Sunday, 30 May 2021

 

..क्र- 391                                                                    दि.30.05.2021

सोयाबिन पिकाची उत्पादकता  व गुणवत्ता चांगली

राखण्यासाठी शेतकऱयांनी काळजी घ्यावी

          वर्धा, दि 30 (जिमाका ):-  खरीप हंगाम लवकरच सुरु होत असून  मागील वर्षी सोयाबीन पिक वाढीच्या अवस्थेत असतांना  चक्री भुंग्याचा प्रार्दुभाव  दिसून आला. तसेच कापणीचे कालावधीत  सोयाबिन पिक पावसात सापडल्याने  उत्पादनात घट व बियाणाची गुणवत्ता , प्रत खराब झाल्यामुळे  यावर्षी  बियाण्यांचा तुटवडा  पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या खरीप हंगामात सोयाबिन पिकाची उत्पादकता व गुणवत्ता  चांगली  राखण्यासाठी  शेतक-यांनी  सोयाबिन पिकाची पेरणी करतांना  काळजी घ्यावी  असे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे यांनी केले आहे.

          75 ते 100 मिली मीटर  पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. अवकाळी  पावसाला मोसमी पाऊस समजून  सोयाबिन  पिकाची पेरणी करु नये,  मुख्य मोसमी पावसाला सुरुवात झाल्यांनतर  75 ते 100 मीली मीटर पाऊस  झाल्यावरच पेरणी करावी अन्यथा  उगवण कमी होते. सोयाबिन बियाणे 4 सेमी मीटर पेक्षा जास्त  खोल पेरु नये अन्यथा  उगवण कमी होण्याची शक्यता आहे.  सोयाबिन  पेरणी बीबीएफ पेरणी यंत्राने करावी.  बीबीएफ यंत्राने पेरणी केल्यास एकरी 22 किलो  बियाणे लागते व एकरी 8 किलो सोयाबिन बियाणाची बचत होते. उगवण चांगली   होते.  तसेच  उत्पादनात वाढ होते. टोकन पध्दतीने  पेरणी करावी.  त्यामुळे एकरी 8 किलो बियाणे लागते  व बियाणात बचत होते. पेरणी करण्यापुर्वी  सोयाबीन बियाणास प्रथम  बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया  करुन नंतर रायझोबिअम व पीएसबी 250  ग्रॅम  प्रत्येकी प्रति 10 किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया  करावी. बीजप्रक्रिया करतांना बियाणे जोरात घासू नये. अन्यथा बियाणाचा पापुद्रा पातळ असल्याने डाळ होण्याची शक्यता असते.  पेरणी  करण्यापूर्वी बियाणाची उगवण शक्ती तपासून पेरणी करावी.  याप्रमाणे सोयाबीनची पेरणी केल्यास उगवण योग्य प्रमाणात होऊन उत्पन्नात चांगली वाढ होते.

००००००००००

..क्र-392                                                                     दि.30.05.2021

बियाणे, खते व किटकनाशकांच्या गुणवत्ता व

पुरवठयाबाबत मोबाईल क्रमांकावर तक्रार करावी

Ø कृषि मंत्र्याचे निर्देश

Ø कृषि आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

         वर्धा,दि.30 (जिमाका):- राज्यातील शेतकरी, उत्पादक, वाहतुकदार,  वितरक व विक्रेते यांना  खरीप हंगामात बियाणे, खते, व किटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठा बाबत  अडचण जाऊ नये यासाठी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या सुचनेनुसार  कृषि आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.  शेतकरी, उत्पादक, वाहतुकदार,  वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर काही अडचण आल्यास नियंत्रण कक्षाच्या ई-मेलवर किंवा मोबाईल क्रमांकावर  तक्रार करावी, असे आवाहन  कृषि संचालक, दिलीप झेंडे यांनी केले आहे. 

या मोबाईल क्रमांकावर करु शकता तक्रार

नियंत्रण कक्षाचा controlroom.qe.maharashtra@gmail.com या ईमेल वर किंवा

8446117500, 8446331750 व 8446221750 या भ्रमणध्वनी क्रमांकावर  तसेच कृषि विभागाच्या 18002334000 या टोल फ्री क्रमांकावर  सकाळी 9 ते सायंकाळी  7 वाजेपर्यंत  कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळून  शेतक-यांना तक्रार दाखल करता येईल.

          सबंधितांनी भ्रमनध्वनी , टोल फ्री  क्रमांक तसेच ईमेलवर येणा-या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किमंत, साठेबाजी, व लिकींग बाबत असलेल्या तक्रारी  नोंदवितांना शक्यतो  आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशिल द्यावा किंवा  सदर तक्रार को-या कागदावर  लिहून त्याचा फोटा व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा ईमेलवर पाठविल्यास तक्रारीचे निरसन  करणे सोईचे होईल. व्हॉट्सॲपचा वापर करणे शक्य नसेल तर तोंडी तक्रार नोंदवावी. असे कृषि विभागाने कळविले आहे.

                     00000

No comments:

Post a Comment