Wednesday 6 December 2017



          शेतक-यांनी मातीचे परीक्षण करून खतांचे नियोजन करावे
                                          - खासदार रामदास तडस
• जिल्ह्यातील 19 हजार शेतक-यांना मृद आरोग्य पत्रिका वितरण
Ø विश्व मृदा दिन साजरा
     वर्धा दि 5 जिमाका :-  मृद आरोग्य परिक्षणावर या देशाचे प्रधानमंत्री स्वतः शेतक-यांशी संवाद साधतात ही बाब शेतकाऱ्यांकडे शासनाचे  लक्ष आहे हे अधोरेखीत करते. यापूर्वी कधीही मातीचे परीक्षण करण्यात आले नाही. या शासनाने ही योजना सुरू करून शेतक-यांच्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी केलेला यशस्वी प्रयत्न आहे.त्यामुळे शेतक-यांनी मातीचे परीक्षण करून घेऊन शेतीला आवश्यक मूलद्रव्याचा आहार पुरवावा आणि भरघोस पीक घ्यावे,  असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी  केले.
            आज  सेलसुरा येथे कृषी विज्ञान केंद्र,  कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने  विश्व मृदा दिनानिमित्त शेतकरी मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी श्री तडस बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे,   जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती,  देवळी नगर परिषद नगराध्यक्ष सुचिता मडावी, पंचायत समिती सभापती विद्या भुजाडे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक प्रशांत उंबरकर, उपसंचालक जी.आर. कापसे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, तालुका कृषी अधिकारी श्री सांगळे  उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार तडस म्हणाले, शेतक-यांना शेतीला पाणी आणि शेतमालाला भाव मिळाला तर शेतकरी स्वत:च्या परिश्रमाने शेतीतून सोन पिकवू शकतो.विदर्भातील सिंचनाचे 30 वर्षांपासून रखडलेले सिंचन प्रकल्प प्रधानमंत्री सिंचन योजनेच्या माध्यमातून मार्गी लागत आहेत. निम्न वर्धा प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी 700 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत. याशिवाय शेतक-यांच्या मातीचे परीक्षण करून 10 कोटी शेतक-यांना आज मृद आरोग्य पत्रिका वाटप करण्याचा कार्यक्रम देशपातळीवर एकाचवेळी राबविण्यात येत आहे.  सध्या जिल्ह्यात बोन्ड अळीचा प्रादुर्भाव 80 ते 85 टक्के क्षेत्रावर झाला आहे. हा प्रश्न येत्या लोकसभा अधिवेशनात मांडू असेही ते यावेळी म्हणाले. शेतक-यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीसोबत जोडधंदा सुरू करावा असे  आवाहनही त्यांनी केले.
         शेतक-यांनी आधुनिक शेतीसोबतच जैविक शेतीची कास धरावी. शेतीला जोडधंदा आणि फवारणी किट चा वापर करावा असे आवाहन कृषी सभापती मुकेश भिसे यांनी केले.
          शासन शेतक-यांना मोफत माती परीक्षण करून देते. यासाठी प्रत्येक परीक्षणाला शासनाला 300 रुपये खर्च येतो. त्यामुळे शेतक-यांनी याचा लाभ घेऊन शेतातील मातीचे परीक्षण करून घ्यावे. जमिनीत काय आहे आणि कोणत्या घटकांची आवश्यकता आहे याचे गणित या आरोग्य पत्रिकेत दिलेले असते.शेतक-यांनी त्याप्रमाणे खतांचा वापर करून पीक उत्पादन वाढवावे .  उत्पादन खर्च कमी करणे हे शतक-यांचं धोरण  असल पाहिजे. त्यासाठी  शेतक-यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे.  घरगुती बियाणे,  सेंद्रिय व जैविक खते आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन करून शेतकरी उत्पादन खर्च कमी करू शकतात. असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी यावेळी केले.
या मेळाव्यात शेतक-यांना मृद आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले. आज जिल्ह्यात एकाचवेळी 19 हजार मृद आरोग्य पत्रिकेचे ठिकठिकाणी कार्यक्रम घेऊन वाटप करण्यात आले. तसेच प्रगतीशील शेतकरी रुपाली पाटील आणि श्री सुपारे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मान्यवरांचे हस्ते स्टॉल चे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी माती परीक्षक अधिकारी रश्मी जोशी,  डॉ रुपेश झाडोदे, डॉ धनराज चौधरी यांनी शेतकऱयांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच सेंद्रिय शेती करणारे देवळी तालुक्याच्या लोणी गावचे शेतकरी श्री पेठकर यांनीही शेतकऱयांना सेंद्रिय शेतीचे फायदे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रशांत उंबरकर यांनी तर संचालन प्रा उज्वला शिरसाट यांनी केले.
                                     


No comments:

Post a Comment