Thursday, 13 September 2012

निम्‍न वर्धा प्रकल्‍पा अंतर्गतच्‍या पुनर्वसन गावांना नागरी सुविधा -रणजित कांबळे



                         *    बोरगांवसह चार गावांसाठी ग्रामपंचायत
                 *   पुनर्वसन गावात पिण्‍याच्‍या पाण्‍याची सुविधा

          वर्धा दि.13- निम्‍न वर्धा प्रकल्‍पा अंतर्गत येणा-या बोरगांव,हरिसवाडा,भादोड आदी गावांचे पुनर्वसन करतांना ग्रामस्‍थांच्‍या सुचनेनुसार पूनर्वसन झालेल्‍या क्षेत्रासाठी  स्‍वतंत्र ग्रामपंचायत स्‍थापन करुन त्‍यांना सर्व नागरी सुविधा पुरविण्‍याबाबत तात्‍काळ कार्यवाही करा अशा सूचना पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांनी आज दिल्‍यात.
          विश्रामगृह सभागृहात निम्‍न वर्धा प्रकल्‍पग्रस्‍त संघर्ष समिती देवळी-सालोड येथील प्रतिनिधी मंडळासोबत अधिका-यांची संयुक्‍त बैठक आयोजित करण्‍यात आली होती. त्‍याप्रसंगी मार्गदर्शन करतांना राज्‍यमंत्री श्री.कांबळे बोलत होते.
            जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे,मुख्‍यकार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने,अपर जिल्‍हाधिकारी संजय भागवत,उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक,उपजिल्‍हाधिकारी शैलेन्‍द्र मेश्राम,रमन जैन,प्रकल्‍पग्रस्‍त संघर्ष समितीचे उपाध्‍यक्ष  मोरेश्‍वर पिंगळे,सचिव विनोद कदम,श्री.नाखले,गवळी आदी उपस्थित होते.
          बोरगांव पुनर्वसन अंतर्गत चार गावांचे पुनर्वसन देवळी येथे झाले असून देवळी नगर परिषदेच्‍या सिमेत झाल्‍यामुळे पुनर्वसन झालेल्‍या गावांचा समावेश न करता स्‍वतंत्र ग्रामपंचायत असावी ह्या संघर्ष समितीच्‍या मागणीनुसार पुनर्वसनासंदर्भात या गावांच्‍या जनतेचाही प्राधान्‍याने विचार करावा अशी सूचनाही श्री. रणजित कांबळे यांनी केली.
          दिघी बोपापूर व अजनावती या पुनर्वसन झालेल्‍या गावांना सर्व नागरी सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यासोबत पिण्‍याच्‍या पाण्‍याची योजनेची दुरुस्‍ती करण्‍यासोबत या गावातील पिण्‍याच्‍या पाण्‍याचा प्रश्‍न तात्‍काळ सोडवावा असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.
          पुनर्वसन करतांना बेघर कुटूंबांनाही भुखंड वाटप करावे.हनुमान मंदिर तसेच सामाजिक उपयोगाच्‍या जागा याबाबतही तात्‍काळ कार्यवाही करावी अशा सूचनाही राज्‍यमंत्र्यांनी यावेळी दिल्‍यात.
                                  आदिवासींना घरकुलाचे कायम पट्टे  

          पळसगांव येथील आदिवासी कुटूंबांना वनहक्‍क कायद्या अंतर्गत सध्‍या राहत असलेल्‍या जागेवरच मालकी हक्‍क मिळावे यासाठी ग्रामवनहक्‍क समितीची बैठक घेवून तात्‍काळ कार्यवाही  करावी अशी सूचनाही पाणीपुरवठा राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांनी केली.                                            
यावेळी बोरगांव पुनर्वसन अंतर्गत देवळी –सालोड येथील निम्‍न वर्धा प्रकल्‍पग्रस्‍तांच्‍या विविध प्रश्‍नासंदर्भात चर्चा करण्‍यात आली.
          मुख्‍यकार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने यांनी पुनर्वसन गावांना मुलभूत सुविधा देण्‍याबाबत प्राधान्‍य असल्‍याचेही यावेळी सांगितले.
          अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी देवळी सालोड येथील पुनर्वसन गावातील विविध सोयी सुविधा तसेच पिण्‍याच्‍या पाण्‍याचा प्रश्‍नासह ग्रामपंचायत गठण करण्‍याबाबतच्‍या  प्रश्‍नासंदर्भात माहिती दिली.
                                                         0000

No comments:

Post a Comment