Thursday, 15 July 2021

 


          15 ते 30 जुलै दरम्यान राबविणार अतिसार पंधरवाडा

अतिसारामुळे मृत्युचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे

   

      वर्धा, दि 15 (जिमाका):-  जिल्हयामध्ये  2014 पासुन  अतिसारामुळे (डायरिया) एकही मृत्यु  झालेला नाही जिल्हयातील मृत्युचे प्रमाण शुन्यावर  आणण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमे दरम्यान  आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा  1 ते 5 वर्षाआतील बालकांच्या घरी  गृहभेटी देऊन  सर्वेक्षण करणार आहे. त्याचबरोबर ओआरएस व झिंक गोळयाचे वितरणही करणार आहे.  यासाठी नागरिकांनी  आरोग्य विभाग व आशांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे.

            15 ते 30 जुलै या कालावधित अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येत आहे. या पधंरवाडयाचा शुभारंभ जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांचे हस्ते जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला  मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती मृणाल माटे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण वेदपाठक,  माता व बाल संगोपण अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक, सामान्य रुग्णालयाचे निवासी  वैद्यकिय अधिकारी डॉ. नितीन निमोदिया,  विनोबा भावे रुग्णालयाचे  विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे,   रुग्ण कल्याण समितीच्या हेमलता मेघे,  डॉ. शुभदा जाजू,  डॉ. मोना सुने यांची प्रमुख उपस्थिती होती.

            जिल्हयात दरवर्षी  प्रमाणे  यावर्षी सुध्दा  अतिसार नियंत्रणाकरीता  15 ते 30 जुलै  या कालावधित  अतिसार नियंत्रण पंधरवाडा  साजरा करण्यात येत आहे. या दरम्यान ग्रामीण व शहरी  भागात आरोग्य कर्मचा-यामार्फत  आशा कार्यकर्ती 1 ते 5 वर्षा आतील लाभार्थ्यांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करुन लाभार्थ्यांना  ओआरएस  व झिंग गोळयाचे वितरण करणार आहे. त्याचबरोबर गोळयाचा वापर कसा करायचा, ओआरएसचे द्रावण बनविण्याचे प्रात्याक्षिक, कुपोषित बालकावर उपचार, स्तनपान व बालकांचे पोषण यावर माहिती देण्यात येणार आहे.

                                                                        0000

 



प.क्र. 531                                                                    दिनांक 15 जुलै 2021

                उद्योग सुरू राहण्यासाठी उद्योग क्षेत्राने कोविड

                 अनुकूल वर्तणुकीचा अवलंब करणे आवश्यक

                                                    - जिल्हाधिकारी

कार्यक्षेत्राच्या ठिकाणी किंवा परिसरात कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करावी

          वर्धा, दि 15 (जिमाका):- कोविड 19 च्या संसर्गाच्या परिस्थितीचा सामना करताना लॉकडाऊन काळातही आपले उद्योग सुरू ठेवण्यासाठी  कार्यक्षेत्राच्या ठिकाणी कोविड अनुकूल वर्तणुकीसोबतच कार्यक्षेत्राच्या ठिकाणी कर्मचारयांच्या राहण्याची व्यवस्था, त्यांचे लसीकरण आणि अत्यावश्यक परिस्थितीत त्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी छोटे रुग्णालय सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्यात. 

        जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संसर्गाच्या अनुषंगाने तिसऱ्या लाटेतही उद्योग सुरू राहावेत यासाठी उद्योजकांची बैठक घेण्यात आली. यावेळी उद्योजकांनी करावयाच्या तयारी संदर्भात चर्चा करण्यात आली, यावेळी श्रीमती देशभ्रतार बोलत होत्या.

          कोविड संसर्ग काळात रुग्णसंख्या वाढल्यास शासनाला लॉक डाऊन करण्यापलीकडे पर्याय उरत नाही. अशावेळी लॉकडाऊनचा परिणाम आपल्या उद्योग आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेवर होतो. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आपण आरोग्यायसंदर्भात सर्व तयारी करतोय, तशीच तयारी आपल्याला उद्योग सुरू ठेवण्यासाठी सुद्धा करायची आहे. त्यासाठी प्रत्येक उद्योगाने त्यांच्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी आवश्यक ती तयारी आणि संसर्गाच्या अनुषंगाने बदल करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. 

अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना  घर ते कार्यस्थळ यादरम्यान वाहतूक करण्यासाठी वाहतूक व्यवस्था तयार करावी. बस 50 टक्के क्षमतेने चालवावी . असे करणे शक्य नसल्यास संबंधित कर्मचारी स्वतःच्या वाहनाने प्रवास करीत असल्यास त्यांना घर ते कार्यस्थळाशिवाय इतरत्र बाहेर फिरण्यास प्रतिबंध करावा. कर्मचारी कंटेन्मेंट झोन मध्ये येत असल्यास त्यांना कार्यस्थळी येण्यास प्रतिबंध करावा.          कार्यस्थळी तापमान तपासणी, मास्कचा वापर, आणि कार्यस्थळाचे रोज निर्जंतुकीकरण या बाबी कटाक्षाने पाळण्यात याव्यात. तसेच जेवणाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याप्रमाणे जेवणाच्या वेळांचे नियोजन करावे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

          प्रत्येक उद्योगाने त्यांच्या कर्मचाऱ्याचे व त्यांच्या कुटुंबियांचे लसीकरण करून घ्यावे. किती कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले नाही याची माहिती पाठवावी, यावरून एम आय डी सी मध्ये लसीकरण केंद्र देण्यासंदर्भात विचार करता येईल. क्षमता असणाऱ्या उदयोग आस्थापनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी खाजगी स्तरावर लसीकरण करून घ्यावे.  त्याचबरोबर मोठ्या उद्योगांनी त्यांच्या परिसरात कर्मचाऱ्यांसाठी बाह्यरुग्ण विभाग, विलगिकरण कक्ष, आणि मूलभूत औषधी, आणि छोटे रुग्णालय इत्यादी व्यवस्था करणे भविष्याच्या दृष्टीकोणातून आवश्यक राहणार आहे. 100 पेक्षा जास्त कर्मचारी असणाऱ्या उद्योगांनी अशी व्यवस्था करावी असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. रुग्णालयासाठी आवश्यक मनुष्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण कौशल्य विकास विभागाचा वतीने उपलब्ध करून देण्यात येईल असेही त्या म्हणाल्या. 

उद्योगांनी त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून 500 जम्बो सिलिंडर शासकीय रुग्णालयांना उपलब्ध करून द्यावेत, तसेच लहान मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी उपलब्ध करून द्याव्यात. तसेच यापूर्वी उद्योगांनी केलेली मदत सुद्धा प्रशासनाला कळवावी अशा सूचना देशभ्रतार यांनी दिल्यात. 

या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक शिवकुमार मुद्देमवार, शेखर शेंडे, प्रवीण हिवरे, आर के शर्मा, पी एम जावदंड, आर बी वैरागडे, प्रसाद कुकेकर, विवेक पाटील, आयुष सिंघनिया, दिलीप गायकवाड, बी एस शहाणे आदी उद्योजक उपस्थित होते.

                                                 0000000

Friday, 9 July 2021

 




प.क्र-505                                                                     दि.09.07.2021

रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन वर्धा जिल्हा अपघातमुक्त करावा

                                   - खासदार रामदास तडस

       वर्धा जिल्हयात सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय  महामार्गाच्या माध्यमातुन  अनेक  मोठे प्रकल्प  प्रगतीपथावर  आहे. वर्धा-आर्वी , आर्वी –तळेगाव,  वर्धा हिंगणघाट हॅव्रीट ॲनेवीटी  अंतर्गत  सार्वजनिक बांधकाम विभागाचे  कामे सुरु आहे.  या कामामध्ये  रस्ता सुरक्षा  विषयक बाबीची पुर्तता करण्यात येते किंवा नाही  याचे मुल्यांकन करुन अहवाल सादर करुन रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वर्धा जिल्हा अपघातमुक्त करण्याच्या सुचना  खासदार रामदास तडस  यांनी दिल्यात.

          केंद्र शासनाच्या अधिसुचनेनुसार  गठण झालेल्या संसद सदस्य  रस्ता सुरक्षा समितीची  बैठक खासदार रामदास तडस यांचे अध्यक्षतेखाली झाली यावेळी त्यांनी सुचना केल्या. बैठकिला जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धाचे  कार्यकारी अभियंता प्रकाश बुब, आर्वी कार्यकारी अभियंता सुनिल कुंभे, राष्ट्रीय महामार्गाचे नागपूर राजन पाला, अमरावतीचे एम.एच.राठोड,यवतमाळचे चंदनसिंह बायस, अशोक वनकर, वसंत नाल्हे, अंकुश  केने, औरंगाबादचे बी.एस.कसबे, वाहतुक पोलिस निरिक्षक राजेश कडू, महामार्ग जामचे वाहतुक पोलिस निरिक्षक, अशासकिय सदस्य किरण उरकांदे,  प्रणव जोशी,  शिरिष  भांगे आदी उपस्थित होते.

           संसद सदस्य  रस्ता सुरक्षा समितीच्या अधिसुचनेतील तरतुदीनुसार   वर्धा जिल्हयात  स्वतंत्र वाहतुक पार्कची निर्मिती  करावी, युवकांमध्ये  अपघात  टाळण्याकरीता   जनजागृती करावी  व नव्याने  घोषित करण्यात आलेल्या जालना ते पुलगाव  महामार्गाचे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून  आडिट करुन  उपाययोजना  कराव्या याबाबत श्री. तडस यांनी सुचना केल्या केल्या. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी  जाहिर सभेत  घोषित केलेल्या  हिंगणघाट  शहरातून  जाणा-या  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर (जुना) उडान पुल बांधण्याकरीता  समितीमध्ये एक मताने ठराव करुन कलोडे चौक व  अशोक हॉस्पीटल चौक या स्थळाची  तातडीने  दुरुस्ती करण्याबाबत  भारतीय राष्ट्रीय राजमार्ग  प्राधिकरण नागपूर यांचे ठराव पाठविण्यात आले व सोबतच  जिल्हयातील 32 ब्लॅक स्पॉट  दुरस्तीबाबत  एक मताने  निर्णय घेण्यात आला.

          रस्ते अपघात टाळण्याकरीता  सर्व विभागांनी समन्वयाने  कार्य करुन   रस्ते सुरक्षा उपाययोजनाचे तंतोतंत पालन करावे याबाबत  व विशेष करुन  पावसाच्या दिवसात विशेष काळजी  घेण्याच्या सुचना  जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी अधिकारी वर्गांना दिल्यात.

          यावेळी  अशासकिय सदस्य  किरण उरकांदे व प्रणय जोशी यांनी सुध्दा रस्ता सुरक्षाबात आपल्या समस्या मांडल्या.

          बैठकिला शिक्षण विभागाचे  सुनिल कोहळे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. नितीन निमोदिया यांची उपस्थिती होती.

                                                0000

 




उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बापूकुटीला दिली भेट

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी  सेवाग्राम येथील बापूकुटीला  भेट देऊन आश्रमाची  पाहणी केली व प्रार्थनेत सहभागी झाले. यावेळी त्याचे सोबत माजी खासदार अनंत गुढे,  शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल देवतारे आदी उपस्थित होते.   सर्वप्रथम सेवाग्राम आश्रमप्रतिष्ठानचे मंत्री मुंकुद मस्के यांनी  उदय सामंत यांचे सुतमालेने स्वागत केले.

 




प.क्र-505                                                                     दि.09.07.2021

व्हेंटिलेटर्सचा आरोग्य यंत्रणेने योग्य उपयोग करावा

                                -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत 

Ø जिल्ह्याला मिळाले तीन व्हेंटिलेटर्स

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने राज्यात प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक व्हेंटिलेटर्स वाटप करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने या व्हेंटिलेटर्सचा योग्य उपयोग करावा, कोणत्याही इतर खाजगी रुग्णालयांना ते हस्तांतरित करू नये  अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्हेंटिलेटर्स लोकार्पण प्रसंगी दिल्यात. 

           जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ सचिन तडस यांना  मंत्री उदय सामंत यांनी 3 व्हेंटिलेटर्स वितरित केले. यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, माजी खासदार अनंत गुढे, शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल शिवतारे, प्रशांत शहागडकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नाईक उपस्थित होते.

          यावेळी श्री सामंत म्हणाले, मुख्यमंत्री राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्याशी समनव्य ठेऊन कोरोनाचा लढा देत आहेत. वर्धा जिल्ह्याचा कोरोनाच्या काळातील पॉझिटिव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा पुढे गेला होता. तो आता 5 टक्क्यांच्या आत आहे. कोरोना रुग्ण व्हेंटिलेटरवर जाऊ नये यासाठीच डॉक्टरांनी प्रयत्न करावेत असेही ते म्हणाले.

दुसऱ्या लाटेचा जसा आपण सामना केलात तशीच तयारी तिसरी लाट येणारच नाही यासाठी केली पाहिजे. तिसरी लाट ही लहान मुलांना जास्त बाधित करणार आहे असे तज्ञांचे मत आहे.  याला प्रतिबंध करताना आपण पूर्वीपासूनच तयारीत असले पाहिजे अशी महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रशासनसोबत काम करताहेत.

वैद्यकीय सेवा केवळ मेट्रो सिटी मध्ये पोहचुन उपयोगाची नाही तर ती राज्यात सर्व जिल्ह्यात पोहचली पाहिजे हा उद्देश मुख्यमंत्री महोदयांचा आहे.  त्यासाठी पक्ष म्हणून आम्हीही प्रयत्न करीत आहोत असेही श्री सामंत यांनी सांगितले. 

                                                          0000000000

Thursday, 8 July 2021

 







प.क्र-505                                                                     दि.08.07.2021

मुख्यमंत्री महा आरोग्य कौशल्यविकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन

जिल्ह्यात पाहिल्या टप्प्यात 240 प्रशिक्षणार्थींना मिळणार प्रशिक्षण

आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध

     वर्धा, दि 8 जुलै (जिमाका):- राज्यामध्ये कोविड १९ या साथीच्या आजारावरील रुग्णावर उपचार करण्यासाठी आवश्यक असणा-या पॅरामेडीकल क्षेत्रातील प्रशिक्षित मानव संसाधणाची तीव्र कमतरता जाणवत असुन या क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे राज्यस्तरीय उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते आज दुरदृश्य प्रणालीद्वारे पार पडले.

जिल्ह्यात विनोबा भावे रुग्णालय सावंगी मेघे, जिल्हा सामान्य रुग्णालय वार्ध आणि उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथून या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन  करण्यात आले. यावेळी सावंगी येथे दीप प्रज्वलन आणि प्रशिक्षणार्थींना किट वाटप करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, आचार्य विनोबा भावे रुग्णालयाचे व्यवस्थापक   अभ्युदय मेघे, डॉ महाकाळकर, भाग्यश्री वाघमारे उपस्थित होते तर जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सचिन तडस उपस्थित होते.

जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे होम हेल्थ एड, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट व आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय, सावंगी मेघे, येथे इमरजेंसी मेडिकल टेक्निशिएन या प्रशिक्षणासाठी  एकुण ६० उमेदवार उपस्थित होते.

जिल्ह्यात ४५० उमेदवारांनी विविध कौशल्य प्रशिक्षणासाठी नोंदणी केली असून यामध्ये 12 अभ्यासक्रम निश्चित करण्यात आले आहेत. यात होम हेल्थ एड, इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन, फ्लेबोटोमिस्ट, हॉस्पिटल फ्रंट डेस्क कॉर्डिनेटर, जनरल ड्युटी असिस्टंट, रुग्णवाहिका चालक, मेडिकल ड्रेसर, डायबेटीस असिस्टंट, इत्यादी प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा समावेश आहे. जिल्ह्यातील सावंगी मेघे वैद्यकीय महाविद्यालयासहित  एकूण 11 रुग्णालयांची प्रशिक्षण संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. यात जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, हिंगणघाट, आर्वी, ग्रामीण रुग्णालय सेलू, भिडी, देवळी, पुलगाव, आष्टी, समुद्रपूर, वडनेर आणि कारंजा रुग्णालयाचा समावेश आहे.

          या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमामुळे जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात आवश्यक असे कुशल मनुष्यबळ निर्माण होईल आणि कोरोना सारख्या महामारीच्या काळात इतर क्षेत्रात रोजगार कमी झाले असताना  आरोग्य क्षेत्रात तरुणाना रोजगाराच्या नवीन संधी प्राप्त होणार आहेत.

        यावेळी मुख्यमंत्री यांनी कार्यक्रमाचे उदघाटन करुन सर्वांना मार्गदर्शन केले. सदरउद्घाटनीय कार्यक्रमास मुंबई येथून उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेबथोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कौशल्य विकास रोजगार वउद्योजकता मंत्री  नवाब मलिक, आरोग्य मंत्री राजेश टोपे,वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख,  कौशल्यविकास रोजगार व उद्योजकता  राज्यमंत्री शंभुराज देसाई,  सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकिय शिक्षण राज्यमंत्री  राजेंद्र पाटील-यड्रावकर उपस्थित होते.

                                                00000

Friday, 11 June 2021

 







                 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सरपंचांशी संवाद

            सरपंचांनी राबवलेल्या अभिनव संकल्पनांचे केले कौतुक

Ø वर्धा जिल्ह्याच्या रसुलाबाद येथील सरपंचांना मिळाली मुख्यमंत्र्यांशी संवाद करण्याची संधी

Ø गावातील प्रत्येकाची आरोग्य तपासणी केल्याने गाव कोरोनामुक्त करण्यात मिळाले यश

      वर्धा, दि 11 जून (जिमाका):-  गावातील प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी, तरुण मुलामुलींचे आरोग्य सेवक पथक, गावातील निर्जंतुकीकरण आणि गावातीलच पण मोठया शहरांमध्ये सेवा देणा-या दोन तरुण डॉक्टर मुलांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने रसुलाबाद गाव आज कोरोनामुक्त करण्यात यश मिळाले अशी महिती रसुलाबादचे सरपंच राजेश सावरकर यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना दिली.

           आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर,अमरावती आणि औरंगाबाद महसूल विभागातील सरपंचांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील एका सरपंचांकडून त्यांनी त्यांच्या गावात कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी केलेल्या  उपाय योजनांची माहिती जाणून घेतली. 

          यावेळी सरपंच राजेश सावरकर यांनी रसुलाबादची लोकसंख्या 3781 असून 1035 कुटुंब आहेत असे सांगून यांनी पहिल्या लाटेत  कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समजताच गावाने सर्वानुमते बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी गावबंदीचा निर्णय घेतला. पण त्याचबरोबर गावातील प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी करून घेतली. गावात तरुण मुलामुलींचे 50- 50 व्यक्तींचे दोन गट स्थापन करून त्यांना गावातील प्रत्येकाच्या घरी कोण आजारी आहे  याची विचारपूस करण्याची जबाबदारी सोपवली.

        रसुलाबाद येथील दोन डॉक्टर मुलांचे मार्गदर्शन खूप महत्वाचे ठरल्याचे यावेळी सावरकर यांनी सांगितले. गावातील आशा , अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि शिक्षकांनी त्यांची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली.  गावात दुसऱ्या लाटेत 35 रुग्ण होते. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला. आज गावात कुणीही कोरोना रुग्ण नाही असेही त्यांनी सांगितले.

        कोरोना लसीकरणाबाबत गावातील लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करून गावात 75 टक्के लसीकरण करून घेतले. त्याचबरोबर कोरोना काळात रक्तदान आणि प्लाझ्मादान करण्यासाठी सुद्धा लोकाना प्रोत्साहित केले असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आभार मानले.

         मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी सरपंचाना  मार्गदर्शन करताना म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व सरपंचांचा मला अभिमान असून त्यांनी मुख्यमंत्र्यांना आपलेपणाने नेहमीच सहकार्य केले आहे. सर्व सरपंचांनी कोरोना कालावधीत उत्तम काम केले असून त्यांनी राबविलेल्या अभिनव संकल्पनासाठी त्यांचे अभिनंदन केले. मात्र यापुढेही गावात कोरोनाला प्रवेश द्यायचा की नाही ते आपणच ठरवायचे आहे. आता कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे असे समजून आपण   गाफील राहू नये. कोरोना हा बेसावध असतानाच गाठतो.  त्यामुळे रुग्णसंख्या थोडीही वाढली तरी लगेच उपाययोजना सुरू करा. गावातील प्रत्येक वस्तीमध्ये टीम करून त्यांना घरे वाटून प्रत्येकाची विचारपूस करायला सांगा. चाचण्यांची संख्या कमी करू नका. पावसाळा सुरू झाल्यामुळे साथीचे आजार वाढतील त्यामुळे त्याकडेही लक्ष द्या. 

         लसी उपलब्ध होतील तसा लसीकरणाचा वेग वाढेल. पण लस घेतळ्यामुळे कोरोना होणार नाही असे समजू नका. पण लस घेतल्यामुळे कोरोना तुमच्यासाठी घातक ठरणार नाही. मास्क हीच आपली या शत्रूशी लढण्यासाठीची ढाल आहे. त्यामुळे मास्क, हाताची स्वच्छता आणि शारीरिक अंतर या त्रिसूत्रीचा कायम अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि औरंगाबाद येथून महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही मार्गदर्शन केले.

          यावेळी वर्धा जिल्ह्यातून जिल्हाधिकारी कार्यालयातून  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, आर्वी तालुक्यातील रसुलाबादचे सरपंच राजेश सावरकर आणि सेलू तालुक्यातील  कोटंबा गावच्या सरपंच रेणुका कोटंबकर सहभागी झाल्या होत्या.

                                0000