Monday, 1 July 2019


                      आनंदी जगण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक
                                                          - विवेक भिमनवार

Ø 87 लक्ष वृक्ष लागवडीचे आज जंगलापूर येथे उदघाटन
          वर्धा, दि 1 जिमाका:-  वनक्षेत्र जास्त असणाऱ्या देशांमध्ये  हॅपिनेस इंडेक्स  अर्थात आनंदी असण्याचे प्रमाण अधिक  आढळून आले आहे.  त्यामुळे आपल्या देशाचा हॅपिनेस इंडेक्स वाढविण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी  प्रत्येक व्यक्तीने वृक्ष लागवड आणि त्याचे संगोपन करावे,  असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले.
          33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत  जंगलापूर  येथे वनमहोत्सव उदघाटन कार्यक्रम वृक्ष लागवडीने पार पडला. यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना आवाहन केले. यावेळी
मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासें, पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली, उपवन संरक्षक सुनील शर्मा,
  जिल्हा परिषद सदस्य विनोद लाखे , तहसीलदार सोनवणे , नगराध्यक्ष शारदा माहुरे, पंचायत समिती सभापती जयश्री खोडे, गटविकास अधिकारी श्रीमती कोल्हे, विभागीय वनाधिकारी डी एन जोशी,  शैलेंद्र दफतरी,  केळझरच्या सरपंच श्रीमती लोणकर, प्रा.वैभवी उघडे, मुरलीधर बेलखोडे, आशिष गोस्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.
        लोकांच्या सहभागामुळे  50 कोटी वृक्ष लागवडीचा  कार्यक्रम यशस्वी झाला आहे. काही वर्षांपूर्वी  ग्लोबल वार्मिंग हा विषय केवळ चर्चासत्राचा होता. पण  हा विषय इतक्या लवकर प्रत्यक्षात अनुभवावा लागेल  असे वाटले नव्हते. ग्लोबल वार्मिंगमुळे प्रत्येक वर्षी आपण नैसर्गिक  आपत्तीला सामोरे जातोय. यावर्षीचा उन्हाळा हा खूप तीव्र आणि दीर्घ स्वरूपाचा होता. महाराष्ट्रात  ज्या गावांमध्ये वनक्षेत्र कमी आहे तिथेच पाण्याचे टँकर लागले होते.  त्यामुळे वनक्षेत्र जास्त असेल तर पाणी सुद्धा जास्त राहील.  राज्यात 33 टक्के वन पाहिजे, मात्र ते केवळ 20 टक्के आहे. जेव्हा ते 33 टक्के होईल तेव्हा दुष्काळ, ग्लोबल वार्मिंग सारख्या  समस्या राहणार नाहीत.  त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने 10 झाडे तरी लावावीत.  फिलिपाईन्स या देशाने 10 झाडे प्रत्येक विद्यार्थ्याने लावली तरच त्यांना पदवी प्रमाणपत्र दिल जात. आपल्याकडे ही शक्ती करण्याची गरज पडू नये. सक्ती पेक्षा स्वतःहून केलेलं कोणतंही काम चांगलं आणि कायमस्वरूपी होतं. आजच्या ग्लोबल वार्मिंगला थोपवण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक आहे. आपल्या  जिल्ह्याला 87 लाख 52 हजार च उद्दिष्ट आहे आपण सर्व मिळून हे उद्दिष्ट  पूर्ण करू अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
        पृथ्वीवर जगण्यासाठी जे वातावरण आवश्यक आहे ते म्हणजे पाणी आणि ऑक्सिजन. या दोन्ही बाबी झाडांमुळे आपल्याला मिळतात. ही पृथ्वी पुढील पिढीसाठी जगण्यायोग्य राहावी  यासाठी आता आपण काळजी घेतली पाहिजे. आज भूजल पातळी 80 फुटावरून 600 फुटापर्यंत खाली गेली आहे. पुढच्या 30 वर्षात काय परिस्थिती होईल हे सांगता येत नाही. हे थांबवायचं असेल तर प्रत्येकाने झाड लावून ते जगवावे असे आवाहन पोलीस अधीक्षक बसवराज तेली  यांनी केले.

          सचिन ओंबासे यावेळी बोलताना म्हणाले,  87 लाखांपैकी 20 लाख वृक्ष लागवडीचा लक्ष्यांक  जिल्हा परिषदेकडे  आहे. लोकांचा सहभाग वाढविल्याशिवाय शासकीय योजना यशस्वी होत नाही असे जेव्हा दिसून आले तेव्हा जलयुक्त शिवार, स्वछता अभियान यासारख्या कार्यक्रमात शासनाने लोकसहभाग मिळविला आणि त्या योजना यशस्वी झाल्यात.  वृक्ष लागवड सुद्धा आज लोकचळवळ झाली आहे. यावर्षी जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांने एक वृक्ष लावून त्याच संगोपन करायचं आहे असे सांगितले.
      याप्रसंगी प्रा वैभवी उघडे, विनोद लाखे, आणि शैलेंद्र दफटरी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक करताना सुनील शर्मा यांनी ग्लोबल वार्मिंग नियंत्रित करण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक असल्याचे सांगितले.
वृक्ष लागवड ही बाल संगोपणासारखी करावी. यावेळी वन विभागासोबतच वेगवेगळ्या
49 विभागांना  उद्दिष्ट दिले आहे . वर्धा जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार मोठं खूप चांगला आहे. वनविभागाच्या वतीने जनतेसाठी रोपे आपल्या दारी उपक्रम यावर्षी सुद्धा राबविण्यात येत आहे. या ठिकाणी लोकांना सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध होतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
      यावेळी महाबळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवडीमध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. संदीप पेटारे, तर आभार डी एन जोशी यांनी मानले. 
                                                       

Sunday, 2 June 2019




         प्र.. 199                                                            दि. 2 जुन 2019 
पूर्व विदर्भात शेतक-यांच्या विज जोडणीसाठी स्वतंत्र धोरण राबविणार
                                            - पालकमंत्री मुनगंटीवार
v 2019-20 खरीप नियोजन आढावा बैठक
v शेतक-यांबाबत संवेदनशीलपणे काम करण्याचे निर्देश
v खरीप हंगामासाठी 4 लक्ष 28 हजार हेक्टरचे नियोजन
         वर्धा,दि.2(जिमाका) : सिंचनाच्या माध्यमातून शेतक-यांचे उत्पादन वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शेतक-यांना सोलर कृषी पंपांच्या माध्यमातून विज जोडणी देण्यात येत आहे. शेतकरीसुध्दा मोठ्या प्रमाणात अर्ज करीत असून शेतक-यांच्या विज जोडणीसाठी पूर्व विदर्भात स्वतंत्र धोरण राबविण्यात येईल, असे प्रतिपादन अर्थ व नियोजन, वने तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
          जिल्हा परिषदेच्या सभागृहात सन 2019-20 खरीप नियोजन व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, खासदार रामदास तडस, आमदार रामदास आंबटकर, आमदार  समीर कुणावार, रणजित कांबळे, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे,  कृषी सभापती  मुकेश भिसे, राज्य कृषी आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विद्या मानकर आदी उपस्थित होते.
          इतर विभागाच्या बैठकीपेक्षा खरीप आढावा व नियोजन बैठक अतिशय महत्वाची आहे, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सोलर कृषी पंपासाठी शेतक-याने अर्ज दिल्यापासून एक महिन्याच्या आत त्याच्या शेतात सोलरपंप लागणे गरजेचे आहे. संबंधित एजंन्सीने हे काम प्राधान्याने करावे. ठराविक कालावधीपेक्षा जास्त वेळ लागत असले तर अशा एजंन्सीविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. पीक कर्जासाठी शेतक-यांच्या अर्जाची वाट पाहू नका. शेतक-यांपर्यंत कृषी विभाग आणि बँकांनी पोहचले पाहिजे. यासाठी शेतक-यांचे मेळावे घ्या. या मेळाव्यात जास्तीत जास्त शेतकरी येतील याची काळजी घ्यावी. केवळ उद्दिष्ट पुर्तीकरीता मेळावे घेऊ नका. शेतक-यांना पीक कर्ज नाकारणे योग्य नाही, अशा ही सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
          शेतक-यांना केंद्रबिंदू मानून खरीपाबाबत योग्य नियोजन करा, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिका-यापासून तर कृषी सहाय्यकापर्यंत सर्वांनी शेतक-यांच्या तक्रारींची तातडीने दखल घ्यावी. नियमाच्या चौकटीत राहून काम करायचे असले तरी शेतक-यांना मानवतेची वागणूक द्या. प्रतिबंधित बीटी, निकृष्ट दर्जाची खते आणि बियाणे विकणा-यांवर कडक कारवाई करा. यात कृषी विभागाने कुठलीही हयगय करू नये. केवळ लक्षांकासाठी तपासणी मोहीम राबवू नका. खत आणि बियाणांचा काळाबाजार याबाबत एखादी गुप्त माहिती मिळाल्यावर त्यावर त्वरीत कार्यवाही होणे गरजेचे आहे. भरारी पथकामध्ये प्रामाणिक आणि चांगल्या अधिका-यांची नियुक्ती करा.
          सिंचनाचे उद्दिष्ट व इतर अनुषांगिक माहिती यासाठी एक पुस्तिका तयार करून ती लोकप्रतिनिधींना द्यावी. लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या 100 टक्के समन्वयाशिवाय योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकत नाही. त्यामुळे कृषी विभागाच्या योजनांची माहिती लोकप्रतिनिधींना द्या. 18:18:10 खताबाबत कृषी विभागाने शेतक-यांना योग्य मार्गदर्शन करावे. कृषी विभागाशी संबंधित विविध विषयांवर अधिकारी –कर्मचारी तसेच आदर्श शेतक-यांच्या माध्यमातून उत्कृष्ट लेख लिहून  घ्यावे. तसेच या लेखांचा संग्रह करून अनुभवावर आधारीत पुस्तिका तयार करावी. जय किसान कॉल सेंटरच्या माध्यमातून शेतक-यांच्या तक्रारी नोंदवा. आठवड्याअखेर तक्रारींचा आढावा घेऊन या तक्रारी निकाली काढा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.
          यावेळी पालकमंत्र्यांनी पिककर्ज, बियाणे व खतांची उपलब्धता, विज जोडणी, प्रधानमंत्री पिक विमा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, क्रॉपसॅप संलग्न शेतीशाळांचे नियोजन, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, 33 कोटी वृक्ष लागवड आदी विषयांचा आढावा घेतला.
          यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विद्या मानकर यांनी पॉवर पॉईन्ट प्रेजेन्टेशनव्दारे खरिप हंगामाच्या नियोजनबाबत  माहिती दिली. यावेळी शेतक-यांसाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक घडीपत्रिकेचे विमोचन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
          जिल्हयात 2019-20 मध्ये एकुण 4 लक्ष 28 हजार 625 हेक्टर खरीपाचे नियोजन करण्यात आले आहे. यात कापूस 2 लक्ष 35 हजार 500 हेक्टरवर, सोयाबिन 1 लक्ष 25 हजार 250 हेक्टर,भुईमुग 675 हजार हेक्टर, तूर 65 हजार हेक्टरवर, मुंग 400 हेक्टर, ज्वारी 1100 हेक्टर  यांचा  समावेश आहे. 
          गतवर्षीच्या तुलनेत 75 हजार 767 क्विंटल खरीप बियाण्याची मागणी करण्यात आली असून यापैकी खाजगी क्षेत्रातून 54080 क्विंटल बियाणे उपलब्ध होईल. तर सार्वजनिक क्षेत्रातील महाबिज मार्फत 21678 क्विंटल बियाण्यांची मागणी खात्याकडे सोपविण्यात आली आहे.
          खरीप हंगामासाठी रासायनिक खताच्या खात्यामार्फत एकुण 126270 मे.टनचे आवंटन मंजूर झाले आहे. यात युरिया 44200 मे.टन, डी.ए.पी. 20640 मे.टन, एम.ओ.पी. 12190मे.टन, एस.एस.पी.   16190 मे.टन, संयुक्त खत 33050 मे.टन यांचा समावेश आहे.
          यावेळी बैठकिला  उपमुख्यम कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक बिरेंद्रकुमार, निम्न वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अधियंता श्री. व-हाडे, कार्यकारी अभियंता  दि.ग. बारापात्रे, वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. काळे आदी विभाग प्रमुख उपस्थित होते.

                                                0000
         


Monday, 11 March 2019





वर्धा लोकसभा मतदार संघासाठी 11 एप्रिलला  मतदान
जिल्हाधिकारी यांची पत्रकार परिषदेत माहिती

•जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू
• नागरिकांना तक्रारीसाठी 'सी व्हिजिल' अँप
• ही निवडणूक 'दिव्यांगासाठी सुलभ निवडणूक' म्हणून घोषित
• मतदार संघात एकूण 17 लक्ष 24 हजार 581 मतदार
वर्धा दि 11:- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी संपूर्ण देशात  आचारसंहिता लागू झाली असून वर्धा लोकसभा मतदार संघासाठी पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाची  तयारी सुरू असून मतदार नोंदणीसाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मिळालेल्या प्रतिसादावर मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात आचारसंहितेची कडक अंमलबजावणी होणार असून नागरिकांना सुद्धा आचारसंहितेचा भंग होत असल्यास सी- व्हिजिल अँप वर तक्रार करता येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक भीमनवार यांनी पत्रकार परिषदेत दिली .
वर्धा लोकसभा मतदार संघासाठी 18 मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध होऊन नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात होईल. 25 मार्च पर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करता येतील. 26 मार्चला नामनिर्देशन पत्राची छाननी होऊन 28 मार्चला उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. 29 मार्चला अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होऊन त्यांचे निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. प्रचारासाठी उमेदवारांना 11 दिवसांचा कालावधी मिळणार असून 11 एप्रिलला मतदान होणार आहे. भारतीय खाद्य महामंडळाच्या गोडाऊन मध्ये 23 मे ला मतमोजणी होणार आहे.
वर्धा लोकसभा मतदार संघात धामणगाव ,मोर्शी, आर्वी, देवळी, हिंगणघाट, वर्धा अशा 6 विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. 31 जानेवारी ला प्रसिद्ध झालेल्या मतदार यादिनुसार वर्धा लोकसभा मतदार संघात एकूण 17 लक्ष 24 हजार 581 मतदार असून यामध्ये 8 लक्ष 86 हजार 109 पुरुष तर  8 लक्ष 38 हजार 447 महिला मतदार आहेत. यामध्ये 1286 सैनिक मतदारांची सुद्धा नोंद आहे. 
2019 हे लोकसभा निवडणुकीचे वर्ष  निवडणूक आयोगाने 'अपंगांसाठी सुलभ निवडणुका' असे घोषित केले असून मतदार संघात एकूण 4391 दिव्यांग मतदारांची ओळख पटविण्यात आलेली आहे. त्यांना मतदान केंद्रावर पोहचविण्यासाठी व्हील चेअर ची सुविधा सुद्धा पुरविण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यासाठी रॅम्प ची व्यवस्थाही करण्यात येणार  असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. 
आयोगाच्या निर्देशानुसार कोणीही मतदार वंचित राहता कामा नये   या घोष वाक्यानुसार जास्तीत जास्त मतदारांची मतदार नोंदणी करण्यात आलेली आहे. यात दिनांक 23 व 24 फेब्रुवारी व 3 व 4 मार्च 2019 रोजी दोन विशेष मतदार नोंदणीसाठीचे कॅम्प राबविण्यात आलेले आहेत व त्यामध्ये एकुण नमुना-6-8631, नमुना-7-3698 व नमुना-8 अ-102 प्राप्त झालेले आहेत. त्यांची डाटाएन्ट्री करण्यात आलेली असुन त्यांचा समावेश पुरवणी मतदार यादीमध्ये करण्यात येणार आहे.
संघात एकूण 1995 मतदान केंद्र असून ग्रामीण भागात 1559 तर शहरी भागात 436 मतदान केंद्र आहेत. काही मतदान केंद्रावर 1400 पेक्षा जास्त मतदार आहेत त्यामुळे अशा ठिकाणी सहाय्यकारी मतदान केंद्राची निर्मिती केली असून असे 28 सहाय्यकारी मतदान केंद्र आहेत.  सर्व मतदान केंद्रावर एकुण 8 आश्वासित पायाभूत सुविधा पुरविण्यात येणार  आहेत. यामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा, अपंगांसाठी रॅम्पची  सुविधा, विजेची सुविधा, मदतकक्ष, प्रसाधनगृह, फर्नीचर, दिशादर्शक फलक, सावलीसाठी शेड या सर्व सुविधाचा समावेश असणार आहे.  
            नागरीकांना व मतदारांना आचार संहिता भंगाच्या तक्रारी व मतदार यादी  विषयक व मतदान केंद्राविषयी माहितीसाठी जिल्हा संपर्क क्रमांक टोल फ्री.1950 या क्रमांकावर संपर्क साधून करता येणार आहे. 11 मार्च 2019 रोजी दुपारी 1.00 वाजेपर्यंत एकुण 345 नागरीक मतदार यांनी या क्रमांकावर संपर्क साधून आपले शंकांचे समाधान करून माहिती घेतलेले आहे.
            एकुण 48  शासकीय जिल्हास्तरावरील कार्यालयांमध्ये मतदार जागृती मंचाची   स्थापना करुन  नोंडल अधिकारी  यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामुळे नागरिक मतदारांना निवडणूक विषयी माहिती देण्यात येते.
            या निवडणूकीत इ.व्ही.एम  सोबत व्ही.व्ही.पॅट  या मशिनचा वापर सर्व मतदान केंद्रावर नागरीकांना मतदान नेमके कोणत्या उमेदवारांस केले याची खात्री व्हावी यासाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदान प्रक्रीयेत सुलभता व पारदर्शकता आलेली आहे. इ.व्ही.एम  सोबत व्ही.व्ही.पॅट  जनजागृती मोहिम अंतर्गंत जिल्हयातील एकुण 1387 गांवामध्ये मिळून एकुण 1314  मतदान केंद्रांवर एकुण 66157 मतदारांची जागरुकता करण्यात आलेली आहे. व 41761 मतदारांनी डेमो मत टाकुन आपले मत दिलेल्या उमेदवारांसच जात असल्याची खात्री करुन घेतलेली आहे.
            या लोकसभा निवडणूकीत C-Vigilance नावाचे मोबाईल ॲप तयार करण्यात आले असून त्याव्दारे मतदारांना आचार संहिता भंगाविषयीच्या तक्रारी चे Video  चित्रीकरण करून पाठविता येणे शक्य होणार आहे. उमेदवारांसाठी विविध परवानग्या प्राप्त करून घेण्यासाठी (मिरवणूक, प्रचार सभा, वाहनांची परवानगी तात्पुरत्या प्रचार कार्यालयाची परवानगी इत्यादी) या निवडणूकीत सुविधा (Suvidha)या प्रणाली व्दारे प्राप्त करून घेता येणार आहेत
            नागरीकांसाठी व मतदारांसाठी विविध शंकांचे व समस्याचे समाधान करून घेण्यासाठी समाधान (Samadhan) नावाचे ॲप तयार करण्यात आलेले आहे. विविध शासकीय वाहने अधिग्रहीत करण्यासाठी सुगम (Sugam) नावाचे ॲप तयार करण्यात आलेले आहे.
            जिल्हयात एकुण 8 हजार  408 (पुरुष-7 हजार 653 व महिला-3 हजार 30 ) शासकीय कर्मचारी व अधिकारी यांची नियुक्ती प्रत्यक्ष मतदान केंद्रावर मतदानासाठी आवश्यक असल्याने त्यांची Polling Staff  मध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्हयात एकुण 153 क्षेत्रिय अधिकारी (Sector/ Zonal Officer)  यांची नियुक्ती प्रत्येकी 10 ते 12 मतदान केंद्रावर सुरळीत मतदान व्हावे व मतदारांना मतदान केंद्रांवर आश्वासित पायाभुत सुविधा पुरविल्या जातात किंवा नाही याकामी देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्ती करणत आलेली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, देवळीचे तहसीलदार मनुज जिदाल, उपजिल्हा निवडणूक अधिकरी, प्रविण महिरे  , जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे उपस्थितीत होते
0000

Wednesday, 30 January 2019







                         विदर्भ  कुस्तीची पंढरी होईल.
                                                                       -सुधीर मुनगंटीवार
 
        • महिला राज्यस्तर कुस्ती स्पर्धेचा समारोप.
  वर्धा दि 30 :- आपल्या देशात प्राचीन काळापासून कुस्ती या खेळाला राजाश्रय होता..मात्र अलीकडच्या काळात कुस्तीला राजाश्रय कमी पडला. खासदार रामदास तडस यांच्यासारख्या कुस्तीवर प्रेम करणाऱ्या नेत्यांनी विदर्भात  कुस्तीला रुजविण्यासाठी घेतलेला पुढाकार हा एक दिवस विदर्भाला कुस्तीची पंढरी केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन वित्त व नियोजनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
        देवळी येथे नगर परिषद प्रांगणात आयोजित महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, वर्धा कुस्तीगीर परिषद आणि सार्वजनिक बजरंग व्यायाम शाळेच्या वतीने आयोजित  21 वी वरिष्ठ महिला व तिसरी सब ज्युनियर महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ, राज्य शासन वैशिष्ट्यपूर्ण निधी मधून बांधण्यात आलेल्या नवीन स्टेडियमचे लोकार्पण आणि वैशिष्ट्यपूर्ण निधीतून 10 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन, शाहिद स्मारकाचे लोकार्पण  कार्यक्रम पार पडला, यावेळी श्री मुनगंटीवार बोलत होते. या समारंभाला खासदार रामदास तडस, आमदार रामदास आंबटकर, देवळीच्या नगराध्यक्ष सुचिता मडावी, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, राज्य कृषी मूल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे, शोभा तडस, नांदगाव खंडेश्वर चे नगराध्यक्ष संजय पोकळे, सुनील गफाट आदी मान्यवर उपस्थित होते. 
          खेलो इंडिया च्या माध्यमातून देशात खेळाचे वातावरण आणि खेळाडू तयार करण्याचे प्रयत्न होत आहेत. देशाची खेळातील प्रगती पाहता पुढील दहा वर्षांत ऑलिम्पिक मध्ये सर्वात जास्त पदके मिळविण्यात आपला देश दुसऱ्या क्रमांकावर राहील यात शंका नाही असे श्री मुनगंटीवार म्हणाले. चंद्रपूर सारख्या जिल्ह्यातील आदिवासी मुले- मुली 29 हजार फूट उंचीवर आपला तिरंगा फडकवण्याची कामगिरी करतात. याचा अर्थ  विदर्भातही चांगले खेळाडू घडविण्याची शक्ती आहे.  अशा स्टेडियमच्या माध्यमातून विदर्भात उत्तम खेळाडू तयार होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कुस्तीसाठी इनडोअर स्टेडियमसाठी 5 कोटी रुपये निधी देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. या निधीतून उत्कृष्ट इनडोअर स्टेडियम तयार करावे. तसेच कुस्ती व कबड्डी ची मॅट खरेदी करण्यासाठी सुद्धा 14 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची  हमी त्यांनी यावेळी दिली.  या स्टेडियमच्या माध्यमातून विविध खेळाचे खेळाडू तयार होतील. कुस्ती  खेळणाऱ्या मुलींसाठी वित्तमंत्री म्हणून काही करता आले तर यासारखा दुसरा आनंद असणार नाही असेही ते यावेळी म्हणाले. कुस्तीच्या प्रचार- प्रसारासाठी काम करणारा नेता म्हणून खासदार तडस यांची ओळख आहे.ती ओळख त्यांनी अशीच कायम ठेवावी अशा शुभेछा त्यांनी यावेळी दिल्यात. तसेच विविध जिल्ह्यातून आलेल्या कुस्तीगीरांना त्यांनी उत्कृष्ट खेळ करण्यासाठी  शुभेच्छा दिल्या.

       यावेळी सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सांघिक विजेतेपद मिळविणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याला ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सब ज्युनियर मुलींच्या कुस्ती स्पर्धेत पुणे जिल्ह्याला सांघिक विजेतेपदाची ट्रॉफी देण्यात आली.
           यावेळी बोलताना खासदार तडस म्हणाले, खेळाडूला जात पात, धर्म नसतो. तो केवळ देशासाठी खेळतो आणि देशाचे नाव उज्वल करतो.  देवळीला यापूर्वी कुस्तीचा आखाडा नव्हता. आता नवीन स्टेडियमच्या माध्यमातून इथे इनडोअर आखाडा करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी निधीची मागणी त्यांनी वित्तमंत्र्यांकडे केली. महाराष्ट्रात मुली कुस्ती खेळायला लागल्या असून आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये त्या उत्तम कामगिरी करत आहेत. या स्टेडियमच्या माध्यमातून कुस्तीच प्रशिक्षण केंद्र वर्धेत तयार करण्याचा मानस असून विदर्भात कुस्तीचे खेळाडू तयार करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सार्वजनिक बजरंग व्यायामशाळेचे व्यवस्थापक पंकज तडस यांनी केले. संचालन पंकज चोरे, दीपक फुंडकर, आभार नगर परिषद उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर यांनी केले.कार्यक्रमाला राणा रणनवरे, पंकज सायंकार, मयुरी सयाम, विद्या भुजाडे, किशोर गव्हाळकर इत्यादी मान्यवरांसह खेळाडू, प्रशिक्षक, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
                                                                        0000