कुष्ठरोग
निवारण मोहीम 13 फेब्रुवारीपर्यंत
कुष्ठरोग
जनजागृती रॅलीने मोहिमेची सुरूवात
वर्धा,दि.3 जिल्ह्यात कुष्ठरोग निवारण मोहीम 13
फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात येत आहे. या कालावधीत वर्धा शहरात कुंभलकर समाजकार्य
महाविद्यालय, नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांद्वारे गृहभेटीद्वारे संशयित कुष्ठरोग
शोध मोहीम, ग्रामीण भागात आशा सेविका, आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवक यांच्यामार्फत
संशयित कृष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात
येत आहे. तसेच प्रश्नमंजुषा, रॅली पथनाट्याद्वारे मोठ्याप्रमाणात जनजागृतीही करण्यात
येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांनी सांगितले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय येथून सामान्य रुग्णालय बजाज चौक, सोशालिस्ट चौक
ते महादेव वॉर्ड, मस्जिद चौकमार्गे राष्ट्रीय
निवारण दिन व तालुका कुष्ठरोग निमुर्लन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरोग
जनजगृती रॅली काढण्यात आली. रॅलीचा समारोप सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) कार्यालय, वर्धा
येथे करण्यात आला. रॅलीला आरोग्य व शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, अति.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. अजय डवले, सहाय्यक संचालक डॉ.लक्षदीप पारेकर यांनी हिरवी झेंडी दाखविली.
रॅलीत प्रामुख्याने अस्थिरोग तज्ज्ञ
डॉ. अनुमप हिवलेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रविण धाकटे, साथरोग अधिकारी डॉ.
विलास आकरे, साथरोग तज्ज्ञ डॉ.झलके, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्री.
रहाटे, प्राचार्य इशरत खान, श्रीमती व्ही.एस.मने, प्रा. किशोर ढोबळे, प्रा. सुनील
तोतडे, प्रा.पुनम येसंबरे, प्रा. पोटदुखे, प्रा. भगत, बाबाराव कनेर, त्रिशरण
रंगारी, सिद्धार्थ तेलतुबंडे, स्वप्नील चव्हाण, दीपक कांबळे, रंगराव राठोड, कुणाल
डोंगरे व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कुष्ठरोग रॅलीमध्ये
शहरातील मौलाना आझाद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्याल वर्धा, मॉडेल हायस्कूल, चेतना नर्सिंग स्कूल, शासकीय
शाळा, कुंभलकर सामाजिक कार्य महाविद्यालयाच्या
विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
0000000
उपचाराने होतो क्षयरोग हमखास बरा
-
डॉ.
निवृत्ती राठोड
वर्धा, दिनांक 3 – क्षयरोग देशातील महत्त्वाची व गंभीर सार्वजनिक
आरोग्य समस्या आहे. क्षयरोगाकरीता सहा ते आठ महिने औषधोपचार घ्यावा लागतो. क्षयरुग्णांनी
नियमित औषधोपचार घेतल्यास हा रोग हमखास बरा होतो, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी केले.
समाजात क्षयरोगाविषयी जनजागृती व्हावी
या उद्देशाने सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा
क्षयरोग कार्यालयाच्यावतीने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी
जिल्हा क्षय रोग नियंत्रण अधिकारी डॉ. अजय डवले यांनीही मार्गदर्शन केले.
अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती
राठोड म्हणाले, क्षयरोगामुळे रुग्णास
कमजोरी येते. त्यांचा परिणाम त्यांच्या मानसिक धैर्य कमी होऊन औषधोपचारात खंड
पडण्यास होते. औषधोपचारात खंड पडल्यामुळे, कोणत्याही औषधाला दाद न देणारा
क्षयरोग (एमडीआर) होतो. एड्स व मधुमेह या आजारात रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने
अशा रुग्णांना क्षयरोगाची बाधा होण्याची शक्यता जास्त असते. क्षयरुग्णांनी
नियमित औषधोपचार घेतल्यास ते पूर्णपणे रोगमुक्त होतील व त्यांच्या मनोधैर्यात
वाढ होईल या करिता आपणा सर्वांच्या सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. क्षयरोगाविषयी जास्तीत जास्त जनजागृतीचा होणेही
गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
संपूर्ण जिल्हात क्षयरोगाविषयी शाळा,
कॉलेज स्तरावर क्षयरोगाविषयावर, घोषवाक्य, निबंध स्पर्धचे आयोजन करण्यात येणार
आहे. अशी माहिती, डॉ. अजय डवले यांनी आपले भाषणात व्यक्त केले. क्षयरोगाविषयी समाजात असणारे गैरसमज व
शासनामार्फत पुरविले जाणारे सुविधा, मोफत निदान व औषधोपचार यांच्याविषयी समाजात
जनजागृती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत असल्याचेही डॉ. डवले
यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमामध्ये जिल्हा क्षयरोग
कार्यालयाचे जिल्हा पी.पी.एम समन्वयक जितेंद्र बाखडे यांनीही क्षयरोग
नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे नर्सिंग स्कूलच्या अधिकारी जे. एस.
मॅसन व प्राध्यापक व्ही.एम.भांबरे, अधिसेविका श्रीमती फुनसे व जिल्हा क्षयरोग
केंद्राचे कर्मचारीही यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जितेंद्र
बाखडे, नितीन जगताप, अमित दुबे, अख्तर शेख, संजीव शेळके, संजय सोनटक्के यांनी पुढाकार
घेतला.
00000
17 मीटर कापडाची निर्मिती
Ø जिल्हाधिकारी,
जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून विद्यार्थ्यांचे कौतूक
वर्धा, दि.3 – पूर्वी टकळीवर सूतकताई शाळांमध्ये शिकविली जात.
पण कालांतराने हा प्रकार बंद झाला. पण मगन संग्रहालयाने नव्याने ही मोहिम सुरु केली.
त्यामुळे स्वतः धागा निर्मितीचा आनंद विद्यार्थी घेत आहेत. मगन संग्रहालय
समितीमार्फत विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये टकळीवर
सूतकताई हा विशेष उपक्रम. शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या या
उपक्रमातून 17 मीटर कापड्याच्या वस्तूचे यंदा प्रजास्ताक दिनी विक्रीप्रदर्शन भरविण्यात
आले. हे प्रदर्शन सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते.
जिल्हाधिकारी आशुतोष सलिल व जिल्हा पोलिस
अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह अनेक मान्यवरांनी या प्रदर्शनाला भेट देत या उपक्रमाचे
आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
चालू वर्षात शहरातील सुशिल
हिंमतसिंगका कन्या शाळा, आनंद विद्यालय बोरगाव मेघे, विकास विद्यालय,
जगजीवनराम विद्यालय या शाळांमधील 70 विद्यार्थी व त्याचबरोबर जिल्ह्यातील
नेहरु विद्या मंदिर सालोड, यशंवत विद्यालय येळाकेळी, आदर्श विद्यालय आंजी, विवेक
माध्यमिक विद्यालय, मांडवा आदी ग्रामीण भागातील 96 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात
सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी टकळीवर सूत लावून त्यापासून कापड निर्मिती
केली. या कापडापासून रुमाल व इतरही वस्तू तयार करुन त्याची विक्री व प्रदर्शनी
वर्धा येथील जिल्हा क्रीडा संकुलात प्रजास्ताक दिनानिमित्त भरविण्यात आले होते.
यावेळी टकळीवर सूत कताईचे प्रात्यक्षिक उपस्थितांना विद्यार्थी करून दाखवत
असल्याने सर्वांचे ते लक्ष वेधून घेत होते.
तीन वर्षापासून हा टकळीवर धागानिर्मिती उपक्रम सुरु करण्यात
आलेला आहे. यामध्ये 2013 मध्ये वर्धा शहरातील 6 शाळांमधील 152 विद्यार्थी सहभागी
झाले. होते. ऑगस्ट ते डिसेंबर महिन्यापर्यंत कताई सुरु होती. यात विद्यार्थ्यांनी
7 मीटर कपडा तयार केला होता. तर 2014 या
वर्षामध्ये या उपक्रमांतर्गत सहभागी 6 शाळांच्या 210 विद्यार्थ्यांनी 300 गुंड्या
टकळीवरील सूतांनी तयार करुन त्याचे 14 बाय 14 इंचाचे 50 रूमाल तयार केले. या
उपक्रमात आतापर्यंत मगन संग्रहालयाकडून 6 हजार पेळू पुरविण्यात आलेले आहेत, त्याचा
17 मीटर कपडा तयार करण्यात आलेला आहे.
0000000
अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन
वर्धा, दिनांक 3 – व्यवसाय
शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राबविण्यात येणारे विविध अभ्यासक्रम माध्यमिक
शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सुरु करण्यास मान्यता मिळविण्यासाठी इच्छुक
संस्थांकडून नवीन, अधिकच्या तुकड्या कायमस्वरूपी विना अनुदान तत्वावर सुरु करू
इच्छिणा-या शैक्षणिक संस्थांकडून सन 2016-17 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज 15 मार्चपर्यंत
सादर करावेत, असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी केले आहे.
संचालनालयांतर्गत राबविण्यात येणा-या विविध योजना व त्यांतर्गत
राबविण्यात येणारे अभ्यासक्रम तसेच अधिक दोन स्तरावरील विज्ञान, कला वाणिज्य या शाखांकरीता शाखानिहाय उपलब्ध
असलेल्या द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमाचा तपशील आदी माहिती दर्शविणारी माहिती
पुस्तिका व अर्ज संचालनालयाच्या www.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून संबंधित संस्थांनी
डाउनलोड करुन घ्यावा.
सदरील अर्ज जिल्हा व्यवसाय शिक्षण
व प्रशिक्षण अधिकारी यांचेकडे जमा करतेवेळी रु. 500 चा राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष
जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, नागपूर यांचे नावे असलेल्या प्रस्तावासोबत
जोडावयाचा आहे. प्रस्ताव शुल्क स्वतंत्र चलानद्वारे शासन जमा करावयाचे आहे.
नियमितरित्या अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 15 मार्च असून विलंब शुल्कासह
अर्ज दिनांक 31 मार्चपर्यंत स्वीकारले जातील.
अधिक माहितीकरीता जिल्हा व्यवसाय
शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, वर्धा यांचेशी संपर्क साधावा,असेही या कार्यालयाने
कळविले आहे.
000000
पोलिस शिपाई भरतीची सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध
-
अंकित गोयल
वर्धा, दिनांक 3 – जिल्हा पोलिस
अधीक्षक, वर्धा यांच्या आस्थापनेवरील पोलिस शिपाई यांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी
आवेदन पत्र संगणकीय प्रणालीद्वारे भरण्यात येणार आहेत. याबद्दलची सविस्तर माहिती
www.mahapolice.gov.in व mahapolice. mahaonline.gov.in
संकेतस्थळावर उमेदवाराच्या माहितीकरिता प्रसिध्द करण्यात आली
आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी कळविले आहे.
उमेदवाराने पोलिस शिपाई/कारागृह शिपाई पदासाठी वेगवेगळे
ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. कारागृह विभागातील कारागृह शिपाई पदांची
भरती प्रक्रिया पोलिस आयुक्त, नवी मुंबई, जिल्हा पोलिस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण,
पुणे ग्रामीण, नागपूर ग्रामीण या पोलिस घटकांमार्फत घेण्यात येईल.
जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या रिक्त पदांच्या संख्येमध्ये
बदल होऊ शकतो व त्याची माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
जाहिरातीतील नमूद केलेल्या रिक्त पदांची संख्या पूर्ण पदे भरण्याबाबत शासन
आदेशाच्या अधीन असेल. पदसंख्या कमी झाल्यास उमेदवारास निवडीबाबत कोणताही दावा
करण्याचा हक्क राहणार नाही.
पोलिस शिपाई व कारागृह शिपाई अशा दोन्ही पदांसाठी ऑनलाईन
आवेदन अर्ज सादर केल्यास दोन्ही पदांसाठी लागू परीक्षा शुल्क आकारण्यात येईल.
उमेदवारांनी आवेदन अर्जात अचूक माहिती द्यावी. चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी
कोणत्याही टप्यावर रद्द होईल,असेही त्यांनी कळविले आहे.
000000
जिल्हाधिकारी
आशुतोष सलिल यांच्याहस्ते
सेवाग्राम येथील नाला खोलीकरण, शेततळी कामाचे उद्घाटन
वर्धा,दि.3 – सेवाग्राम गावातील मागील बाजूस असलेल्या नाला विस्तारीकरण,
शेततळी, बांधबंदिस्तीच्या कामाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्याहस्ते
करण्यात आले. यावेळी सेवाग्रामच्या सरपंच रोशनाताई जामलेकर, सेवाग्राम आश्रम
प्रतिष्ठानचे सचिव श्रीराम जाधव, नई तालिम समितीचे डॉ. सुगन बरंठ, जिल्हा अधीक्षक
कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, तहसीलदार राहुल सारंग, ग्रामोपयोगी विज्ञान
केंद्राचे संचालक सोहम पंड्या, सुनील कोल्हे, सतीश फत्तेपुरे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्याहस्ते पूजन करून कामाची सुरूवात
करण्यात आली. कमलनयन बजाज फाऊंडेशनतर्फे हाती घेण्यात आलेल्या या कामाची सविस्तर
माहिती कार्यक्रम व्यवस्थापक महेंद्र फाटे यांनी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांना दिली.
यामध्ये त्यांनी या नाला सरळीकरण, खोलीकरण, 2 शेततळी, बांधबंदिस्तीच्या कामातून
आजूबाजूच्या शेतीला पाण्याचा उपयोग होईल. पिकांनाही याचा लाभ होईल. तसेच पुरामुळे
शेतात येणारे पाणी नाल्याच्या सरळीकरण व खोलीकरणामुळे वाहते होईल. शेतीत पाणी न शिरल्याने पिकांचे नुकसानही होणार नाही,
त्याचा शेतीला लाभ होईल, असे सांगितले. यावेळी ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, आश्रमाचे
कर्मचारी, पदाधिकारी यांचीही उपस्थिती होती.
0000
शुल्क
निर्मितीची ऑनलाईन सुविधा 10 फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध
वर्धा,दि.3 - कनिष्ठ, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना सन 2015-16 या शैक्षणिक
वर्षासाठी शुल्क निर्मित करण्याच्या ऑनलाईन प्रणालीची सुविधा 10 फेब्रुवारीपर्यंत
उपलब्ध करुन दिली आहे. महाविद्यालयांनी मान्य शुल्क आपल्या लॉगिनमध्ये निर्मित
करुन अद्ययावत करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाशी
संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.
तरी महाविद्यालयांनी आपले शुल्क तत्काळ
निर्मित करून या कार्यालयाकडून मंजूर करुन घ्यावे. सन 2015-16 मध्ये प्रथम वर्षात
प्रवेशित विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज प्रवर्गनिहाय समाज कल्याण विभागाच्या सहायक
आयुक्त कार्यालयात तपासणीकरीता उपलब्ध करुन द्यावेत. अर्ज तापसणीनंतरच पात्र अर्ज
या कार्यालयाचे लॉगिनवर पाठवावेत.त्रूटीतील अर्ज 31 मार्चनंतरच त्रूटीची पूर्तता
करुन सादर करावेत. महाविद्यालयांनी डिजीटल स्वाक्षरी तयार करुन तसा अहवालही सादर
करावा. त्यानंतरच सन 2015-16 वर्षाच्या शिष्यवृत्तीचे देयक काढण्यात येतील, असेही
श्री. देशमुख यांनी कळविले आहे.
000000
राजीव गांधी जीवनदायी योजना शेतक-यांसाठी जीवनदायी
– रामदास तडस
Ø राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत आरोग्य शिबिर
वर्धा,दि.3 – राजीव गांधी जीवनदायी
आरोग्य योजना शेतक-यांसाठी जीवनदायी योजना आहे. या योजनेचा लाभ सर्व
लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहचविण्याचे आवाहन केले.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य
योजनेंतर्गत देवळी ग्रामीण रुग्णालयात आरोग्य रोग निदान शिबिर पार पडले. शिबिराचे
उद्घाटन खासदार रामदास तडस यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष
शोभाताई तडस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी.डी.मडावी, अतिरिक्त जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, तालुका
वैद्यकीय अधिकारी डॉ. दिदावात, वैद्यकीय अधिकारी डॉ. कोल्हटकर, आचार्य विनोबा
भावे रुग्णालयाचे विशेष कार्यकारी
अधिकारी अभ्युदय मेघे, डॉ. वांदिले, कस्तुरबा हॉस्पिटलच्या डॉ. पांडे उपस्थित
होते. शिबिरात जिल्हा सामान्य रुग्णालय, आचार्य विनोबा भावे रुग्णालय, कस्तुरबा
रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी.डी. मडावी
यांनी सर्व योजना तळागापर्यंत पोहचल्या पाहिजेत व सर्वांना आरोग्य सेवा व योजनेचा
लाभ मिळाला पाहिजे, असे विचार मांडले. शिबिरामध्ये जनरल मेडिसिन, शल्य चिकित्सा,
अस्थि, स्त्री, बाल, -हदय रोग या विभागांद्वारे एकूण 350 रुग्णांची तपासणी करण्यात
आली. या शिबिरात एनसीडी, मानसिक, राष्ट्रीय बाल सुरक्षा विभागातील कर्मचारी,
अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ. पी.डी. मडावी, अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. चव्हाण, डॉ. प्रफुल मेश्राम, रितेश गुजरकर, जिल्हा
वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल चाफले यांनी
पुढाकार घेतला.
00000
प्र.प.क्र.82 युवा सप्ताहामध्ये विविध
स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश
वर्धा, दिनांक 3 – राष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवा सप्ताहात
आयोजित निबंध, वाद विवाद, चित्रकला, गीत गायन,
तसेच मैदानी स्पर्धा, विविध महाविद्यालयांमध्ये घेण्यात आल्या. यामध्ये विविध
कला प्रकार सादर करून विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करून युवा सप्ताह साजरा केला
.
क्रीडा व युवक
सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय
यांच्यावतीने डॉ. आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिन युवा सप्ताहाचा
समारोप झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी क्रीडा विभागाचे उपसंचालक सुभाष रेवतकर,
प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय डॉ. मिलिंद सवाई, प्रा.श्री.
भेले, प्रोफेसर श्रीमती विटनकर यांची उपस्थिती होती. यावेळी स्वामी विवेकानंदांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सप्ताहांतर्गत निबंध, वाद विवाद, चित्रकला, गीत गायन, तसेच
मैदानी स्पर्धा, विविध महाविद्यालयांमध्ये घेण्यात आल्या. यामध्ये निबंध स्पर्धेत
प्रथम क्रमांक हर्षदा सरोदे, द्वितीय क्रमांक सोनू मरकोटे यांनी प्राप्त केला. तर वादविवाद
स्पर्धेत प्रथम क्रमांक वैशाली कांबळे, द्वितीय प्रिया कांबळे, तृतीय प्रियंका
होरे यांनी मिळवला. चित्रकला स्पर्धेत रेवती गुजरकर, द्वितीय रुतिक बोबडे, तृतीय
शुभांगी गाडेकर यांनी क्रमांक पटकावून यश मिळविले. गीतगायन स्पर्धेत प्रथम
क्रमांक माधवी ढोबळे, द्वितीय प्रांजली कुडकी, तृतीय आरती उईके यांनी क्रमांक
पटकाविले आहेत. 100 मी. धावणे स्पर्धेत मुलीमध्ये प्रथम बुशरा, द्वितीय शिवाणी
समुंदे, तृतीय रांची मोखाडे, मुलांमध्ये प्रथम तेजस कानतोडे, द्वितीय हेमंत
वानखेडे, तृतीय दर्शन हस्ती यांनी क्रमांक पटकाविले. स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय
व तृतीय क्रमांक प्राप्त विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन व्यवस्थापक रवी काकडे यांनी केले. आभार क्रीडा अधिकारी चारुदत्त
नाकट यांनी मानले. यावेळी कार्यक्रमास क्रीडा अधिकारी श्रीमती चैताली राऊत, क्रीडा
अधिकारी घनश्याम वरारकर, व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी तसेच डॉ.
आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद कार्यक्रमास
उपस्थित होते.
0000000
कृषी यंत्र सामुग्री व उपकरण खरेदीसाठी शेतक-यांना
अर्थसाहाय्य
वर्धा,दि. 3 - राष्ट्रीय कृषी विस्तार व तत्रंज्ञान
अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण सेवेसाठी कृषी
यंत्र सामुग्री व उपकरणे खरेदीसाठी शेतक-यांना अर्थसहाय्य (अनुदान) देण्यात येणार आहे. इच्छुक शेतक-यांनी त्यांचे अर्ज संबंधित
तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह त्वरीत सादर करण्याचे
आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी केले आहे. औजारे मागणी अर्ज, 7/12, 8 अ, आधार कार्ड फोटो, ओळख पत्राची स्वसांक्षांकित प्रत, रद्द केलेल्या धनादेशाची, बँक पासबुकच्या पहिल्या पृष्ठांची स्वस्वक्षाकिंत प्रत व महाराष्ट्र राज्य कृषी उघोग विकास महामंडळाचे कोटेशन जोडणे आवश्यक आहे.
कृषि यंत्रसामुग्री व उपकरणे खरेदीसाठी ट्रॅक्टर, पॉवर ट्रीलर, ट्रॅक्टर चलित औजारे आदी, मनुष्य ,प्राणी चलीत उपकरणे, पीक संरक्षण उपकरणे आदींसाठी अनुदान उपलब्ध आहे. अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती, अल्प व अत्यल्प लाभधारक, महिला व इतर लाभार्थी शेतक-यांसाठी कमाल अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. कमाल अनुदान मर्यादेच्या अधिन राहून व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प, अत्यल्प व महिला लाभधारकांसाठी 50 टक्के व इतर लाभार्थींसाठी 40 टक्के यापैकी जे अनुदान कमी आहे. ते लाभार्थीस देय राहील. निवड केलेल्या लाभधारकांनी पूर्व संमती प्राप्त झाल्यानंतर खरेदी करावयाच्या यंत्र व औजारांची संपूर्ण रक्कम विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडे जमा करुन यंत्र व औजारांची खरेदी त्यांच्या पसंतीनुसार करावयाची आहे. खरेदी केलेल्या औजारांची तपासणी संयुक्त तपासणी पथकाद्वारे करण्यात येईल. तपासणीनंतरच लाभाधारकास अनुदान देय राहील,असेही त्यांनी कळविले आहे. तसेच याबाबत अधिक माहिती व मार्गदर्शक सूचना www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले आहे.
जिल्हास्तरीय समितीकडून 140 सावकारी कर्जमाफीचे प्रस्ताव
मंजूर
वर्धा,दि.4- जिल्ह्यामध्ये 4 हजार 624
कर्जमाफीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. 4 हजार 624 शेतक-यांना 5 कोटी 36
लाख 51 हजार 814 रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. मंगळवार, दिनांक 2
फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सावकारी कर्जमाफीचे 140 प्रस्ताव जिल्हास्तरीय
समितीद्वारे मंजूर करून शेतक-यांना 17 लक्ष 39 हजार 814 रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे, असे सहकारी
संस्थेच्या जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी कळविले आहे.
याबाबतची माहिती जिल्ह्याच्या
संकेतस्थळावर याबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरीय समितीच्या
सभेसाठी निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक अजय
कडू, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग
श्री. चुटके, सहाय्यक निबंधक (प्रशासन) जयंत तलमले, सहाय्यक निबंधक श्री.
वनस्कर, श्रीमती निनावे, श्री.वडे उपस्थित होते.
या संदर्भात जिल्ह्यातील काही पात्र शेतक-यांना
अद्यापपर्यंत कर्जमाफी लाभ मिळाला नसला त्यांनी संबंधित तालुक्यातील सहाय्यक
निबंधक यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा,
असे आवाहनही जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे.
0000000
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत
मंगळवारी मोफत आरोग्य शिबिर
वर्धा,दि.4- राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत मंगळवार,
दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालय
येथे मोफत तपासणी व उपचार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
शिबिरामध्ये -हदय रोग, श्वसन रोग,बाल
रोग, स्त्री रोग, अस्थिव्यंग,किडनी, पोटाचे आजार, मधुमेह व रक्तदाब या आजारांवर
जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा, कस्तूरबा हॉस्पिटल, सेवाग्राम, आचार्य विनोबा
भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी मेघे येथील तज्ञ चमूद्वारे मोफत तपासणी व उपचार
करण्यात येईल. शिबिराचा जास्तीत जास्त लाभ जनेतने घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी
आशुतोष सलिल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी.डी.मडावी व जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. दुर्योधन चव्हाण यांनी केली आहे.
000000
No comments:
Post a Comment