Tuesday, 7 September 2021

 

                                जिल्ह्यात समूह उद्योग स्थापन करण्यास प्राधान्य द्यावे

                                                                        -जिल्हाधिकारी

       वर्धा, दि 7 सप्टेंबर (जिमाका):- जिल्ह्यात विविध क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी  जिल्हा उद्योग केंद्र, आरसेटी, उमेद अभियान, खादी व ग्रामोद्योग महामंडळ, नाबार्ड आणि एम गिरी यांनी प्रशिक्षणा सोबतच समूह उद्योग स्थापन करण्यासाठी काम करावे.जिल्ह्यात निर्माण होऊ शकणाऱ्या आणि मागणी असणाऱ्या उद्योगांना प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्यात.

       जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समूह उद्योग विकास बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे, जिल्हा उद्योग केंद्राचे श्री मुद्देमवार, लीड बँक व्यवस्थापक वैभव लहाने, एमगिरीचे व्यंकट राव,  नाबार्डचे व्यवस्थापक, मविमच्या जिल्हा समन्वयक  अस्मिता भोंगाडे, तसेच उमेदच्या स्वाती वानखेडे उपस्थित होत्या.

       बैठकीत उद्योगासाठी लागणारी विविध कौशल्ये आणि वस्तूंचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशिक्षकांची चमू तयार करायची आहे. यासाठी एम गिरी, आरसेटी, जिल्हा उद्योग केंद्र या संस्था प्रशिक्षण आयोजित करेल. एमगिरीने राज्य किंवा केंद्र कौशल्य विकास प्राधिकरणासोबत करार करून घ्यावा. तसेच प्रशिक्षणासाठी डायटचे इमारत वापरावी. यासोबतच खादी ग्रामोद्योग महामंडळाने शेतकऱ्यांना मध संकलनासाठी सुद्धा प्रशिक्षण द्यावे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

        उमेदच्या महिलांचे  चार समूह प्रकल्पाला अंतिम स्वरूप देण्यात आले. यात सेलूमध्ये -डेअरी क्लस्टर, सिंधी मेघे येथे  बॅग आणि टेराकोटा ज्वेलरी क्लस्टर, नाचनगाव येथे गारमेंट स्टिचिंग क्लस्टर विकसित केले जाईल. यासाठी खादी व ग्रामोद्योग महामंडळाकडे असलेल्या स्फूर्ती योजनेमध्ये  या प्रकल्पाना अनुदान मिळण्यासाठी अहवाल तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.

                                                                        0000

 

                  डेंग्यु रुग्णाचे प्रमाण जास्त असलेल्या परिसरात अधिका-यांनी प्रत्यक्ष भेटी द्याव्या

                                                                   -जिल्हाधिकारी

Ø  महिन्यातील प्रत्येक शनिवार कोरडा दिवस पाळावा

Ø  डेंग्युच्या रुग्णांना ज्योतीबा फुले आरोग्य योजनेचा लाभ दयावा

वर्धा, दि 7 सप्टेंबर (जिमाका) जिल्हयात डेग्युच्या आजाराच्या रुग्णात मोठी वाढ होत असून सावंगी मेघे व सेवाग्राम येथे 300 डेंग्यु आजाराचे रुग्ण दाखल असून इतर खाजगी रुग्णालयात सुध्दा मोठया प्रमाणात रुग्ण दाखल होतांना दिसत आहे. सामान्य रुग्णालया दाखल होणा-या रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरोसिस मशीन खरेदी करावी. ज्यामुळे  रुग्णांना प्लेटलेट देण्याची सुविधा उपलब्ध होऊन  रुग्णांना चांगले उपचार देता येईल त्याच बरोबर खाजगीरित्या प्लेटलेट खरेदी करण्याची आवश्यक भासल्यास  खरेदी करुन   सदर महात्मा ज्योतीबा फुले योजने अंतर्गत   रुग्णांवर  उपचार करावा  अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी  डेंग्यू आजार आढावा बैठकित दिल्यात.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकिला मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी वेदप्रकाश पाठक,सेवाग्राम वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन गगने, सावंगी रुग्णालयाचे प्रशासकिय अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे उपमुख्यकार्यकारी अधिकारी विपुल जाधव, वर्धा नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. देवळीकर, आर्वी , हिंगणघाट, सेलू नगर पंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

नगर पालिका व ग्रामपंचायत  क्षेत्रातील ज्या परिसरात डेंग्यु आजाराचे रुग्णाचे प्रमाण जास्त आढळून  येत आहे. अशा परिसराला  नगर पालिका अधिकारी व नगर सेवकांनी स्वत: प्रत्यक्ष भेटी देऊन स्वच्छतेबाबत पाहणी करुन लोंकामध्ये स्वच्छतेबाबत जागृती करावी.  यासाठी सेवाग्राम, सावंगी व सामान्य रुग्णालयाकडून डेंग्यु आजाराच्या रुग्णाची पत्त्यासह यादी मागवून घ्यावी. सर्व नगर पालिका ग्रामपंचायत क्षेत्रात कोरडा दिवस पाळावा. त्याचबरोबर  साचलेले गटार, नाल्या व घरामध्ये फवारणी करावी अशा, सूचना श्रीमती देशभ्रतार यांनी दिल्यात.

नागपूर, गडचिरोली, गोदिंया व भंडारा जिल्हयात डेल्टाचे रुग्ण आढळले असून  कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता सुध्दा नाकारता येत नाही त्यामुळे   नगर पालिकांनी कोविडची चाचणी वाढवावी त्याचबरोबर नगर पालिकाच्या शाळा  जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कोविड केअर सेंटर व गृहविलगीकरण कक्ष तयार करुन ठेवावे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांनी ऑक्सीजन पुरवठा , पर्याप्त प्रमाणात बेड उपलब्ध करुन ठेवावे. ऑक्सजीजन व व्हेंटीलेटरसहित बाल कोविड कक्ष तयार करुन ठेवण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

00000

Friday, 3 September 2021

 



जल जीवन मिशन अंतर्गत 442 योजनांची

कामांची निविदा प्रक्रिया  सप्टेंबर अखेरीस पूर्ण करा

                                 -जिल्हाधिकारी

वर्धा, दि 3 सप्टेंबर,(जिमाका):- जल जीवन मिशन अंतर्गत सुधारणात्मक पुनर्जोडणी व नविन पाणी पुरवठा अशा ४४२ योजनांची अंदाजपत्रके तयार करावयाची असल्याने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने अंदाजपत्रके तयार करण्याच्या कामाची गती वाढवावी. सप्टेंबर अखेर योजनांची अंदाजपत्रके प्रशासकिय मान्यतेस्तव सादर करुन निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिलेत.

         जल जीवन मिशन अंतर्गत "जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन बाबत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी

          डॉ. सचिन ओम्बासे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी.एस. वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे श्री. मदनकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील रहाने, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी दीपक हेडाऊ, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणचे श्री. कुळकणी, वरीष्ठ भूवैज्ञानिक राजेश सावळे, विद्युत वितरण कंपनीचे श्री. पडोळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे आदी उपस्थित होते.

        जिल्ह्यात प्रती माणसी प्रती दिवस 55 लिटर पाणी देण्यासाठी  425 गावांमध्ये असलेल्या जुन्या योजनांची क्षमता वृद्धी करण्यासाठी 393 योजनांची कामे करायची आहेत. तसेच 68 गावांमध्ये 49 नवीन योजनांची कामे सुरू करण्यासाठी या सर्व कामांचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या कामास गती देण्यास जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सर्व अंदाजपत्रके एक आठवड्यात तयार करून त्याला प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात.

पाणी पुरवठा योजनांकरिता सौर ऊर्जेवर आधारितनेट मिटरिंगचा अवलंब करण्याचे दृष्टीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभाग व महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांनी याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून  मार्गदर्शन मागविण्याचे निर्देश दिलेत.

         तसेच जल जीवन मिशन अंतर्गत सौर ऊर्जेवर आधारित नविन पाणी पुरवठा योजनेचे कामांकरिता कुशल व अनुभवी कंत्राटदारांकडून सदर काम करून घेण्यासोबतच  केलेल्या  कामाची गुणवत्ता तपासून महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांनी  काम पूर्णत्वाचा अहवाल द्यावा अशी सूचना ग्रामीण पाणी पुरवठा

कार्यकारी अभियंता यांनी केली. यासाठी  महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांचेकडे सदर कामाचे पर्यवेक्षण शुल्काचा भरणा केल्यास महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणकडून सदर कामावर पर्यवेक्षण करण्यात येईल व काम पूर्णत्वाचा अहवाल सादर करता येईल असे सांगितले. 

                                                   000000

 




‘उमेद’ अभियानातून मिळाला 214 महिलांना रोजगार

अडीच कोटीचा साकारला सोलर प्रकल्प

कवठा झोपडी गावाची यशोगाथा

देवळी, कारंजा व आष्टी तालुक्यातील

सात गावांत स्ट्रीट लाईट बसविण्याच्या कामास सुरुवात      

वर्धा दि.3 (जिमाका) : वर्धा जिल्हा बऱ्याचश्या ऐतिहासिक चळवळीमध्ये अग्रेसर राहिलेला आहे.  बचतगटाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यातही जिल्ह्याने नावलौकिक मिळवलेले आहे. याचा प्रत्यय येतो तो कवठा झोपडी या गावच्या तेजस्वी सोलर एनर्जी महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या सोलर  स्ट्रीट लाईट निर्मितीच्या प्रकल्पाच्या यशातून. या महिला बचतगटाने सुमारे अडीच कोटीचे स्ट्रीट लाईट निर्मितीचे ध्येय बाळगून जिल्ह्यातील देवळी, कारंजा व आष्टी तालुक्यातील सात गावांत स्ट्रीट लाईट बसविण्याच्या कामास सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे स्ट्रीट लाईट उपकरण एकत्रित करुन बसविण्याचे संपूर्ण काम महिलांव्दारे केल्या जाते. या प्रकल्पाच्या माध्यमातून 214 महिलांना रोजगार मिळाला असून महिला सक्षमीकरणाचे एक उत्तम उदाहरण समाजाला दिसून आले आहे.  

जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी विशेष प्रयत्न करुन स्ट्रीट लाईटसाइी निधी उपलब्ध करुन दिला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचीन ओम्बासे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सत्यजीत बडे, अभियान व्यवस्थापक स्वाती वानखेंडे यांचे सहकार्य लाभले आहे. या प्रकल्पाच्या महिला पदाधिकारी संगीता प्रकाश वानखेडे, अर्चना बलवीर यांच्या नियोजन व परिश्रमातून हा सोलर उत्पादने निर्माण करणारा प्रकल्प आकारास आला.

या प्रकल्पाच्या संस्थेला जिल्हा नियोजन समिती मार्फत 40 लाख स्ट्रीट लाईट पुरवठा करण्याचे मागणी प्राप्त झाली आहे. त्यानुसार 11 लक्ष 70 हजार रुपयाचा निधी संबंधित कंपनीला प्राप्त झाला असून त्यातून 56 सोलर स्ट्रीट लाईट जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील खातखेडा, एकाम्बा, कारंजा तालुक्यातील मेठहिरजी, खैरवाडा तर आष्टी तालुक्यातील ममदापूर, बाम्बडा, बोरखेडी आदी ठिकाणी तेजस्विनी सोलर एनर्जीव्दारे बसविण्यात आले.

कवठा झोपडी या गावी 'उमेद' अभियानाच्या माध्यमातून 214 महिलांनी बचत गट स्थापित करुन  तेजस्वी सोलर एनर्जी मागासवर्गीय महिला औद्योगिक प्रकल्पाची को-ऑपरेटिव्ह सोसायटी अंतर्गत नोंदणी केली. प्रकल्पाच्या माध्यमातून स्ट्रिट लाईट निर्मितीचे काम सुरु झाले. या प्रकल्पात 214 महिला सहभागी झाल्यात. या सोलर प्रकल्पासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईने तांत्रिक मार्गदर्शन दिले. यातील 12 महिलांना राजस्थानच्या डुंगरपूर येथील दुर्गा सोलर एनर्जी येथे प्रशिक्षित करण्यात आले. तसेच भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईव्दारा गावातच संबंधित महिलांना उमेद अभियानच्या माध्यमातून संपूर्ण प्रशिक्षण दिले.

तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या मागदर्शन व प्रयत्नातून समाजकल्याण विभागाच्या नाविण्यपूर्ण योजनेतून हा सोलर प्रकल्प उदयास आला. या प्रकल्पाचे 2 कोटी 62 लक्ष रुपये अंदाजपत्रक असून महिलांना प्रशिक्षित करुन सोलर उत्पादने तयार करण्यात येत आहे. प्रकल्पात काम करणाऱ्या महिलांनी एक हजार लॅम्प बनविले असून दोन लाख रुपयाची विक्री झाली आहे. या कामास उमेद अभियानाचे अधिकारी, व आयआयटी मुंबईने सहकार्य केले.

कवठा (झोपडी) या गावात कंपनीच्या इमारतीचे पूर्णपणे बांधकाम झाले असून पॅनल तयार करण्यास सुरुवात झाली आहे. सोलर पॅनल, सोलर स्ट्रीट लाईट व सोलर होम लाईट इत्यादी उत्पादने बनविण्याचे काम सुरु आहे. काही ठिकाणी सदर साहित्याची उभारणी सुद्धा करण्यात आली असून जिल्हा नियोजन समिती मार्फत या कंपनीला 40 लाख स्ट्रीट लाईटचा पुरवठा करण्याचे मागणी आदेश प्राप्त झाले आहे. या सोलर उत्पादनांच्या विक्रीतून सुमारे 11 लाख 70 हजार रुपये बचतगटाला मिळाले असून यामुळे गावातील महिलांना शाश्वत रोजगार उपलब्ध झाला आहे.

0000

 

 

 

 

 

 

 

Friday, 27 August 2021

 

.प्र..क्र- 618                                                                               दि.27.8.2021

महाडीबीटी पोर्टलवर विविध योजनेसाठी शेतकऱ्यांचे अर्ज आमंत्रित

प्रमाणित बियाणे वितरण,पीक,प्रात्याक्षिके,सुधारित कृषि औजारे व सिंचन सुविधा साधने या घटकासाठी अर्ज करता येणार

      वर्धा दि. 27 (जिमाका):-  सन 2021-22 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके व गळीत धान्य अंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण,पीक,प्रात्याक्षिके,सुधारित कृषि औजारे व  सिंचन सुविधा साधने या बाबीसाठी इच्छुक शेतक-यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. शेतकऱयांनी महाडीबीटी पोर्टलवर 30 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर पर्यंत नोंदणी करावी.

पीक प्रात्यक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने पीक प्रात्याक्षिकांसाठी अर्ज करताना संबंधित कृषि सहाय्यकांशी संपर्क करुन 10 हे.क्षेत्र असणा-या गटांनी नोंदणी करावी. शेतक-यांना नोंदणी करण्यासाठी दिनांक 30 ऑगष्ट,20212ते सप्टेंबर,2021 पर्यंत मुदत देण्यात येत आहे. विहित मुदतीत नोंदणी करणा-या शेतक-यांचाच विचार केला जाईल. याची नोंद घ्यावी.

बियाणे वितरण:-

  हरभरा प्रमाणित बियाणे वितरण 10 वर्षाआतील वाणास रु.25  प्रति किलो,10 वर्षावरील वाणास रु. 12 - प्रति किलो,  रब्बी ज्वारी 10 वर्षाआतील वाणास रु.30 प्रति किलो,10 वर्षावरील वाणास रु.15 प्रति किलो. एकुण किंमतीच्या 50 टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतक-याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देण्यात येईल.

पीक प्रात्याक्षिके:-

हरभरा,करडई व रब्बी ज्वारी  पीक प्रात्याक्षिकासाठी एका शेतक-याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरुपात अनुदान उपलब्ध करुन दिले जाणार आहे. बियाणे, जैविक खते, सुक्ष्ममुलद्रव्ये,भु सुधारके व पीक संरक्षण औषधी या निविष्ठांसाठी शेतक-याला 1 एकरच्या मर्यादेत डीबीटी तत्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे. यासाठी कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञांचे सल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येणार असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे. शेतक-यांची निवड ऑनलाईन लॉटरी पध्दतीने होणार आहे.

000000

.प्र.प.क्र- 619                                                            दि.27.8.2021                                                                  

सोयाबीनवरील मरुका अळीचे व्यवस्थापन.    

     वर्धा दि. 27 (जिमाका):-  सोयाबीन या पिकावर मरुका या किडिचा प्रादुर्भाव बुलढाणा जिल्ह्यातील चिखली व शेगाव या दोन तालुक्यामध्ये झाल्याचे दिसून येत आहे. आपल्या जिल्ह्यात अद्याप या किडीचा नोंद नाही. मात्र तरीही शेतकऱयांनी जागरूकपणे या अळीवर लक्ष ठेवणे आवश्यक असून अळी दिसून आल्यास त्याचे योग्य व्यवस्थापन करावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. 

सोयाबीन उत्पादन कमी येण्याच्या विविध कारणंपैकी किडिंचा प्रादुर्भाव हे सर्वात महत्वाचे कारण आहे. सोयाबीन पिक हिरवेगात, मऊ,लुसलुशीत आणि दाट पानांचे असल्यामुळे अनेक किडी या पिकाकडे आकर्षित होतात. त्यात प्रामुख्याने तंबाखुवरील पाने खाणीर अळी (स्पेाडोप्टोरा),उंट अळी व घाटे अळी (हेलिकोव्हर्पा) या किडींचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर नुकसान करतांना आढळुन येतो.

   मरुका पॉड बोरर,बिन पॉड बोरर,मंग मॉथ किंवा सोयाबीन पॉड बोरर या नावाने ओळखली जाणारी ही किड बहुपक्षी असून प्रामुख्याने तुर पिकास नुकसान करते. त्याच बरेाबर सोयाबीन, चवळी,मुग,उडीद व पावटा या पिंकांवर देखील या किडिचा प्रार्दुभाव आढळुन येतो.

जीवनक्रम:-

   पिक फुलो-यांच्या अवस्थेत असतांना या किडिचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसुन येते. या किडीचे प्रौढ कीड तपकिरी काळसर रंगाचे असुन मध्यम बांध्याचे असतात. त्यांच्या पंखांवर पांढरे चटटे आढळतात. पतंग रात्रीच्या वेळी कार्यरत असतात. मादी पतंग अंडी शक्यतो झाडाच्या शेंड्यांवर पुंजक्यात घालते. अंड्यांचा रंग हलका पिवळसर असून चार ते पाच दिवसांत अंडी उबतात. सदर किडिची अळी हिरवट पांढ-या रंगाची चमकदार असून तिच्या पाठीवर काळसर ठिपके असतात. त्यामुळे तिला ठिपक्यांची अळी असेही म्हणतात. अळीचे डोके गर्द तपकिरी रंगाचे असुन ती अतिशय चपळ असते व हलक्या धक्यानेही लगेचच गुंडाळलेल्या फुले कळयामधुन खाली पडते. अळीच्या पाच अवस्था असुन आठ ते चौदा दिवसात अळी अवस्था पुर्ण होते. कोषावस्था चंदेरी रेशमी जाळयांनी विणलेल्या अवस्थेत फुले, कळ्या किंवा जमिनीत आढळते. या किडीचा जीवनक्रम साधारपणे 18 ते 35 दिवसांत पुर्ण होतो.

नुकसानीचा प्रकार:-

    प्रथम अवस्थेतील अळ्या प्रामुख्याने फुले व फुलकळ्यांवर उपजिवीका करण्यास प्राधान्य देतात. प्रत्येक अळी साधारणत: चार ते सहा फुले प्रादुर्भावीत करते. तिस-या अवस्थेतील अळ्या ह्या शेंगावरती उपजिविका करण्यास सुरुवात करतात व पाचव्या अवस्थेतील अळ्या मोठ्या प्रमाणात शेंगांना प्रार्दुभाव करतात. तसेच अधुन मधुन पाने,शेंगाच्या देठांना व मुख्य खोडाला नुकसान करतात. विशेषत: ऑगष्ट सप्टेबर महिन्यामध्ये म्हणजेच पिक फुलोरा अवस्थेत  येण्याच्या कालावधीमध्ये वातावरणामध्ये जास्त आर्दता व मध्यम तापमान असते. अशा अनुकुल वातावरणात किडीचे प्रजनन जलद होते. जास्त आर्द्रता असलेल्या भागात ह्या किडीचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसुन येते. सदर परिस्थितीत सोयाबीनवरील मरुका किडीचे नियंत्रणासाठी केंद्रीय किटकनाशक मंडळाव्दारा कुठल्याही किटकनाशकाची शिफारस उपलब्ध नाही. परंतु तुरीवरील मरुका किडीचे नियंत्रणासाठी खालील शिफारशीत किटकनाशके उपलब्ध आहेत तरी फवारणी करीता त्यांचा अवलंब करता येईल.

फवारणीसाठी उपलब्ध रासायनिक कीटकनाशके

1)क्लोरॅट्रॅनिलीप्रोल 18.50 एस.सी. किंवा 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात.

2) इथिऑन 50 ई.सी -    20मिली प्रति 10 लिटर पाण्यात.,

3)फ्लुबेन्डामाईड 20 डब्यु.जी. -   6 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात.

4)थायोडिकार्ब 75 डब्ल्यू पी. -   15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात.

5) नोव्हॅल्युरॉन 5.25+ इन्डोक्झाकार्ब 4.50 एस.सी. 17.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात.

6) इन्डोक्झाकार्ब 15.80 इ.सी.-   6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात.

7) इन्डोक्झाकार्ब 14.50 एस.सी.-           4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात. तयार करून फवारणी करावी.

 

00000

 

 

महाआवास अभियानांतर्गत विभागीय पुरस्काराचे सोमवारी वितरण

राज्य पुरस्कृत आवास योजनेत वर्धा प्रथम

* केंद्र पुरस्कृत आवास योजनेत गोंदिया प्रथम*

* उत्कृष्ट तालुके व ग्रामपंचायतींना मिळणार पुरस्कार*

     वर्धा , दि. 27 : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरीसाठी दिल्या जाणारा महाआवास अभियान-ग्रामीण अंतर्गत विभागीय स्तरावरील उत्कृष्ट कामगिरीबद्दलचा गौरव समारंभ सोमवार,30 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

राज्य पुरस्कृत आवास योजनेत वर्धा प्रथम

राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये सर्वोकृष्ट जिल्हा म्हणून वर्धा जिल्ह्याची निवड झाली आहे. द्वितीय क्रमांक भंडारा जिल्ह्याला तर तृतीय क्रमांक चंद्रपूर जिल्याल्ला प्राप्त झाला आहे. उत्कृष्ट तालुक्यामध्ये प्रथम सडक अर्जुनी (गोंदिया), द्वितीय लाखांदूर, तृतीय पवनी पंचायत समिती, जिल्हा भंडारा यांची निवड झाली आहे.

उत्कृष्ट ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत बोरगाव(चंद्रपूर), द्वितीय दिघोरी (भंडारा) तर तृतीय सानगांव(साकोली) व ग्रामपंचायत चिचूर(कुही) नागपूर जिल्ह्याची निवड झाली आहे. बांधकामासाठी कर्ज  देणारी उत्कृष्ट वित्तीय संस्था म्हणून प्रथम वर्धा जिल्ह्यातील समानता प्रभाग संघ, समुद्रपूर, द्वितीय परिवर्तन प्रभाग संघ सेलू तर तृतीय  सार्थक प्रभाग संघ वायफळ या वर्धा जिल्ह्यातील तीनही संस्थांचा या पुरस्कारामध्ये समावेश आहे.

महाआवास अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल ‍जिल्हे, तालुके तसेच उत्कृष्ट ग्रामपंचायतींना विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देवून गौरविण्यात येणार आहे.

महाआवास  अभियान ग्रामीण अंतर्गत विभागीय स्तरामध्ये केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचा प्रथम पुरस्कार गोंदिया जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. तसेच द्वितीय पुरस्कार भंडारा जिल्हा तर तृतीय पुरस्कारासाठी वर्धा जिल्ह्याची निवड झाली आहे. उत्कृष्ट तालुक्यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय तालुका म्हणून गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, गोंदिया व  तिरोडा पंचायत समितीला अनुक्रमे पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यासोबतच  उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून गोंदिया जिल्ह्यातील तळेगाव, द्वितीय कोरंबी तसेच केसोरी या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावांची निवड झाली आहे. तृतीय पुरस्कार वर्धा ‍जिल्ह्यातील झंझाडा ग्रामप्रचायतीची निवड झाली आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी कर्ज देणारी वित्तीय संस्था म्हणून वर्धा  जिल्ह्याची नारी शक्ती प्रभात संघ सिंधीविहिरी(कारंजा), द्वितीय भंडारा जिल्ह्यातील बँक ऑफ इंडिया, आंधळगाव तर तृतीय वर्धा जिल्ह्यातील हिरकणी प्रभाग संघ, अंदोरी(देवळी) तसेच जागा व वाळू उपलब्ध करुन देण्यासाठी प्रथम वरोरा तालुका, द्वितीय कामठी तालुका तर तृतीय भद्रावती तालुक्याचा समावेश आहे.

0000

 

.प्र..क्र- 617                                                                               दि.27.8.2021

4 महिन्यात दोन लक्ष सव्वीस  हजार सहाशे गरिबांना मिळाला निःशुल्क शिवभोजन थाळीचा आधार

17 केंद्रावरून मिळतो लाभ

      वर्धा दि. 27 (जिमाका) : कोरोना काळात सर्वत्र लॉक डाऊन असताना कुणीही गरीब उपाशी राहू नये यासाठी शासनाने 15 एप्रिल,2021 पासून नि:शुल्क शिवभोजन थाळी उपलब्ध करुन दिली. तसेच जिल्ह्यात शिवभोजन थाळीचा इष्टांक दीड पट वाढवून तो 2100 पर्यंत दिला. एप्रिल ते ऑगस्ट या चार महिन्यात 2 लक्ष 26  हजार 600 गरिबांना निःशुल्क शिवभोजन थाळीचा आधार मिळाला आहे.

शासनाच्या शिवभोजन योजनेचा प्रारंभ राज्यात दिनांक 26 जानेवारी 2020 पासून सुरु झाला. गरीब व गरजु लोकांना स्वस्तात शिवभोजन मिळावे याकरिता शासनाने वर्धा जिल्ह्याकरिता  23 ऑगष्ट 2021 पर्यंत वर्धा शहर व जिल्ह्याअंतर्गत सर्व तालुके मिळुन 17 केंद्रे सुरु करण्यात आली या सर्व केंद्राला शासनाने प्रतिदिन 1600 थाळ्यांचा इंष्टांग मंजुर केला होता. पण कोरोना काळात कुणीही गरीब व गरजु व्यक्ती उपाशी राहु नये, म्हणुन शासनाने  15 एप्रिल,2021 पासून नि:शुल्क शिवभोजन थाळी उपलब्ध करुन दिली.  तसेच प्रतिदिन थाळीच्या इंष्टांकात  दीड पट वाढ केली.  वर्धा जिल्ह्यात सरासरी 1800 ते 2100 थाळ्यांचा लाभ गरीब,गरजु व अनाथ लोक दररोज या सर्व केंद्रावरुन घेत आहे.

या योनजेअंतर्गत वर्धा जिल्ह्यात एकुण 17 केंद्रावर ह्या थाळीचा लाभ गरीब व गरजु लोक घेत आहे.  15 एप्रिल ते 23 ऑगष्ट 2021 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 2,43,00,230 (दोन कोटी त्रेचाळीस लाख) लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर वर्धा जिल्ह्यातील 17 केंद्रावरुन 2 लक्ष 26 हजार 613 एवढ्या गरीब व गरजु लोकांनी या थाळीचा लाभ घेतलेला आहे. विशेष म्हणजे  17 शिवभोजन केंद्राला शासनाच्या नियमाप्रमाणे  14 ऑगष्ट 2021 पर्यतचे संपूर्ण अनुदान वितरीत करण्यात आले आहे.

 

 

000000

 

.प्र.प.क्र- 618                                                                  दि.27.8.2021

 

महिला व मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण व साहित्यासाठी 90 टक्के अनुदान

इच्छुक लाभार्थ्यांनी 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावा

     वर्धा दि. 27 (जिमाका):-  महिला व बाल कल्याण समितीकरीता सन 2021-22 च्या अंदाजपत्रकातील तरतुदीप्रमाणे प्राप्त निधीनुसार  ग्रामीण भागातील मुलींना 90 टक्के अनुदानावर व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण तसेच महिलांना व्यवसायासाठी 90 टक्के अनुदानावर साहित्य पुरविण्याची योजना राबविण्यात येत आहे. यासाठी  सर्वसाधारण, अनुसूचित जाती- जमाती  प्रवर्गातील  लाभार्थ्यांकडून 15 ऑक्टोबर,2021 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील स्त्रियांना 90 % अनुदानावर साहित्य पुरविणे (शिलाई मशिन) तसेच ग्रामीण भागातील मुलींना व महिलांना 90 %  अनुदानावर व्यावसायिक व तांत्रीक प्रशिक्षण (शिवणकाम व फॅशन डिझाईनिंग प्रशिक्षण)

देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. यात ग्रामपंचायतीने सदर लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेमध्ये करून ती माहिती पंचायत समितीला पाठवावी. यासाठी अर्जदारांनी ग्रामपंचायत मध्ये अर्ज करावा.

अर्जदाराचे बी.पी.एल.चे प्रमाणपत्र तसेच तलाठी/तहसिलदाराचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र जोडावे. सन 2020-2021 चे वार्षीक उत्पन्न् रु. 1,20,000/- (अक्षरी एक लक्ष वीस हजार फक्त) पेक्षा जास्त नसावे. अर्जदार ही वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असावी. (सरपंच/सचिवाचे प्रमाणपत्र जोडावे.) जातीचे प्रमाणपत्र तहसिलदार किवा उपविभागीय अधिका-यांचे प्रमाणपत्र जोडावे. सदर योजनेचा लाभ, लाभार्थ्यांनी अन्य कोणत्याही विभागाकडुन/योजनेतुन घेतलेला नसावा. लाभार्थीना साहित्य शुल्काच्या 90 % रक्कम अदा करणेत येईल. किंवा या कार्यालयाकडुन दर निश्चितीच्या 90 % रक्कम लाभार्थ्यांना अदा करण्यात येईल.

शिवणकलेचे मान्यता प्रापत संस्थेचे प्रमाणपत्र जोडावे.

लाभार्थ्यांचे आधारकार्ड व बँक पासबुकची झेरॅाक्स प्रत व बँकेची सिडीग स्लीप अर्जासोबत जोडावी. लाभार्थ्यांना वस्तू व  प्रशिक्षण शुल्काच्या 10% रक्कम स्वतः भरावी लागेल. 

 

00000

Thursday, 26 August 2021

 

वर्धा विधानसभा मतदार संघातील प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीवर मतदारांनी हरकती नोंदवाव्यात.                                                                                                                                         

                                                                                           -सुरेश बगळे

      वर्धा दि. 26 (जिमाका) वर्धा विधानसभा मतदार संघातील  17 जानेवारी ते  23 जुलै 2021 या कालावधीची मतदारांची सुधारित नमुना 10 यादी नगर परिषद वर्धा, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तसेच संबंधित ग्रामपंचायत च्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. ज्या मतदाराचा त्यांच्या यादी भागात सर्वसाधारण रहिवास आहे, परंतु त्यांचे नाव कमी झालेले आढळल्यास त्यांनी तात्काळ तहसील कार्यालय वर्धा येथे नमुना 6 भरुन ,रंगीत फोटोसह, जन्म तारिख व रहिवासी पुराव्यासह सादर करावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे.

 1 जानेवारी,2021 या आर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित झाला आहे. त्याअनुषंगाने 047 वर्धा विधानसभा मतदार संघातील मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांनी त्यांच्या भागामधील फोटो नसलेले मतदारांचे फोटो गोळा केलेत व जे मतदार मय्यत/दुबार आहेत व जे मतदार आढळुन येत नाही तसेच जे मतदार स्थालांतरील झाले आहेत अशा मतदाराचे नमुना 7 भरुन दिले आहेत.  प्राप्त नमुना 7 च्या आर्जाची 17 जानेवारी  ते 23 जुलै 2021 पर्यन्त  डाटा एन्ट्री करण्यात आली आहे. त्या डाटा एन्ट्री केलेले नमुना 7 च्या अर्जाची नमुना 10 यादी भाग क्रमांक नुसार तयार करुन राष्ट्रीय व राज्य स्तरीय पक्षांना प्रसिध्दीसाठी पाठविण्यात आली आहे. शहरी यादी भागाचे नमुना 10 नोटीस नगर परिषद,वर्धा येथे प्रसिध्दी करण्यासाठी मुख्याधिकारी,नगर परिषद,वर्धा यांना पाठविण्यात आली व ग्रामीण यादी भागाचे नमुना 10 नोटीस ग्रामपंचायत मध्ये प्रसिध्दी करण्यासाठी गट विकास अधिकारी,पंचायत समिती,वर्धा यांना पाठविण्यात आले आहे. तसेच त्याची एक प्रत मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार,वर्धा यांच्या नोटीस बोर्ड वर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. मतदारांनी  आपल्या भागातील मतदार यादी पाहून नाव कमी झाल्याचे आढळल्यास तात्काळ तहसील कार्यालयात कळवावे.

 

00000