Monday 16 May 2016

         नवे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पदभार स्वीकारला
·        सेवाग्राम आश्रमाला भेट
   वर्धा, दिनांक 16 – वर्ध्याचे जिल्हाधिकारी म्हणून शैलेश नवाल यांनी आशुतोष सलिल यांच्याकडून पदभार स्वीकारला. श्री. शैलेश नवाल हे यापूर्वी अहमदनगर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांची चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.
शैलेश नवाल हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2010 बॅचचे अधिकारी असून त्यांनी महाराष्ट्र कॅडरमध्ये प्रशासकीय सेवेला सुरूवात केली आहे. डहाणू येथे सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विभागाचे प्रकल्प संचालक म्हणून 4 फेब्रुवारी 2014 पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी अहमदनगर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. श्री. नवाल हे दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी असून त्यांनी एम. (इकॉनॉमिक्स) ही पदवी प्रथम श्रेणी उत्तीर्ण केली आहे.
सेवाग्राम आश्रमाला भेट
         वर्धेचे जिल्हाधिकारी या पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शैलेश नवाल यांनी सेवाग्राम येथील बापू कुटीला भेट दिली. तसेच सामुहिक प्रार्थनेत सहभाग घेतला. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे सचिव डॉ. श्रीराम जाधव आदी उपस्थित होते.
        महात्मा गांधी यांचे वास्तव्य असलेला सेवाग्राम आश्रम परिसर हा प्रेरणा देणारे स्थळ असून वर्धा जिल्ह्यातल्या सामाजिक आणि सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार असल्याचे श्री.नवाल यांनी सेवाग्राम आश्रम भेटी प्रसंगी सांगितले.
          सेवाग्राम आश्रम परिसरात दैनंदिन उपक्रम तसेच येथे राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पाबाबतही शैलेश नवाल यांनी माहिती घेतली. प्रारंभी आश्रम प्रतिष्ठानचे सचिव डॉ. श्रीराम जाधव यांनी सूतमाला पुस्तक भेट देऊन स्वागत केले.

*****

No comments:

Post a Comment