Wednesday, 7 February 2018



          मोठेपणाचा मार्ग हा मृत्यूच्या मैदानातून जातो
                                                     - विष्णू सवरा
Ø  3 आदिवासी वसतिगृहाचे लोकार्पण
Ø  7 कोटी 52 लक्ष रुपये खर्च
Ø  375 विद्यार्थी क्षमता
Ø  50 हजार आदिवासी विद्यार्थी नामांकित शाळेत
वर्धा,दि7 (जिमाका)  :- आयुष्यात खूप पैसा, प्रतिष्ठा आणि नाव  कमवायचे असेल तर आलेल्या कोणत्याही संकटावर मात करण्याची इच्छाशक्ती असावी लागते. सुख मिळवण्यासाठी कष्ट करण्याची आणि शिकण्याची जिद्द ठेवा हा संदेश  विद्यार्थ्याना देताना आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी 'मोठेपणाचा मार्ग हा मृत्यूच्या मैदानातून जातो' असे प्रतिपादन  केले.
उमरी मेघे येथे आदिवासी मुलांचे जुने व नवीन शासकीय वसतिगृह आणि मुलींचे शासकीय वसतिगृहाचे लोकार्पण व साहित्याचे वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री सवरा उदघाटक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष म्हणून आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी,  आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त डॉ माधवी खोडे, जिल्हा परिषद सदस्य सरस्वती मडावी, उमरी मेघेच्या सरपंच संघमित्रा दखणे, प्रकल्प अधिकारी दिगांबर चव्हाण आदी मान्यवर  उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री सवरा म्हणाले,  आदिवासी विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी शासनामार्फत  आदिवासी विद्यार्थ्याना नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेश योजना राबवली जात आहे. या योजनेचा लाभ आज 50 हजार विद्यार्थी घेत आहेत. आदिवासी विद्यार्थ्याना शिक्षणासाठी सर्व सोयी सुविधा मिळाव्यात आणि चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे म्हणून सर्व आदिवासी शाळा आणि वसतिगृहे शासकीय इमारतीत आणण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. मागील दोन वर्षात राज्यात 206 इमारतीचे काम सुरू केले असून त्यापैकी 81 इमारती पूर्ण झाल्या आहेत. आदिवासी जनतेचा विकास हेच ध्येय ठेऊन शासन काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी सांस्कृतिक भवन उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, आणि लवकरच या जिल्ह्यातही असे भवन उभे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार पंकज भोयर यांच्या मागणीवरून त्यांनी सहायक प्रकल्प अधिकारी कार्यालयाला कर्मचारी वर्ग देण्याची मागणी मान्य केली.
आमदार पंकज भोयर यांनी वर्धा जिल्ह्यासाठी सहाय्यक आदिवासी प्रकल्प कार्यालय मंजूर केल्याबद्दल श्री सवरा यांचे आभार मानतांना या कार्यालयात पुरेसा कर्मचारी वर्ग देण्याची मागणी केली. प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी निवासी सैनिकी शाळा, नवरगाव या गावाप्रमाणेच जंगलातील गरमसुर या आदिवासी गावाचे सुद्धा आदर्श पुनर्वसन करावे ही मागणी केली.
अध्यक्ष नितीन मडावी यांनी सुद्धा जिल्ह्यात आदिवासी सांस्कृतिक भवन उभारण्याची आणि येथील मुलींच्या वसतिगृहाला संरक्षण भिंत उभारून देण्याची मागणी केली. शिवाय जिल्ह्यातला शबरी घरकुल योजनेचा लक्षांक 150 ने वाढवला यासाठी आभारही व्यक्त केले.
उमरी मेघे येथे 3  वासतिगृहासाठी 4 एकर जागा शासनाने उपलब्ध करून दिली असून बांधकामासाठी 7 कोटी 52 लक्ष रुपये निधी खर्च झाला आहे. आणखी एका इमारतीचे काम सुरू करायचे आहे.  उदघाटन झालेल्या तीनही वसतिगृहाची क्षमता प्रत्येकी 125 विद्यार्थ्यांची आहे. जिल्ह्यात एकूण 12 वसतिगृह असून त्यापैकी 7 वसतिगृह शासकीय इमारतीध्ये आहेत आणि उर्वरित भाड्याच्या इमारतीमध्ये सुरू आहे. सर्व वसतिगृहाची क्षमता 1155 विद्यार्थ्यांची असून 1054 विद्यार्थी सध्या प्रवेशित आहेत, अशी माहिती  प्रकल्प अधिकारी दिगंबर चव्हाण यांनी प्रास्ताविकात दिली.
यावेळी संस्कृती वाकडे या चिमुकलीने गणेश वंदना सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यासाठी तिचा सत्कारही करण्यात आला. तसेच  हिरापूर (तळणी) येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थिनींनी आदिवासी नृत्य सादर केले.   स्वाभिमान सबलीकरण योजना, तुषार संच पुरवठा, एच डी पी ई पाईप, ताडपत्री, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना,  नवीन विहीर खोदकाम, कृषी पंप इत्यादी योजनेचा लाभ थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा केलेल्या लाभार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. 
कार्यक्रमाचे संचालन जवाहर जोगळे यांनी केले. यावेळी प्रशांत बुले, निलेश किटे, राजू मडावी, चेतन पेंदाम, शिक्षक आणि वसतिगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                        00000




Monday, 5 February 2018



सेवा हक्क कायदयांतर्गत राज्यात2 कोटी 36 लाख अर्जावर निर्णय                                          
                                                   - स्वाधीन क्षत्रिय
Ø 21 लाख अर्ज ऑनलाईन
Ø जिल्हयात 2 लाख 77  हजार अर्जावर कार्यवाही

  वर्धा दि.5:-नागरिकांना शासनाच्या सर्व सेवा विहित मुदतीत मिळाव्या यासाठी सरकारने सेवा हक्क हमी कायदा  अंमलात आणला असून विविध विभागाच्या 438 सेवांचा यात समावेश आहे. या कायद्यांतर्गत राज्यात 3 कोटी 54 लाख अर्ज प्राधिकरणाला  प्राप्त झाले असून  यापैकी 2 कोटी 36 लाख अर्जांचा विविध विभागाने निपटारा केला आहे. वर्धा  जिल्हयात 2017- 18 या वर्षात विविध 16 विभागांकडे ऑनलाईन व ऑफलाईन असे एकूण  3 लाख 28 हजार  675 अर्ज सेवा हक्क हमी कायदयात प्राप्त झाले होते. त्यापैकी 2 लाख 77 हजार 280  अर्जाचा निपटारा विहित कालावधीत करण्यात आला आहे. सेवा हक्क हमी कायदा हा नागरिकांना सेवा पुरविण्यासाठी असून या कायदयाची योग्य अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी दिले.

आज राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ काँफरन्स घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भंडारा येथे जिल्हाधिकारी सुहास दिवसे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सेवा हक्क हमी कायद्यांतर्गत नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कायद्यात विविध 438 सेवांचा समावेश आहे. या कायदयाची जाणीव जागृती करण्याच्या सूचना क्षत्रिय यांनी  दिल्या.

 शासनाच्या या सेवांसाठी ऑनलाईन ऑफलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. यासाठी आपले सरकार व महाऑनलाईन या संकेतस्थळाचा वापर करता येईल. अर्जदाराला विहित मुदतीत सेवा पुरविण्याची जबाबदारी संबंधित विभागाची असणार आहे. सेवा पुरविण्यासाठी विलंब का झाला अथवा अर्ज नामंजूर का करण्यात आला याबाबत स्पष्ट कारण नमुद करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सेवा विलंबाने दिल्यास 500 ते 5 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाचे प्रावधान कायद्यात आहे.

या कायद्यांतर्गत राज्यभरात विविध प्राधिकरणाकडे 3 कोटी 54 लाख अर्ज प्राप्त झाले यापैकी 21 लाख 36 हजार नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. 2 कोटी 36 लाख अर्जावर प्राधिकरणाने वेळेत निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. प्रथम अपिलात 73 हजार 391 अर्ज  आले असून 44 हजार 482  अर्जावर निर्णय देण्यात आला आहे. द्वितीय अपीलात  4 हजार 920 अर्ज  आले असून 2  हजार 484 अर्जावर निर्णय घेण्यात आला आहे.  राज्यात आपले सरकारचे 16 हजार केंद्र आहेत तर 10 हजार ग्रामपंचायतीमध्ये सेतु केंद्र कार्यरत आहेत. या ठिकाणी सुध्दा नागरिक या कायद्यांतर्गत अर्ज करु शकतात.

प्राधिकरणाने  आलेल्या प्रत्येक अर्जाची पोच देणे आवश्यक आहे. यासाठी कायद्यात 3 प्रपत्र देण्यात आले आहे. त्याअंतर्गत माहिती नमूद असावी, असे ते म्हणाले. प्रथम व द्वितीय अपीलांचा निर्णय सुध्दा वेळेत घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अर्जाच्या नोंदीसाठी नोंदवहया ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. सेवा हक्क हमी कायद्यात  वेळेवर सेवा पुरविण्याचे कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना  प्रोत्साहनपर बक्षिस देण्याचे त्यांनी सुचविले. या कायद्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भात जिल्हास्तरावर नियमित आढावा घेण्यात यावा, असे ते म्हणाले. आपला विभाग व त्यामार्फत पुरविण्याता येणाऱ्या सेवा यांचा माहिती फलक प्रत्येक प्राधिकरणाने दर्शनिय भागावर लावावा.

सेवा हक्क आयोगाने rtsmaharashtra हे मोबाईल अॅप्लीकेशन तयार केले असून याद्वारे सुध्दा अर्ज करण्याची  सोय उपलब्ध आहे. या कायद्याचे प्रशिक्षण अधिकारी-कर्मचाऱ्यांना देण्यात यावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. सेवा हक्क हमी कायदा नागरिकांच्या सुविधेसाठी असून विहित मुदतीत सेवा न मिळाल्यास नागरिकांनी या कायद्यांतर्गत अर्ज करावा, असे आवाहन स्वाधीन क्षत्रिय यांनी केले.  
                                                                        0000 

Wednesday, 17 January 2018



लोकराज्यने रिअल हिरोची दखल घेतली
                                    -निर्मलादेवी एस.
वर्धा दि 17 :-  महाराष्ट्राच्या अदयावत पोलीस दलाचा आढावा घेणारा आणि पोलीस जवानांच्या उमेदीला उभारी देणारा लोकराज्यचा जानेवारीचा अंक  माहिती आणि जनसंपर्क विभागाने प्रकाशित केला आहे. याव्दारे सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी रात्रंदिन तत्पर असणा-या रिअल हिरोची दखल घेतली असून हा लोकराज्य अंक पोलीस विभागासाठी सन्मानाची बाब आहे. असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक निर्मलादेवी एस. यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने जानेवारी 2018 चा लेाकराज्य अंक स्मार्ट, समर्थ, संवेदनशिल ‘आपले पोलीस  आपली अस्मिता’ या विषयावर काढला आहे. या अंकाचे प्रकाशन जिल्हा पोलीस अधिक्षक निर्मला देवी एस. यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
लोकराज्यच्या या अंकात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर , महिला व बाल सुरक्षा, सायबर गुन्हे, सुरक्षित वाहतुक, दहशतवाद व नक्षलवादाचा बिमोड, या विषयी अतिशय उपयुक्त माहिती असून ती सर्वसामान्य नागरिकांना सुध्दा उपयोगाची आहे. पोलिस विभागासाठी असलेल्या योजना , पोलिसांना उच्च शिक्षणाची संधी, सायबर क्राईम म्हणजे नक्की काय? सायबर गुन्हयाचा पाठलाग, सायबर युगाची आव्हाने, गुन्हे सिध्दीचे शास्त्रीय तंत्र, या बाबतची माहिती हे या अंकाचे वैशिष्टय असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.
पोलीसांसाठीच नव्हेतर सर्वासामान्य नागरिकांसाठी हा अंक संग्राहय ठेवण्यासारखा आहे. यामध्ये महाराष्ट्र पोलीस सिटिजन  पोर्टल ॲप  बाबत माहिती दिली असून हे ॲप डाऊन लोड करुन आता नागरिकांना घरूनच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविता येऊ शकते. या ई- तक्रारीवर झालेल्या चौकशीची माहितीसुध्दा एस.एम.एस. व्दारे तक्रारदारास प्राप्त होते. त्यामुळे नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड करुन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच सर्व पोलिस कर्मचा-यांनी लोकराज्यचा हा  अंक वाचावा. असेही त्या यावेळी म्हणाल्या.
लोकराज्यचा हा अंक सर्व बुक स्टॉल तसेच जिल्हा माहिती कार्यालय येथे विक्रीस उपलब्ध आहे.
                                      0000





165 कोटी 75 लक्ष रूपयांचा जिल्हा विकास आराखड्यास मंजुरी
Ø जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न
वर्धा दि 17 :-  जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या जिल्हा नियोजन समितीची बैठक आज आमदार समीर कुणावर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये 165 कोटी 75 लक्ष रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजना  प्रारूप आराखड्यास  जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली. या आराखड्यात  जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 102 कोटी 4 लक्ष, अनुसूचित जाती उपयोजना 40 कोटी 48 लक्ष तर आदिवासी उपयोजना 23 कोटी 23 लक्ष रुपयांच्या  आराखड्याचा समावेश आहे.
येथील विकास भवन येथे आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकिला जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी,  आमदार सर्वश्री रणजित कांबळे, डॉ पंकज भोयर, अमर काळे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे तज्ञ सदस्य कपील चंद्रायन, मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, आदिवासी उपयुक्त श्री. सावरकर, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुरणे उपस्थित होते. यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या नव निर्वाचित सदस्यांचे स्वागत करण्यात आले.
जिल्हा वार्षिक योजनेमधून करण्यात येणारी कामे वेळेत पूर्ण करावीत. तसेच सर्व कामे दर्जेदार करावीत. या बैठकीत दिलेल्या सर्व सूचनांचे अनुपालन अहवाल पुढील बैठकीत देण्यात यावा अशा सूचना बैठकीचे अध्यक्ष आमदार समीर कुणावार यांनी दिल्यात.
2018- 19  च्या प्रारूप आराखड्यात  सर्वसाधारण योजनेमध्ये  कृषि व संलग्न सेवा यासाठी 22 कोटी 46 लक्ष 27 हजार रुपये, ग्रामीण विकास कार्यक्रम 13 कोटी 64 लक्ष 11 हजार, पाटबंधारे व पूर नियंत्रण, 3 कोटी 76 लक्ष, सामाजिक व सामूहिक सेवा 28 कोटी 16 लक्ष, ऊर्जा 1 कोटी 59 लक्ष उद्योग व खाणकाम 55 लक्ष, वाहतूक व दळणवळण 18 कोटी 30 लक्ष, सार्वजनिक बांधकाम 7 कोटी 85 लक्ष आणि इतर बाबींसाठी 5 कोटी 71 लक्ष रुपयांचा समावेश आराखड्यात करण्यात आला आहे.
2017-  18 या आर्थिक वर्षातील डिसेंबर 2017 पर्यंत 55 टक्के खर्च झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. तसेच यावेळी 30 टक्के कपात असल्यामुळे तिन्ही योजना मिळून  210 कोटीं रुपयांचा मंजूर आराखडा 140 कोटी रुपये करण्यात आला आहे. हा सर्व निधी मार्च पूर्वी खर्च करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीत शेतकऱयांच्या पीक विम्याची रक्कम बँकेने कपात केली  मात्र बँकेने ती संबंधित पीक विमा कंपनीकडे जमा केली नाही,  अशी प्रकरणे आढळून आल्यास संबंधित बँक अधिका-यांवर कारवाई करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. आदिवासी समाजासाठी आदिवासी सांस्कृतिक सभागृह बांधण्याचा प्रस्ताव जागेसह आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयाने शासनाकडे सादर करावा, अशा सूचना आमदार समीर कुणावार यांनी दिल्यात. ग्रामपंचायत भवन आणि यात्रास्थळे विकास कामांसाठी जिल्हा परिषदेला दिलेला निधी अद्याप खर्च केला नसल्याची बाब आमदार पंकज भोयर आणि रणजित कांबळे यांनी निदर्शनास आणून दिली.  यावेळी 31 मार्च पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्यात यावीत अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्यात.
झुडपी जंगल जागेवरील  अतिक्रमण काढून तिथे वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत वृक्ष लागवड करण्याच्या सूचना श्री. कुणावर यांनी दिल्यात.  धाम नदी पात्रात मोठ्या प्रमाणात बेशरम झाडे वाढली आहेत. याच नदीपात्रात पाणीपुरवठा योजनांचे स्रोत असल्यामुळे प्रदूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यावर नदी पात्राची सफाई  कंपनी सामाजिक दायित्व  निधीतून करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सोंडी गावांसाठी तातडीने पिण्याचे पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करून पुर्ण करावी अशा सूचना अध्यक्ष समीर कुणावर यांनी दिल्यात.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात आजपर्यंत 50 किलोमीटरचे पांदण रस्ते झाल्याची माहिती दिली. तसेच यासाठी 125 किलोमीटरसाठी मागणी नोंदवण्यात आली आहे. 15 फेब्रुवारीनंतर आणखी मागणी नोंदवल्यास पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येईल. यावेळी 20 बँक सखींना मिनी ए टी एम. मशीनचे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. या बैठकीला नव निर्वाचित सदस्य सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते