Tuesday 15 May 2018


आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांचे
जेंडर टास्क फोर्स करणार सर्वेक्षण
                                   - अनूप कुमार
* आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांच्या प्रश्नांचा आढावा
* शेतकऱ्याच्या विधवा पत्नीची वारसान म्हणून होणार नोंद

वर्धा, दि.10: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबातील महिलांचे प्रश्न सोडविणे तसेच कुटूंबाचे विविधांगी सर्वेक्षण करण्याच्या दृष्टीने वर्धा जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालीजेंडर टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली वर्धा जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील महिलांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीत जिल्हाधिकारी वर्ध्याचे शैलेश नवाल, उपायुक्त सुधाकर तेलंग, तहसीलदार रविंद्र माने, महिला किसान अधिकार मंचच्या श्रीमती सीमा कुळकर्णी, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी श्रीमती सुवर्णा दामले, श्रीमती नुतन माळवी, श्रीमती शुभदा देशमुख, श्रीमती आरती बैस आदी उपस्थित होते.
वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तसेच शेतकरी कुटूंबियांचे समुपदेशन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. घरातील कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्यानंतर कुटूंबातील महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेत जिल्हा प्रशासनाच्या वतीने अशा कुटूंबियांचे सर्वेक्षण करून महिलांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्या अनुषंगाने वर्धा जिल्ह्यात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अध्यक्षतेखाली जेंडर टास्क फोर्सची स्थापना करण्यात येईल. जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांच्या मदतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील महिलांची आर्थिक, सामाजिक व मानसिक स्थिती, मुलांचे शिक्षण, प्राप्त मदत अशा विविध बाबींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जेंडर टास्क फोर्स मध्ये जिल्हाधिकारी तसेच सदस्य सचिव म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, महिला किसान अधिकार मंचचे प्रतिनिधी, महिला उपजिल्हाधिकारी, समाज कल्याण संस्था प्रतिनिधी यांचा समावेश राहील, असे विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी सांगितले.
शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त व्हावे यासाठी तयार करण्यात आलेल्या समुपदेशन चमूच्या बळकटीकरणासाठी प्रशिक्षण देण्यासोबतच कार्यशाळा देखील घेण्यात येईल. वर्धा जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हेल्पलाईन तयार करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन तसेच महिला किसान अधिकार मंचच्या मदतीने या हेल्पलाईन केंद्राचे कामकाज चालेल.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी बनेल वारसान
शेतकरी आत्महत्यानंतर त्यांच्या विधवा पत्नीची वारसान नोंद होणे अपेक्षित आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीची वारसान नोंद न झाल्याने त्या शासकीय योजनापासून वंचित आहेत. शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीना त्यांचा हक्क मिळावा यादृष्टीने जिल्हानिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
                                                                        0000


No comments:

Post a Comment