Monday 21 May 2018



नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यास प्रशासनाने सज्ज राहावे. - जिल्हाधिकारी
•जिल्हाधिका-यांनी घेतला मान्सूनपूर्व आढावा
          वर्धा दि 21 (जिमाका):- जीर्ण झालेल्या अति धोकादायक शासकीय इमारती पावसाळा सुरू होण्यापूर्वी पाडून टाकाव्यात . तसेच नैसर्गिक आपत्तीत जीव वाचवणारी आवश्यक साधने जसे बोट, लाईफ जॅकेट्स,दोर, या साधनांची पुरेशी व्यवस्था करण्यासोबतच, ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयात  औषधांचा पुरेसा साठा करून ठेवावा. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे,  अशा सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्यात. मान्सूनपूर्व आढावा बैठक घेताना ते बोलत होते.
          यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्षमी शहा,  अतिरिक्त कार्यकारी अधिकारी करुणा जुईकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि विभाग प्रमुख आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर सोनटक्के उपस्थित होते.
          नैसर्गिक आपत्तीच्या काळात कार्यालयात  वीज पुरवठा खंडित झाल्यास कार्यालयाचे काम बंद पडू नये यासाठी  नादुरुस्त डिझेल इंजिन कार्यालयाने तातडीने दुरुस्त करून घ्यावे. त्यासाठी निधी आवश्यक असल्यास त्याची मागणी करावी.  उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयात औषधी, डॉक्टरांची चमू, वीज पुरवठा, इमर्जन्सी ऑपरेशन थिएटर, तयार ठेवावे.  तसेच रुग्णालयाची तात्पुरती डागडुजी करून घ्यावी. यासाठी रुग्णकल्याण समितीला 5 लक्ष रुपये देण्यात येतील. हे काम रुग्ण कल्याण समितीने करावे. या सर्व रुग्णालयांची  तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी पाहणी करून खातरजामा करावी.
          ग्रामीण भागात अवैध दारू व्यवसायांवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच आपत्ती काळात तत्पर कार्य करण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करावी. मे अखेर पर्यंत ग्राम सुरक्षा दल स्थापन करून जून च्या पहिल्या आठवड्यात तहसीलदारांनी त्यांची बैठक घ्यावी. सर्व विभाग प्रमुखानी नैसर्गिक आपत्तीच्या काळात जबाबदारीने काम करावे. हलगर्जीपणा करणा-या अधिक-यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment