Thursday, 20 November 2014

मुलांच्या सुरक्षिततेसाठी हे आपल्याला माहित असायलाच हवं........
वर्तमान पत्राचे पान उघडल्यावर रोज काही ना काही मुलांच्या सोबत घडणाऱ्या घटनांविषयी आपल्याला वाचायला मिळतंय....आता तर... आपण हे सर्व दूरदर्शन वर लाईव पाहायला सुद्धा शिकलो आहोत...कधी मुलींची छेडछाड, कधी अपहरण कधी बलात्कार...तर कधी छोट्या अर्भकांना बेवारस सोडून देणं तर कधी मुलांच्या हक्कांविषयी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचे अभ्यासपूर्ण केस स्टडीज...आणि कधी कधी तर एखादा आशेचा किरण ज्यात सर्वस्वी मुलांच्या संरक्षणाचा विचार करीत घेत असलेल्या भूमिकांचा वेध.....हे सर्व आपल्याला वाचायला आणि बघायला मिळत आहे. मुळातच आपल्या सर्वांचा मुलांकडे बघण्याचा दृष्टीकोन आपण कसं विकसित करतो आहोत यावर बऱ्याचशा गोष्टी निर्भर आहेत.  आपण मोठी माणसे मुलांना काय समजतो ?  मुळात आपण मुलांना संरक्षित करण्यात आपली भूमिका स्पष्ट नसेल तर या आणि अशा प्रकारच्या शोषणाची मुलं बळी पडतात.  मुलांनी शोषणाचे बळी ठरू नये यासाठी जबाबदारी असते ती आपण सर्व मोठ्यांची ! मात्र मोठेच जर शोषण करीत असतील तर.....? तरीसुद्धा वेग वेगळ्या माध्यमातून मुलांचं संरक्षण करणाऱ्या व्यवस्थांची मदत घेत आपण मुलांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यायला हवा.
आजघडीला बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम २००० आणि संशोधन २००६ नुसार यातील कलम २ (ट) नुसार मुलं म्हणजे वयाची १८ वर्षे पेक्षा कमी वयाची व्यक्ती असा केलाय याचा अर्थ मुल म्हणजे १८ वर्षे पूर्ण होई पर्यंत त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपण सर्व मोठ्यांनी पार पडायला हवी.
मुलांचं सर्व-प्रथम संरक्षण करणं ही जबाबदारी कुटुंबाची.  पण सगळ्याच कुटुंबात मुल सुरक्षित राहातच असं आम्हाला म्हणायचे नाही...तरी सुद्धा सर्वच कुटुंबात मुलं असुरक्षित असतात असं नाही.ज्या कुटुंबात मुलं सुरक्षित नाही त्या कुटुंबातून मुल शासकीय व्यवस्थेकडे सुरक्षिततेसाठी सोपवता येते.  म्हणजेच कुटूंब सक्षम  नसेल तर संरक्षणाची जबाबदारी शासनाची.  यासाठी मुलांच्या दृष्टीकोनातून सर्वांगाने मुलांच्या विकासाची भूमिका निभावणाऱ्या शासकीय यंत्रणांची मदत घेता येते आणि जेंव्हा या दोन्ही यंत्रणा संरक्षणासाठी सक्षम नसतील तेंव्हा सर्वस्वी जबाबदारी ‘समाजाची’ ठरते.  यासाठीच समाजमन तयार करणे आणि मुलांच्या सुरक्षितते साठी भूमिका जास्त संवेदनशीलपणे निभावणे गरजेचं आहे.
हे सर्व आताच सांगण्याची गरज का हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे....बाल हक्कांची संहिता सर्व राष्ट्रांनी स्विकारून या वर्षी २५ वर्षे होत आहेत. २० नोव्हेंबर १९८९ रोजी संयुक्त राष्ट्र संघाने मुलांच्या अधिकाराविषयीच्या संहितेला मान्यता दिली होती. म्हणूनच २० नोव्हेंबर हा दिवस खऱ्या अर्थाने मुलांच्या अधिकाराचा दिवस ओळखला जातो.
मुलांच्या अधिकारांविषयी महाराष्ट्र शासन संवेदनशील आहे, म्हणूनच सर्वच्या सर्व जिल्ह्यात मुलांसाठी त्यांच्या संरक्षणासाठी विविध यंत्रणा उपलब्ध आहेत.  या यंत्रणा समजून घेऊन या यंत्रणांच्या सहकार्याने आपल्याला काय उपाय योजता येतील याची माहिती आपल्या प्रत्येक संवेदनशील नागरिकांना माहित होणं आवश्यक आहे.  यासाठी आपल्या जिल्ह्यात ‘बाल कल्याण समिती’ ज्या मध्ये ५ सदस्यांचा समावेश असतो. ही समिती जिल्ह्यातील सर्व काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या मुलांबाबत मुलांच्या हिताचे निर्णय घेणारी यंत्रणा आहे.या समितीला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे अधिकार आहेत.  या समितीचे आपल्या जिल्ह्यातील सदस्य कोण आहेत.  त्यांच्यासमोर आपल्या जिल्ह्यातील बळीत, दुर्लक्षित, मोठ्या माणसांच्या शोषणाचे बळी ठरलेल्या सर्व मुलांच्या केसेस कलम ३२ (बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम ) नुसार कुणीही घेऊन जाऊ शकतो. या बाल कल्याण समितीने आठवड्यातून किमान ३ वेळा नियोजित वेळेत आणि दिवशी आपली कार्यवाही करणे अपेक्षित आहे. मग शोध घ्या आपल्या जिल्ह्यात मुलांच्या संरक्षणासाठी  एव्हढी मोठी यंत्रणा कार्य करतेय कशी ? बाल कल्याण समिती चांगले काम करत असल्यास त्यांना सोबत करा, आणि करत नसल्यास त्यांना कामाला कसं लावता येईल हे पहा....! यंत्रणा माहित नाही म्हणून मुलांना असुरक्षित वातावरणात ढकलण्याचा किंवा ठेवण्याचा आपल्याला काहीएक अधिकार नाही. आणि हो...ही यंत्रणा आपल्या जिल्ह्याच्या बालगृहात / निरीक्षण गृहात बसत असते हे लक्षात असू द्यात....म्हणजे काम करणे सोप्पं होईल.
बाल कल्याण समितीच्या सोबतच आपल्या जिल्ह्यात बाल न्याय मंडळ कार्यरत आहे का ते पहाच ! या बाल न्याय मंडळाकडे गुन्ह्याचं कृत्य केलेल्या विधि संघर्ष ग्रस्त मुलांना पोलिस उभं करतात.  या बाल न्याय मंडळात ३ सदस्य असतात.  हे तीनही सदस्य खंडपीठ म्हणून विधि संघर्ष ग्रस्त मुलांसाठी निर्णय घेतात. विधि संघर्ष ग्रस्त मुलांना खरं तर कलम १२ नुसार पोलिस, पोलिस ठाण्यातच जामीन देऊ शकतात. या मुलांना संरक्षित करणं तेवढच महत्वाचे आहे.
याच सोबत आपल्या जिल्ह्यात जिल्ह्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ‘ बाल मजुरी निर्मुलन कृती दल’ स्थापण्यात आले आहे का ? याची माहिती घ्या, असल्यास या कृती दलाचे कोण सदस्य आहेत त्यांची नाव जवळ ठेवा. जेणेकरून जिल्ह्यात बालमजुरी निर्मुलनासाठी आपला कृतीशील सहभाग राहील हे आवश्यक.. यासाठी की  मुलांची पिळवणुकीतून आणि आर्थिक शोषणातून मुक्तता करणं ही आपल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे.  या कृती दलात आपणही सहभागी होऊ शकता हे लक्षात असू द्यात...

आपल्या जिल्ह्यात ‘विशेष बाल पोलिस पथक’ आणि जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात ‘बाल कल्याण अधिकारी’ यांची नियुक्ती झालेली आहे का. याचीही खातरजमा आपण करून घ्यायला हवी. नियुक्ती झाली असल्यास या यंत्रणांची मदत घ्यायला हवी. नियुक्ती झाली नसल्यास यासाठी संबंधितांकडे आग्रह धरावयास हवा. आपल्या जिल्ह्यात ‘जिल्हा बाल संरक्षण कक्ष’ ज्या मार्फत मुलांच्या संरक्षणाची यंत्रणा आपल्याला सदैव मदत करण्यास उपलब्ध आहे. या किमान गोष्टी आपल्याला माहित असायला हव्यात या केवळ त्वरित उपलब्ध यंत्रणेविषयी आपण माहिती घेतली या यंत्रणांची मदत घेत नक्कीच आपण मुलांच्या सुरक्षिततेबद्दल प्राधान्य देऊ शकतो...न्हवे,,,,ते आपण द्यायला हवं...नाहीतर मुलांची पीढी आपल्याला कधीही माफ करणार नाही....तेंव्हा आताच ही माहिती करून घेत कामाला लागूयात.....

Wednesday, 4 September 2013

शेवगा बहरला बांधावर...

वर्धा, दिनांक 5 – शेवग्याला (मुंगना) बाजारात  मोठ्याप्रमाणात  मागणी  आहे. राज्‍यासह  आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्‍यांतही  शेवग्‍याच्‍या  शेंगांना  असलेली  मागणी  लक्षात  घेवून  वर्धा  जिल्‍ह्यातील  शेतक-यांनी शेवग्‍याची  लागवड करावी यासाठी  प्रायोगिक  स्‍तरावर  सात गावातील सुमारे  300 शेतक-यांनी  शेताच्‍या  बांधावर शेवग्याची लागवड केली आहे. बांधावरील शेवग्‍याची  लागवडीला आता बहारु लागली आहे.
       आमगाव जंगली या आदिवासी गावात 95 शेतक-यांनी सुमारे 7 हजार  शेवगा आपल्‍या बांधावर लावला आहे. कृषी विभागातर्फे  शेवग्याच्‍या बिया मोफत उपलब्‍ध करुन दिल्‍यामुळेच येथील शेतक-यांनी  आपल्‍या  शेताच्‍या बांधावर  शेवग्‍याची  लागवड केली आहे. दौलतराव कुळमेथे  या आदिवासी  शेतक-याने  बांधावर  50 झाडे  लावली  असून, आज ती  डौलाने  उभी  आहेत. शेवग्‍याच्‍या  शेंगा  कधीही  न पाहिलेल्‍या  या आदिवासी  शेतक-यांनी  यशस्‍वीपणे  लागवड करून  आज ते प्रत्‍येक  झाडाचे संगोपन करत आहेत.  अडीच ते तीन महिन्‍यांनी  या झाडाला  शेंगा लागून उत्‍पन्‍न  येईल, अशी  त्‍यांना खात्री आहे.
          सेलू तालुक्‍यातील  रिदोरा, वडगाव जंगली, नवरगाव, आमगाव जंगली, सोंडी, शिवणगाव  आदी या सात गावातील  300 शेतक-यांनी  सुमारे  20 हजार  झाडे आपल्‍या  शेताच्‍या  बांधावर लावली  आहेत. ही  झाडे आज दोन ते अडीच फुटापर्यंत वाढली आहेत. जिल्‍हा  अधीक्षक कृषी  अधिकारी भाऊसाहेब  ब-हाटे,  तालुका कृषी  अधिकारी  श्री. नानोटे  तसेच कृषी सहायकांच्‍या  मार्गदर्शनाखाली  ही लागवड  यशस्‍वी  होत आहे.
          महात्‍मा  ज्‍योतिबा फुले  जलभूमी  अभियानांतर्गत  विदर्भात  शेवगा लागवडीचा  अभिनव प्रयोग  राबविण्‍यात आला आहे. अहमदनगर येथून  तीन हजार रुपये किलोप्रमाणे शेवग्‍याच्‍या  बिया  खरेदी  करुन  15 किलो बिया  प्रायोगिक  तत्‍त्‍वावर  सेलू  तालुक्‍यातील  300 शेतक-यांना   मोफत  वितरित करण्‍यात  आल्‍या आहेत.  सरासरी  एका झाडासाठी  केवळ  एक रुपया खर्च  आलेला आहे. कृषी  विभागाने  शेतक-यांच्‍या  शेतात  पाणी साठविण्‍यासाठी  खोल समतल सलग चर खोदले आहेत. चर खोदतानाच  बांध तयार झाले असून, या बांधावर शेवग्‍याची  लागवड  करण्‍यात आली आहे.
शेवग्‍याला मिळणार बाजारपेठ
          विदर्भात  पहिल्‍यांदाच  शेवगा लागवडीचा उपक्रम राबविण्‍यात येत असून, या लागवडीनंतर  सुमारे  दीड ते  दोन हजार क्विंटल  शेवग्‍याच्‍या  शेंगा  विक्रीसाठी  उपलब्‍ध  होणार आहेत. कृषी  विभागातर्फे  शेतक-यांना  विक्रीची व्‍यवस्‍थासुध्‍दा  करण्‍यात येणार आहे. आमगाव जंगली या गावात  प्रगतीशील  शेतकरी   श्‍यामराव  चावरे , बबनराव येवले, दत्‍तूजी चावरे, वसंतराव जावरे, प्रमोद येवले, श्री. चारोडे  आदी  शेतक-यांनी  या उपक्रमामध्‍ये  सहभागी  होवून  ही  लागवड  यशस्‍वी  केली आहे.
          शेवग्‍याच्‍या  शेंगांना नागपूरसह विदर्भातील सर्वच बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी  आहे. परंतु अत्‍यंत  कमी प्रमाणात शेवग्‍याच्‍या शेंगा बाजारात उपलब्‍ध  होतात. त्‍यामुळे  चांगला भावसुद्धा  शेतक-यांना मिळतो. शेताच्‍या बांधावरसुद्धा  शेवग्‍यामुळे  उत्‍पादन घेणे शक्‍य  होत आहे. इतर पिकांसोबत  शेतक-यांना आर्थिक  उत्‍पन्‍नाचे  स्‍त्रोत उपलब्‍ध  होणार आहेत. विदर्भात  पहिल्‍यांदाच  अशाप्रकारची  लागवड  झाल्‍यामुळे   शेतक-यांनाही  शेवग्‍याच्‍या  शेंगाबद्दल  चांगलीच  उत्‍सूकता  आहे. जिल्‍हा अधीक्षक कृषी  अधिकारी भाऊसाहेब  ब-हाटे  आणि सर्व कृषी  अधिकारी  शेवगा लागवडीच्‍या  यशस्‍वीतेसाठी  शेतक-यांना  नियमित  मार्गदर्शन करीत आहेत. त्‍यामुळे  बांधावर शेवग्‍याची लागवड हा प्रयोग  निश्चितच यशस्‍वी  होणार आहे.
                                 -अनिल गडेकर,
                                    9890157788
                                      

          

Tuesday, 3 September 2013

पर्यावरणपूरक गणेशोत्‍सव मंडळांसाठी स्‍पर्धा

जिल्‍हा माहिती कार्यालय,सा‍माजिक वनीकरण विभागाचा उपक्रम


             वर्धा, दि.3- सार्वजनिक गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्‍सव साजरा करावा. तसेच देखाव्‍यांच्‍या माध्‍यमातून पर्यावरण संवर्धनात्‍मक जनजागृती करावी, या उद्देशाने जिल्‍हा माहिती कार्यालय व सा‍माजिक वनीकरण विभागाच्‍या संयुक्‍त विद्यमाने पर्यावरणपूरक गणेशोत्‍सव 2013 या स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे. वर्धा जिल्‍हयातील सर्व सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांसाठी या स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे.
         सार्वजनिक गणेशोत्‍सवाच्‍या माध्‍यमातून पर्यावरण संवर्धनाला चालना मिळावी. तसेच श्री गणेशोत्‍सव आयोजना सोबतच पर्यावरणासाठी जनतेचाही सहभाग वाढावा यासाठी या स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे. स्‍पर्धेत उत्‍कृष्‍ठ ठरणा-या मंडळांना रोख पारितोषिके स्‍मृतीचिन्‍ह देऊन गौरविण्‍यात येणार आहे.   श्रीगणेशाची स्‍थापना केवळ पर्यावरण पूरक,मा‍तीच्‍या मूर्तीच्‍या माध्‍यमातून व्‍हावी. तसेच गणेशोत्‍सवातील देखावेसुद्धा पर्यावरण संवर्धन पूरक असावेत, ही या स्‍पर्धेची प्रमुख अट राहील.
          स्‍पर्धेसाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी स्‍पर्धेत भाग घेण्‍यासाठी श्री गणेश मूर्तीचा फोटो त्‍यासोबत  पर्यावरण संवर्धनासाठी केलेल प्रयत्‍न, मंडळाच्‍या प्रमुखांची नावे, पत्‍ते आणि संपर्क क्रमांकासह दि. 15 सप्‍टेंबर 2013 पर्यंत संपूर्ण माहिती जिल्‍हा माहिती कार्यालय, प्रशासकीय भवन, दुसरा माळा, वर्धा तसेच उपसंचालक, सामाजिक वनीकरण विभाग,वर्धा यांच्‍या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाठविणे आवश्‍यक आहे.  स्‍पर्धेसाठी कोणतेही शुल्‍क आकारण्‍यात येणार नसून प्रवेशिकेवर सार्वजनिक गणेश मंडळाने पर्यावरणपूरक देखावा आणि मूर्तीबाबत थोडक्‍यात माहिती लिहावी. सार्वजनिक गणेश मंडळाचे संपूर्ण नाव, पत्‍ता आणि संपर्क क्रमांकही लिहावयाचा आहे.  त्‍याचबरोबर मूर्ती, देखाव्‍याचे रंगीत छायाचित्रही प्रवेशिकेसोबत जोडावे लागणार आहे. प्रवेशिकेवरील माहिती को-या कागदावर सुवाच्‍च हस्‍ताक्षरात किंवा टंकलिखित स्‍वरूपात मंडळाच्‍या अध्‍यक्ष व सचिवांच्‍या स्‍वाक्षरीने दाखल करावयाची आहे.  स्‍पर्धेसाठी आलेल्‍या प्रवेशिकांतून पर्यावरणप्रेमी संस्‍थांचे प्रतिनिधी, कार्यालयीन प्रतिनिधी असलेल्‍या निवड समितीद्वारे विजेत्‍यांची निवड करण्‍यात येणार आहे. निवड समिती प्रत्‍यक्ष गणेश मंडळांच्‍या देखाव्‍यांची, मूर्तींची पाहणी करणार आहेत. पाहणीनंतर तीन विजेत्‍यांची निवड करण्‍यात येणार आहे. प्रथम विजेत्‍या स्‍पर्धकाला रूपये 1001, द्वितीय स्‍पर्धकास 701 आणि तृतीय स्‍पर्धकाला 501 रूपयांचे रोख पारितोषिक, स्‍मृतीचिन्‍ह आणि प्रमाणपत्र एका विशेष समारंभ देऊन गौरविण्‍यात येणार आहे. त्‍याचबरोबर बालगणेशोत्‍सव मंडळांचाही पर्यावरण संवर्धनात वाटा असावा, या उद्देशाने बाल गणेश मंडळांनाही विशेष पुरस्‍कार देऊन गौरविण्‍यात येणार आहे. 
         निवड समितीने दिलेला निकाल हा अंतिम असेल. त्‍यावर कोणत्‍याही आक्षेपाचा विचार करण्‍यात येणार नाही, याची स्‍पर्धकांनी नोंद घ्‍यावी.  तसेच या सामाजिक उपक्रमात, स्‍पर्धेत अधिकाधिक सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभागी होऊन पर्यावरणपूरक गणेशोत्‍सव साजरा करावा, असे आवाहन जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक प्रवीणकुमार बडगे यांनी केले आहे.

Sunday, 30 June 2013

लोकशाही वार्ता. प्रकाशित दिनांक.27 जून 2013

लोकशाही वार्ता, दिनांक 27 जून 2013 रोजी प्रकाशित वृत्‍त   

Friday, 17 May 2013

लोकनायक बापुजी अणे व ग.त्र्य. माडखोलकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारसाठी 31 मे पर्यंत प्रवेशिका स्वीकारणार


              वर्धा,दि. 17: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन आणि उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार तसेच अमरावती विभागीय स्तरावरील लोकनायक बापुजी अणे पुरस्कार स्पर्धेसाठी  1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2012 पर्यंतच्या कालावधीमधील प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम 31 मे 2013  पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहे.
            2012 या कॅलेंडर वर्षात प्रसिध्द झालेले विकासविषयक लेख, विशेष वृत्त व वृत्त मालिका, वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या संदर्भात त्यांची संबंधित वर्षात प्रसिध्द झालेली  विकासविषयक छायाचित्रे यांचा विचार करण्यात येईल. स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून  व वृत्त शाखा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने शासनाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत.
       पुरस्कार व स्वरूप पुढीलप्रमाणे -  राज्यस्तर (मराठी) बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार-51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;  राज्यस्तर(इंग्रजी) अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; राज्यस्तर (हिंदी) बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र,  राज्यस्तर (उर्दू) मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; शासकीय गट (मराठी) यशवंतराव चव्हाण पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पु.ल.देशपांडे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;  तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार-मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व 41 हजार रुपये आणि केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट  (मा. व ज.) 41 हजार  रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे स्वरूप आहे.          
       अमरावती विभागीय स्तरावरील  लोकनायक बापूजी अणे पुरस्कार-41 हजार रुपये,मानचिन्ह व प्रशस्तीपत्र आणि  नागपूर विभागस्तरीय ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे विभागीय पुरस्कारांचे स्वरूप आहे. प्रवेशिकेसोबत मूळ लिखाणाचे कात्रणांच्या 2 प्रतींसह पाठवून मूळ लिखाणावर लेखकाचे नाव नसल्यास, ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिद्ध झाला असेल, त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला प्रवेशिकेबरोबर जोडलेला असावा. अन्यथा त्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.                                                 
             पत्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे. तसेच पुरस्कार स्वीकारण्याची संमती कळविणे आवश्यक आहे.  अर्जदारांनी राज्य व विभागीय पातळीवरील प्रवेशिका नागपूर येथील संचालक (माहिती), अमरावती येथील विभागीय उपसंचालक (माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे थेट पाठवाव्यात. प्रवेशिकेसोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार संघटनांच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही.
          जे पत्रकार बृहन्मुंबई, नवी मुंबई  (कोकण),  कोल्हापूर,  नागपूर,  अमरावती,  नाशिक,  पुणे आणिऔरंगाबाद या विभागातील असतील, त्यांना त्या विभागासाठी असलेल्या विभागीय स्पर्धेतच भाग घेता येईल. मात्र त्यांचे लेखन अन्य कोणत्याही विभागातील वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले असेल तरी ते ग्राह्य मानण्यात येईल.                  
प्रवेशिकेवर राज्यस्तर/विभागीयस्तर तसेच प्रवेशिका कोणत्या भाषेकरिता आहे याचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. तसेच प्रवेशिका राज्यस्तरासाठी किंवा विभागीय स्तरासाठी व कोणत्या भाषेकरिता आहे, याबाबतचा स्पष्ट उल्लेख असावा. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही. प्रत्येक गटासाठी व भाषेसाठी संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठविल्यास, त्याचा विचार केला जाणार नाही.
इलेक्ट्रॉनिक्स मिडियातील पत्रकारांसाठी स्पर्धा
इलेक्ट्रॉनिक्स मिडियातील पत्रकारांसाठी उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पु.ल.देशपांडे पुरस्कार देण्यात येतो. ही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खासगी चित्रवाहिन्या, स्थानिक केबल न्यूज व शासकीय  उपक्रम  यांना यामध्ये सहभाग घेता येईल. पुरस्काराचे स्वरुप 41,000 रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे आहे. वृत्तकथाचित्रे ही स्पर्धेच्या संबंधित वर्षात तयार केलेली व प्रसारित झालेली असावीत. वृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. प्रवेशिका पाठवितांना संबंधित प्रतिनिधीची माहिती तसेच वृत्तकथा कोणत्या तारखेस प्रसारित झाली,याबाबतचे संबंधित संस्थाप्रमुखांचे प्रमाणपत्र असावे. स्थानिक केबलच्या बाबतीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नोंदणीपत्र सादर करणे आवश्यक आहे.  प्रवेशिकेसोबत संबंधित वृत्तकथेची सीडी, कॅसेट थेट त्या त्या विभागातील उपसंचालक/जिल्हा माहिती अधिकारी यांचेकडे तर मुंबईकरिता मा.महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला,मंत्रालय, मुंबई-32 यांचेकडे पाठविण्यात यावी. मराठी वृत्तकथाचित्र राज्यस्तरीय पुरस्कारासाठी थेट प्राप्त झालेल्या नावांमधून पुरस्कारपात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स मिडियातील तज्ज्ञ व्यक्तींची परिक्षण समितीवर नियुक्ती करण्यात येईल. तसेच याशिवाय अटी नियम पुस्तिकेतील क्रमांक 6आणि अन्य संबंधित अटी या गटासाठीही लागू राहतील.               
छायाचित्रकार पुरस्कार
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार 41 हजार रुपये, उत्कृष्ट छायाचित्रकार स्पर्धा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रातील पूर्णवेळ छायाचित्रकारांसाठी आहे. केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, शासकीय गट (मावज) 41 हजार रुपये, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे कर्मचारी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात. उत्कृष्ट छायाचित्रकार स्पर्धा मराठी,इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या छायाचित्राकरिता आहे. या पुरस्कारासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2012 या कालावधीत प्रसिद्ध झालेले महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांवरील छायाचित्र ग्राह्य मानण्यात येईल. मात्र हे छायाचित्र मूळ स्वरुपातील असावे.
पुरस्कारासाठी छायाचित्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक कामाच्या प्रसिद्धीसाठी जनतेमधील जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल.एकाच छायाचित्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.
पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ छायाचित्रे पाठविण्यात यावीत. ज्या नियतकालिकातछायाचित्र प्रसिद्ध झाले असेलत्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखलातारीख नियतकालिकाचे नावप्रवेशिकेसोबत जोडलेले असावे. अन्यथा त्या  प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.या  स्पर्धेविषयींची माहिती आणि अर्जाचे नमुने माहिती  जनसंपर्क महासंचालनालयाच्या                                          www. dgipr.maharashtra.gov.in तसेच  शासनाच्या  www.maharashtra.gov.in या  संकेतस्थळावर  उपलब्ध  आहेत. 
            या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावेअसे आवाहन  माहिती  जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात येत आहे.
                                                                     00000000         

Wednesday, 20 March 2013

विधीमंडळातील यशवंतराव चव्हाण


विशेष लेख :                                                    दिनांक : 19 मार्च, 2013

विधीमंडळातील यशवंतराव चव्हाण

        महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा सांगता सोहळा राष्ट्रपती श्री. प्रणव मुखर्जी यांच्या प्रमुख उपस्थितीत 23 मार्च 2013 रोजी मुंबई येथील एनसीपीए सभागृहात होणार आहे. त्यानिमित्ताने विशेष लेख. . .

 सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. राज्यासमोर दुष्काळासारखे नैसर्गिक संकट उभे ठाकले आहे. या संकटाला सामोरे जाताना विधानमंडळातील चर्चेला उत्तरे देताना नेत्यांचा क लागतो आहे. राज्यावर मानवनिर्मित किंवा निसर्गनिर्मित संकट येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक संकटाना राज्याने व पर्यायाने राज्यातील नेत्यांनी खंबीरपणे तोंड दिले आहे. संकटाचा सामना करुन आणि त्यातून बाहेर पडून राज्य आजही देशात सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे. या राज्याचा पाया घालणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी विधान मंडळात केलेल्या भाषणांचा व त्यांच्या तत्कालीन कार्यपध्दतीचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे.
प्रतापगडावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
          प्रतापगडावर पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार होते. त्यावेळी पंडितजीं समोर निदर्शने होणार होती. यशवंतराव चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते. प्रतापगडावर पंडितजींच्या कार्यक्रमासाठी जे लोक जाणार होते त्यांना ट्रकने जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आणि पंडितजींच्या विरोधी निदर्शने करणाऱ्या समितीच्या निदर्शकांना ट्रकने वाईला जाण्याची परवानगी नाकारली होती. मुंबई राज्याच्या त्या वेळच्या विधानसभेत सरकारच्या या परस्पर विसंगत भूमिकेवर वादळी चर्चा झाली. काँग्रेसने आयोजन केलेल्या कार्यक्रमाला ट्रकने माणसे नेण्याची परवानगी मिळते आणि शांततामय मार्गाने निदर्शने करु इच्छिणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना ट्रकने माणसे नेण्यास परवानगी दिली जात नाही, अशी सकृतदर्शनी यात विसंगती होतीच, त्यावेळी विधानमंडळाच्या चर्चा दर्जेदार असत, त्या चर्चेमधून बुध्दीचा कस प्रखरपणे व्यक्त होत होता. एस.एम.जोशी, आर.डी. भंडारे, आचार्य अत्रे, ए.बी.बर्धन, उध्दवराव पाटील, दत्ता ताम्हाणे, दत्ता देशमुख अशी दिग्गज मंडळी विरोधी पक्षाच्या बाकावर असतांना आणि मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण असताना हे बौध्दीक सामने अधिक रंगत असत.
          परवानगी द्यायची आणि परवानगी नाही द्यायची या दोन्ही निर्णयाची बरीच चिरफाड झाल्यानंतर यशवंतराव शांतपणे बोलायला उठले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, परवानगी द्यायची आणि नाही द्यायची हे दोन्ही  निर्णय माझेच आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होत असतांना त्यांचा जय जयकार करायला जाणाऱ्या राज्यातील कोणत्याही माणसाला थोपवणे शक्य नव्हते, त्यामुळे ती परवानगी देणे आवश्यक होते. दुसरीकडे परवानगी नाकारली, कारण छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण करायला देशाचे पंतप्रधान येत असतांना, पुतळ्याचे अनावरण करु नका असे सांगणाऱ्यांना एकत्र जमा होऊ द्यावयाचे नाही, हीच भूमिका सुसंगत होती. कायदा व सुव्यवस्था सरकारला पाळावयची असेल तर जमाव न जमवण्याची खबरदारी सरकारलाच घ्यावी लागेल. त्याची काळजी मी घेतली. निदर्शकांना ट्रकने माणसे नेण्याची परवानगी दिली असती आणि त्या जमावाने हिंसक कृत्य केले असते तर त्याचे उत्तर मलाच द्यावे लागले असते, आणि म्हणून माझा निर्णय योग्य आहे.                       
अभिभाषणावरील चर्चा
       16 फेब्रुवारी 1961 रोजी राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणावरील चर्चेत यशवंतराव चव्हाण यांनी जे भाषण केले आणि यात शिक्षणासारख्या मूलभूत गोष्टींवर केलेली चर्चा आजही उदबोधक आहे हे आपल्याला लक्षात येईल. यशवंतराव म्हणतात. "शिक्षण आणि शेती हे महत्वाचे विषय आहेत. माध्यमिक किंवा प्राथमिक शिक्षक या दोन्ही प्रकारच्या शिक्षकांचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. लक्षावधी  मुलांना योग्य शिक्षण देवून त्यांना उत्तम नागरिक बनविण्याचे काम त्यांच्यावर अवलंबून असते. काही मॅनेजमेंटमध्ये अलीकडे जरी बिझनेसची वृत्ती आली असली तरी त्या संस्था ज्यांनी काढल्या ती ध्येयवादी माणसे होती. त्यापैकी काही थोडीशी बिझनेसवाली असली तरी पुष्कळशी मंडळी शिक्षणाचा प्रसार व्हावा या ध्येयाने पुढे आल्यामुळे महाराष्ट्रात अशा अनेक संस्था निघालेल्या आहेत. राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे राज्यात आले होते तेव्हा त्यांनी. महाराष्ट्रात खासगी शिक्षण संस्थांनी शिक्षण संस्था काढून शिक्षणाचा प्रसार केला आहे, देशात कोठेही इतक्या मोठ्या प्रमाणावर शिक्षणाचा प्रयत्न झालेला नाही. अशा शब्दात महाराष्ट्रातील शिक्षणाविषयी गौरवोद्‌गार काढले होते. राष्ट्रपतीचे हे उद्‌गार ऐकून आपल्या शिक्षण संस्थेमध्ये दोष दिसत असले तरी माझ्या अंगावर मुठभर मांस चढले.
            24 ऑगस्ट 1960 रोजी तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या दृष्टीकोनासंबंधी चर्चा करताना शेती विषयी यशवंतरावजी म्हणतात. "दुष्काळी भागात शेकडो मैल लांबी आणि रुंदीचे पट्टे असून त्यात असलेल्या जमिनी लागवडी खाली आणण्याचा कितीही प्रयत्न केला तरी शेवटी कोरडवाहूच राहणार आहेत. यासाठी इरिगेशनच्या योजना हाती घ्याव्या की कोरडवाहू जमिनीवर सॉईल  कन्झर्वेशन व लॅंड डेव्हलप करण्याच्या दृष्टीने बंडिंग्ज, विहीरी सारखे मायनर इरिगेशनचे कार्यक्रम हाती घेऊन आपले सामर्थ्य खर्च करावे असा प्रश्न निर्माण होतो. इरिगेशनच्या ज्या मोठ्या योजना आहेत त्याची प्राथमिक तयारी, खर्च इत्यादी गोष्टी होऊन त्या पूर्ण झाल्यानंतर त्याचा प्रत्यक्ष फायदा हाती पडेपर्यंत सात ते दहा वर्षाचा कालावधी लागेल व त्या अवधीपर्यंत शेतकऱ्यांना वाट पहावी लागेल. तेव्हा मोठ मोठया इरिगेशनच्या योजनांना प्राधान्य द्यावे की मायनर इरिगेशनच्या कार्यक्रमाला महत्व द्यावे असा पेचाचा प्रश्न निर्माण होतो. अशा महत्वाचा प्रश्नांबाबत शासनास निश्चित धोरण करावे लागेल."
            अशा प्रतिनिधिक भाषणांचा अंशातून यशवंराव चव्हाणांचा अभ्यास, चाणाक्षवृत्ती आणि दूरदृष्टीचा आपल्याला प्रत्यय येतो. यशवंतरावाच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन !
000
                                                                                                                        अर्चना शंभरकर
                                                                                                                वरिष्ठ सहाय्यक संचाल

स्मरणशक्तीला सलाम


विशेष लेख :                                                                  दिनांक : 19 मार्च, 2013

स्मरणशक्तीला सलाम

        महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा सांगता समारोप राष्ट्रपती श्री. प्रणव मुखर्जी यांच्या प्रमुख उपस्थितीत 23 मार्च 2013 रोजी मुंबई येथील एनसीपीए सभागृहात होणार आहे. त्यानिमित्ताने विशेष लेख. . .

            यशवंतराव चव्हाण साहेबांची भाषणे ते मुख्यमंत्री झाल्यापासून मी ऐकत आलो आहे. साहेब हे शब्दांचे जादुगार होते. त्यांची भाषणे मी आवाजांच्या चढउतारासह व लकबींसह तल्लीनतेने ऐकत असे. ज्या ज्या वेळी मित्रमंडळी जमत त्या त्या वेळी मी त्यांच्या हावभावांची नक्कल करून दाखवी. यामुळे कार्यकर्ते मित्रही खूष अन मलाही प्रसिध्दी मिळे. मनात अनेक वेळा येत असे, या शब्दसम्राटाबरोबर आपली व्यक्तिगत ओळख झाली तर काय मजा येईल. हा शब्दांचा जादूगार खासगी मैफलीत कसा बोलत असेल, असे औत्सुक्य व त्या मैफलीत आपल्याला प्रवेश मिळावा अशी इच्छा मी अनेक वर्ष बाळगून होतो. हळूहळू जाणे वाढू लागले. बरोबर अनेक लोक असत त्यामुळे साचेबध्द बोलणे होई. मनातील ही सुप्त इच्छा मात्र शांत बसू देत नव्हती.
            चांगली गोष्ट घडण्यासाठी नेहमी वेळ लागतो पण ती अतिशय थेट असते यावर माझा विश्वास होता. त्यामुळे माझी ही इच्छा पूर्ण होणार याची खात्री होती. अन एक दिवस ही संधी आयतीच चालून आली. दिल्लीतील माझी कामे आटोपून परत निघण्यापूर्वी साहेबांना भेटण्यासाठी गेलो. दोन मिनिटे भेटण्यासाठी वेळ मिळाला होता. मी बैठकीच्या खोलीत उभा राहिलो. बोलायची संधी मिळाली होती पण काय बोलावे हे सुचेना. बसा विनायकराव या त्यांच्या वाक्याने बसलो.  नेहमीप्रमाणे जिल्ह्यात कोणाचे काय सुरू आहे, याबाबत विचारणा होईल अन पाचव्या मिनिटात आपली रवानगी होईल असा विचार मनात सुरू होताच; पण त्याचवेळी साहेब काय प्रश्न विचारताहेत याची वाट पहात होतो. साहेबांनी थेट विचारले "हं काय त्या अमुक माणसाची तुम्ही चांगली नक्कल करता हे ऐकलय मी !" या प्रश्नाने माझी मात्र भंबेरी उडाली.  कारण मी त्यावेळच्या एका महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील  एका मंत्र्याच्या भाषणातील चुका  व त्यात माझी भर टाकून नक्कल करीत असे. माझे हे प्रयोग स्थळकाळाचे बंधन झुगारून मुक्तपणे चालले होते. माझ्या या प्रयोगांबाबत शरद पवारांनी त्यांना माहिती दिली हे कळायला वेळ लागला नाही कारण सर्वात जास्त या प्रयोगांचे ते साक्षीदार होते. आता जरा जपून बोलण्याचा सल्ला मिळणार याची वाटत पहात असतांनाच "साहेबांनी बघू या तुमचे प्रयोग! म्हणून अनपेक्षित धक्का दिला".  प्रथम या धक्क्यातून सावरलो अन घाम पुसला. सगळा उत्साह परत आणला उभा राहिलो. प्रयोगास सुरूवात केली. पहिल्या दोनतीन वाक्यातच साहेब खळाळून हसले. टोपी बाजूला काढून लक्षपूर्वक ऐकू लागले अन अगदी मुक्तपणाने हसत होते. अक्षरश: हसता हसता त्यांच्या डोळ्यात पाणी आले. वीस पंचवीस मिनिटे कशी गेली ते कळलेच नाही. अशाप्रकारे माझी इच्छा पूर्ण झाली होती. पहिल्याच बैठकीत औपचारिकतेची बंधने गळून पडली होती.  मी खूप आनंदी होतोच शिवाय दिल्लीत आलात की भेटत जा हे आमंत्रण होतेच. मीही जेव्हा संधी मिळेल तेव्हा भेटत होतो. मनमोकळेपणाने संवाद साधत होतो. अगदी शेरोशायरी, गझलांची देवाण घेवाण, प्रवासातील अनुभव, व्यक्तिचित्रे व किस्से एकमेकांना सांगत होतो. त्यांची विलक्षण स्मरणशक्ती, शब्दांचे वेड व संभाषण चातुर्य प्रत्येक भेटीत जाणवत होते.
            यशवंतराव चव्हाण साहेब हे अतिशय रसिक मनोवृत्तीचे होते. नवीन चांगले पुस्तक असो वा चांगला चित्रपट ते आर्वजून पहात असत. देशाचे संरक्षणमंत्री असणारा माणूस चित्रपटगृहात जावून चित्रपट पहाणे हे अतिशय  दुर्मिळ.  सुरक्षा  आणि  लोक  यामुळे  अनेकदा  इच्छा असूनही  ते शक्य नसते. पण एकदा मी आणि चव्हाण साहेब माधवराव आपटे यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा माधवरावांनी रिगल चित्रपटगृहात सुरू असलेल्या एका इंग्रजी चित्रपटाचा उल्लेख केला आणि तो साहेबांनी आर्वजून पहावा असेही सुचविले. मुळातच रसिक असलेले साहेब ही संधी कशी दवडणार. त्या दिवशी ते जरा निवांतही  होते. त्यांनी  कुणालाही न सांगता आमच्या दोघांसाठी तिकीट मागविले तीन ते सहाच्या खेळाचे. मला पावणेतीनला सांगितले विनायकराव आपण एका खास मोहिमेवर जातो आहोत. सुरक्षा अधिकारी वा अन्य कुणालाही न सांगता चित्रपट सुरू झाल्यानंतर अंधारात आम्ही चित्रपटगृहात जावून बसलो . आपल्याला कुणीही ओळखू नये यासाठी साहेब टोपी काढून बसले होते. आम्ही दोघांनी त्या चित्रपटाचा आनंद घेतला. चित्रपट संपल्यावर लोकांच्या लक्षात आले की साहेब आहेत मग लोकांची गर्दी झाली पण चांगल्या कलाकृतीचा आस्वाद घेतलाच पाहिजे मग त्यासाठी ते आर्वजून वेळ राखून ठेवायचे. हा साहेबांचा मूळ स्वभाव होता.
            ते कलावंतांना आणि साहित्यिकांना नेहमी प्रोत्साहन देत. मला 1 जानेवारी 1977 चा तो दिवस  आजही आठवतो. साहेब संरक्षणमंत्री झाल्यानंतर त्यांनी मराठी तरूणांनी सैन्यात जावे असे आवाहन केले होते. त्यासाठी आम्ही गावोगावी जावून मेळावे घेतले होते अन तरूणांना आवाहन केले होते. त्यानुसार नांर्दुडी  गावचा कुंभार्डे  नावाचा तरूण सैन्यात दाखल झाला होता.  चीन युध्दात तो कामी आला. त्याच्या स्मरणार्थ त्या गावाच्या लोकांनी वाचनालय सुरू केले. हा अतिशय छोटा कार्यक्रम होता तरीही साहेब या वाचनालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यांच्या जेवणाचा कार्यक्रम आमच्या घरी होता. जेवण आणि कार्यक्रम यांमध्ये बराच वेळ होता. तेव्हा ना. धों. महानोर ही तेथे उपस्थित होते. मधल्या वेळात काय करायचे हा विचार माझ्या मनात सुरू होता. साहेबांनी आराम करावा असे मी सुचविणार होतो तेवढ्यात साहेबांनी महानोरांना "नामदेवराव, तुमच्या कविता ऐकवा! अशी फर्माइश केली. मग आमच्या हॉलचे रुपांतर काव्य संमेलनात झाले. त्यांच्या कवितांना साहेब अतिशय उत्स्फुर्तपणे दाद देत होते. साहेब कलावंतांचा नेहमी सन्मान करत असत. हे करणे केवळ साहेबांनाच शक्य होते, कारण त्यांच्या वागण्यात कृत्रिमता नव्हती सर्व कसं साध सरळ होते.त्यांना माणसं मनापासून आवडत व ही माणसं करीत असलेल्या कामावर त्यांची नितांत श्रध्दा होती.
            ते चांगल्या साहित्यकृतींना केवळ  दादच देत नसत पण त्या लेखनामागे काय कारण असेल याची  कारणमीमांसा करत. उपराकार लक्ष्मण माने यांच्या 'उपरा' या पुस्तकात एक वाक्य आहे  'ही सगळी अवस्था पाहिल्यानंतर वाटतं की जावून पार्लमेंटवर बॉम्ब टाकावा' तेव्हा साहेब म्हणाले माझ्या गावच्या एका मुलाला मी ज्या पार्लमेंटचा सदस्य आहे त्या पार्लमेंटवर समाजव्यवस्थेमुळे बॉम्ब टाकावासा वाटतो तेव्हा या मुलांच्या भावना समजावून घेतल्या पाहिजे. अन त्यानुसार समाजव्यवस्थेत बदल केले पाहिजे असे मला वाटते.  ते गप्पा मारतांना अनेकदा असे पुस्तकांचे दाखले देत आणि त्यासाठी काय करायला हवे याचीही चर्चा करीत असत. त्यांच्या खूप कविता तोंडपाठ होत्या. एकदा आमच्या गप्पा ऐन रंगात आल्या होत्या. बालपण आणि  शालेय जीवनातील आठवणी  सांगत असतांना साहेबांनी  झुक झुक झुक आगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत सोडी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जावू या हे गाणं गाता गाता साहेब एकदम मामा माझा तालेवार रेशीम घेईल हजारवार या ओळीवर येवून थांबले. मी विचारले काय झाले ते म्हणाले "विनायकराव, हे गाणे माझं गाणं आहे." या गाण्याचं व्यक्तिगत आयुष्यात खूप महत्व  आहे. लहानपणी बिकट आर्थिक परिस्थितीमुळे मामाच्या गावाला रहावे लागले होते मग मामांनी केलेली मदत आणि बालपणीच्या आठवणींना साहेबांनी उजाळा दिला होता.
            साहेबांची स्मरणशक्ती अतिशय तल्ल्ख आहे याची प्रचिती मला एका प्रसंगाने आली. ते मुंबईला आले आहेत असे समजल्याने मी भेटण्यास गेलो.ते बाहेर पडण्याच्या विचारात होते. मी नमस्कार करून बाजूला उभा राहिलो.  त्यांनी  चला  म्हटल्यावर  गाडीत  बसलो.  नंतर समजले की पुणे जिल्ह्यात तळेगाव येथे कार्यक्रमास
निघाले होते. हक्काचे तीन तास गप्पांसाठी मिळाले. प्रवासात अमीर खुश्रू यांची कविता तर काही शेर सांगितले. तळेगावला पोहचल्यावर सभा सुरू झाली. भाषणात एक संदर्भ देतांना त्यांनी अमीर खुश्रूंच्या काव्यपंक्ती जशाच्या तशा म्हणून दाखविल्या.एकदा सहज ऐकल्यानंतर या काव्यपंक्ती लक्षात ठेवणाऱ्या त्यांच्या स्मरणशक्तीला मी मनातल्या मनात सलाम केला.
            साहेबांचा व माझा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध होता. मी त्यांच्या नातवासारखा असल्याने त्यांना काहीही विचारण्याचे मला स्वातंत्र्य  होते. जे प्रश्न पत्रकार विचारू शकत नाही ते प्रश्न मी त्यांना विचारण्याचे ठरविले. त्यानुसार मी बत्तीस प्रश्न विचारायचे ठरविले. बत्तीस प्रश्न विचारण्यामागे मुळ प्रेरणा होती सिंहासन बत्तीशीची. साहेबांनी ही त्याला परवानगी दिली होती. वेगवेगळया निमित्ताने हे प्रश्न विचारण्याचे ठरविले. असेच एकदा आम्ही त्यांच्या दिल्लीतील घरी गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात त्यांचे स्वीय सहायक डोंगरे यांनी साहेबांना सांगितले कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री देवराज अरस यांचे निधन झाले. तेव्हा पटकन उत्तरले 'अरेरे ,वाईट झाले'. अन मूळ विषयाकडे वळले. तेव्हा मी त्यांना मृत्यूविषयी त्यांना काय वाटते असे विचारले. त्यांनी ते जीवनाचे वास्तव आहे असे सांगितले. मृत्युशी  माझी पहिल्यांदा ओळख माझ्या वडीलांच्या मृत्युने झाली.  तेव्हा त्याची दाहकता जाणवत होती पण वाढत्या वयाबरोबर याबाबतचा दृष्टीकोन त्रयस्थ होत गेला. पण काही मृत्यु जीवाला चटका लावणारे असतात. माझा सहकारी किसन वीर याचा मृत्यु असाच मला चटका लावणारा होता. तेव्हा खूप काही गमावल्याची जाणीव झाली अन मी ओक्साबोक्शी रडलो ही अगदी वैयक्तिक बाबही साहेबांनी मला सांगितली होती.
            असेच एकदा मी त्यांना वेणुताई आणि साहेबांच्या नातेसंबंधाविषयी छेडले. तेव्हा एक made for each other अशी स्लोगन असलेली जाहिरात होती. मी त्यांना तुम्ही made for each other वाटतात असे म्हटले तेव्हा साहेबांनी त्याला दुजोरा दिला आणि एक अनुभवही सांगितला. मी गृहमंत्री असतांना संसदेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होता. तेव्हाच बातमी आली की कऱ्हाडमध्ये जातीय दंगल उसळली होती. तो तास संपवून घरी  आलो अन वेणूताईंना विचारले बातमी ऐकली का त्यावर त्या उत्तरल्या "हो बातमी ऐकली आणि तुमची बॅग भरून तयार आहे". अशाप्रकारे आम्हाला एकमेकांना काय हवे आहे याची चांगली जाणीव आहे.अनेकदा काहीही न बोलता मनातले भाव आम्ही ओळखतो.   विनायकराव तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही खरोखरच made for each other आहोत.
            या प्रश्नांना साहेबांकडून मिळणारा प्रतिसाद माझा उत्साह वाढविणारा होता. तेव्हा अशाच एका गप्पांमध्ये मी त्यांना भाषेविषयी विचारले. तुमचे काही सातारी आघात सोडले तर भाषा पुणेरी आहे पण बाकी सर्वांची भाषा टिपीकल सातारी आहे याचे कारण काय, असं विचारलं; यावर त्यांनी केवळ एकाच शब्दात उत्तर दिले. ते म्हणाले "मातृभाषा."
            साहेब एकदम स्पष्टवक्ते पण मनमिळावू होते.ते समोरच्या माणसाचा अहंकार न दुखवता एखादी गोष्ट अतिशय समर्पक शब्दात समजावून सांगत. बोलतांना व ऐकतांना त्यांचा चेहरा अतिशय बोलका असे.   आपण उच्चारलेल्या प्रत्येक वाक्यागणिक त्यांच्या चेहऱ्यावर सहमत असल्याच्या, नसल्याच्या रागाच्या, आनंदाच्या, मिश्किलपणाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत असत. असेच एकदा मी माझ्या भाषणात ब्रम्हपुत्रा नदी असा उल्लेख केला त्या भाषणानंतर मला माझा तो उल्लेख कसा चुकला आहे हे समजावून सांगितले. ब्रमहपुत्रा ऐवजी ब्रम्हपुत्र असा उल्लेख असून तो नदी नद आहे हे सांगितले. त्यांनी माझी ही चूक सुधारलीच पण मला अगदी सविस्तर माहिती दिली. साहेबांनी असे नेहमीच मला मार्गदर्शन करीत त्यामुळे माझ्यातील उत्तम वक्ता घडत गेला. साहेबांची माया आणि मार्गदर्शन नेहमीच मला लाभले हे मी माझे भाग्यच मानतो.

                                                                                                                     - विनायकदादा पाटील
0 0 0 0 0