* दहावा वृक्ष वाढदिवस उत्साहात साजरा
* जिल्ह्यात 2 कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प
* निसर्ग सेवा समितीच्या हरितीकरणाचा गौरव
वर्धा,दि.28- आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वृक्षारोपण करुन वर्धा शहर परिसराचे हिरवेपण जपतानाच आय.टी.आय. परिसरातील टेकडीवर वृक्षारोपन करुन सतत दहा वर्षे वृक्षसंगोपन करतानाच वृक्ष वाढदिवस करण्याच्या अभिनव संकल्पनेमुळेच निसर्ग सेवा समितीच्या वृक्षारोपनाचे महत्व अधोरेखित झाले असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यपालन अधिकारी शेखर चन्ने यांनी केले.
शतकोटी वृक्षलागवड कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यात दोन लाख वृक्ष लावण्यात येणार असून, यासाठी स्वंयसेवी संस्था सोबतच युवकांचेही सहकार्य घेण्यात येणार असल्याचे श्री. शेखर चन्ने यांनी यावेळी सांगितले.
निसर्ग सेवा समितीतर्फे म्हाडा कॉलनी परिसरातील आयटीआय टेकडीवर पाऊनेदोन एकर परिसरात वीस प्रजातीची आठशे वृक्ष लावण्यात आली असून वृक्षारोपनाचा दहावा वाढदिवस साजरा करण्यात आला त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यपालन अधिकारी शेखर चन्ने बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.नारायण निकम होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत, सौ.सुनंदा वानखेडे, हरिष इथापे, बँक ऑफ इंडियाचे नितीश नाईक आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात वृक्षारोपनाची व वृक्षसंवर्धनाची मोहीम राबवितांना वृक्ष संवर्धनाचे महत्व जनतेपर्यंत पोहचविण्याची आवश्यकता व्यक्त करताना शेखर चन्ने म्हणाले की, वृक्षामुळेच मानवी मनाला शांती व आनंद मिळतो त्यामुळेच वर्धा शहराच्या परिसरात लोकसहभागातून पाच लाख वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. शेतकोटी कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यात दोन कोटी झाडे लावण्यात येणार असून सरासरी एका व्यक्तीला वीस वृक्ष लावायचे आहेत. इच्छाशक्ती व अविरत प्रयत्नातूनच वृक्षारोपनाची मोहीम यशस्वी होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
वृक्षारोपन व त्यांच्या संगोपनामुळे सुजनाचा आनंद मिळतो त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपन करुन त्याचे संवर्धन करावे असे आवाहन करताना प्रा. नारायण निकम म्हणाले की वर्धा वासीयांना निसर्ग सेवा समितीने वृक्षांचे महतव समजावून दिले. त्यामुळेच आज शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन झाले आहे.
आयटीआय टेकडी परिसरात दहा वर्षापूर्वी लोकसहभागातून निसर्ग सेवा समितीने 800 वृक्ष लावली होती त्यामध्ये आवळा, रिठा, पळस, कांचन, कडूनिंब आदी प्रजातींच्या वृक्षांचा समावेश होता. जिल्हा प्रशासनातर्फे दिलेल्या जागेवर लोकसहभागातून संरक्षण भिंत तयार करुन वृक्ष संगोपन तयार करताना जलसंधारणासारखेही उपक्रम येथे राबविण्यात आले आहे. दहा वर्षे वृक्षांचे संगोपन करुन ही वृक्षवलली 11 व्या वर्षात पदार्पन करीत आहे.
यावेळी शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्रमदान करुन वृक्ष संगोपनासाठी आवश्यक स्वच्छतेचे कार्य केले. दहा वर्षापूर्वी लावण्यात आलेल्या रिठा या वृक्षाचे पूजन करुन वृक्ष वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. मुख्य कार्यपालन अधिकारी शेखर चन्ने,अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत तसेच प्रा. नारायण निकम यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपन करण्यात आले.
निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात दहा वर्षापूर्वी आयटीआय परिसरातील टेकडी वृक्षारोपनासाठी समितीला जिल्हा प्रशासनातर्फे उपलब्ध करुन देण्यात आली होती. अत्यंत खडकाळ जागेवरही लोकसहभागातून आठशे वृक्ष लावण्यात आली असून, यासाठी दहा ट्रक माती बाहेरून आणण्यात आली. तसेच जलसंधारणाचेही कामेही येथे घेण्यात आले आहेत. निसर्ग सेवा समितीतर्फे शहरात एक लाख वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचलन किरण पटेकर यांनी आभार प्रदर्शन श्रीमती शोभाताई बेलखेडे यांनी मानले.
यावेळी किशोर वानखेडे, सुरेश तागडे, मुकुंद मसराम, प्रा.बेलसरे, सतीश निमगडे, सुनिल सावत, प्रकाश येंडे, संजय पाचघरे, भरत महोदय, सुनिल रहाने, प्रशांत निमसरकार, कु. सिमा दुबे, कार्यकारी अभियंता संजय माटे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आदी निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विविध शाळांचे विद्यार्थ्यांनी श्रमदान केले. यामध्ये एनसीसीचे नरेश बागडे, शिव वैभव अध्यापक महाविद्यालयाचे प्रविण भोयर, प्रियदर्शनी महाविद्यालय, आयटीआयचे विलास भगत, लोकविद्यालयाचे प्रा. श्रीराम मेंढे, वाय.डी. देशमुख, श्री. गरड आदींचा समावेश होता.
0000000
No comments:
Post a Comment