Wednesday 1 June 2016

आधुनिक सिंचन, पीक पद्धतीचा
                  अवलंब करून आर्थिक सक्षम व्हा
                   -समीर कुणावार
Ø शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळेचा 600 शेतक-यांना लाभ
Ø  राष्ट्रीय गळीतधान्य, तेलताड अन्न सुरक्षा अभियान
          वर्धा, दिनांक 20 – शेतक-यांनी आधुनिक सिंचन, पीक पद्धतीचा अवलंब करून आर्थिक समृद्ध व्हावे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सुजलाम, सुफलाम शेती करावी. शासनांच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. तसेच पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे, याबाबत काही अडचणी येत असल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन शेतक-यांना आमदार समीर कुणावार यांनी केले.
              हिंगणघाट येथील केजीएन सभागृहात राष्ट्रीय गळीतधान्य, तेलताड अन्नसुरक्षा अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. दीपप्रज्वलनाने त्यांच्याहस्ते प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
              यावेळी शिक्षण आरोग्य सभापती वसंतराव आंबटकर, हिंगणघाट पंचायत समितीचे सभापती संजयराव तपासे, उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे, कृषी तज्ञ अभय भंडारी, नागपूरच्या पशु मत्स्य विज्ञान विद्यापिठाचे संचालक डॉ. नंदकिशोर झाडे, आकाशवाणीच्या कार्यक्रम अधिकारी उमाकांत वरडकर, संगीता अरजपुरे, प्राध्यापक डॉ. सारीपुत लांडगे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू, तालुका कृषी अधिकारी संजय साखरे यांची उपस्थिती होती.
             आमदार समीर कुणावार म्हणाले, शेतक-यांनी पिकांचे योग्य नियोजन करावे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा भरपूर उपयोग करून देशी पिकांचे संवर्धन आणि जल उत्पादकता वाढवून शाश्वत पिण्याचे स्त्रोत बळकट करावेत. शासनाच्या महत्त्वांकांक्षी अशा जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जलसिंचन करावे. मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याची सर्वांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगून पाणी बचतीचा संदेश दिला.
             ग्रामीण अर्थव्यवस्था आणि बदलणारे जग या विषयावर विस्तृत स्वरूपात अभय भंडारी यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी पीक, पिकांचे उत्पादन, उत्पादकता, बाजारपेठ याविषयावर मार्गदर्शन करून आधुनिकतेची कास धरून ग्रामीण संस्कृती  टिकविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावाराजस्थानपेक्षा आपल्या भागात पावसाचे प्रमाण अधिक असूनही आपणाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. टंचाईला हद्दपार करावयाचे असेल तर प्रत्येक वाहणा-या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून पाणी जमिनीत मुरविले पाहिजे, असे सांगून जलस्वावलंबनाचा प्रत्येकाने ध्यास घ्यावा त्यादृष्टीने कार्य करावे. पारंपरिक पीक पद्धती बदलून आधुनिक पीक पद्धतीचा अवलंब करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. जलस्वावलंबनासाठी, वृक्षसंवर्धनासाठी लोकसहभाग अधिक महत्त्वाचा असल्याचेही  ते म्हणाले.
          प्रशिक्षण कार्यक्रमात प्राध्यापक डॉ. सारीपुत लांडगे, उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे यांनी मागेल त्याला शेततळे याबाबत उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले. तसेच भारतीय कृषी व्यवस्था चिंता चिंतन याविषयावरही अभय भंडारी यांनी विचार मांडले. तसेच संगीता अरजपुरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
          प्रारंभी मान्यवरांचे महात्मा गांधी यांचे पुस्तक आणि दुपट्टा देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी संजय साखरे यांनी केले. सूत्रसंचालन रवींद्र भुसारी यांनी केले.
                   प्रगतीशील शेतक-यांचा गौरव   
       तूर पिकांचे प्रति हेक्टर 35क्वि. विक्रमी उत्पादन घेणा-या वेणीचे हर्षद घोरपडे, दारोडाचे भोजराज तिमांडे, सुभाष धोटे, पवनीचे जीवन माथनकर, चिकमोहचे नंदश्री माळवे यांचा शेतक-यांचा मान्यवरांच्याहस्ते गौरव करण्यात आला. तसेच नभोवाणी शेतीशाळा प्रशस्तीपत्र हिंगोलीतील सदानंद मुळे, मारोतराव खडसकर, हंसराज बडोले, उमेश जांगळे, नीळकंठ काळे, राजकुमार गेडाम, प्राणहंस मेहर, उज्वला जांगळे, सुभाष वंजारी, संध्या साखरे, नामदेव मारगे, सविता पाटील, चंदूलाल राऊत, दीपक दुपारे,चंपालाल पटले, ठमाजी ठिकरे, सुरेश हत्तीमारे, सेवकराम बहेकार, भूषण शिवणकर, रामेश्वर बहेकार,विनोबा खंडाईत, प्रभावती खंडाईत, अनंत पाटील, राहुल मेश्राम यांना नभोवाणी शेतीशाळा प्रशस्तीपत्र आमदार समीर कुणावार इतर मान्यवरांच्याहस्ते वितरीत करण्यात आले.
***

No comments:

Post a Comment