Saturday, 26 January 2019










               राज्य शासन शेतक-यांच्या पाठीशी
-         प्रकाश महेता
Ø प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
Ø विविध पुरस्काराचे वितरण

   
        वर्धा, दि. 26 :  राज्य शासन वर्धा जिल्हयाच्या विकासासाठी अनेक प्रकल्प राबवित आहे. विकासाची फळे शेवटच्या घटकापर्यंत पोहचावित असे प्रत्येक राज्यकर्त्याला वाटत असते. राज्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांच्या अडचणी वाढल्याची जाणिव शासनालस असून राज्य शासन कायम शेतक-यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहिल, असे प्रतिपादन राज्याचे गृह निर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी केले.
          भारतीय प्रजासत्ताकाच्या 69 व्या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या मुख्य शासकिय ध्वजारोहण प्रसंगी जनतेला संबोधित करतांना ते बोलत होते.
जिल्हा क्रिडा संकुल येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, जिल्हा पोलिस अधिक्षक बसवराज तेली,  अपर जिल्हाधिकारी संजय दैने, अपर पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी उत्तम दिघे यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रकाश महेता यांनी  परेड निरिक्षण करुन सर्व स्वातंत्र संग्राम सैनिक आणि शहिदांना विनम्र  अभिवादन करुन  उपस्थित नागरिकांना  शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी गृह विभाग, होमगार्ड, एन.सी.सी., स्काऊट, गाईड पथकांनी पथसंचलन  करुन मान्यवरांना मानवंदना दिली. तसेच  सामान्य रुग्णालयातर्फे  प्रधानमंत्री मातृत्व  योजनेवर उत्कृष्ट झाकी ,  आपात कालीन वैद्यकिय सेवा,  पोलिस विभागाचे श्वान पथक, दंगल नियंत्रण व वज्र वाहन पथक, स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचा चित्ररथ आदी चित्ररथाव्दारे जनजागृतीपर संदेश देण्यात आला. 
यावेळी पुढे बोलतांना श्री. महेता म्हणाले, यावर्षी कमी पाऊस पडल्यामुळे शासनाने राज्यात 151 तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित केला असून दुष्काळावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.वर्धा जिल्हयातही तीन तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असून या ठिकाणी पिण्याचे पाणी आणि  जनावरासाठी चा-याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणुन प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले आहे.

          जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असलेला देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. आपण साजरा करीत असलेला प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव असून विविध प्रयत्नांमुळे आपली लोकशाही अधिकाधिक मजबूत होत असल्याचे श्री महेता म्हणाले.  लोकशाही विकेंद्रीकरणाची कास धरणा-या राष्ट्रपिता महात्मा गांधींचे 150 वे जयंती वर्ष साजरे होत असतांना त्यांच्या स्वप्नांची पुर्तता करणा-या 73 व 74 व्या घटना दुरुस्तीचे सुध्दा हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे  वर्षभरात  व त्यापुढे होणा-या सर्व निवडणूकांमध्ये सर्व मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून सहभाग घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री. महेता यांनी केले.
          राज्य शासनाने जिल्ह्यातील विकास कामांना प्राधान्य दिले आहे. गांधी जिल्हा म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करण्यासाठी सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून सेवाग्राम , पवनार व वर्धा या तीन गावांत पर्यंटनाच्या दृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहे. यासोबतच विदर्भातील दळणवळणाच्या सुविधेसाठी नागपूर-वर्धा -तुळजापूर रस्त्याचे चौपदरीकरण, शहरातील  अंतर्गत रस्ते , वर्धा बसस्थानकाचे आधुनिकीकरण व नुतणीकरण, जिल्हाधिकारी कार्यालय आणि कृषि कार्यालयाच्या नविन इमरातीचे भूमीपूजन, भूयारी गटार योजना, पाणी पुरवठा योजना   अशा अनेक आघाड्यांवर जिल्हयातील विकास कामांना गती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.  
          वृक्षलागवड अंतर्गत वन विभागाच्या 154 हेक्टर झुडपी जागेवर 20 ठिकाणी ‘ऑक्सीजन पार्क’ हा नाविण्यपूर्ण प्रकल्प राबविण्यात येत आहे. वर्धा जिल्हयाचे ऑक्सीजन पार्कचे मॉडेल राज्यभर राबविण्याचा मानस वन मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले.
         
    जिल्हाधिकारी  यांनी जिल्हयात राबविलेल्या नाविण्यपूर्ण व रोजगारभिमुख प्रकल्पाची राज्य शासनाने राज्यस्तरावर दखल घेतली असून  यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणुन निवड केली आहे. या  उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे अभिनंदन केले.
          यावेळी मंत्रिमहोदयाचे हस्ते उत्कृष्ट पथसंचलनाचा पुरस्कार एन.सी.सी. कॅडेट देवळी, जे.बी. सायन्स कॉलेज आणि महिला पोलिस पथक यांना देण्यात आला.  चित्ररथामध्ये पोलिस श्वान पथक, वृक्ष लागवडीचा संदेश देणारे सायकल स्वार श्री. अडसूड तसेच स्वच्छतेचा संदेश देणारा नगर परिषद विभागाचा चित्ररथ याशिवाय सांस्कृतिक सादरीकरणामध्ये  पिपरी येथील  अग्रग्रामी शाळा,  गो.से. वाणिज्य महाविद्यालय व न्यु. इंग्लीश  शाळेच्या चमूला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
          यावेळी विविध विभागाचे वतीने देण्यात येणा-या पुरस्काराचे वितरणी करण्यात आले यामध्ये जिल्हा स्तरीय लघु उद्योजक पुरस्कार हिंगणघाट येथील मे. गोलछा बायोसायन्स प्रा.लि. आणि मे. कलोडे अग्रो. इंडस्ट्रिज  देवळी यांना प्रथम व व्दितीय पुरस्कार देण्यात आला. तर भारत स्काऊट गाईड चळवळी अंतर्गत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त गाईड व हिरकापंख प्राप्त बुलबुल यांना मंत्री महोदयाचे हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच यावेळी केरळ राज्यात पुर परिस्थतीमध्ये उत्कृष्ट वैद्यकिय सेवा दिलेल्या वैद्यकिय चमूला , क्रिडा क्षेत्रात संघटक , प्राविण्य प्रात्प खेळाडू , माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभार्थ्यांना मुदती ठेव प्रमाणपत्र ,आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांना प्रशस्ती प्रमाणपत्र, संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना रोख पारितोषिक, पोलिस उपअधिक्षक अभय वानखेडे यांना विशेष सेवा पदक तसेच निखिल शेंडगे यांना मंत्रिमहोदयाचे हस्ते दिव्यांग व्यक्ती प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
          यावेळी स्वातंत्र्य संग्राम सैनिक , मोठया संख्येने शालेय विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अतुल राजपायले यांनी केले.
                                                0000

Saturday, 5 January 2019










गुणवंत शेती करायला लागतील तेव्हा शेती उद्योगाला प्रकाशवाट मिळेल
                                             - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
- कृषी महोत्सवाचे उदघाटन

-

          वर्धा दि 5 (जिमाका ) :- नोकरी सोडून जेव्हा अनेक गुणवंत विद्यार्थी शेती करायला  तयार होतील तेव्हाच शेतीतील अंधाराला प्रकाशाची वाट मिळेल. शेतीतील उत्कर्षाची ती नांदी असेल आणि लालबहादूर शास्त्रींनी दिलेला जय जवान जय किसान चा नारा तेव्हाच खऱ्या अर्थाने पूर्णत्वास जाईल, असे प्रतिपादन अर्थ, नियोजन व वन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार  यांनी केले.
 
         पोलीस मैदान येथे कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
  5 दिवस चालणारया कृषी महोत्सवाचे उदघाटन श्री मुनगंटीवार यांचे हस्ते झाले, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार रामदास तडस, आमदार रामदास आंबटकर, आमदार डॉ पंकज भोयर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कांचन नांदूरकर,  नगराध्यक्ष अतुल तराळे
कृषी सभापती मुकेश भिसे, शिक्षण व आरोग्य सभापती
  जयश्री गफाट, सुनीता कलोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, पंचायत समिती सभापती नीता गजाम , वर्धा पंचायत समिती सभापती महानंदा ताकसांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
            यावेळी बोलताना ते म्हणाले की,कृषी विद्यापीठांनी राजुरी विद्यापीठासारखे अडीच एकरात साडेचार लाख उत्पन्न मिळवून देण्याचे संशोधन करावे. यासाठी पाहिजे तेवढा निधी बजेट मधून देण्यात येईल. राज्याच्या तोजोरीवर शेतकऱ्याचा पहिला हक्क आहे. त्यामुळे शेती उदयोग फायद्याचा करण्यासाठी असे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचवीणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
       शेतीच क्षेत्र जे पूर्वी सरासरी 4. 28 हेक्टर होतं ते आता 1.44 हेक्टर एवढं कमी झालं आहे. त्यातही बहुपिक पद्धती संपुष्टात आली असून अधिक उत्पन्न घेण्याच्या नादात आपण शेतीला विषयुक्त केलेलं आहे. त्यामुळे शेतीला विषमुक्त, करण्यासाठी सेंद्रिय शेतीची नितांत गरज आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा देशात सेंद्रिय शेतीसाठी पदम पुरस्कार देण्यात आला. मातीची सेवा केल्याशिवाय त्यातून सोन निघू शकत नाही हे सांगताना ते म्हणाले की, जगात कितीही शोध लागले तरी शेतीशिवाय अन्नधान्याचा पिकवण्याचा शोध अद्याप लागलेला नाही. त्यामुळे जगाचे पोट भरण्याची ताकद फक्त आणि फक्त शेतकऱ्यांमध्ये आहे.
त्यामुळे शेतकऱयांनी सुद्धा जे जगाच्या बाजारात विकू शकतो त्याचे उत्पादन घ्यावे असे आवाहन केले.  भूमातेची सेवा करणारया  शेतकऱ्यासाठी हा कृषी महोत्सव धन प्राप्त करणारे पर्व ठरावे अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. श्री मुनगंटीवार यांनी यावेळी महित्सवात लागलेल्या स्टॉलची पाहणी केली.
        यावेळी बोलताना खासदार रामदास तडस म्हणाले,  नाशिकच्या धर्तीवर विदर्भातील शेतमाल एक्स्पोर्ट करायला हवा.  फळबाग लावण्यासाठी प्रोत्साहित करून विदर्भातील शेतकरी सधन करण्याचे काम होत आहे. नाविन्यपूर्ण योजनेतून 'गोट मार्केट' ला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 
         कृषी महोत्सवाची सुरुवात अर्थमंत्र्यांनी केली असे डॉ पंकज भोयर म्हणाले. मागील वर्षी जाहीर केलेल्या कृषी भवनाचे आज  भूमिपूजन झाले. यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उओलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले. पाटील यांचे सीताफळ अंबानी विकत घेतात पण कृषी विभागालाच याची माहिती नाही . शेतकऱ्यांच्या समस्यांची गंभीरपणे दखल घेतली जात नाही.याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.  कामचुकार अधिकाऱ्यांकडे संपूर्ण विभाग बदनाम होत असतो असेही ते म्हणाले.  शेतकरी आत्महत्येचा जिल्ह्याला लागलेला कलंक पुसण्याचे काम अधिकाऱयांनी करावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
 
           यावेळी सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱयांचा पुरस्कार देण्यात आला यामध्ये विक्रमी सीताफळाची उत्पादन घेणारे  समुद्रपूर तालुक्यातील हळदगाव येथील  सुरेश पाटील, पवनारचे कुंदन वाघमारे  सुल्तानपूर हिंगणघाट चे रतनलाल बोरकर, भाजीपाला व फुलशेतीमध्ये  जया उघडे यांना  प्रथम क्रमांकाचे  पारितोषिक, सुधाकर शेंडे धानोली गावंडे, गोपाळ वाघमारे सेंद्रिय शेतीसाठी  सविता येळणे,  श्रीकांत  सर्वाधिक कापुस उत्पादन घेणारे  येरणगाव येथील महेश मुधोळकर यांना प्रथम पुरस्कार देण्यात आला. तसेच गुलाबीबॉण्डअळींचे व्यवस्थापन , विविध पिकांवरील रोगांचे व्यवस्थापन  आणि  कृषी विषयक योजनाची माहिती देणाऱ्या माहिती  पुस्तिकेचे  विमोचन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  यांनी केले. महोत्सवाला शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


000






देश निर्मितीत बांधकाम कामगाराचा वाटा मोठा
                                             सुधीर मुनगंटीवार
Ø बांधकाम कामगार नोंदणी मेळावा
वर्धा , दि. 05 : देश निर्मितीत बांधकाम कामगाराचा वाटा मोठा आहे. यासाठी देशाच्या निर्माणासाठी घाम गाळणा-या कामगारासाठी शासन विविध योजना राबवित आहे. गेल्या चार वर्षात शासनाने या येाजनेत दुप्पट वाढ केलेली असून यामुळे कामगार मंडळाकडे कामगारांच्या नोंदणीत सहापट वाढ झालेली आहे.  या नोंदणीधारक कामगारांना  विविध योजनेचा लाभ देण्यात येत असल्याचे  वित्त, नियोजन व वन मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज बांधकाम कामगाराच्या मेळाव्यात केले.
आज सार्वजनिक ग्रंथालयाच्या  सभागृहात आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमानी बांधकाम कामगारा संघटनेच्या वतीने आयोजित बांधकाम कामगार मेळाव्याला  इमारत व बांधकाम कामगार मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, खासदार रामदास तडस,  जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, आमदार, डॉ. पंकज भोयर, आमदार समिर कुणावार, आमदार रामदास आबंटकर,  माजी खासदार दत्ता मेघे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, नगर परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप ठाकूर यांची उपस्थिती होती.
 
शासनाने सत्तेत आल्यावर प्रथम मंत्र्याच्या वाहनावरील लाल दिवे हटवले. लाल दिव्यावर प्रेम करण्यापेक्षा   लाल रक्ताच्या माणसाला विकासाच्या मुख्यप्रवाहात आणणे  हे उद्दिष्ट ठेवले. यासाठी शासन दिनदुबळे, कष्ठकरी, सामान्य माणूस हा केंद्र बिंदू  समजून  राज्य शासन योजना  राबवित आहे. बांधकाम कामागारांनी महामंडळाकडून ‍मिळालेल्या पैशाचा सदुपयोग केला पाहिजे. कारण हा  पैसा मेहनतीचा आणि कष्टाचा आहे, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले, बांधकाम कामगारांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत  निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे यावेळी श्री. मुनगंटीवार म्हणाले. 
यावेळी मंत्रीमहोदयांना जिल्हयातील कामगार संघटनानी  जिल्हयात कामगार भवन उभारण्यात यावे तसेच कामगारांना पेंशन लागु करावी अशी मागणी केली असता श्री. मुनगंटीवार यांनी कामगार भवनाची मागणी पूर्ण करुन  कामगार भवनासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. या कामगार भवनामध्ये  कामगाराच्या मुलांना  शिक्षण, संगणक, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र तयार करण्यात येईल अशी  ग्वाही  यावेळी दिली. तसेच पेंशन बाबत  केंद्र पेंशन कायदयानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात पुर्वी 2 लाख बांधकाम कामगाराची नोंदणी होती. गेल्या चार वर्षात आता 13 लाख नोंदणी झालेली असून या नोंदणी करण्यात आलेल्या सर्व बांधकाम कामगार व त्याच्या पाल्यांना महामंडळाकडून विविध योजनेचा लाभ देण्यात येत असल्याचे श्री यादव म्हणाले.
यावेळी मान्यवरांचे हस्ते 500 बांधकाम कामगारांना निधीचे प्रमाणपत्र देण्यात आले.
                             00000



Thursday, 3 January 2019








चार वर्षांत राज्य शिक्षणात तिसऱ्या क्रमांकावर
  शिक्षणमंत्री विनोद तावडे
Ø शिक्षणाची वारीचे थाटात उदघाटन
Ø  100 आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करणार
Ø  गोंदिया हा शाळाबाह्य विद्यार्थी जिल्हा घोषित
Ø  राज्य शासन ओपन बोर्ड सुरू करणार
           वर्धा, दि 3 जिमाका :-  कोणतंही मुलं नापास होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखायला आपण कमी पडतो आणि म्हणून आपल्या सोयीसाठी त्याच्या कपाळावर नापास चा शिक्का मारतो.  विद्यार्थ्याना  कौशल्यावर आधारित प्रशिक्षित करण म्हणजे शिक्षण अस मानून राज्य शासन शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवित आहे. त्याचा परिणाम म्हणजे 4 वर्षात  राज्य शिक्षणाच्या बाबतीत देशात 16 व्या क्रमांकावरून 3  क्रमांकावर आले आहे आणि यावर्षी ते प्रथम क्रमांकावर राहील.विद्यार्थी घडविणे हा मूळ उद्देश असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले.
      आज वर्धा येथिल  चरखा घर येथे आयोजित  'शिक्षणाची वारी'  या उपक्रमाचे  उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार डॉ. पंकज भोयर, समीर कुणावर, विभागीय आयुक्त संजीव कुमार , शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी,  जिल्हाधिकारी शैलेश नवाल, नगराध्यक्ष अतुल तराळे,जिल्हा परिषद उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, शिक्षण व आरोग्य सभापती  जयश्री गफाट, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, पंचायत समिती सभापती महानंदा ताकसांडे शिक्षण विभागाचे संचालक सुनील मगर उपस्थित होते.
      राज्यात शिक्षण क्षेत्रात विविध गुणात्मक बदल केल्यामुळे अनेक शिक्षकांनी त्याचे  स्वागत करून ते राबविल्यामुळे आज शिक्षणात गुणात्मक बदल दिसतोय. वर्धेत 1 हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून जिल्हा परिषद शाळेत आणण्याचा काम जिल्हा परिषद शिक्षकांनी केले आहे. हा त्या जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढली आहे याचा परिणाम असून यावर श्रेय शिक्षकांना जातेयं असे श्री तावडे यावेळी म्हणाले. इंगजीतून शिक्षणाला विरोध नाही हे स्पष्ट करताना ते म्हणाले की मराठी भाषा  ही डोळे असून इंग्रजी भाषा  ही चष्मा आहे. त्यामुळे दृष्टी असल्याशिवाय  दूरदृष्टी येणार नाही म्हणून मातृभाषेतून शिक्षणाला त्यांचा नेहमीच पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
 
          जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांची शोक्षणातील प्रगती वाढावी म्हणून स्वखर्चाने विविध उपक्रम राबविले.त्यांना शाबासकी देण्यासाठी आणि त्यांचे प्रयोग राज्यभर पोहचून इतर शाळांनी तसेच उपक्रम राबवून राज्याला शैक्षणिक दृष्ट्या प्रगत करावे, यासाठी शिक्षणाची वारी हा उपक्रम सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात 64 हजार शाळा शिक्षक आणि लोकप्रतिनिधिंच्या च्या लोकवर्गणीतून डिजिटल झाल्या आहेत. आता केंद्र शासन देशातील 15 लाख शाळांमध्ये डिजिटल बोर्ड हा उपक्रम सुरु करणार आहे. राज्य शासन नापास विद्यार्थ्यांसाठी वन टू वन करिअर समुपदेशन करून त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन देत आहे. घोकंपट्टी परीक्षा पद्धतीमुळे महाराष्ट्र संशोधक तयार करण्यात कमी पडले आहे. त्यामुळे मागील 4 वर्षांपासून इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचा अभ्यासक्रम बदलला आहे. तसेच यापुढे विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात शिक्षकाची उपलब्धता होणार असल्यामुळे शिक्षकांना विविध उपक्रम राबविण्यासाठी वेळ मिळेल असेही त्यांनी सांगितले.
 
     यावेळी विनोंद तावडे यांनी शिक्षक , विद्यार्थी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या शिक्षण विषयक प्रश्नांना उत्तरे दिलीत. यावेळी श्री विद्यामंदिर येथील विद्यार्थिनीने दफ्तराच्या ओझ्याचा प्रश्न उपस्थित केला तेव्हा श्री तावडे यांनी शाळेच्या मुख्याध्यापकाना यावर नियमांची अंमलबजावणी करण्यास  सांगितले.
100 आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करणार
       महाराष्ट आंतराष्ट्रीय शैक्षणिक बोर्डाची स्थापना करून राज्य शासनाने यावर्षी 13 शाळा सुरू केल्यात. पुढील वर्षात 100 शाळा सुरू करणार असल्याचे श्री तावडे यांनी सांगितले. याचा अभ्यासक्रम डॉ. रघुनाथ  माशेलकर,  डॉ काकोडकर, विजय भटकर, सोनम वांगचोक सारख्या शास्त्रज्ञानी तयार केला आहे असेही त्यानी यावेळी सांगितले.
ओपन बोर्डची स्थापना करणार
     काहीं विद्यार्थी संगीत, अभिनय, गायन ,खेळ यामध्ये रस असतो. पण शाळेमुळे त्यांना त्यांच्या या सुप्त गुणांवर लक्ष देता येत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांचे त्या- त्या क्षेत्रात उत्तम  करियर घडविण्यासाठी आणि शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी असे ओपन बोर्ड त्याला मदत करेल.
बालरक्षक चळवळ
      राज्यात बालरक्षक चळवळीच्या माध्यमातून कोणतेही मुलं शाळाबाह्य राहू नये यासाठी काम करीत आहे. या माध्यमातून गोंदिया जिल्हा हा शाळाबाह्य विद्यार्थी मुक्त जिल्हा झाला आहे असे श्री तावडे यांनी सांगितले.



         यावेळी आमदार पंकज भोयर आणि आमदार समीर कुणावर यांनीही वारीसाठी शुभेच्छा दिल्यात.
यावेळी अनटोल्ड स्टोरी या दिव्यांगाणी त्यांच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी केलेल्या यशोगाथेच पुस्तक प्रकाशन करण्यात आले. दीप्ती बेले या कान्हापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींचा दिपकाव्य कविता संग्रह, शुभांगी वासनिक यांच्या रत्नाची खाण आणि सार्थक जीवनासाठी संस्कार पार्व या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

      शिक्षणाची वारी मध्ये विविध शाळांचे 55 स्टॉल लावण्यात आले आहेत . 10 जिल्हे या वारीला जोडले असून 6 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या वारीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक सुनील मगर यांनी प्रस्ताविकातून केले. कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत यांनी तर आभार  शिक्षण उपसंचालक सतिश मेंढे यांनी  मानले.
                                                                        0000