521 ग्रामपंचायतींमध्ये ग्रामोदयातून भारत उदय
अभियानाचा आज शुभारंभ
Ø 14 ते 24 एप्रिलपर्यंत विविध
कार्यक्रमांचे आयोजन
Ø ग्राम उदय अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन
Ø 24 एप्रिल राष्ट्रीय पंचायत राज दिन
वर्धा, दिनांक 13 – ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासोबतच ग्राम उदय से भारत उदय अभियानांतर्गत सामाजिक सलोखा व अभिसरण वृद्धींगत करणे, पंचायत राज संस्थेचे बळकटीकरण तसेच शेतक-यांच्या विकासासोबतच गरिबांचे जीवनमान उंचाविण्यासाठी 14 एप्रिल ते 24 एप्रिल पर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 521 ग्रामपंचायतींमध्ये उद्या गुरूवार दिनांक 14 एप्रिल 2016 रोजी सामाजिक सलोखा व अभिसरणासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येत असून जनतेने या उपक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
सामाजिक समररस्ता पंचायतीचे मजबुतीकरण, गावांचा विकास तसेच शेतक-यांच्या प्रगतीसाठी ग्रामोदयाचे भारत उदय हे अभियान संपूर्ण जिल्हयात 24 एप्रिलपर्यंत राबविण्यात येत आहे. सामाजिक सलोखा कार्यक्रमांतर्गत 14 एप्रिल ते 16 एप्रिलपर्यंत ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात येऊन सामाजिक सलोख्याच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. ग्रामसभेसाठी तसेच डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती समारोहानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा यांनी केले आहे.
सामाजिक सलोखा कार्यक्रमांतर्गत 26 एप्रिलपर्यंत गावक-यांद्वारे सामाजिक सलोखा मजबूत करण्याचा संकल्प बाबासाहेबांचे जीवन आणि राष्ट्रीय एकतेवर त्यांच्या विचारांचा परिचय व ग्रामस्तरावर साहित्याचे वितरण सामाजिक सलोखा निश्चित करणा-या योजनांची माहिती, बाबासाहेबांच्या जीवनाशी संबंधित प्रदर्शन आयोजित करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
ग्राम किसान सभेचे आयोजन
ग्राम किसान सभा या उपक्रमांतर्गत शेतक-यांचा विकास करणे तसेच गरिबांचे जीवनमान उंचाविण्यासाठी दिनांक 17 एप्रिल ते 20 एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे ग्रामस्तरावर आयोजन करण्यात येणार आहे, या उपक्रमामध्ये कृषीक्षेत्रातील योजनांची माहिती देणे व शेतक-यांशी चर्चा करणे.
कृषी क्षेत्रातील योजनांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, फलोत्पादन, मृदा परीक्षण काळ, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, पशुपालन, मत्स्यपालन आदी योजनांची माहिती देण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत 2022 पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यावर विचार होणार आहे.
ग्रामसभेची बैठक
संपूर्ण ग्रामीण विकासासोबतच आमचा गाव आमचा विकास आणि गावाच्या नियोजन प्रक्रियेत ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी दिनांक 21 एप्रिल ते 24 एप्रिलपर्यंत ग्रामसभेच्या बैठकी घेण्यात येणार आहेत.
या ग्रामसभांमध्ये संपूर्ण ग्रामीण विकासाशी संबंधित विषयावर चर्चा करूनच ग्रामविकासाचा आराखडा तयार होणार आहे.
ग्रामसभेपूर्वी गावांमध्ये प्रभातफेरी सांस्कृतिक खेळ आणि स्वचछता कार्यक्रमांचे आयेाजन करण्यात येणार असून ग्रामसभेमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, ग्रामीण आवास योजना, सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती योजना, अटल पेंशन योजना, बेटी बचाओ,
बेटी पढाओ…
मुद्रा योजना, कौशल्य विकास योजना, तसेच स्वास्थ विमा योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
24 एप्रिल पंचायत राज दिन
पंचायत राज संस्थानचे बळकटीकरण करण्यासाठी 73 वी घटनादुरूस्ती 24 एप्रिल रोजी अमलात आली आहे,
त्या अनुषंगाने 24 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.
दिनांक 24 एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिनाचे औचित्य साधून ग्रामसभांचे आयेाजनासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील ग्रामसभेस संबोधित करणार असून त्याचे थेट प्रक्षेपण या ग्रामसभांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशुतोष सलिल तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा यांनी दिली.
****
No comments:
Post a Comment