Friday, 13 August 2021

 

आता  शेतक-यांना स्वतःच घेता येणार आपल्या पिकाची नोंद

 

ई -पीक पाहणी अँप लॉन्च

 

     वर्धा, दि 13 (जिमाका):- येत्या स्वातंत्र्य दिनापासून महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबविण्यात येणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे "ई-पीक पाहणी" प्रकल्पाचे ऑनलाईन लोकार्पण इलेक्ट्रॉनिक कळ दाबून करण्यात आले. शेतकऱ्यांना आता स्वतःच मोबाईल अँपच्या माध्यमातून स्वतःच्या शेतातील पिकाची नोंद सातबारा मध्ये घेता येणार असून यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचण्यासोबतच चुकीच्या नोंदीमुळे होणारे नुकसान टळणार आहे.

टाटा ट्रस्ट मार्फत सुरुवातीला हा प्रकल्प अवघ्या दोन जिल्हयात पथदर्शी प्रकल्प म्हणून सुरु करण्यात आला होता.  मात्र आता हा प्रकल्प राज्यभरात राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी बांधवांना आपल्या पीकाची माहिती स्वत:च भरणे शक्य होणार आहे. आताच्या डिजिटल युगात शेतकऱ्यांना सहज, पारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग प्रयत्न करीत आहे. 

 आज लोकार्पण करण्यात आलेल्या प्रकल्पाची राज्यस्तरावर अंमलबजावणी होणार आहे. तसेच पुढील 15 दिवसात राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या पीकाची नोंद ॲपवर कशी करायची याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.ऑनलाईन सातबारामध्ये सुलभता आणण्याबरोरबच आता 8 अ सुध्दा ऑनलाईन करण्यात आला आहे.

 माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा" असे या प्रकल्पाचे बोधवाक्य आहे.

शेतकऱ्याला स्वत: पिकांची नोंद करता येणार असून शेतीसाठी पीक कर्ज आणि पीक विमा सुलभरित्या उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

 शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतातील पिकांची सात बारामध्ये स्वत: नोंद करता येणार असल्याने पीक पेरणी आणि पिकांच्या परिस्थितीचा अंदाज करता येणार आहे. ई पीक पाहणी प्रकल्पामुळे गाव, तालुका आणि जिल्हानिहाय प्रत्येक पिकाचे क्षेत्र समजणारआहे.

 

0000

 

 











ब्रेक दि चेन अंतर्गत नवीन आदेश लागू

 

वर्धा, दि 13 (जिमाका):-  ब्रेक दि चेन अंतर्गत जिल्ह्यात जवळपास सर्व दुकाने आस्थापना सर्व दिवस रात्री 10  वाजे पर्यंत सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी नवीन आदेश जारी केले आहेत.

उपहारगृहे-

खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास  मुभा देण्यात येत आहे.उपहारगृहामध्ये प्रवेश करताना , प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापरअनिवार्य राहिल व याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहिल.

ब) उपहारगृहामध्ये काम करणारे आचारी, वाढपे, व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांचेकोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहिल व ज्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या दोन मात्राआणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पुर्ण झाले आहे असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृहामध्येकाम करु शकतील तसेच या सर्व कर्मचारी व व्यवस्थापनाने उपहारगृहात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहिल.

क) वातानुकूलित उपहारगृह असल्यास , वायुवीजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून आतील हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक राहिल.

ड) प्रसाधनगृहातही उच्च क्षमतेचा एक्झॉस्ट फॅन असणे आवश्यक राहिल.

इ) उपहारगृहामध्ये विहित शारिरीक अंतराचे पालन होईल यानुसारच आसन व्यवस्था करण्यात यावी

फ) उपहारगृहामध्ये निर्जतुकीकरणाची तसेच सॅनिटायझरची व्यवस्था असणे आवश्यक राहिल. उपरोक्तनुसारउपहारगृहे सुरु ठेवण्यास सर्व दिवस रात्री 10.00 वा. पर्यंत मुभा देण्यात येत आहे. उपहारगृहामधील भोजनासाठीग्राहकांकडून शेवटची मागणी जास्तीत जास्त रात्री 9.00 वाजेपर्यंत घ्यावी. मात्र पार्सल सेवा 24 तास सुरुठेवण्याची मुभा देण्यात येत आहे .

 दुकाने

वर्धा जिल्हयातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री 10 वाजता पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे .दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण दोन मात्रा पूर्ण  झाल्यानंतर 14 दिवसाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहिल.

 शॉपिंग मॉल्स

वर्धा जिल्हयातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस

रात्री 10 .वाजतापर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.तथापि, शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुरारी मात्रा घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहिल व तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहीत ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील.

 

* जिम्नॅशिअम ,योगसेंटर, सलून - स्पा :*

अ) वातानुकूलित तसेच विनावातानुकूलित जिम्नॅशिअम , योगसेंटर , सलन - स्पा 50 टक्के क्षमतेने सर्व दिवस

रात्री 10 वाजता पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, उक्त संस्था वातानुकूलीत असल्यास

वायुविजनासाठी फॅन व वातानुकूलनासह खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक राहील .

 

* इनडोअर स्पोर्टस् :*

इनडोअर स्पोर्टस् असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या कोविड प्रतिबंधात्मक

लसीकरणाच्या दोन मात्रा वि दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवस झालेले असणे आवश्यक राहील. तसेच , या ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी योग्य वायुविजन व्यवस्था असणे आवश्यक राहील.या ठिकाणी खेळाडूना बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वेश, पैरलल बार ,मलखांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे.

 

कार्यालय | औद्योगिक / सेवाविषयक आस्थापना :

 

अ) सर्व शासकीय / निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बैंक कर्मचारी, रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व

व्यवस्थापन यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राथम्याने पूर्ण करण्यात यावे.

ब) खाजगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांचे व व्यवस्थापनाचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण झालेल्या आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे .

क) सर्व आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो विविध सत्रात कर्मचान्यांना बोलावून कामाचे व्यवस्थापन

करावे.

 

ड) तसेच खाजगी कार्यालयाना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये 24 तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे . मात्र अशा सत्र व्यवस्थापनांतर्गत कार्यालयांना एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या 25 टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहील.

मैदान, उद्यान

            स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेत सुरु राहतील.

विवाह सोहळे

अ) खुल्या प्रांगणातील /लॉन वरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण/लॉन/ मंगलकार्यालय / हॉटेल मधील आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपुर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.

ब) खुल्या प्रांगण /लॉन मध्ये होणाऱ्या विवाह सोहळयास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 200 व्यक्तीच्या मर्यादित असेल.

क) बंदिस्त मंगल कार्यालय / हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 100 व्यक्ती या मर्यादेत असेल.

ड) मात्र कोणत्याही परिस्थीतीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्यासाठी व्हिडीओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकाऱ्याला तपासणीसाठी उपलब्ध करुन देणे आवश्यक राहिल. या निबंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच संबंधित हॉटेल / कार्यालयांवर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल / मंगल कार्यालयाचा परवाना रद करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

इ) तसेच मंगल कार्यालय/हॉटेल/लॉन व्यवस्थापन / भोजन व्यवस्थापन / बँडपथक / भटजी / फोटोग्राफर्स अशा विवाह संस्थेशी संबंधीत सर्व संलग्न संस्था यामधील व्यवस्थापक व कर्मचारी यांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण होऊन दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पुर्ण होणे अनिवार्य राहील व त्यानुसार ओळखपत्रासह लसीकरण प्रमाणपत्र

सोबत असणे आवश्यक राहील.

 सिनेमागृहे व मल्टिप्लेक्स

सिनेमागृह / नाटयगृह, मल्टिप्लेक्स (स्वतंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील ) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.

धार्मिक स्थळे

वर्धा जिल्हयातील सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद राहतील.

आंतरराज्य प्रवास

ज्या नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे त्या नागरिकांना , बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. अन्य प्रवाशांसाठी 72 तास पुर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह किंवा 14 दिवस विलगीकरण आवश्यक राहिल.

सांस्कृतिक कार्यक्रम

            कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यात गर्दी व्यवस्थापन करण्याबाबत केंद्र शासनाने तसेच मा .

सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले आहे. यास्तव गर्दी / जमाव टाळण्यासाठी वाढदिवस, राजकीय, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार सभा , रॅली . मोर्चे , इ. वरील निर्बंध कायम राहतील.

वर्धा जिल्हयातील सर्व नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना जसे की, मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, शारिरीक अंतराचे पालन, इतरत्र थुकण्यास प्रतिबंध , इ. सर्व निबंधांचे पालन करणे अनिवार्य राहिल.

सर्व दुकाने, कार्यालये, औद्योगिक आस्थापना, उपहारगृहे ,मॉल मालक / व्यवस्थापनाने त्यांचे आस्थापनेवर कार्यरत असलेल्या व्यवस्थापक तसेच कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पुर्ण होऊन दिवस झाल्याची खातरजमा करावी व या कर्मचाऱ्यांची यादी ( लसीकरण माहिती / प्रमाणपत्रासह ) तयार ठेवावी व सक्षमप्राधिकाऱ्यांनी तपासणी साठी मागणी केल्यास त्यांना उपलब्ध करून द्यावी.

 दुकाने / उपहारगृहे | मॉल्स / कार्यालये | औद्योगिक आस्थापना यांचे नियतकालीक निर्जतूकीकरण व सॅनीटायझेशन करण्याची जबाबदारी संबंधीत मालकाची वं व्यवस्थापनाची असेल . तसेच, यामध्ये कर्मचारी तसेच ग्राहकांचे तापमान घेण्यासाठी इन्फ्रारेड / कॉन्टॅक्टलेस थर्मामिटर याची व्यवस्था करण्यात यावी.

डिस्पेसर व बायोमेडीकल वेस्ट ( वापरलेले मास्क व टिशु पेपर्स इत्यादीची विल्हेवाट ) जमा करण्याची व विहित कार्यपध्दतीने विल्हेवाटीसाठी देण्याची जबाबदारी संबंधीत आस्थापनांची असेल .

 

उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा उल्लंघन केल्यास संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम,साथरोग अधिनियम आणि भारतीय दंडसंहिता 1860 मधील तरतूदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

0000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

प.क्र. 600

आझादी का अमृत महोत्सवा अंतर्गत फ्र‍िडम रन संपन्न्

 

वर्धा,जिमाका 13:-  आझादी का अमृत महोत्सव-India@75 च्या सेलिब्रेशनचा भाग म्हणून  भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व  क्रीडा मंत्रालय च्या वतीने देशभरात फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 आयोजन करण्यात आले होते. प्रथम चरण मध्ये महाराष्ट्रातील 09 जिल्हयात फ्र‍िडम रन‍ चे आयोजनात वर्धा जिल्हयातील बापु कुटी सेवाग्राम आश्रमची निवड करण्यात आली त्यानुषांगाने नेहरू युवा केद्र वर्धा द्वारा हुतात्मा स्मारक चरखा गृह सेवाग्राम ते बापु कुटी सेवाग्राम आश्रम वर्धा येथे जिल्हाप्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी हयांच्या सहकार्याने दिंनाक 13 ऑगस्ट 2021 रोजी फ्र‍िडम रनचे आयोजन  स्पोर्ट अशोसिएशन व युवा मंडळाच्या माध्यमातून करण्यात आले होते हया कार्यक्रमाचे उदघाटन  मा.रामदासजी तडस हयांनी  हिरवी झेंडी दाखवून केले. 

या प्रंसगी हुतात्मा स्मारक सेवाग्राम  येथे मा. रामदासजी तडस हयांच्या हस्ते निसर्ग सेवा समितीच्या सहकार्याने वृ्‌क्ष लावण्यात आले. तसेच गुरुदेव सेवा मंडळाचे श्री हांडे हयांनी सामुहिक प्रेरणा गीत व वंदना घेतली.   प्रथम राष्ट्रगीत घेवून दौडला सुरुवात करण्यात आली.  हयावेळी मा. जिल्हा क्रीडा अधिकारी, लतिका लेकुरवाळे, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधरजी बेलखोडे, से नि जिल्हा युवा अधिकारी संजय माटे, सतिश इंगोले, क्रीडा अधिकारी अनिल निमगडे कुस्ती प्रशिक्षक एस बी. बडगिलवार, श्री प्रविण पेटे, क्रीडा प्रशिक्षक श्रीमती भोंगाडे, एक्सेल इंडियाचे प्रितेश रामटेके आदी उपस्थित होते.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिवधन शर्मा जिल्हा युवा अधिकारी हयांनी केले.   समारोप बापु कुटी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान  येथे करण्यात आला येथे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. टी.आर.एन. प्रभु  हयानी मार्गदर्शन केले.  तर आभार प्रदर्शन श्री अनिल निमगडे हयांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यक्रम पर्यवक्षक दयाराम रामटेके,  क्रीडा कार्यालयाचे रवि काकडे , नेहरू युवा केंद्राचे अमोल चावरे,  जयश्री भोयर, दिक्षांत टेंभरे, ऐश्चर्या भोयर व मृणाली बुडे  हयांनी परीश्रम घेतले.  दिनांक 13/08/2021 रोजी  निवडक 75 गांवामध्ये  राष्ट्रीय युवा स्वयंसेवक व युवा मंडळाचे माध्यमातून  फिडम रनचे आयोजन करण्यात आले आहे.  सदर कार्यक्रम 2 आक्टोबरपर्यंत 744 जिल्हयात होणार आहे अशी माहिती जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा हयानी दिली.

 

000000

 

 

 

 

 

Tuesday, 20 July 2021

 

प.क्र. 547                                                                   दिनांक 19 जुलै 2021

पोलिस विभागाच्या नविन वाहनाचे पालकमंत्री सुनिल केदार यांचे हस्ते लोकार्पण

वर्धा, दि 19जुलै जिमाका:- पोलिस विभागास जिल्हा वार्षिक योजनेच्या  नाविन्यपूर्ण योजनेतून  प्राप्त झालेल्या निधीतुन खरेदी करण्यात आलेल्या 13 नविन चारचाकी वाहनाचे आज राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार यांचे हस्ते लोकार्पण व पोलिस विभागाच्या पेट्रोल पंपाचे भूमिपूजन  करण्यात आले.

 यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, सर्वश्री आमदार  अभिजित वंजारी, रणजित कांबळे, दादाराव केचे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार,  जिल्हा पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर,  अपर पोलिस अधिक्षक यशवंत सोळंके,  वाहन शाखाप्रमुख पोलिस निरिक्षक महेश मुंढे, राखीव पोलिस निरिक्षक शालिक उईके व पोलिस अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजना 2020- 21 च्या नाविन्यपूर्ण योजनेतुन  प्राप्त झालेल्या निधीतून 13 वाहने खरेदी करण्यात आले आहे.  यापूर्वी 8 वाहने असे एकूण  21 वाहने पोलिस विभागास प्राप्त झाली आहे. सदर वाहने जिल्हयातील 19 पोलिस स्टेशनला हस्तांतरीत करण्यात येणार असल्याचे  पोलिस विभागाचे वाहन शाखा प्रमुख श्री. मुंढे यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांचे हस्ते  पोलिस मुख्यालयातील मैदानावरील जागेवर नव्याने बांधण्यात येणा-या पोलिस विभागाच्या पेट्रोल पंपाचे भूमिपूजन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

                                                            00000

 







प.क्र. 548                                                                   दिनांक 19 जुलै 2021

         जनसुविधेसाठी आतापर्यंतचा सर्वाधिक 14 कोटी निधी उपलब्ध

                                              -पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

Ø  लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार अधिकचा निधी देणार

Ø  जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेसाठी  (सर्वसाधारण) अधिकचा 40   कोटी निधी प्राप्त

वर्धा, दि 19 जुलै (जिमाका):- जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने जिल्हा वार्षिक योजनेमधून यावर्षी 14 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून हा आतापर्यंतचा सर्वाधिक निधी आहे. लोकप्रतिनिधींच्या भावनांचा आदर करीत त्यांनी आणखी प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केल्यास यासाठी अधिकचा निधी सुद्धा उपलब्द करून देण्यात येईल, असे प्रतिपादन पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा  जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष सुनील केदार यांनी केले.

जिल्हा परिषद सभागृहात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली यावेळी श्री केदार बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार सर्वश्री रामदास आंबटकर, ऍड.अभिजित वंजारी, डॉ. पंकज भोयर, रणजित कांबळे, दादाराव केचे, समीर कुणावर, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, वित्त व नियोजन विभागाचे उपायुक्त धनंजय सुटे, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेम्भुरणे उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)  2021-22 साठी शासनाकडे जिल्ह्याची बाजू मांडून  पालकमंत्री सुनील केदार यांनी अधिकचा 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असून आता सदर योजना  160 कोटी रुपयांवरून वाढवून सदर निधी 200 कोटी रुपये  मंजूर झाला आहे अशी माहिती यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी यांनी समिती सदस्यांना दिली.

2020- 21 मधील अनुसूचित जाती उपयोजनेतील मृद संधारण या बाबीसाठी 88 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता मात्र त्यापैकी 52.69 लक्ष रूपये निधी खर्च झाला, उर्वरित  35 लक्ष रुपयांचा निधी व्यपगत झाल्याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री यांनी दिलेत. तसेच पाणलोटचे प्रस्ताव देण्यास दिरंगाई केल्याबाबत  संबंधित अधिकारी यांची सुद्धा चौकशी करण्यात यावी असेही त्यांनी सांगितले.

धाम धरण सांडवा उंची वाढ

यावेळी धाम धरण सांडव्याची उंची वाढविण्या संदर्भात सभागृहात सादरीकरण करण्यात आले. 1999 पासून सदर प्रस्ताव लघु पाटबंधारे विभागाकडे प्रलंबित होता. पालकमंत्री यांनी यासंदर्भात केलेल्या पाठपुराव्यामुळे 19 फेब्रुवारी 2020 ला यासाठी पर्यावरण मान्यता मिळाली असून 6 जुलै 2020 ला वन विभागाची मान्यता मिळाली आहे. तसेच या प्रस्तावाला  10 मे 2021 रोजी प्रशासकीय मान्यता मिळून निविदा सुद्धा झालेली आहे. या प्रकल्पाच्या सांडव्याची उंची 1.90 मीटरने वाढविण्यात येणार असून यावर 34 स्वयंचलितगेट बसविण्यात येणार आहे. यामुळे 19 .54 दलघमी अतिरिक्त पाणी साठा निर्मिती होणार असून यामुळे वर्धा जिल्ह्यातील वर्धा शहर आणि आजूबाजूच्या 26 गावांची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे. सदर काम वर्षभरात पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री सुनील केदार यांनी दिल्यात. 

खरीप पीक कर्ज वाटप

सण 2021- 22 च्या खरीप हंगामासाठी शासनाने 850 कोटींचा लक्ष्यांक दिला होता यामध्ये 300 कोटींची वाढ करण्यात आली असून 1150 कोटी रुपये सध्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी 302 कोटी रुपये 26 हजार 36 शेतकऱयांना वाटप करण्यात आले असून त्याची टक्केवारी 35 आहे अशी  माहिती जिल्हा बँक व्यवस्थापक यांनी समितीला दिली. शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून अद्यापही केवळ 35 टक्के कर्ज वाटप झाल्याबाबत पालकमंत्री यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक लावण्यात यावी तसेच जिल्हाधिकारी यांनी पीक कर्ज वाटपाचा नियमित आढावा घ्यावा अशा सूचना श्री केदार यांनी दिल्या.

वर्धा शहर पाणी पुरवठा योजना

वर्धा शहर पाणी पुरवठा योजना अद्यापही पूर्ण झाली नसल्याबाबतही त्यांनी तीव्र आक्षेप घेऊन सदर योजना तात्काळ पूर्ण करून नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल यासाठी काम करा. तसेच या योजनेच्या दिरंगाई मध्ये ज्यांनी शासनाला फसवलं तसेच चुका केल्या त्यांच्यावर कायदेशीर  कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. शिवाय तत्कालीन पालकमंत्री यांनी योजना विहित कालावधीत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदाराकडून दंड वसूल करण्याचे आदेश दिले होते, मात्र अद्यापपर्यंत  कोणताही दंड आतापर्यंत वसूल केला नाही याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिलेत.

यावेळी आमदारांनी विविध मागण्या केल्यात. यात आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या नवीन रुग्णवाहिकेच्या इंधन खर्च एन आर एच एम मधून भागविण्यात यावा, मागील वर्षी सोयाबीन व कापसाचे नुकसान झाले त्याचे 178 कोटी रुपये शासनाकडे प्रलंबित आहेत त्याचा प्रस्ताव पाठवावा, पदवीधरांसाठी जिल्ह्यात सर्व सोयी सुविधा असलेले पदवीधर भवन मंजूर करावे, अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेतील 3 वर्षाचे प्रलंबित प्रस्ताव मंजूर करावे, पालकमंत्री  पांदण रस्ते योजना प्राधान्याने राबवावी, शेतकऱ्यांना खोडकीड संदर्भात मार्गदर्शन करावे, आष्टी शहिद या  क्रांतिकारक स्थळाचा विकास करण्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देण्यात यावा, इत्यादी मागण्या केल्यात. 

यावेळी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत शासकीय अतिक्रमण नियमानुकूल केलेल्या पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्यात आले. तसेच  कोविड परिस्थितीत काम करत असताना कारंजा तालुक्यातील ठाणेगाव येथील अंगणवाडी सेविका जानकी तुळशीराम भांगे यांचा कोविडने मृत्यू झाल्यामुळे त्यांना शासनाच्या वतीने 50 लक्ष रुपयांचे अनुदानाचा धनादेश आज पालकमंत्री यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आला. शिवाय नाविन्यपूर्ण योजनेत 75 बचत गटाला उद्योगासाठी निधी पालकमंत्री यांचे हस्ते वितरित करण्यात आला.

            या बैठकीला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

Thursday, 15 July 2021

 


          15 ते 30 जुलै दरम्यान राबविणार अतिसार पंधरवाडा

अतिसारामुळे मृत्युचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे

   

      वर्धा, दि 15 (जिमाका):-  जिल्हयामध्ये  2014 पासुन  अतिसारामुळे (डायरिया) एकही मृत्यु  झालेला नाही जिल्हयातील मृत्युचे प्रमाण शुन्यावर  आणण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमे दरम्यान  आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा  1 ते 5 वर्षाआतील बालकांच्या घरी  गृहभेटी देऊन  सर्वेक्षण करणार आहे. त्याचबरोबर ओआरएस व झिंक गोळयाचे वितरणही करणार आहे.  यासाठी नागरिकांनी  आरोग्य विभाग व आशांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे.

            15 ते 30 जुलै या कालावधित अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येत आहे. या पधंरवाडयाचा शुभारंभ जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांचे हस्ते जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला  मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती मृणाल माटे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण वेदपाठक,  माता व बाल संगोपण अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक, सामान्य रुग्णालयाचे निवासी  वैद्यकिय अधिकारी डॉ. नितीन निमोदिया,  विनोबा भावे रुग्णालयाचे  विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे,   रुग्ण कल्याण समितीच्या हेमलता मेघे,  डॉ. शुभदा जाजू,  डॉ. मोना सुने यांची प्रमुख उपस्थिती होती.

            जिल्हयात दरवर्षी  प्रमाणे  यावर्षी सुध्दा  अतिसार नियंत्रणाकरीता  15 ते 30 जुलै  या कालावधित  अतिसार नियंत्रण पंधरवाडा  साजरा करण्यात येत आहे. या दरम्यान ग्रामीण व शहरी  भागात आरोग्य कर्मचा-यामार्फत  आशा कार्यकर्ती 1 ते 5 वर्षा आतील लाभार्थ्यांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करुन लाभार्थ्यांना  ओआरएस  व झिंग गोळयाचे वितरण करणार आहे. त्याचबरोबर गोळयाचा वापर कसा करायचा, ओआरएसचे द्रावण बनविण्याचे प्रात्याक्षिक, कुपोषित बालकावर उपचार, स्तनपान व बालकांचे पोषण यावर माहिती देण्यात येणार आहे.

                                                                        0000

 



प.क्र. 531                                                                    दिनांक 15 जुलै 2021

                उद्योग सुरू राहण्यासाठी उद्योग क्षेत्राने कोविड

                 अनुकूल वर्तणुकीचा अवलंब करणे आवश्यक

                                                    - जिल्हाधिकारी

कार्यक्षेत्राच्या ठिकाणी किंवा परिसरात कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करावी

          वर्धा, दि 15 (जिमाका):- कोविड 19 च्या संसर्गाच्या परिस्थितीचा सामना करताना लॉकडाऊन काळातही आपले उद्योग सुरू ठेवण्यासाठी  कार्यक्षेत्राच्या ठिकाणी कोविड अनुकूल वर्तणुकीसोबतच कार्यक्षेत्राच्या ठिकाणी कर्मचारयांच्या राहण्याची व्यवस्था, त्यांचे लसीकरण आणि अत्यावश्यक परिस्थितीत त्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी छोटे रुग्णालय सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्यात. 

        जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संसर्गाच्या अनुषंगाने तिसऱ्या लाटेतही उद्योग सुरू राहावेत यासाठी उद्योजकांची बैठक घेण्यात आली. यावेळी उद्योजकांनी करावयाच्या तयारी संदर्भात चर्चा करण्यात आली, यावेळी श्रीमती देशभ्रतार बोलत होत्या.

          कोविड संसर्ग काळात रुग्णसंख्या वाढल्यास शासनाला लॉक डाऊन करण्यापलीकडे पर्याय उरत नाही. अशावेळी लॉकडाऊनचा परिणाम आपल्या उद्योग आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेवर होतो. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आपण आरोग्यायसंदर्भात सर्व तयारी करतोय, तशीच तयारी आपल्याला उद्योग सुरू ठेवण्यासाठी सुद्धा करायची आहे. त्यासाठी प्रत्येक उद्योगाने त्यांच्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी आवश्यक ती तयारी आणि संसर्गाच्या अनुषंगाने बदल करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. 

अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना  घर ते कार्यस्थळ यादरम्यान वाहतूक करण्यासाठी वाहतूक व्यवस्था तयार करावी. बस 50 टक्के क्षमतेने चालवावी . असे करणे शक्य नसल्यास संबंधित कर्मचारी स्वतःच्या वाहनाने प्रवास करीत असल्यास त्यांना घर ते कार्यस्थळाशिवाय इतरत्र बाहेर फिरण्यास प्रतिबंध करावा. कर्मचारी कंटेन्मेंट झोन मध्ये येत असल्यास त्यांना कार्यस्थळी येण्यास प्रतिबंध करावा.          कार्यस्थळी तापमान तपासणी, मास्कचा वापर, आणि कार्यस्थळाचे रोज निर्जंतुकीकरण या बाबी कटाक्षाने पाळण्यात याव्यात. तसेच जेवणाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याप्रमाणे जेवणाच्या वेळांचे नियोजन करावे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

          प्रत्येक उद्योगाने त्यांच्या कर्मचाऱ्याचे व त्यांच्या कुटुंबियांचे लसीकरण करून घ्यावे. किती कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले नाही याची माहिती पाठवावी, यावरून एम आय डी सी मध्ये लसीकरण केंद्र देण्यासंदर्भात विचार करता येईल. क्षमता असणाऱ्या उदयोग आस्थापनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी खाजगी स्तरावर लसीकरण करून घ्यावे.  त्याचबरोबर मोठ्या उद्योगांनी त्यांच्या परिसरात कर्मचाऱ्यांसाठी बाह्यरुग्ण विभाग, विलगिकरण कक्ष, आणि मूलभूत औषधी, आणि छोटे रुग्णालय इत्यादी व्यवस्था करणे भविष्याच्या दृष्टीकोणातून आवश्यक राहणार आहे. 100 पेक्षा जास्त कर्मचारी असणाऱ्या उद्योगांनी अशी व्यवस्था करावी असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. रुग्णालयासाठी आवश्यक मनुष्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण कौशल्य विकास विभागाचा वतीने उपलब्ध करून देण्यात येईल असेही त्या म्हणाल्या. 

उद्योगांनी त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून 500 जम्बो सिलिंडर शासकीय रुग्णालयांना उपलब्ध करून द्यावेत, तसेच लहान मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी उपलब्ध करून द्याव्यात. तसेच यापूर्वी उद्योगांनी केलेली मदत सुद्धा प्रशासनाला कळवावी अशा सूचना देशभ्रतार यांनी दिल्यात. 

या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक शिवकुमार मुद्देमवार, शेखर शेंडे, प्रवीण हिवरे, आर के शर्मा, पी एम जावदंड, आर बी वैरागडे, प्रसाद कुकेकर, विवेक पाटील, आयुष सिंघनिया, दिलीप गायकवाड, बी एस शहाणे आदी उद्योजक उपस्थित होते.

                                                 0000000

Friday, 9 July 2021

 




प.क्र-505                                                                     दि.09.07.2021

रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन वर्धा जिल्हा अपघातमुक्त करावा

                                   - खासदार रामदास तडस

       वर्धा जिल्हयात सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय  महामार्गाच्या माध्यमातुन  अनेक  मोठे प्रकल्प  प्रगतीपथावर  आहे. वर्धा-आर्वी , आर्वी –तळेगाव,  वर्धा हिंगणघाट हॅव्रीट ॲनेवीटी  अंतर्गत  सार्वजनिक बांधकाम विभागाचे  कामे सुरु आहे.  या कामामध्ये  रस्ता सुरक्षा  विषयक बाबीची पुर्तता करण्यात येते किंवा नाही  याचे मुल्यांकन करुन अहवाल सादर करुन रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वर्धा जिल्हा अपघातमुक्त करण्याच्या सुचना  खासदार रामदास तडस  यांनी दिल्यात.

          केंद्र शासनाच्या अधिसुचनेनुसार  गठण झालेल्या संसद सदस्य  रस्ता सुरक्षा समितीची  बैठक खासदार रामदास तडस यांचे अध्यक्षतेखाली झाली यावेळी त्यांनी सुचना केल्या. बैठकिला जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धाचे  कार्यकारी अभियंता प्रकाश बुब, आर्वी कार्यकारी अभियंता सुनिल कुंभे, राष्ट्रीय महामार्गाचे नागपूर राजन पाला, अमरावतीचे एम.एच.राठोड,यवतमाळचे चंदनसिंह बायस, अशोक वनकर, वसंत नाल्हे, अंकुश  केने, औरंगाबादचे बी.एस.कसबे, वाहतुक पोलिस निरिक्षक राजेश कडू, महामार्ग जामचे वाहतुक पोलिस निरिक्षक, अशासकिय सदस्य किरण उरकांदे,  प्रणव जोशी,  शिरिष  भांगे आदी उपस्थित होते.

           संसद सदस्य  रस्ता सुरक्षा समितीच्या अधिसुचनेतील तरतुदीनुसार   वर्धा जिल्हयात  स्वतंत्र वाहतुक पार्कची निर्मिती  करावी, युवकांमध्ये  अपघात  टाळण्याकरीता   जनजागृती करावी  व नव्याने  घोषित करण्यात आलेल्या जालना ते पुलगाव  महामार्गाचे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून  आडिट करुन  उपाययोजना  कराव्या याबाबत श्री. तडस यांनी सुचना केल्या केल्या. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी  जाहिर सभेत  घोषित केलेल्या  हिंगणघाट  शहरातून  जाणा-या  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर (जुना) उडान पुल बांधण्याकरीता  समितीमध्ये एक मताने ठराव करुन कलोडे चौक व  अशोक हॉस्पीटल चौक या स्थळाची  तातडीने  दुरुस्ती करण्याबाबत  भारतीय राष्ट्रीय राजमार्ग  प्राधिकरण नागपूर यांचे ठराव पाठविण्यात आले व सोबतच  जिल्हयातील 32 ब्लॅक स्पॉट  दुरस्तीबाबत  एक मताने  निर्णय घेण्यात आला.

          रस्ते अपघात टाळण्याकरीता  सर्व विभागांनी समन्वयाने  कार्य करुन   रस्ते सुरक्षा उपाययोजनाचे तंतोतंत पालन करावे याबाबत  व विशेष करुन  पावसाच्या दिवसात विशेष काळजी  घेण्याच्या सुचना  जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी अधिकारी वर्गांना दिल्यात.

          यावेळी  अशासकिय सदस्य  किरण उरकांदे व प्रणय जोशी यांनी सुध्दा रस्ता सुरक्षाबात आपल्या समस्या मांडल्या.

          बैठकिला शिक्षण विभागाचे  सुनिल कोहळे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. नितीन निमोदिया यांची उपस्थिती होती.

                                                0000