Thursday 4 August 2016

नाल्‍याकाठी बहरले खरीपाचे पिक
Ø मलकापूर झाले जलयुक्‍त
Ø 537 द.ल.घ.मी. पाणी साठा
Ø शेतक-यांनी केली डाळिंब लागवड
Ø पिण्‍याच्‍या पाण्‍याची काळजी मिटली
   वर्धा, दि.4- पावसाळयात नाल्‍याचे पाणी शेतात शिरुन खरीप पिक नष्‍ट होत होते. एखादया वर्षी चांगला पाऊस झाला तरच रबी पिकाची शाश्‍वती  मलकापूर गावातील नाल्‍याकाठच्‍या शेतक-याची अनेक वर्षापासुनची ही वेदना ! पण जलयुक्‍त शिवार अभियानांत झालेल्‍या नाला खालीकरणाचे कामामुळे शेतात पाणी शिरण्‍यास पायबंद बसला आाणि नाल्‍याकाठच्‍या अनेक शेतक-यांच्‍या चेह-यावर समाधानाचे भाव दिसू लागले. कित्‍येक वर्षात ज्‍या शेतात खरीपाचे पिकच आले  नाही, त्‍या शेतात सोयाबिन, कापूस व तूरीचे पिक आज डौलाने उभे आहे.
          देवळी तालुक्‍यातील मलकापुर हे गाव कायम टंचाई ग्रस्‍त  गाव.  मागील वर्षी या गावाची आणेवारी 50 टक्‍केच्‍या आत होती.  2015-16 मध्‍ये या गावाची निवड जलयुक्‍त शिवार अभियानात करण्‍यात आली आणि गावाचे चित्रच पालटले गावाच्‍या एकुण पाण्‍याच्‍या गरजेनुसार पाण्‍याचे नियोजन करण्‍यात आले. यामध्‍ये सिमेंट नाला बांधासह नाला खोलीकरणाची सहा कामे, दोन साठवण बंधारे, आणि पाणी पुरवठा योजनेच्‍या स्‍त्रोत बळकटीकरणासाठी भूमिगत रिचार्ज शाप्‍ट 5 अशी एकुन 13 कामे घेण्‍यात आली.  त्‍यापैकी 8 कामे पूर्ण झाली असून 5 कामे प्रगतीपथावर आहे.  गावाच्‍या एकुण वाटर बजेटींग नुसार 91 टक्‍के पाण्‍याचे बजेटींग पूर्ण झाले आहे. सध्‍या गावात 537. 64 द.ल.घ.मी. पाणीसाठा निर्माण झाला असून  या पाण्‍याचा उपयोग सुमारे 537 हेक्‍टर संरक्षित सिंचनासाठी होणार आहे.या संपूर्ण कामासाठी 1 कोटी 46 लक्ष रुपयाचा आराखडा तयार करण्‍यात आला असून  त्‍यापैकी पूर्ण झालेल्‍या कामावर 70 लक्ष 67 हजार रुपये खर्च झाले आहे..
जलयुक्‍त शिवारमधील  झालेल्‍या कामामुळे विशेषतः नाल्‍याकाठच्‍या शेतक-यांना मोठया प्रमाणावर फायदा होतांना दिसत आहे. पदमाकर बाजारे यांची नाल्‍याकाठी 5 एकर शेती आहे. मात्र काही वर्षापासुन त्‍यांनी या शेतात खरीपाचे पीक घेतले नव्‍हते नाल्‍याचे पाणी शेतात शिरुन पीक जळायचे, मात्र यावर्षी शेतात पाणी शिरलेच नाही. शिवाय पावसाचे अतिरिक्‍त पाणी नाल्‍यात सोडता आले त्‍यामुळे यावर्षी    खरीपाचे पीक चांगले होण्‍याची अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.
डाळिंब लागवड
नाल्‍यालगत माझी 5 एकर शेती असून शेतात विहिर आहे. मात्र रब्‍बी पिकाला विहिरीचे पाणी पुरत नव्‍हते. पण नाला खोलीकरणाचे कामामुळे यावर्षी विहिरीच्‍या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. त्‍यामुळे दोन एकरात मी डाळिंबाची लागवड केली आहे. पावसाळयानंतर विहिरीच्‍या पाण्‍यावर डाळिंब शेती जगवता येईल.
                                                                              प्रशांत निवल
                                                                                 शेतकरी
पिण्‍याच्‍या पाण्‍याची काळजी मिटली  हे गाव कायम पाणी टंचाईग्रस्‍त मध्‍ये असते. गावात ग्रामीण पाणी पुरवठा योजना आहे. मात्र या योजनेसाठी वापरण्‍यात येणारी विहिर उन्‍हाळयात कोरडी होते त्‍यामुळे गावात पाणी पुरवठा होत नव्‍हता. जलयुक्‍त शिवार मध्‍ये पाणी पुरवठा योजनेच्‍या स्‍त्रोत विहिरीजवळ रिचार्ज शाप्‍टची कामे करण्‍यात आली. यामुळे यावर्षी विहिरीची पाणी पातळी वाढली आहे. पुढील उन्‍हाळयात पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई जाणवणार नाही अशी आशा आहे.
                                                                                       साधना नेहारे
                                                                                   सरपंच ,मलकापूर



No comments:

Post a Comment