वर्धा,दि.23-बालकांमध्ये अलीकडील काळात नितीमुल्याचा –हास होत असल्यामुळे भविष्यात समाजापुढे संकटे उभे राहण्याची शक्यता आहे. बालकामध्ये उत्तम विचार व चांगले गुण व संस्कार देण्याची गरज असून, बाल हक्काचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी केले.
सेवाग्राम येथील शांतीभवन येथे नई तालीम, बुनियादी शिक्षण आणि बालहक्क या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रस्तरीय कार्यशाळेचे उदघाटन त्यांनी केले त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ हे होते. प्रमुख पाहूणे म्हणून अनिल फरसोले, अ.ना. त्रिापाठी, सुषमा शर्मा व कुसुमबेन शहा , जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी बि.एम. मोहन व अवर सचिव सतिश सुपे आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते.
महात्मा गांधी यांनी 1937 साली नयी तालीम किंवा बुनियादी शिक्षण हे प्रायोगिक स्तरावर सुरुवात केली असल्याचे नमुद करुन न्या. धर्माधिकारी म्हणाले की अलिकडील काळात सामाजिक विषमतेमुळे बाल हक्काविषयी शासन करीत असलेले प्रयत्न उत्तम असले तरी पण ते दिर्घकाळ टिकले पाहीजे. नैसर्गिक साधन संपत्तीचा हक्क बालकांना देऊन तसेच समाजात समानता आणून बाल हक्काविषयी जटील समस्या सेाडविण्यासाठी प्रयत्न झाले पाहीजे असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक करताना त्रिपाठी म्हणाले की, बाल न्याय व काळजी संरक्षण अधिनियम 2006 साली कार्यान्वित करण्यात आली. भारतीय घटनेच्या भाग 3 व 4 या दोन्हीमध्ये मुलांचे हक्काचे जास्तीत जास्त संरक्षण मिळावे. घटनेच्या कलम 19(अ) खाली सर्व मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद आहे. 1937 साली सेवाग्राम येथे नई तालीम बुनियादी शिक्षण सुरु झाले. याचे देशभरात 1 लाखापेक्षा अधिक शिक्षण संस्था होत्या. या नई तालीम बुनियादी शिक्षणाच्या माध्यमातून आजची शिक्षण प्रणाली अवलंबिल्यास सुसंस्कृत समाज घडण्यास मदत होईल. बालकांचा सर्वांगिण विकास हा शिक्षणाने होत असतो. बालकांना शिक्षणाची अधिक ओढ निर्माण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बरंठ म्हणाले की, आजही नई तालीम किंवा बुनियादी शिक्षणाकडे बालकांना आकृष्ट करण्याची गरज आहे. या शिक्षण प्रणालीमुळे मुल्यवर्धित विचार मुलांमध्ये रुजविल्यास सशक्त समाजाची निर्मिती होऊ शकेल असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे विधीवत उदघाटन दिप प्रज्वलनाने झाले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. मोहन गुजरकर व ज्योती भगत यांनी केले तर आभार सतीश सुपे यांनी मानले. या कार्यक्रमाला देशभरातून अनेक मान्यवर उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment