Thursday 7 December 2017



सार्थक जीवनासाठी मूल्यशिक्षणाचे 25 राजदूत दिल्ली वारीला
Ø गांधी जिल्ह्याचा अनोखा उपक्रम
      वर्धा दि 7 (जिमाका)  दिवसेंदिवस  मूल्य शिक्षणाचा -हास होत असून त्याचे परिणाम म्हणून आज   समाजात अशांतता, जातीभेद, असहिष्णुता आणि  हिंसा  पहावयास मिळते.  मूल्यसंस्कारांचे बाळकडू लहानपणीच मुलांना मिळावे आणि सुदृढ, समतोल विचारांची  पिढी घडावी  म्हणून गांधी जिल्हा अशी ओळख असलेल्या  वर्धा जिल्ह्याने  यासाठी पुढाकार घेतला आहे.महात्मा गांधींनी दिलेले विचार आणि मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी निवड करण्यात आलेल्या 25 ब्रँड अँबेसिडर  विद्यार्थ्याना आज विमानाने  दिल्ली वारी करण्याची संधी मिळाली.  खासदार रामदास तडस आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज विद्यार्थ्यांच्या  गाडीला हिरवी झेंडी दाखवून मुलांना शुभेच्छा दिल्यात.
महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने बालकांमध्ये शालेय अवस्थेपासून गांधीजींचे  मूल्य रुजवण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि  जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून  जिल्हा प्रशासनाच्या वतीने 2 ऑक्टोबर 2016 पासून  उडाण प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था  जिल्हा परिषद शिक्षण विभाग, गांधी विचार परिषद, आणि नई तालीम सेवाग्राम,  यांचे सहकार्य घेण्यात आले.
 सर्व जिल्हापरिषद,  नागरपालिकां आणि  काही खाजगी शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. मुलांना विविध प्रात्यक्षिक  आणि स्पर्धेच्या माध्यमातून मूल्य शिक्षणाचे धडे देण्यात आले.  यामध्ये विद्यार्थ्याना वैयक्तिक, सामाजिक, आणि राष्ट्रीय मूल्यांची शिकवण प्रत्यक्ष कृतीतून आणि विविध उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात आली.  त्याचबरोबर सार्थक जीवनासाठी मूल्यशिक्षण  अंतर्गत संस्कारपर्व पुस्तक विद्यार्थ्याना वाटप करण्यात  आले. 

           विद्यार्थ्याना राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता,  शांती ,अहिंसा, सहिष्णुता, संवेदनशीलता,  सौजन्य, श्रमप्रतिष्ठा, स्त्री- पुरुष समानता, वक्तशीरपणा,  या दहा मूल्यांवर आधारित शिक्षण व  प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय जिल्हाधिकारी यांनी स्वतः मुख्याध्यापकांचे या विषयांवर उद्बोधन केले. याचबरोबर, विद्यार्थ्यांची वक्तृत्व , निबंध, चित्रकला, काव्य व कलागुणांवर आधारित  स्पर्धा घेण्यात आली. शिवाय गावातील श्रमिक आणि कारागिरांच्या मुलाखती आणि प्रात्यक्षिकाद्वारे त्यांच्या कलेचे आणि श्रमाचे मोल आणि  जाणीव रुजविण्याचे  काम शाळांनी केले. वर्धा, सेलू, आर्वी, आष्टी, देवळी या तालुक्यांमध्ये सायकल यात्रा काढून विद्यार्थ्यानी  पर्यावरण आणि समाजाला जोडण्याचा प्रयत्न केला. याशिवाय शाळेतील  शिक्षकांनी व्यसनमुक्ती आणि  शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका, यावर पालकांचेही उद्बोधन केले. सेवाग्राम येथे चार दिवस बाल आनंद मेळावा घेऊन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धाही घेण्यात आल्यात.
        वर्षभरापासून सुरू असलेल्या या उपक्रमात शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा, केंद्र, तालुका आणि जिल्हास्तर अशा विविध टप्प्यावर  सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील इयत्ता 5 वी  ते 9 वी पर्यंतचे 1000 विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील 25 विद्यार्थी गुणवत्तेत चमकले. यात ग्रामीण भागातील जिल्हापरिषद शाळांमाधील 20 विद्यार्थी आहेत.  या 25 विद्यार्थ्याना मूल्य संस्काराचे राजदूत म्हणून दिल्ली वारी करण्याची संधी उडाण प्रकल्पाद्वारे मिळाली आहे.
         या वारीत 4 दिवस विद्यार्थी  गांधीजींचे वास्तव्य असलेली ठिकाणे आणि संस्थाना भेट देतील. तसेच राष्ट्रपती भवन,  संसद भवन, संसदेतील ग्रंथालय, इंडिया गेट आणि दिल्लीतील महत्वाच्या ठिकाणांना भेट देऊन माहिती घेतील. त्यांच्यासोबत जिल्हा परिषद शाळांमधील5 शिक्षक आणि डाएट च्या प्रा. श्रीमती महाजन सहभागीं झाल्या आहेत.
        आज समाजात  मूल्य रुजवणे आवश्यक  झाले आहे.  त्यासाठी शालेय जीवनातच याचे संस्कार व्हावेत म्हणून महात्मा  गांधीच्या 150 व्या जयंती निमित्ताने  उडाण हा प्रकल्प सुरू केला आहे. गांधी जिल्हा म्हणून या जिल्ह्याची जबाबदारी आहे की,  गांधीजींनी जी जीवनमूल्ये आपल्याला दिलीत ती पुढच्या पिढीपर्यंत आपण पोहचवली पाहिजे.  यावर्षी विविध उपक्रम आणि स्पर्धेच्या माध्यमातून 25 मुले निवडण्यात आलीत. त्यांना मूल्यसंकराचे राजदूत म्हणून आपण संबोधले आहे. यात जिल्हा परिषद शाळेतील गरीब कुटुंबातील मुले आहेत. दिल्ली येथे विमानाने जाऊन ही मुले तेथील महात्मा  गांधींच्या स्मृती स्थळांना भेट देऊन राष्ट्रपती भवन आणि इतर ठिकाणांना भेटी देतील.
 शैलेश नवाल, जिल्हाधिकारी वर्धा


No comments:

Post a Comment