Thursday, 25 October 2018


20 हजार गावांना पिण्याचे शुद्ध पाणी देणार
                                         -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• 28 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन
• 80 जागांसाठी वायफाय सुविधा सुरू
         वर्धा दि 25 (जिमाका):- प्रत्येक गावात घरोघरी पिण्याचे  शुद्ध पाणी मिळावे हा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. 15 वर्षांपासून रखडलेल्या ग्रामीण पेयजल योजनांसाठी केंद्र  शासनाने 8 हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करून निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे राष्ट्रीय व  मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून राज्यातील 20 हजार गावांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्यात येईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
         मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पिपरी मेघे व 13 गावे वाढीव पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन सावंगी मेघे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर,  जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे,  दत्ता मेघे, सावंगी मेघे ग्रामपंचायत सरपंच सरिता दौड आदी उपस्थित होते.
        देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच राज्यात 60 लाख नवीन शौचालये बांधण्यात आलीत हे सांगताना  मुख्यमंत्री म्हणाले,   हागणदारी मुक्त महाराष्ट्र आणि शुद्ध पाणी पुरवठा  करण्यात शासनाला यश मिळाले. या दोन्ही बाबतीत राज्य  देशात प्रथम क्रमांकावर आहे. यासाठी त्यांनी मंत्री बबनराव लोणीकर यांचे अभिनंदन व कौतुक केले.
आमदार पंकज भोयर यांच्या पाठपुराव्यामुळे आदिवासी प्रकल्प कार्यालय वर्धा जिल्ह्यात सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.यापुढे आदिवासी बांधवाचे  नागपूर कार्यालयात जाण्याचे कष्ट कमी होतील असेही श्री फडणवीस म्हणाले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पत पुरवठा करण्यासाठी वर्धा जिल्हा सहकारी बँकेला राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण  करण्याचा निर्णय शासनाने  घेतला आहे. लवकरच बँकेची व्यवस्था सुरळीत सुरू होऊन  सामान्य जनतेच्या हक्काची बँक सेवेत दाखल  होईल असे श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. 
         बबनराव लोणीकर यावेळी बोलताना म्हणाले,  पाणी पुरवठा विभाग दुर्लक्षित  होता. 14 - 15 हजार पाणी पुरवठा योजना अपूर्ण होत्या. यासाठी नितीन गडकरी यांचे माध्यमातून केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला आणि 5 हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला. यातून 5 हजार 600 गावांच्या योजना पूर्ण केल्यात. उर्वरित गावांसाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना सुरू करून मुख्यमंत्र्यांनी 2 हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत. महाराष्ट्र हागणदारी मुक्त झाल्यामुळे केंद्र शासनाने 8 हजार कोटी रुपयांच्या आरखडयास मान्यता दिली. तसेच शासनाने जागतिक बँकेचे 1300 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन संपूर्ण राज्यात शुद्ध पिण्याचे पाणी देण्यासाठी योजना सुरू केल्या आहेत असे श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
आमदार पंकज भोयर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डिजिटल इंडिया अंतर्गत 80 जागांसाठी वायफाय सुविधेचे  लोकार्पण करण्यात आले.  कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत यांनी केले.
                                                          00000















Tuesday, 2 October 2018






मॅराथॉन  स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्र्यांचे हस्ते  बक्षिस वितरण 

            वर्धा, दि.2, (जिमाका) महात्मा गांधींचे विचार आणि मुल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 29 सप्टेंबर ते  2 ऑक्टोंबर पर्यंत कार्यांजली उत्सव आयोजित करण्यात आला. या उत्सवाच्या आज शेवटच्या  दिवशी  शांती दौड मॅराथॉन स्पर्धेचे आयेाजन करण्यात आले.  मॅराथॉन स्पर्धेतील प्रथम , व्दितीय, तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना वित्त , नियोजन व वने तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सेवाग्राम येथे पुरस्कार देऊन सन्मानित केले.
            यावेळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समिर कुणावार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल , जिल्हा पोलिस अधिक्षक बसवराज तेली उपस्थित होते.
           
       आज सकाळी सकाळी 7.30  वाजता जिल्हा क्रिडा संकुल येथून मॅराथॉन स्पर्धेला खासदार रामदास तडस,  जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलिस अधिक्षक बसवराज तेली  यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. मॅराथॉन स्पर्धेमध्ये पाच जिल्हयातील 2 हजार 800 स्पर्धक सहभागी झाले असून स्पर्धा खुला पुरुष व महिला, शालेय मुले व मुली व प्रौढ 45 वर्षावरील युवकांसाठी स्पर्धा आयेाजित करण्यात आली. स्पर्धा तीन गटात विभागण्यात आली असून प्रत्येक गटातील सहा विजेत्यांना बक्षिस देण्यात आले. यामध्ये प्रथम 10 हजार ते 1 हजार , दुस-या गटात 6 हजार ते 1 हजार व तिस-या गटात 4 हजार ते 1 हजार असे सहा बक्षिसे मान्यवराचे हस्ते प्रदान करण्यात आली.
                                   
                                                                                    00000









चरखा हा जगाला शोषणमुक्ती आणि अहिंसेचा संदेश देईल.
                                                        - सुधीर  मुनगंटीवार
Ø सेवाग्राम येथे जगातील सर्वात मोठ्या चरख्याचे लोकार्पण

    वर्धा दि 2(  जिमाका ):- गांधीजींनी चरख्याच्या माध्यमातून श्रम, समानता आणि शक्तीची शिकवण संपूर्ण देशाला दिली. देशाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी चरखा हे त्यावेळी उत्तम माध्यम ठरले. आज त्यांच्या दिडशेव्या जयंती निमित्त त्यांच्या कर्मभूमीत उभारण्यात  आलेला जगातील सर्वात मोठा चरखा हा जगाला भूकमुक्ती, शोषणमुक्ती आणि हिंसा मुक्तीचा संदेश देईल असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

सेवाग्राम आश्रमाच्या नवीन सभागृहाच्या आवारात सेवाग्राम विकास आराखड्यातून उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या चरख्याचे लोकार्पण श्री मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.  खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, समीर कुणावर, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी , जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी  अजय गुल्हाणे, जे जे स्कुल ऑफ आर्ट चे प्रा. विजय सकपाळ, विजय बोनदर, उपअभियंता श्री मंत्री यावेळी उपस्थित होते.
श्री मुनगंटीवार यांनी या ठिकाणी बालकांच्या समवेत सूत कताई करून उपस्थितांना श्रम करण्याची प्रेरणा दिली.
      महात्मा गांधींच्या दिडशेव्या जयंती निमित्त त्यांच्या रचनात्मक कार्यक्रमाचे आणि खादी व हस्तकलेचे  प्रतीक म्हणून ओळखला जाणारा चरखा सेवाग्राम येथे उभारण्यात आला असून हा जगातील सर्वात मोठा  चरखा आहे.  विशेष म्हणजे हा चरखा मंद गतीने खऱ्या चरख्यासारखा फिरतो.  चरखा हे गांधीजींच्या रचनात्मक कार्यक्रमाचे प्रत्यक्ष स्वरूप आणि प्रतीक होते. या चरख्याच्या माध्यमातूनच त्यांनी स्वदेशी, स्वयंपूर्णता आणि स्वातंत्र्याचे  स्फुलिंग भारतीयांच्या मनात जागविले. हे श्रम, समानता आणि एकतेचे सुद्धा प्रतीक होते.  त्यामुळे त्यांच्या दिडशेव्या जयंती निमित्त त्यांनी स्वतंत्र भारताला दिलेले हे प्रतीक त्यांना आदरांजली म्हणून सेवाग्राम या त्यांच्या कर्मभूमीत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. खादी व हस्तकलेचे प्रतीक असलेला चरखा कलात्मक पद्धतीने मांडण्याची जबाबदारी मुंबईच्या  ज. जी. कला महाविद्यालयाला देण्यात आली होती .  येथील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना या चरख्याची संकल्पना विकसित करण्यासाठी 25 दिवसांचा कालावधी लागला आहे.

     सध्या सर्वात उंच चरखा हा दिल्ली येथील विमानतळावर उभारला असून त्याची उंची 17 फूट,  रुंदी 9 फूट  आणि लांबी 30 फूट आहे. सेवाग्राम येथे उभारण्यात येणारा  चरखा दिल्ली येथील इंदिरा गांधी विमानतळावरील चरख्यापेक्षा उंच  असणार आहे. सेवाग्राम येथील चरख्याची  उंची 18.5 फूट राहणार असून, 11. 3  फूट रुंद आणि 31 फूट लांब असणार  आहे. हा धातूमध्ये तयार करण्यात आला असून त्यावर ऊन ,वारा पाऊस याचा परिणाम होऊ नये म्हणून त्याला लाकडाप्रमाणे रंगविण्यात आले आहे.

    या चरख्याच्या प्रत्येक पात्यावर गांधीजींचे विचार लिहिलेले असतील.. खऱ्या चरख्यासारखा हा मंद गतीने फिरणार असून सुबक प्रकाश योजनेमुळे प्रत्येक दिन विशेषानुसार त्याची रंगसंगती बदलेल.
 मुंबई येथील ज. जी. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे, अधिव्याख्याता विजय सकपाळ, विजय बोनदर, श्रीकांत खैरनार, 10 विद्यार्थी, 10 तंत्रज्ञ आणि मजुरांच्या साहाय्याने 22 दिवसांमध्ये याची निर्मिती करण्यात आली आहे. याच्या संकल्पनेसाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल आणि अडारकर असोसिएट्स यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सेवाग्राम येथे भेट देणा-या देश- विदेशातील पर्यटकांसाठी हे निश्चितच आकर्षणाचे केंद्र ठरेल.
                                                00000








देशाला दिशा देणारा जिल्हा म्हणून वर्धेची ओळख निर्माण व्हावी.
                                                           -  सुधीर मुनगंटीवार
   *जिल्हाधिकारी कार्यालय भूमिपूजन व  उपविभागीय कार्यालयाचे लोकार्पण
   * भूमिपूजनाचा मान महिला कर्मचाऱयांना * वर्धा नगर परिषदच्या विकास कामांचे ई- भूमिपूजन
वर्धा दि 2 जिमाका :- वर्धा हा महात्मा गांधींचा जिल्हा;  सामाजिक ,आर्थिक, सांस्कृतिक, जातीविहिन व धर्मविहिन समाजाचे प्रतीक म्हणून  पुढे यावा . तसेच  महात्मा गांधींचा चरखा हा भूकमुक्त, शोषणमुक्त ,नक्षलमुक्त भारतीय समाजाचे  प्रतीक म्हणून जगाच्या समोर येऊन देशातील 712 जिल्ह्यांना दिशा देणारा जिल्हा  म्हणून वर्धा जिल्ह्याची ओळख निर्माण करण्याचा संकल्प आज महात्मा गांधींच्या जयंती निमित्त करावा, असे प्रतिपादन वित्त, नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
     नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवनाचे भूमिपूजन, उपविभागीय कार्यालयाचे लोकार्पण आणि वर्धा नगर परिषदमधील विविध विकास कामांचे  भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी श्री मुनगंटीवार बोलत होते.यावेळी खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री डॉ पंकज भोयर, समीर कुणावर, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, नगराध्यक्ष अतुल तराळे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, अधीक्षक अभियंता श्रीमती  साखरवाडे,  आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नगर परिषदच्या विविध विकास कामांचे ई- भूमिपूजन पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
      गांधीजींच्या दिडशेव्या जयंती निमित्त त्यांचा विचार जण मना पर्यंत पोहचविण्याचे काम करायला हवे. त्यासाठी राष्ट्रपती भवनासारखी इमारत असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाने दिन, दुर्बल, शोषित ,पीडितांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम करावे, असे श्री मुनगंटीवार म्हणाले.  सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणारे कार्यालय व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करून पालकमंत्री यांनी येथील कर्मचा-यांनी निर्जीव हृदयाने काम करू नये असेही सांगितले. पारदर्शकतेसोबतच माणुसकीची झालर या कार्यालयाला लाभेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पाठपुरावा करून जिल्हाधिकारी कार्यालयाचे बांधकाम  एक -दीड वर्षात  पूर्ण करावे . वाघाच्या हस्ते या कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन झाले असून वाघाच्या गतीने काम पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले.
      देशाच्या आंदोलनाची दिशाभूमी आणि महात्मा गांधीच्या कर्मभूमीने या देशाला कर्म करण्याची प्रेरणा दिली. मात्र सत्यातून सत्तेकडे गेलेला हा विचार पुन्हा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्तेतून सत्याकडे आणला आहे.  15 वर्षांपूर्वी केलेल्या घोषणा या शासनाने पूर्ण केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. सत्याच्या रस्त्यावर चालून बोलू तेच करण्याचा संकल्प त्यांनी केला. 
इमारतीचे भूमिपूजन महिला कर्मचा-यांच्या  हस्ते
जिल्हाधिकारी कार्यालय व नियोजन भवन च्या भूमिपूजन प्रसंगी पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी कुसुम वाघ या महिला कर्मचार्याला   भूमीपुजन करण्यास सांगितले. कामाचे श्रेय घेणे आणि मानपान यासाठी रुसवे भूगवे होताना नेहमीच बघतो. मात्र पालकमंत्री यांनी कनिष्ठ वरिष्ठ हा भेद संपवून त्याच कार्यालयात काम करणा-या  महिला कर्मचा-याला भूमीपूजनाचा मान देऊन माणुसकीचे दर्शन घडवले.
      यावेळी खासदार तडस म्हणाले,  चरख्याच्या माध्यममातून गांधीजींचा श्रम, समानता आणि शांती चा संदेश नवीन पिढीपर्यंत पोहचवता येईल. या शासनाच्या काळात 7 राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाले. विदर्भाचा विकास या माध्यमातून होईल. प्रधानमत्री आवास योजनेत शहरी आणि ग्रामीण भागातील घरांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीतील तफावत थांबवून सर्वाना साडेतीन लाख रुपये देण्याची मागणी त्यांनी याप्रसंगी केली.
जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताविकातून इमारतीची वैशिष्ट्ये सांगून ही नवीन इमारत पारदर्शक, गतीने सेवाभाव ठेवून काम करणारी राहील असे सांगितले.
      यावेळी आमदार पंकज भोयर यांनी पालकमंत्री यांच्यामुळे जिल्ह्याचा विकास झाला असे सांगून विकासकामांची यादी सांगितली. समाधान शिबिराच्या माध्यमातून 50 हजार लोकांच्या तक्रारी निकाली निघाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आदिवासी प्रकल्प कार्यालय मंजूर करण्याची मागणी केली.  यावेळी आमदार समीर कुणावर यांनीही मनोगत व्यक्त केले.
       यावेळी मान्यवरांच्या हस्ते वास्तू विशारद किशोर चिद्दलवार आणि यश सराफ यांचा सत्कार करण्यात आला. जगातील सर्वात मोठ्या  चरख्याच्या  प्रतिकृतीची निर्मिती करणारे जे. जे. स्कुल ऑफ आर्ट चे प्राध्यापक विजय सकपाळ आणि विजय बोनदर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच बचत गटामार्फत निर्मित पर्यावरण पूरक कापडी पिशव्यांचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अतुल रासपायले, आणि आभार अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने यांनी मानले.
43 कोटी 11 लक्ष 8 हजार रुपये खर्च  करुन बांधण्यात येणा-या जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा नियोजन कार्यालयाची इमारत दोन मजली राहणार आहे.  इमारतीचे बांधकाम  10 हजार 281 चौ. मीटरमध्ये करण्यात येणार असून नागपूरच्या मे. विजय कंस्ट्रक्शन कपंनीच्या माध्यमाने इमारतीचे बांधकाम 15 महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. पर्यावरण पुरक इमारतीचे बांधकाम होणार आहे. यामध्ये सौर उर्जा चलित वातानुकूलित , पर्यावरण घटकाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच भारतीय स्थापत्य शैलीचा पुरेपूर वापर करुन भारतीय राजमुद्रा तथा चिन्हांचा अंतर्भाव असणार आहे. अशा प्रकारची जिल्हाधिकारी कार्यालयाची नविन इमारत असणार आहे.  
            38 कोटी 9 लक्ष 79 हजार रुपये खर्च करुन 1 हजार 712 चौ.मी. क्षेत्रात बांधण्यात आलेल्या उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयाची इमारत दोन मजली असून तळमजल्यावर तहसिल कार्यालय व पहिल्या मजल्यावर उपविभागीय कार्यालय बांधण्यात आले आहे.
                                                                                    00000