सकारात्मक वातावरणामुळे विकासकामांना गती
-
आशुतोष सलिल
v मावळते जिल्हाधिकारी यांना निरोप व नूतन जिल्हाधिकारी यांचे स्वागत
वर्धा, दिनांक 18 – वर्धा जिल्ह्याच्या प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचा समन्वय व जनतेच्या सकारात्मक दृष्टीकोन असल्यामुळे विविध योजना प्रभावीपणे राबविणे शक्य झाले आहे.
जिल्ह्याच्या सर्वांगीन विकासासाठी असेच वातावरण पुढे सुरू ठेवल्यास राज्यातील सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून नावलौकिक मिळेल, असा विश्वास मावळते जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी व्यक्त केला.
तसेच नवनियुक्त जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी प्रशासनातील सकारात्मक बदलाचा लाभ मला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
विकास भवन येथे मावळते जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांना निरोप तर नवनियुक्त जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचा स्वागताचा कार्यक्रम अधिकारी, कर्मचा-यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता,
यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल,
परिविक्षाधीन पोलिस उपविभागीय अधिकारी निलोत्पल, प्र. अपर जिल्हाधिकारी दीपक नलवडे, प्र. मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक इलमे,
महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. देशपांडे, उपवनसंरक्षक दिगांबर पगार, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी आशुतोष सलिल म्हणाले, नूतन जिल्हाधिकारी शैलेश नवाल उत्तम कार्यकुशल प्रशासक असून ते जिल्ह्याच्या विकासासाठी भरपूर चांगले काम करतील. जिल्ह्यात जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी कार्यालयात उत्तमप्रकारचे समन्वय आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनीही जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्या कार्यपद्धतीचा गुणगौरव करत जनतेनेच त्यांच्या कार्याचे मुल्यमापन केले असून त्यांनी जनतेला उत्तम सेवा देण्याचा ध्यास घेतला असल्याचे सांगून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे,
उपवनसंरक्षक दिगंबर पगार, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय जांगडा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.ए. भारती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू यांनीही जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मावळते जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांचा नूतन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याहस्ते भेटवस्तू, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे यांना सहसंचालक पदी अमरावती येथे पदोन्न्ती मिळाल्याबद्दल त्यांनाही अपर जिल्हाधिकारी दीपक नलवडे यांच्याहस्ते भेटवस्तू, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात येऊन निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी केले. आभार तहसीलदार सारंग यांनी मानले.
विकास भवन परिसरात वृक्षारोपन
नवनियुक्त जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याहस्ते विकास भवन परिसरात निसर्ग सेवा समितीच्यावतीने वृक्षारोपन करून निरोप समारंभ कार्यक्रमास सुरूवात झाली.
यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment