडींची माहिती घेणं त्‍याचं विश्‍लेषण करणे आपल्‍याला शिकावं लागेल. अर्थकारण आणि व्‍यवहारज्ञान आपणास असलं पाहिजे. अमूक एकच पद मिळाल्‍याने देशाची सेवा असलं पाहिजे. अमूक एकच पद मिळाल्‍याने देशाची सेवा होते असं नाही तर कोणतेही काम देशाच्‍या प्रगतीला हातभार लावणारे आहे अशी सकारात्‍मक मानसिकता आपण बाळगायला हवी.

     अमेरिका हे संपन्‍न राष्‍ट्र आहे कारण संपत्‍ती कशी कमवावी हे तेथील प्रत्‍येक नागरिक जाणतो. संपत्‍ती अर्थात वेल्‍थ कशी वाढता येईल याचा विचारच आपणाकडे नाही 90 टक्‍के युवक आजही शिक्षण झाल्‍यावर  नोकरीचा विचार करताना दिसतात नोकरी अर्थात पोटपाणी (ब्रेडअँन्‍ड बटर) या नोकरीतून आपण संपत्‍ती जमा करु शकत नाही.

     नोकरीमध्‍ये महागाई आणि पगार यांचा मेळ बसविण्‍यात निवृत्‍ती  कधी येते तेच कळत नाही अशी स्थिती आहे. जागतिकीकरणानंतर मागणी आणि पुरवठ्याच्‍या गणितात पेट्रोल, वीज, अन्‍नधान्‍य आदींच्‍या किंमत सतत वाएणार आहेत. यापुढेही ही वाढ सुरुच राहील. या चक्रातून बाहेर पडायचं असेल तर आपणास संपन्‍न व्‍हावं लागेल. संपत्‍तीची संकल्‍पना जाणून सर्वांनी त्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न करायला लागेल. अशाच प्रकारे व्‍यक्‍ती संपन्‍न झाल्‍या तरच राष्‍ट्र संपन्‍न होईल याची जाण आणि भान सर्वांनी ठेवण्‍याची गरज आहे.

     शेतीप्रधान देशात आपण शेती व त्‍यावर आधारित उद्योगांवर भर देणे, पारंपरिक शेती सोडून बाजारपेठेत काय बदल झालेत याचा विचार करुन शेती करणे काळाची गरज झाली आहे. आपण आपल्‍या देशाचे चित्र बघितल्‍यास पंजाबमध्‍्ये  शेती अतिशय चांगल्‍या  प्रकारे केली जाते मुळात मानसिकता नोकरीची असेल तर शेती कधीच फायद्याची वाटणार नाही. परंतू शेती व्‍यवसायच आपल्‍या देशाला संपन्‍नतेकडे नेवू शकतो. संपन्‍न राष्‍ट्राच्‍या निर्मितीत शेतीचा वाटा मोठा असतो हे जगभरातील सर्व संपन्‍न अशा राष्‍ट्रांनी सिध्‍द करुन दाखवलं आहे.

     आजचा युवक आपल्‍या कृतीतून हे चित्र निश्चितपणानं बदलू शकतो इतकी ताकद या पिढीत जरुर आहे.

                                              - प्रशांत दैठणकर

अपघात आणि नागरिक


    रस्‍त्‍यावर वाहनांच्‍या धडकण्‍यामुळे पादचा-यांनाही मोठा धोका असतो. रस्‍त्‍यावर चालायचे कसे आणि काय काळजी घ्‍यायची याची माहिती असल्‍यास असे अपघात आपण सहजरित्‍या टाळू शकतो.
                                   - प्रशांत दैठणकर                                                        
अपघात ही देखील एक आपत्‍ती आहे. या आपत्‍तीचे व्‍यवस्‍थापन आपण विविध प्रकारे करु शकतो. त्‍यात अपघात झाल्‍यावर करण्‍याच्‍या सर्व उपाय योजनांपेक्षा अधिक जोर आपण अपघाताच्‍या प्रतिबंधावरच द्यायला हवा.
     रस्‍ता ओलांडताना वाहनाने धडक देणे त्‍याचप्रमाणे वाहन पादचा-यांच्‍या अंगावर येवून आदळणे या प्रकारातून रस्‍त्‍यांवर चालणा-या नागरिकांना देखील अपघाताला सामोरं जावं लागतं. या दोन्‍ही प्रकारच्‍या अपघातात प्राण गमावणा-यांचे त्‍याचप्रमाणे  अपंग होणा-यांचे प्रमाण मोठे आहे.
     रस्‍त्‍यावर होणा-या या अपघातांप्रमाणेच भारतात रेल्‍वे रुळ ओलांडताना रेल्‍वेखाली मरण पावणा-यांची संख्‍या देखील खूप मोठी आहे. रेल्‍वे स्‍थानकांवर या फलाटावरुन त्‍या फलाटावर जाण्‍यासाठी दादरे उपलब्‍ध करुन देण्‍यता आलेले आहेत मात्र वेळ वाचवण्‍यासाठी रुळ ओलांडण्‍याची असणारी मानसिकता अशा अपघातांचे कारण ठरत असते.
     रस्‍त्‍यांवरुन चालताना रस्‍त्‍याच्‍या कडेने चालणे महत्‍वाचे असते. आपण महामार्गावरुन पायी जात असाल तर शक्‍यतो डांबरी रस्‍त्‍यावर येवू नका. चालण्‍याची दिशा देखील वाहनांच्‍या दिशेच्‍या विरुध्‍द असावी जेणेकरुन आपणास समोरुन येणारे वाहन दिसत राहते. वाहने ज्‍या दिशेने जातात त्‍या दिशेने चालल्‍यास मागून कोणते वाहन येत आहे आणि त्‍याची गती नेमकी किती आहे हे आपणास समजू शकत नसते.
     शहरी भागात मॉर्निंग वॉक तसेच जॉगिंग करणारे अनेक आहेत. काही जण सकाळच्‍या वेळी धावण्‍याचा सराव देखील होतो. या सर्वांसाठी महामार्गाचा तसेच शहरातील मुख्‍यरस्‍त्‍यांचा वापर टाळलेला बरा. बहूतेक अपघात हे याच वेळात होतात याची जाणीव आपणास असली पाहिजे.
     हिवाळ्याच्‍या दिवसात सकाळच्‍या वेळी अनेकदा दाट धुके असते. असा प्रकार उत्‍तर  भारतात मोठ्या प्रमाणावर आहे. या प्रकारच्‍या धुक्‍यामुळे समोर काय आहे हे दिसत नाही व त्‍यामुळेच वाहनांचे अपघात होतात. धुक्‍यात रस्‍ता दिसावा यासाठी विशिष्‍ट अशा `फॅग लाईटचा `वापर वाहन धारकांनी केल्‍यास अपघाताची शक्‍यता कमी होईल. अशा अंधुक प्रकाशात वाहनाची गती देखील कमी ठेवायला हवी.
     रस्‍ते  ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगचा वापर आपण करायला हवा तो लोक करीत नाहीत. ते देखील अपघाताचे कारण ठरते. हे टाळल्‍यास आपण अपघातांचे प्रमाण निश्चितपणे कमी करु शकू.  
                                            - प्रशांत दैठणकर

Wednesday 4 January 2012

फिरते नांव नोंदणी पथकाचा दौरा


     वर्धा,दि.4-जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, वर्धा या कार्यालयाचे फिरते नाव नोंदणी पथकाचा दौरा जानेवारी 2012 मध्‍ये पुढील प्रमाणे आहे.
     दि. 6 जानेवारी 2012 पंचायत समिती आष्‍टी, दि. 7 जानेवारी 2012  पंचायत समिती, कारंजा, दि. 10 जानेवारी 2012 पंचायत समिती आवी, दि. 12 जानेवारी 2012 पंचायत समिती सेलू, दि. 15 जानेवारी 2012 पंचायत समिती समुद्रपूर, दि. 16 जानेवारी 2012 पंचायत समिती हिंगणघाट, दि. 18 जानेवारी 2012 नगर परिषद पुलगाव, दि. 19 जानेवारी 2012 पंचायत समिती देवळी.
     उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्‍या व जातीचे मुळ प्रमाणपत्रासह उपस्थित राहून आपल्‍या नावाची नोंदणी सकाळी 11 ते सायं.5 वाजेपर्यंत करुन घ्‍यावी. 

जिल्‍हास्‍तरावर ज्‍येष्‍ठ नागरिकांची समितीसाठी अर्ज आमंत्रित


   वर्धा,दि.4-जिल्‍हास्‍तरावर ज्‍येष्‍ठ नागरिक कल्‍याण समिती स्‍थापन करावयाची असल्‍याने या क्षेत्रामध्‍ये कार्य करणा-या तज्ञ कार्यकर्ते तसेच विख्‍यात ज्‍येष्‍ठ नागरिक,सामाजिक कार्यकर्ते  यांनी पुढील नमुन्‍यात अर्ज सादर करावयाचा आहे.

    या अर्जामध्‍ये वैयक्तिक माहितीसह तज्ञ कार्यकर्त्‍यांचे नाव, पत्‍ता, जन्‍म तारीख, वय, सामाजिक सेवेचा कालावधी, सामाजिक सेवेचे क्षेत्र, ज्‍या  संस्‍थेसोबत काम करतात त्‍या संस्‍थेचे नांव, सद्या कोणत्‍या शास‍कीय किंवा अशासकीय पदावर नियुक्‍त आहात याची माहिती तातडीने सादर करावयाची आहे. अशी माहिती जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी जि.प. वर्धा कळवितात.

जिल्‍हा परिषदेच्या समाज कल्‍याण अधिकारी पदनामात बदल


     वर्धा,दि.4–शासनाच्‍या सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग यांचे शासन निर्णयानुसार समाज कल्‍याण अधिकारी गट अ जि.प. वर्धा या नावात बदल करण्‍यता आला असून, यापुढे विद्यमान पदनाम जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी वर्धा असे झाले आहे.

     संबधितांनी या बदलाची नोंद घेवून पत्रव्‍यवहार नविन नावाने करण्‍यात यावे, असे जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी, जि.प. वर्धा कळवितात.

Tuesday 3 January 2012

महानगरपालिकांसाठी १६ फेब्रुवारीला तर जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारीला मतदान मंगळवार, ३ जानेवारी, २०१२

बृहन्मुंबईसह दहा महानगरपालिका, तसेच २७ जिल्हा परिषदा आणि ३०९ पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी मंगळवारी मुंबईत जाहीर केला. त्यानुसार महानगरपालिकांसाठी १६ फेब्रुवारी २०१२ रोजी मतदान होईल तर जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारी २०१२ रोजी मतदान होईल. या सर्व ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत श्रीमती सत्यनारायण यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. राज्य निवडणूक आयोगाचे अप्पर मुख्य सचिव चाँद गोयल यावेळी उपस्थित होते.

श्रीमती सत्यनारायण म्हणाल्या, आम्ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०१२ तर दहावीची परीक्षा १ मार्च २०१२ पासून सुरू होत आहे. परीक्षांचा कालावधी लक्षात घेऊन निवडणुकांचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही आणि निवडणुका वेळेवर घेण्याची संविधानिक जबाबदारीही व्यवस्थित पार पडेल.

महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम

महानगरपालिका निवडणुकीसाठी २४ जानेवारी ते ३१ जानेवारी २०१२ या कालावधित नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जातील. सार्वजनिक सुट्टी व रविवारी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. १ फेब्रुवारी २०१२ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. तसेच त्याच दिवशी वैधरीत्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत ३ फेब्रुवारी २०१२ असेल. ४ फेब्रुवारी २०१२ रोजी निवडणूक चिन्हाचे वाटप व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्याच दिवशी मतदान केंद्रांची व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध होईल. १६ फेब्रुवारी २०१२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. मतदानाच्या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता किंवा सर्व केंद्रांवरील मतदान समाप्तीनंतर मतमोजणी होईल. अथवा स्थानिक परिस्थिती लक्षात घेता १७ फेब्रुवारी २०१२ रोजी मतमोजणी होईल.

जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम

जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे देण्यास १८ जानेवारी २०१२ पासून सुरवात होईल व २३ जानेवारी २०१२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी व वैध उमेदवारांची यादी २४ जानेवारी २०१२ रोजी प्रसिद्ध होईल. नामनिर्देशनपत्रे स्वीकारणे किंवा नामंजूर करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे अपिल करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०१२ असेल. या अपिलावर जिल्हा न्यायाधीशांनी निकाल देण्याची संभाव्य शेवटची तारीख ३० जानेवारी २०१२ राहील. तसेच ही अपिले निकालात काढल्यावर वैध उमेदवारांची यादी त्याच दिवशी प्रसिद्ध होईल. जेथे अपील नसेल तेथील नामनिर्देशनपत्रे ३० जानेवारी २०१२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. तसेच जेथे अपील असेल तेथील नामनिर्देशनपत्रे १ फेब्रुवारी २०१२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. जेथे अपील नसेल तेथील उमेदवारांची यादी ३० जानेवारी २०१२ रोजी दुपारी ३.३० नंतर प्रसिद्ध केली जाईल. तसेच त्याच दिवशी निवडणूक चिन्हाचे वाटप होईल आणि जेथे अपील असेल तेथे १ फेब्रुवारी २०१२ रोजी दुपारी ३.३० नंतर उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल.

१ फेब्रुवारी २०१२ रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ७ फेब्रुवारी २०१२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधित मतदान घेण्यात येईल. ८ फेब्रुवारी २०१२ रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीस सुरवात होईल.

निवडणूक होणाऱ्या महानगरपालिका

बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर

निवडणूक होणा-या जिल्हा परिषदा

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत येणा-या पंचायत समित्या.

एकूण जागांचा तपशील

महानगरपालिका : एकूण जागा- १,२४४, महिला- ६२४
जिल्हा परिषदा : एकूण जागा- १,६४१, महिला- ८२८
पंचायत समित्या : एकूण जागा- ३,२५२ महिला- १,६२६

नव्या मतदारांना संधी

निवडणूक होत असलेल्या या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुदती मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात संपत आहेत. त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाने संयुक्तपणे १ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०११ मध्ये `मतदार व्हा` मोहीम राबविली होती. त्यात राज्यभरात एकूण २३ लाख अर्ज प्राप्त झाले असून त्यांची राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत छाननी करण्यात आली आहे. त्यानुसार ५ जानेवारी २०१२ रोजी नवीन मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीमध्ये नव्याने समावेश झालेल्या मतदारांनाही या निवडणुकांमध्ये मतदानाची संधी मिळावी या दृष्टीने महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम आखण्यात आला आहे.

उमेदवारांच्या निवडणूक खर्चात वाढ (रुपयांत)
• `अ`वर्ग महानगरपालिका (मुंबई)- १,३५,००० वरून ५,००,०००
• `ब`वर्ग महानगरपालिका (पुणे व नागपूर)- १,००,०० वरून ४,००,०००
• `क`वर्ग महानगरपालिका (पिंपरी-चिंचवड, ठाणे, नाशिक व नवी मुंबई)- १,००,००० वरून ४,००,०००
• `ड`वर्ग महानगरपालिका (उर्वरित सर्व)- १,००,००० वरून ३,००,०००
• जिल्हा परिषदा- ६०,००० वरून ३,००,०००
• पंचायत समित्या- ४०,००० वरून २,००,०००

मतदारांच्या सोयीसाठी
• राज्य निवडणूक आयोगाचे www.mahasec.com हे नवे अद्ययावत संकेतस्थळ
• मतदान केंद्र मध्यवर्ती ठिकाणी असेल
• रांगा टाळण्यासाठी मतदान केंद्रावरील कमाल मतदार संख्येत घट
• बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी मतदान केंद्रावरील मतदारांची कमाल संख्या १,०००
• उर्वरित महानगरपालिका, जि.प./पं.सं.साठी मतदान केंद्रावरील मतदारांची कमाल संख्या ८००
• अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्पची व्यवस्था
• अंध, अपंग, गरोदर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी प्राधान्य
• राजकीय पक्षांच्या महत्वाच्या पुढाऱ्यांच्या प्रवास खर्चास उमेदवाराच्या खर्चातून सूट
• बाटलीतील शाईऐवजी आता मार्करपेनने मतदारांच्या बोटावर निशाणी
• मतदारांच्या ओळखीसाठी आता `आधार कार्ड`लाही मान्यता
• प्राण्यांचा क्रूरपणे वापर करण्यास प्रतिबंध

यशदाच्‍या वतीने तीन दिवस कार्यशाळा




     वर्धा,दि.3 –यशवंतराव चव्‍हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यशदा पुणे तर्फे अल्‍प संख्‍याक समुहाचा विकासाच्‍या मुख्‍य प्रवाहात समावेश या विषयावर  प्रशिक्ष्‍ण कार्यशाळा दि.3 ते 5 जानेवारी 2012 दरम्‍यान विकास भवन येथे घेण्‍यात येत आहे.

     निवासी उपजिल्‍हाधिकारी राजेश खवले यांच्‍या हस्‍ते या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन करण्‍यात आले. उदघाटन प्रसंगी भारती खरटमल, सुत्र संचालक  समता व सामाजिक न्‍याय केंद्र यशदा पुणेचे पिरजादे रियाज लाला हे उपस्थित होते.

     या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रशिक्षार्थि म्‍हणून शासकिय अधिकारी व कर्मचारी अशासकीय संस्‍था, सामाजिक कार्यकर्ते प्रतिनिधी सहभागी झाले होते.या तीन दिवसामध्‍ये व्‍याख्‍याने ,गटचर्चा होणार आहे.

आदर्श आचार संहिता लागू

     वर्धा, दि. 3 – राज्‍य निवडणूक आयोगाने जिल्‍हा परिषद व पंचायत समिती निवडणूका जाहीर केल्‍या  असून, दि. 3 जानेवारी 2012 पासून आदर्श आचारसंहिता लागू केलेली आहे.
      तेव्‍हा शहरी भागात व खेडी विभागात सार्वजनिक स्‍थळी असलेले पताका, पोस्‍टर, भिंती पत्राके ज्‍या राष्‍ट्रीय पक्षाने लावले असतील त्‍यांनी स्‍वतः काढून घ्‍यावे. अन्‍यथा ते सरकारी यंत्राणे मार्फत काढण्‍यात येईल. संबंधीतांनी नोंद घ्‍यावी तसेच आचारसंहिता भंग होणार नाही, याबाबत विशेष दक्षता घेण्‍यात यावी. असे जिल्‍हाधिकारी, वर्धा कळवितात.

चौथ्‍या स्‍तंभाचे स्‍थान अबाधितच ....!



      6 जानेवारी, मराठी वृत्‍तपत्रसृष्‍टीचे जनक बाळशास्‍त्री जांभेकर यांच्‍या दर्पण या मराठी वृत्‍तपत्राने एक सशक्‍त अशा चौथ्‍या स्‍तंभाचा आधार लोकशाहील दिला. दर्पण दिनानिमित्‍त हा लेख.
                                         - प्रशांत दैठणकर                                                         
  
     जग तंत्राच्‍या आणि तंत्रज्ञानाच्‍या प्रगतीमुळे जवळ आलं आहे. आज हातातल्‍या मोबाईलमध्‍ये दूरदर्शन व इतर वाहिन्‍यांचे कार्यक्रम बघणं शक्‍य झालं आहे. सेाबत इंटरनेटने माहितीची दालनं खुली केली आहेत. या परिस्थितीतही वृत्‍तपत्रसृष्‍टीचे महत्‍व अबाधित आहे. वृत्‍तपत्रांनी जपलेली सामाजिक बांधिलकी आणि विश्‍वसनीयता यामुळे हे शक्‍य झालं आहे.
      वृत्‍तपत्रांना मधल्‍या काळात विविध प्रकारच्‍या आव्‍हानांचा मुकाबला करावा लाला असला तरी आपल्‍या सामाजिक बांधिलकीच्‍या भूमिकेतून वृत्‍तपत्रसृष्‍टीने भारतासारख्‍या सर्वात मोठ्या सक्रीय लोकशाहीमध्‍ये स्‍वतः होवून लोकशाहीचा चौथा स्‍तंभ असं स्‍थान प्राप्‍त केलं आहे.
      समाजाचे कान आणि डोळ असणा-या वृत्‍तपत्रांनी मोठ्या प्रमाणावर सामाजिक जागृती केलेली आहे. विविध चळवळींच्‍या माध्‍यमातून विकासाचे प्रश्‍न मार्गी लावण्‍यात वृत्‍तपत्रांचे महत्‍व  अनन्‍यसाधारण आहे.
      मराठी वृत्‍तपत्रांमध्‍ये सामाजिक जाणीवा मोठ्या प्रमाणावर जपल्‍या जातात. बदलत्‍या काळात बदलत्‍या सामाजिक समस्‍यांची जाण ठेवली जाते. गेल्‍या  काही काळापासून पर्यावरण विषयक जाणीव जागृतीचे काम वृत्‍तपत्रांनी मोठ्या प्रमाणावर चालविलेले आपणास दिसेल. केवळ पर्यावरणास धोका आहे इतकं सांगून न थांबता पुढचं पाऊल म्‍हणून पर्यावरण चळवळीत काम करणारी वृत्‍तपत्रे आपणास दिसतील.
      पर्यावरणास असणारे धोके समाजासमोर मांडण्‍यासेाबतच एडस् आणि एच.आय.व्‍ही. सारख्‍या संवेदनशील विषयावर वृत्‍तपत्रांची भूमिका महत्‍वाची राहिलेली आहे. आपण समाजाचा महत्‍वाचा घटक आहोत. या नात्‍याने समाजातील सर्व घटकांना समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहात राहण्‍याचा अधिकार आहे आणि त्‍यांना मुख्‍य प्रवाहात आण्‍ण्‍यासाठी प्रयत्‍न करणं व त्‍याबाबत प्रबोधन करणं यात वृत्‍तपत्रांचे योगदान खूप मोठे आहे.
      समाजात घडणा-या घटनांचं प्रतिबिंब वृत्‍तपत्रामध्‍ये यावं तसं वृत्‍तपत्रांनी समाजाला दिशा द्यावी असा दुहेरी प्रवास सध्‍या वृत्‍तपत्रासृष्‍टी करीत आहे. यंत्रणांमधील त्रुटी निदर्शनास आणून देत योग्‍य दिशेने विकास प्रक्रिया नेण्‍यात मराठी वृत्‍तपत्राचे योगदान खूप मोठे आहे. टिव्‍ही, इंटरनेट आदी माध्‍यमे आली असली तरी वृत्‍तपत्राचे महत्‍व यामुळेच अबाधित राहिले आहे.

`स्‍कूल बस ` ची सुरक्षा महत्‍वाची ....!

`स्‍कूल बस ` ची सुरक्षा महत्‍वाची ....!
रस्‍ते सुरक्षा पंधवड्याला सुरुवात झाली आणि हरणातल्‍या भीषण अपघाताची बातमी समोर आली. या निमित्‍ताने शालेय मुलांची वाहतूक करणा-या बस आणि सुरक्षेचे नियम याबाबत वर्धा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्‍हाण यांनी दिलेली ही माहिती.
लेखक – विजय चव्‍हाण
शब्‍दांकन - प्रशांत दैठणकर

हरयाणातील अंबाला जवळ शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या अपघाताची जी दुर्दैवी घटना घडली त्‍या 12 शाळकरी मुलांचा जीव गेला. क्ष्‍णभर हळळळ व्‍यक्‍त करुन पुन्‍हा जगरहाटीला सुरुवात करण्‍याची आपली सवय असते. आपण या घटनेचे गांभीर्य जाणून आपल्‍या आसपास याबाबत जागरुकता ठेवावी ही शिकवण सा-या पालकांसाठी आहे.
शाळांसाठी मुलांना सोडताना बरेच पालक घराच्‍या कोप-यावर आली बस आणि दिलं मुलांना बसवून त्‍यात या पलिकडे फारसा विचार करताना दिसत नाहीत. केवळ स्‍वस्‍त सेवा आहे. यापेाटी खच्‍चून भरलेल्‍या स्‍कूलबसमध्‍ये मुलांना पाठवणारे अनेक पालक आहेत. बसेससाठी सुरक्षेचे नियम असे आहेत.
शाळेतील मुलांची सुरक्षितपणे ने-आण करणे, परिवहन शुल्‍क, बस थांबे निश्चित करणे या बाबींकडे लक्ष देण्‍यासाठी प्रत्‍येक शाळेची एक परिवहन समिती असेल आणि ही समिती, वाहनाची कागदपत्रे जसेः नोंदणी प्रमाणपत्र, योग्‍यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, परवाना, वायू प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, वाहन चालविण्‍याचे लायसन, अग्निशामक, प्रथमोपचार पेटी इत्‍यादींची पडताळणी करील.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण हे शालेय व्‍यवस्‍थापन, वाहतूक पोलीस आणि महानगरपालिका किंवा नगरपरिषदेशी विचारविनिमय करुन, शाळेच्‍या वेळा आणि मुलांची सुरक्षितता लक्षात घेऊन, केवळ स्‍कूल बसकरिता यथोचित ठिकाणी वाहनतळ आणि वाहन थांबे विनिर्दिष्‍ट करील.
शाळेच्‍या मालकीच्‍या आणि मुलांची ने-आण करण्‍यासाठी वापरण्‍यात येणा-या वाहनांच्‍या संबंधात परवाना देणे आणि त्‍याचे नूतनीकरण करणे याकरिता प्रत्‍येक अर्ज या नियमान्‍वये अनुसूचीमध्‍ये विहित केलेल्‍या नमुना पी.एससी,सी.ओ.एस. नुसार असेल.
शाळेव्‍यतिरिक्‍त इतरांच्‍या मालकीच्‍या असलेल्‍या आणि शाळेचे कंत्राटी वाहन म्‍हणून वापरण्‍यात येणा-या वाहनांच्‍या संबंधात परवाना देणे आणि त्‍यांचे नूतनीकरण करणे याकरिता प्रत्‍येक अर्ज या नियमांन्‍वये अनुसूचीमध्‍ये विहित केलेलया नमुना पी.सीओ.एस.नुसार असेल.
परवान्‍यामध्‍ये समावेश केलेली वाहने आणि शाळेतील मुलांचे वाहन करण्‍याकरिता केवळ वापर करण्‍यात येणारी वाहने यांना पिवळा रंग देण्‍यात येईल आणि वाहनाच्‍या पुढच्‍या आणि मागच्‍या बाजूला स्‍कूल बस असे लिहिलेले शब्‍द दिसले पाहिजे. तसेच शाळेची ओळख पटण्‍याकरिता वाहनाच्‍या खिडकीखाली सर्व बाजूंना 150 मिलीमीटर रुंदीचा विटकरी पट्टा रंगविलेला असेल ज्‍यावर शाळेचे नाव लिहिलेले असेल.
शालेय कंत्राटाशिवाय अन्‍य कोणतेही कंत्राट असलेल्‍या वाहनांना पिवळा रंग आवश्‍यक असणार नाही. परंतु वाहनाच्‍या खिडकीखाली सर्व बाजूंना 400 मिलीमीटर पिवळ्या पट्टीने रंगविलेले असले पाहिजे. स्‍कूल बस म्‍हणून वापरण्‍यात येणारे वाहन सुरुवातीच्‍या नोंदणीच्‍या दिनांकापासून 15 वर्षाहून अधिक जुनी असता कामा नये.
वाहनासोबत, ने-आण करणा-या शाळेतील मुलांची संपूर्ण यादी असेल ज्‍यामध्‍ये प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांचे नाव, वर्ग निवासाचा पत्‍ता, संपर्क दूरध्‍वनी किंवा भ्रमणध्‍वनी क्रमांक, रक्‍तगट आणि त्‍याचया किंवा तिच्‍या नावासमोर त्‍याला किंवा तिला चढण्‍याकरिता व उतरण्‍याकरिता थांबण्‍याचे ठिकाण त्‍याच्‍या किंवा तिच्‍या घराजवळील या गोष्‍टी नमूद केलेल्‍या असतील. यादीमध्‍ये मूळ ठिकाण, समाप्‍तीचे ठिकाण आणि वापरण्‍यात येणारा तपशीलवार मार्ग दाखवणारा शैक्षणिक संस्‍थेच्‍या मुख्‍य व्‍यक्‍तीकडून यथोचितरीत्‍या साक्षांकित केलेला मार्गदेखील नमूद केलेला असेल.
प्रत्‍येक स्‍कूल बसमध्‍ये चालकाव्‍यतिरिक्‍त, महाराष्‍ट्र मोटार वाहन नियम 1989 च्‍या नियम 249 मध्‍ये विहित केल्‍याप्रमाणे एक सहवर्ती असेल. तसेच मुलींची ने-आण करीत असलेलया स्‍कूल बसच्‍या बाबतीत, बसमध्‍ये स्‍त्री सहवर्ती उपस्थित असली पाहिजे जी स्‍कूल बसमध्‍ये प्रवास करणा-या मुलींच्‍या गरजांकउे लक्ष देईल आणि सकूल बसमधून चढताना किंवा उतरताना त्‍यांच्‍या सुरक्षेची खात्री घेईल आणि संपूर्ण प्रवासाच्‍या वेळी सर्वसामान्‍यपणे काळजीदेखील घेईल.
निकडीच्‍या प्रसंगी चालक आणि सहवर्ती शाळेच्‍या प्राधिका-यांना प्रसंगाची माहिती देतील आणि शाळेतील मुलांच्‍या सुरक्षेसाठी आवश्‍यक व्‍यवस्‍था करतील.
शिशुवर्गातील मुलांच्‍या बाबतीत जर अधिकृत व्‍यक्‍ती (शाळा आणि पालक यांनी परस्‍पर सहमतीने मान्‍यता दिलेली व्‍यक्‍ती) बस स्‍टॉपवर मुलाला घ्‍यायला आली नाही तर, त्‍या मुलाला पुन्‍हा शाळेत पाठविण्‍यात येईल आणि त्‍याच्‍या पालकांना बोलावून ते मूल त्‍यांना घेऊन जाण्‍यास सांगण्‍यात येईल.
चढण्‍याची खालची पायरी जमिनीपासून 220 मिलीमीटरपेक्षा अधिक उंचीची नसावी आणि सर्व पाय-या पाय न घसरणा-या असल्‍या पाहिजेत.
स्‍कूल बसमध्‍ये बहिर्वक्र भिंगाचा आरसा असला पाहिजे ज्‍यामुळे चालक मोटार वाहनाचा बाहेर पडण्‍याचा दरवाजा व प्रवेश दरवाजा आणि मागील भाग स्‍पष्‍ट बघू शकेल आणि चालकाला बसच्‍या आतील भागातील सर्व दृश्‍य स्‍पष्‍ट दिसू शकेल यासाठी मोठा पॅराबोलिक आरसा देखील असेल.
स्‍कूल बसमध्‍ये पुढील दरवाजाच्‍या पाय-यांसांबत हाताने धरता येणा-या कठड्याची तरतूद असली पाहिजे जिचा वापर दरवाजातून आत येणे आणि बाहेर पडणे यासाठी करण्‍यात येईल. हाताने धरता येणा-या कठड्याची उंची, धातू, रचना शासनाने जारी केलेल्‍या सर्वसाधारण निर्देशांप्रमाणे असेल.
सकूल बसमध्‍ये उभा दांडा (स्‍टॅन्चियन) असेल, प्रत्‍येक दांडा यथोचित अंतरावर असेल आणि तो छतामध्‍ये आणि तळपृष्‍ठाला घट्ट गुंतलेला असेल आणि वाहनाची जमीन न घसरणा-या धातूने बनवलेली असेल, ते धातू शासनाने जारी केलेल्‍या सर्वसाधारण निर्देशांप्रमाणे असेल.
स्‍कूल बसमध्‍ये कोणताही प्रेशर हॉर्न जोडलेला नसला पाहिजे किंवा कर्कश आवाज करणारे जे ब्रेक यंत्रणेमधून हवेच्‍या दाबाने नियंत्रित होत असेल असे अन्‍य कोणतेही साधन बसवलेले नसले पाहिजे.
स्‍कूल बसमध्‍ये वरील बाजू काचेची असलेली प्रथमोपचार पेटी आणि आ.एस.आय.मार्ग असेलेली प्रत्‍येकी 5 किलो क्षमतेची ए बी सी प्रकारची दोन अग्निशामके ठेवणे आवश्‍यक असेल त्‍यापेकी एक चालकाच्‍या केबीनमध्‍ये असेल आणि दुसरे मागे बसच्‍या आणीबाणीच्‍या दरवाजाच्‍या जवळ असेल. परंतु बारापर्यंत आसन क्षमता म्‍हणून नोंदणी असलेल्‍या हलक्‍या चार चाकी मोटार वाहनामध्‍ये आय.एस.आय.मार्क असलेली 5 किलो क्षमतेचे एबीसी प्रकारचे एक अग्निशामक पुरेसे असेल.
बसमध्‍ये आसनाखाली बँग ठेवण्‍याच्‍या रॅकची तरतूद असली पाहिजे आणि परिवहन आयुक्‍तांमार्फत त्‍यांच्‍या आदेशाने वेळोवेळी विनिर्दिष्‍ट केलेलया अशा इतर गोष्‍टींची तरतूद असली पाहिजे. अशा वाहनाच्‍या चालकाकडे 5 वर्षे वाहन चालविण्‍याचा अनुभव असला पाहिजे आणि तो परिवहन अनुज्ञप्‍तीधारक असला पाहिजे आणि स्‍कूल बस चालविण्‍याच्‍या सेवेत असताना वैध बिल्‍ला धारण करीत असला पाहिजे. स्‍कूल बसमध्‍ये धोक्‍याचे इशारे देणारी प्रकाशयोजना (लाईट) असल्‍या पाहिजेत ज्‍यामुळे जेव्‍हा मुले चढताना किंवा उतरताना असे वाहन थांबेल तेव्‍हा त्‍या चालू होतील.
शैक्षणिक संस्‍थेची बस आणि मध्‍यम किंवा जड प्रवासी मोआर वाहने शाळेतील विद्यार्थ्‍यांची ने-आण करण्‍याच्‍या प्रयोजनासाठी वापरण्‍यात येत असतील त्‍या बाबतीत, खिडकीला 3 आडवे स्‍टीलचे दांडे बसच्‍या बाहेरील बाजूने जोडलेले असले पाहिजेत त्‍या कोणत्‍याही दोन दांड्यांमधील अंतर हे पाच सेंटीमीटरपेक्षा अधिक असणार नाही अशारीतीने ते जोडलेले असले पाहिजे. वाहनाला वेगनियंत्राक जोडलेले असले पाहिजे त्‍यामुहे महानगरपालिकेच्‍या हद्दीमध्‍ये वाहनाचा वेग 40 किलोमीटर प्रति तासपेक्षा अधिक असणार नाही आणि महानगरपालिकाव्‍यतिरिक्‍त हद्दीमध्‍ये तो 50 किलोमीटर प्रति तासपेक्षा अधिक असणार नाही.
वाहन शालेय प्रयोजनासाठी वापरण्‍यात येत आहे ही वस्‍तुस्थिती दर्शविण्‍याकरिता वाहनाच्‍या पुढच्‍या व मागच्‍या बाजूस घट्टपणे चिकटवलेला 350 मिलीमीटर x 350 मिलीमीटर आकाराचा फलक असला पाहिजे. त्‍या फलकावर काळ्या रंगाच्‍या 250 मिलीमीटरपेक्षा कमी नसेल इतक्‍या उंचीच्‍या शाळेत जाणा-या दोन मुलांची (एक मुलगी व एक मुलगा) चित्रे रंगविलेली असली पाहिजेत. चित्रांच्‍या खाली काळ्या रंगांमध्‍ये स्‍कूल बस असे लिहिलेले असले पाहिजे आणि त्‍या अक्षरांची उंची किमान 100 मिलीमीटर इतकी असली पाहिजे आणि जाडी (रुंदी) किमान 11 मिलीमीटर इतकी असली पाहिजे.
आसनक्षमता बारापर्यंत असलेलया चार चाकी हलके मोटार वाहन याव्‍यतिरिक्‍त असलेलया प्रत्‍येक स्‍कूल बसवर शाळेची ओहख दर्शविणारा एक फलक दिसेल असा असावा ज्‍यावर मार्ग क्रमांक लिहिलेला असावा आणि तो फलक 30 इंच आकाराचा आणि 8 इंच उंचीचा असावा जो पुढे वरच्‍या बाजूस आणि मागे वरच्‍या बाजूस दिसेल असा असावा आणि प्रवेशव्‍दार /बोहर पडण्‍याच्‍या दरवाजावरील फलकाची लांबी 18 इंचाच्‍या आकाराची आणि उंची 8 इंचाची असावी.
शाळेतील मुलांची ने-आण करण्‍याकरिता वापरण्‍यात येणारे बारापर्यंत आसन क्षमता असलेले प्रत्‍येक चार चाकी हलके मोटार वाहन यावर शाळेची ओहख दर्शविण्‍यासाइी आणि वाहनाचा मार्ग क्रमांक ओळखता येण्‍यासाठी एक फलक असेल जो पुढील बाजूच्‍या वरच्‍या भागावर आणि मागच्‍या बाजूच्‍या वरच्‍या भागावर दिसेल. या फलकाची लांबी 18 इंचाच्‍या आकाराची आणि उंची 8 इंचाची असेल.
महाराष्‍ट्र मोटार वाहन नियम 1989 याच्‍या नियम 20 च्‍या तरतुदींचे परवानाधारकाकडून तसेच चालकाकडून काटेकोरपणे पालन करण्‍यात येईल. स्‍कूल बस म्‍हणून वापरण्‍यात येणा-या वाहनाची संपूर्ण स्‍टील बॉडीसह बंद स्‍वरुपाची बॉडी असेल. कोणत्‍याही कॅनव्‍हास हूड असलेलया वाहनास स्‍कूल बस म्‍हणून मान्‍यता देण्‍यात येणार नाही. वाहनामध्‍ये मुलांसाठी लॉक यंत्राणा जोडलेली असावी.
या प्रवर्गाखाली नोंदणी करण्‍यात आलेली वाहने ही मोटार वाहन अधिनियम 1988 व त्‍याखाली करण्‍यात आलेले नियम यांच्‍या तरतुदीनुसार योग्‍यतेच्‍या चाचणीच्‍या अधीन असतील. जेथे जेथे उपलब्‍ध असेल तेथे शाळेचे प्राधिकारी, शाळेतील मुलांना वाहनांमधून सुरक्षितपणे उतरण्‍यासाठी शाळेच्‍या परिवास्‍तूमध्‍ये जागेची तरतूद करतील. महाराष्‍ट्र मोटार वाहन नियम 1989 याच्‍या नियम 106 च्‍या तरतुदींनुसार स्‍कूल बसमध्‍ये परवानगी देण्‍यात आलेल्‍या मुलांची संख्‍या निर्धारित करण्‍यात येईल.
स्‍कूल बस म्‍हणून वापरण्‍यात येणा-या बसमध्‍ये राज्‍य परिवहन प्राधिकरणाने वेहोवेळी विनिर्दिष्‍ट केलेले संकटकालीन बाहेर पडण्‍याचा दरवाजा किंवा बाहेर पउण्‍याची खिडकी जोडण्‍यात येईल. सर्व स्‍कूल बस, केंद्र सरकार वेळोवेळी विनिर्दिष्‍ट करेल त्‍याप्रमाणे बस बॉडी संकल्‍प चित्र आणि मान्‍यता एआयएस 063 आणि एआयएस 052 याकरिता व्‍यवसाय संहिता याव्‍दारे विहित केलेलया आवश्‍यकातांचे आणि विनिर्देशांचे अनुपालन करतील.
परिवहन आयुक्‍त, स्‍कूल बस म्‍हणून वापरण्‍यात येतील अशा सर्व वाहनांच्‍या प्रतिमानांना मान्‍यता देईल. तसे करताना, परिवहन आयुक्‍त, मुलांच्‍या सुरक्षा लक्षात घेऊन उत्‍पादकाने पुरविलेल्‍या सुरक्षाविषयक तरतुदींची खातरजमा करील. राज्‍य शासनास लेखी कारणे दिल्‍यानंतर एका किंवा त्‍यापैकी कोणत्‍याही शर्तीमधून स्‍कूल बस म्‍हणून नोंदणी झालेल्‍या वाहनांना सूट देता येईल.
शालेय बस संदर्भात जे नियम आहेत त्‍याचे पालन होते की नाही यासाठी शासनाने समिती बनविलेली आहे. राज्‍यात शाळेच्‍या मुलांची वाहतूक करणा-या एकूण 5688 बसेस आहेत. त्‍यापैकी सुरक्षा नियमांची पूर्तता करणा-या बसेसची संख्‍या 1780 आहे. नियमावली लागू झाल्‍यानंतर नोंदणी झालेल्‍या बसेसची संख्‍या 1215 इतकी आहे.
वर्धा जिल्‍ह्यात एकूण 36 बसेस शालेय मुलांची वाहतूक करतात पैकी 9 बसेसनी नियमांची पूर्तता केली आहे. परिवहन विभागातर्फे याबाबत सातत्‍याने पाठपूरावा होत आहे तथापि शाळेतील समित्‍या आणि सर्व पालकांनी याबाबत आग्रही भूमिका ठेवण्‍याची गरज आहे.
विजय चव्‍हाण
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,वर्धा

Sunday 1 January 2012

प्रमोद नलावडे माहिती महासंचालक पदी रुजू

शनिवार, ३१ डिसेंबर, २०११
प्रमोद नलावडे (भा.प्र.से.) यांनी शनिवारी माहिती महासंचालक पदाचा कार्यभार प्रभारी महासंचालक राजेश अग्रवाल यांच्याकडून स्वीकारला. श्री.नलावडे हे १९९६ च्या भारतीय प्रशासन सेवेच्या तुकडीतील असून ते यापूर्वी मंत्रालयात अन्न व नागरी पुरवठा या विभागात सह सचिव या पदावर कार्यरत होते.

श्री.नलावडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा, जिल्हाधिकारी सिंधुदूर्ग, विक्रीकर सह आयुक्त नरिमन पॉईंट विभाग, विक्रीकर सह आयुक्त अन्वेषण विभाग, अपर विक्रीकर आयुक्त (आस्थापना) महाराष्ट्र राज्य अशा विविध पदावर उल्लेखनीय काम करुन आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.