Wednesday 20 March 2013

यशवंतराव चव्हाण : माणूसवेडा नेता


विशेष लेख :                                                  दिनांक : 19 मार्च, 2013

यशवंतराव चव्हाण : माणूसवेडा नेता

        महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा सांगता समारोप राष्ट्रपती श्री. प्रणव मुखर्जी यांच्या प्रमुख उपस्थितीत 23 मार्च 2013 रोजी मुंबई येथील एनसीपीए सभागृहात होणार आहे. त्यानिमित्ताने विशेष लेख. . .

          यशवंतराव चव्हाण यांच्याबाबत बऱ्याच कार्यकर्त्यांकडून ऐकलं होतं वर्तमानपत्रातून त्यांची भाषणे, त्यांनी मांडलेले विविध विचार वाचत होतो. म्हणूनच की काय त्यांच्याबद्दलची एक ओढ माझ्या मनात सारखी वाटत होती. एकदा तरी आपला, आपणा सर्वांचा नेता डोळा भरून पहावा, त्यांच जवळून दर्शन घ्यावं, असं वाटत होतं.
          नुकतीच आणीबाणी उठविली होती. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या. सारा भारत देश निवडणुकामुळे घुसळून निघाला होता. महाराष्ट्राचे लोकनेते आणि देशाचे परराष्ट्र मंत्री यशवंतराव चव्हाण यांची त्यादिवशी शहागंज (औरंगाबाद) येथे जाहीर प्रचारसभा होती. त्यामुळे यशवंतरावांना जवळून पाहण्याची संधी मिळेल या विचाराने त्या सभेला हजर होतो. अपेक्षेप्रमाणे सभा यशस्वी झाली. सभेमध्ये विराट जनसमुदाय जमलेला होता. यशवंतराव चव्हाण उर्फ 'साहेब' यांना जवळून पाहायचं दुसरे त्यांचे प्रत्यक्ष विचार ऐकायचे.
          या सभेमध्ये माझे समाधान झाले असले तरी एक प्रश्न मनामध्ये निर्माण झाला होता. तो म्हणजे लोक या सुसंस्कृत नेत्याला, 'साहेब' का म्हणत असावेत 'साहेब' म्हटले की, गोऱ्या कातडीचा, घाऱ्या डोळ्यांचा, सुटबूटातला इंग्रज 'साहेब' माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. आणि यशवंतराव चव्हाण तर या साहेबी कल्पनेत कुठेच बसणारे नव्हते. मग त्यांना लोक 'साहेब' का म्हणत असावेत. साहेबा पेक्षाही मला यशवंतराव चव्हाणांच्या मध्ये एक प्रेमळ माणूस, सुसंस्कृत माणूसच अधिक प्रमाणात दिसत होता. जेव्हा जेव्हा त्यांना जवळून भेटण्याची बोलण्याची संधी मला मिळाली त्या त्या वेळी मला त्यांचे साहेबापेक्षा माणूसपणच अधिक जाणवले. म्हणूनच या लाडक्या नेत्यावर अख्खा मराठी माणुस जीवापाड प्रेम करीत होता.
          1974 साली सुवर्ण महोत्सवी मराठी साहित्य संमेलन इचलकरंजी येथे झाले. त्यावेळी पु. ल. देशपांडे हे संमेलनाचे अध्यक्ष होते. रणजीत देसाई हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. या संमेलनालाही आपल्या राजकीय घडामोडी बाजूला ठेऊन यशवंतराव चव्हाण मुद्दाम त्यावेळी हजर राहीले. इचलकरंजीत आणि संमेलनाच्या समारंभात जेव्हा यशवंतरावजीचे आगमन झाले त्यावेळी कोल्हापूरकरांनी त्यांच्या विरोधी घोषणा दिल्या. या घोषणांमुळे यशवंतराव थोडेसेही विचलित झाले नाहीत. या उलट त्यांनी थोडेसे भाषणही केले आणि रसिक साहित्यिकांच्या मेळाव्यात आपला काही वेळ त्यांनी दिलखुलासपणे घालवला.                                     
       त्यानंतरचे साहित्य संमेलन खुद्द यशवंतराव चव्हाणांच्या कऱ्हाड या गावीच झाले. त्याचे स्वागताध्यक्ष यशवंतराव चव्हाण स्वत: होते. संमेलनाच्या अध्यक्षा होत्या दुर्गा भागवत. काळ आणीबाणीचा. त्यामुळे संमेलन वेगळया अर्थाने गाजणार असे सर्वांना वाटत होते आणि झालेही तसेच. दुर्गाबाई भागवत यांनी त्या वेळेसच्या भारत सरकारवर ताशेरे ओढले. आणीबाणीचा अस्वीकार केला तरीही यशवंतराव चव्हाण सरकारचे प्रतिनिधी या नात्याने चिडले नाहीत. तर कऱ्हाडकर यजमान म्हणून त्यांनी ते प्रसन्न मनाने स्वीकारले. तीन दिवसाच्या सहवासात संमेलन यशस्वी केलं. असा हा एक दर्दी राजकारणी माणूस होता.
          यशवंतराव चव्हाण यांना भेटण्याची, जवळून पाहण्याची एक संधी मला मिळाली. मी मराठवाडा विद्यापीठात मराठी विभागात एम. ए. चा विद्यार्थी होतो. त्या वेळी मराठवाडा विद्यापीठाची पन्नास मुला-मुलींची एक ट्रीप आग्रा, दिल्ली येथे गेली होती. आग्य्राला काही दिवसांचा मुक्काम झाल्यावर आम्ही दिल्ली गाठली. त्या वेळी यशवंतराव चव्हाण बहुधा भारताचे गृहमंत्री असावेत. आमचा दिल्लीमध्ये खा. माणिकराव पालोदकर आणि खा. सयाजीराव पंडित यांचेकडे मुक्काम होता. दिल्ली मुक्कामात संसदेचे कामकाज पाहिले. पण यशवंतराव चव्हाण यांना जावून घरी भेटावे अशी सर्व विद्यार्थ्यांचीच इच्छा होती.
          चार-पाच दिवसाच्या दिल्ली मुक्कामात आम्ही एक-दोनच नेत्यांना भेटलो. एक भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि दुसरे यशवंतराव चव्हाण. दिल्ली सोडतांना तत्कालीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांचीही भेट घेतली. सर्वात अगोदर म्हणजे सकाळी आठ वाजता पंतप्रधानाची भेटेची वेळ ठरली होती म्हणून दिल्लीच्या त्या गुलाबी थंडीच्या दिवसात आम्ही पंतप्रधानांना भेटण्यासाठी आमच्या सोबत इतर राज्यातील मंडळीही भेटण्यास आली होती. अत्यंत कडेकोट बंदोबस्तात आम्हाला पंतप्रधांनाच्या भेटीसाठी प्रवेश दिला. एवढयात सुरक्षा सैनिकांच्या सोबत पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या. आम्ही सर्वांनी उठून नमस्कार करुन त्यांचे स्वागत केले. त्यांनी विचारपूस केली. आणि आमची ही क्षणिक भेट संपली. या भेटीनंतर घाईघाईने आम्ही सर्वजण यशवंतराव चव्हाण यांच्या भेटीला त्यांच्या रेसकोर्सवरील निवासस्थानी भेटायला गेलो. तेथेही बंगल्याच्या प्रवेशद्वारात आमची तपासणी झाली. पण बंगल्यात गेल्यावर मात्र आम्ही आमच्या घरी आला आहोत अशी जाणीव झाली. यशवंतराव चव्हाणांनी आमचे सर्वांचे मनापासून स्वागत केले. आत सौ. वेणूताई चव्हाण होत्या. त्यांना बोलावून घेतले. आमच्याशी परिचय करुन दिला. परिचयाच्या कार्यक्रमांनंतर चहा-फराळ झाला. चहा-फराळांच्या वेळी साहेबांनी महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. त्याचवेळी त्यांचे स्वत:चे ग्रंथालयही पाहता आले. त्यानंतर त्यांच्या सोबत फोटो काढला. या भेटीत त्यांच्याबद्दलचे माणूसपण अधिकच जाणवलं. ती एक कृत्रिम भेट राहता जीवनात अविस्मरणीय अशी जिव्हाळयाची भेट ठरली. त्यानंतर आम्ही सर्वांनी त्यांचा निरोप घेतला.
         जेव्हा चव्हाण साहेब महाराष्ट्रात दौऱ्यावर आले त्यावेळी मराठवाडयात अंबेजोगाई येथे संगीत संमेलनाच्या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी ते मुद्दाम दिल्लीहून आले. औरंगाबादहून बीडला जातांना वाटेत आमच्या पेंडगावी त्यांचा स्वागताचा कार्यक्रम आम्ही ठेवला होता. आमच्या गावांना सभोवतालची मंडळीही या कार्यक्रमाला हजर होती. या अगोदरही आमच्या या छोट्याशा गावी या नेत्याचे स्वागत कार्यक्रम अनेकदा झाले होते. पण आजचा कार्यक्रम सर्वस्वी वेगळा होता. साहेब आयुष्याच्या बऱ्याच राजकीय हालचालीनंतर येत होते. तसेच यावेळी ते कुठल्याच सत्तेवरही नव्हते. फक्त सत्ताधारी पक्षाचे खासदार होते. तरी देखील माणसाची गर्दी कमी नव्हती.
          आम्ही सर्व ग्रामस्थ हारतुरे घेऊन रस्त्यावर उभे होतो. रस्त्यावरील गर्दी पाहून यशवंतरावजीने आपल्या ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. पांढऱ्या रंगाची ॲम्बेसिडर  कार होती. चव्हाण साहेबांच्या सोबत राज्याचे माजीमंत्री ना. माणिकरावजी दादा पालोदकर होते. कै. खा. रामरावजी होते. गाडी थांबताच रामरावजी गाडीखाली प्रथम आले. नंतर साहेब जागचे उठू लागले. पण त्यांना जागचे उठणे कठीण जावू लागले. उठतांना सर्वांग थरथरत होते. तरीसुद्धा उत्साह मात्र कायम होता. मी हे जवळून पाहत होतो. या उदंड उत्साहामुळे माणूसकीच्या प्रेमामुळे ते थरथरत का होईना गाडीबाहेर आले. लोकांचे स्वागत स्वीकारले आणि सर्वांना प्रेमाशीर्वाद देऊन गाडीत बसले. ते गाडीत बसल्यावर गाडी निघून गेली. आम्ही सर्वजण आमच्या लाडक्या नेत्यांचे अखेरचे दर्शन घेत आहोत हे कोणालाच वाटत नव्हते. काळ इतक्या लवकर त्यांना आमच्या मधून नेईल असे वाटले नव्हते. पण शेवटी घडले ते अघटितच आणि 26 नोव्हेंबर 1984 रोजी आमचा लाडका नेता आमच्यामधून निघून गेला.                     
                                                                                      - डॉ. सुदाम जाधव
00000

No comments:

Post a Comment