Friday, 18 August 2017



तीन वर्षात सर्व शेतक-यांचे कृषी पंप सौर उर्जेवर चालविणार
                                                              -चंद्रशेखर बावनकुळे
            वर्धा दि 18 (जिमाका) येत्‍या तीन वर्षात जिल्‍हयातील सर्व शेतक-यांचे कृषिपंप सौर ऊर्जेवर चालविण्‍यात येणार आहे. यासाठी प्रत्‍येक गावामध्‍ये सौर विज प्रकल्‍प उभारण्‍यात येणार आहे. तसेच दलित वस्‍ती सुधार योजने अंतर्गत प्रत्‍येक गावात सौर पथदिवे, ग्रामपंचायत च्‍या नळ योजना आणि जिल्‍हा परिषदेच्‍या सर्व शाळांना सौर विज पुरवठा कार्यान्वित करण्‍यात येणार असल्‍याचे  प्रतिपादन राज्‍याचे ऊर्जा व उत्‍पादन शुल्‍क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
आज विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय येथे विविध विद्युत उप केंद्राचे भूमी पूजन, लोकार्पण सोहळा व जनता अदालत  प्रसंगी ते बोलत होते. इंटीग्रेटेड पावर डेवलपमेंट योजने अंतर्गत भारत सरकारच्‍या शहरी विद्युत वितरण प्रणालीच्‍या सशक्‍तीकरणाच्‍या हेतून अल्‍लीपूर, तरोडा, हिंगणघाट, पुलगाव  व कारला चौक वर्धा येथे विद्युत उपकेद्राचे भूमीपूजन व खरांगना, मांडगाव व गिरोली उपकेद्राचे लोकापर्ण सोहळयाचे आयोजन करण्‍यात आले. यावेळी कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष नितीन मडावी , नगराध्‍यक्ष अतुल तराळे, जिल्‍हा परिषद सदस्‍य पंकज सायंकार, विद्युत विभागाचे विभागीय संचालक श्री.खंडाईत, अधिक्षक अभियंता श्री. देशपांडे उपस्थित होते.
          प्रत्‍येक नागरिकाला घरगुती 24 तास विद्युत पुरवठा देण्‍यात यावा तसेच कृषी पंपासाठीचा 8 तासाचे वर विद्युत पुरवठा खंडीत करु नये, असे निर्देश असतांना काही ग्रामीण भागात 8 तासाचे वर विज पुरवठा ख‍ंडित केल्‍याबाबत यावेळी विद्युत विभागाच्‍या अधिका-याविषयी नाराजी व्‍यक्‍त करुन यापूढे असा प्रकार घडल्‍यास अधिका-यांच्‍या वेतनवाढी थांबविण्‍यात येणार असल्‍याचे यावेळी श्री. बावनकुळे म्‍हणाले. जिल्‍हयातील 68 हजार शेतक-यांना सौर विज कृषिपंप देण्‍यात येणार असून यासाठी शेतक-यांनी अर्ज करावे. वर्दळीच्‍या ठिकाणी असलेल्‍या जागेवरील विद्युत खांब, रोहित्र व तारामुळे सामान्‍य नागरिकांना त्रास होऊन अपघात होण्‍याची शक्‍यता असते यासाठी  विद्युत विभागांनी अपघातस्‍थळावरील विद्युत तारा , रेाहीत्र व खांब तात्‍काळ दुसरीकडे स्‍थानांतरीत करावे.
          प्रत्‍येक नागरिकाला केवळ विज जोडणीचे अनामत रककमच घेऊन विज जोडणी दयावी. विद्युत खांब किंवा विद्युत तारा जोडणीची रक्‍कम घेऊ नये अशाही सुचना यावेळी दिल्‍यात. वर्धा जिल्‍हात 2030 पर्यंत विद्युतीकरण  पुर्ण होईल. यासाठी जिल्‍हयाला 200 कोटी रुपये उपलब्‍ध झाले आहे. यामध्‍ये आणखी 250 रुपये  कोटीची आवश्‍यकता असून लवकरच उपलब्‍ध करुण देण्‍यात येणार आहे. ज्‍या शेतक-याला शाश्‍वत विज दिली जाणार नाही त्‍या अधिका-यांवर कठोर कारवाई करण्‍यात येर्इल असा इशारा त्‍यांनी यावेळी दिला.
          जिल्‍हयात 86 कोटी रुपयाचे देयक शेतक-यांकडे थकित असतांनाही  शेतक-यांची विज कापण्‍यात आली नाही.  जिल्‍हयात दोन वर्षात 9 हजार 500 विज कनेक्‍शन देण्‍यात आले असून केवळ 2 हजार 300 कनेक्‍शन बाकी आहे.   यावेळी विद्युत विभागाशी संबधित 270  नागरिकांनी तक्रारी दाखल केल्‍या. सर्वच तक्रारीचे मं‍त्रीमहोदयानी निराकरण केले. यापुढे प्रत्‍येक शाखा अभियंत्‍यांनी  महिन्‍यातून एकदा ग्राहक मेळाव्‍याचे आयोजन करावे. तसेच कार्यकारी अभियत्‍यांनी ग्राहक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करुन ग्राहक सेवेचे व्रत जोपासावे, असेही  श्री. बावनकुळे म्‍हणाले.
          कार्यक्रमाला विद्युत विभागाचे अधिकारी , कर्मचारी, नागरिक, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
                                               



No comments:

Post a Comment