Tuesday, 20 September 2016

जलयुक्‍त शिवार अभियान अंमलबजावणीत
               वर्धा जिल्‍हा विभागात आघाडीवर
Ø 25 हजार हेक्‍टर सिंचन क्षमता
Ø 37 हजार द.श.ल.क्ष. घनमीटर पाणीसाठा निर्मीती
वर्धा,दि.20-पावसाच्‍या पाण्‍यावरील शेतक-यांचे अवलंबित्‍व कमी करुन शेत-शिवारात विकेंद्रीत जलसाठे निर्माण व्‍हावेत या उद्देशाने राज्‍यशासनामार्फत राबविण्‍यात येत असलेल्‍या जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या अंमलबजावणीत वर्धा जिल्‍हा आघाडीवर आहे. नागपूर विभागातील सहा जिल्‍हयांपैकी सर्वाधिक पाणी साठवण क्षमता वर्धा जिल्‍हयात निर्माण झाली असुन यामुळे 25 हजार हेक्‍टर संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्‍ध झाली आहे.
            जिल्‍हयात 4 लाख 48 हजार 285 हेक्‍टर क्षेत्रावर यावर्षी खरीपाची लागवड झाली आहे. त्‍यामध्‍ये केवळ 27 टक्‍के क्षेत्र सिंचनाखाली असुन उर्वरित 73 टक्‍के क्षेत्र कोरडवाहू आहे. त्‍यामुळे पावसाची अनियमितता आणि शेतीची उत्‍पादकता यांचा थेट संबंध आपल्‍या जिल्‍हयात पहायला मिळतो. यावर्षी सुध्‍दा शेतक-यांना हा अनुभव आलाच. पण ज्‍या गावांमध्‍ये जलयुक्‍त शिवारची कामे झालीत तेथील शेतक-यांना मात्र तिथे साठलेल्‍या पाण्‍याने तारले. ऑगस्‍ट महिन्‍यात पावसाने महिनाभर खंड दिला. पिके कोमेजायला लागलीत तेव्‍हा सिमेंट बंधारा, शेततळे  नाल्‍यातील पाण्‍यामुळे पिकांना नवसंजिवनी मिळाली .
            जलयुक्‍त शिवार अभियानात 2015-16 मध्‍ये 214 गावांची निवड करण्‍यात आली होती. त्‍यापैकी 115 गावांमध्‍ये 100 टक्‍के काम पूर्ण झाले आहे. तर 44 गावांमध्‍ये 80 टक्‍के पेक्षा जास्‍त काम झाले आहे. या 159 गावांमधील शेतक-यांनी खंड काळात नाल्‍यामध्‍ये व सिमेंट बंधा-यामुळे साठलेल्‍या पाण्‍याचा उपयोग डिझेल पंप लावून पिके वाचविण्‍यासाठी केला.
            मागील वर्षी 214 गावांमध्‍ये 3206 कामे घेण्‍यात आली होती. यापैकी 2896  कामे पूर्ण झाली आहेत. या सर्व कामांमुळे जिल्‍हयात 37 हजार 459 दशलक्ष घनमिटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. या पाण्‍याचा उपयोग कापुस पिकासाठी एकदा पाणी दिल्‍यास 24 हजार 972 हेक्‍टर क्षेत्रात सिंचन होवू शकते. तर दोनदा पाणी वापरल्‍यास 12 हजार 486 हेक्‍टर सिंचन होवू शकते. त्‍यामुळे यावर्षी जिल्‍हयातील किमान 25 हजार हेक्‍टरवरील शेतक-यांना तरी पावसाच्‍या लहरीपणाचा फटका बसणार नाही.
            याशिवाय नाला खोलीकरण आणि सिमेंट नाला बांधमुळे विहिरीच्‍या पाणी पातळीत दीड ते 2 मिटरने वाढ झाल्‍याचे निदर्शनास आले आहे. याचा थेट फायदा शेतक-यांना पावसाच्‍या खंड काळात तसेच रब्‍बी पिकासाठी होणार आहे. त्‍यामुळे एका धरणामुळे जे शक्‍य झाले नसते ते जलयुक्‍त शिवारमध्‍ये झालेल्‍या विकेंद्रीत जलसाठयामुळे साध्‍य झाले आहे.
>

Saturday, 17 September 2016

प्रभाग रचना व आरक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहिर
वर्धा,दि.17-जिल्‍हयातील सालोड (हिरापूर) व नेरी (पुनर्वसन ) या दोन ग्रामपंचायतीसाठी प्रभाग रचना व आरक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहिर करण्‍यात आला आहे.
20 सप्‍टेंबर पर्यंत महाराष्‍ट्र ग्रामपंचायत (सदस्‍यांची संख्‍या, प्रभागात विभाजन करणे व जागा राखून ठेवणे) नियमाप्रमाणे ग्रामपंचायतीसाठी एकुण सदस्‍य संख्‍या ठरविणे व प्रारुप प्रभाग रचना करण्‍यात येईल. 23 सप्‍टेंबर पर्यंत प्रारुप प्रभाग रचनेला प्राधिकृत अधिकारी मान्‍यता देतील. 28 सप्‍टेंबर पर्यंत आरक्षणाची सोडत ठरविण्‍यात येईल. 29 सप्‍टेंबर पर्यंत हरकती व सूचना मागविण्‍यासाठी जाहीर सुचना प्रसिध्‍द करण्‍यात येईल. 7 ऑक्‍टोंबर पर्यंत  हरकती स्विकारण्‍यात येतील. हरकती व सुचना प्राप्‍त झाल्‍यावर त्‍यावर 18 ऑक्‍टोंबर पर्यंत निर्णय घेण्‍यात येईल. अंतिम प्रभाग रचना, आरक्षित जागा इत्‍यादी  तपशिल  24 ऑक्‍टोंबर रोजी प्रसिध्‍द करण्‍यात येईल, असे उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य) तथा ग्रामपंचायत निवडणूक प्रभारी अधिकारी एन.के.लोणकर  यांनी कळविले आहे.
                                                

Thursday, 15 September 2016

एस. टी. महामंडळाच्‍या बडतर्फ वाहकानी
पूर्नर्नेमणूकीसाठी संपर्क साधावा
वर्धा,दि.15- महाराष्‍ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळातील गैरहजेरीस्‍तव तसेच अपहार प्रकरणी बडतर्फ झालेल्‍या  वाहकास कुंटूंब सुरक्षा योजने अंतर्गत अटी व शर्तीनुसार पुर्नर्नेमणुक देण्‍यात येणार आहे. यासाठी बडतर्फ वाहकानी महामंडळाशी संपर्क साधण्‍याचे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे.
राज्‍य परिवहन सेवेतून गैरहजेरीस्‍तव तसेच अपहार प्रकरणी बडतर्फ झालेल्‍या वाहकांना त्‍यांच्‍या कुंटूंबाची होणारी आर्थिक कुचंबणा थांबावी यासाठी 45 वर्षापेक्षा जास्‍त वय नसलेल्‍या कर्मचा-यांना कुंटूंब सुरक्षा योजने अंतर्गत अटी शर्ती नुसार नेमणुक देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.
पुर्नर्नेमणुक देतांना सदर कर्मचा-यांच्‍या पदातील त्‍याच्‍या विभागातील सामाजिक आरक्षणानुसार व सध्‍याच्‍या रिक्‍त जागांनुसार कार्यवाही करण्‍यात येणार आहे. या संदर्भात प्रसारित करण्‍यात आलेली परिपत्रके राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या msrtc.gov.inया अधिकृत संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करण्‍यात आलेली आहेत. तसेच विभागांच्‍या व आगारांच्‍या सुचना फलकावरही प्रदर्शित करण्‍यात आलेली आहे. या बाबत अधिक माहिती करिता संबंधित राज्‍य परिवहन विभागाशी त्‍वरीत संपर्क साधावा. तसेच या संदर्भात कोणत्‍याही भुलथापांना बळी पडू नये असे विभाग नियंत्रक , राज्‍य परिवहन महामंडळ यांनी कळविले आहे.
                                      0000


मेस्‍को करीअर अॅकॅडमी येथे युवकांसाठी भरती पूर्व प्रशिक्षण
वर्धा,दि.15- यवतमाळ येथे 6 जानेवारी 17 पासुन सुरु होणा-या नागपूर ए.आर.ओ. च्‍या सैन्‍य भरतीसाठी महाराष्‍ट्र शासन अंगिकृत माजी सैनिक महामंडळ (मेस्‍को ) संचालित सातारा जिल्‍हयातील मेस्‍को करीअर अॅकडमी येथे भरतीपुर्व प्रशिक्षण चालविण्‍यात येत आहे. इच्‍छुक उमेदवरांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्‍यावा असे आवाहन जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी ध.य.सदाफळ यांनी केले आहे.
प्रशिक्षण समाजाच्‍या सर्व स्‍तरातील युवकांसाठी उपलब्‍ध असून प्रशिक्षणामध्‍ये मैदानी व लेखी परिक्षेच्‍या तयारीची तसेच राहण्‍याची आणि जेवणाची उत्‍तम सुविधा उपलब्‍ध आहे. यासाठी मासिक शुल्‍क 6 हजार 500 असून ते अॅकडमी मध्‍ये प्रवेश घेतांना भरावे लागेल. अधिक मा‍हितीसाठी अॅकडमीच्‍या सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळात 9168986864 व 7588624043 या भ्रमणध्‍वनी क्रमांकावर तसेचwww.mescoltd.co.in या संकेत स्‍थळावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी यांनी केले आहे.
                                      00000

मतदार याद्याचा पुर्नरिक्षण कार्यक्रम जाहिर
वर्धा,दि.15-भारत निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्‍या कार्यक्रमानुसार जिल्‍हया‍तील 44-आर्वी, 45-देवळी, 46-हिंगणघाट व 47 वर्धा विधानसभा मतदार संघातील 1 जानेवारी 2017 या दिनांकावर आधारित मतदार याद्यांचे मतदार संघानुसार विशेष पुनरिक्षणाचा कार्यक्रम जाहिर करण्‍यात आला आहे.
16 सप्‍टेंबर रोजी प्रारुप याद्यांची प्रसिध्‍दी करुन, 16 सप्‍टेंबर ते 14 ऑक्‍टोंबर दरम्‍यान दावे व हरकती स्विकारण्‍यात येतील. 16 सप्‍टेंबर व 30 सप्‍टेंबर ला मतदार यादी मधील संबंधित भागाचे/सेक्‍शनचे ग्रामसभा /स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था येथे वाचन करुन नावाची खातर जमा करण्‍यात येईल. 18 सप्‍टेंबर व 1 ऑक्‍टोंबर रोजी विशेष मोहिम राबविण्‍यात येणार आहे. 16 नोव्‍हेंबर पर्यंत दावे व हरकती निकालात काढण्‍यात येईल. 15 डिसेंबर पर्यंत डाटाबेसचे अद्यावतीकरण  व 5 जानेवारी ला अंतिम मतदार यादीची प्रसिध्‍दी करण्‍यात येणार आहे.
          ज्‍या भारताच्‍या नागरिकांनी 1 जानेवारी 2017 रोजी 18 वर्ष पूर्ण केले असतील आणि त्‍या मतदार संघातील कायमचे रहिवाशी आहेत अशा नागरिकांनी आपले नांवे मतदार यादी मध्‍ये नोंदवावे.
          मतदार संघनिहाय मतदार नोंदणी अधिका-यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.  44-आर्वीसाठी  उपविभागीय अधिकारी आर्वी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्‍हणुन तहसिलदार ,आर्वी, आष्‍टी कारंजा (घा.) ,45 – देवळीसाठी मतदार नोंदणी अधिकारी उपविभागीय अधिकारी , वर्धा तर सहायक नोंदणी अधिकारी तहसिलदार देवळी , 46 –हिंगणघाटसाठी मतदार नोंदणी अधिकारी उपविभागीय हिंगणघाट व सहायक नोंदणी अधिकारी ,तहसिलदार, हिंगणघाट व समुद्रपूर, 47 –वर्धासाठी मतदार नोंदणी अधिकारी  उपविभागीय अधिकारी , वर्धा तर सहायक मतदार नोंदणी अधिकारी तहसिलदार वर्धा व सेलू यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.
          सं‍बंधित मतदान केंद्रावर नियुक्‍त केलेल्‍या पदनिर्देशित अधिका-याकडे, मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात 16 सप्‍टेंबर ते 14 ऑक्‍टोंबर पर्यंत कार्यालयीन वेळेत सर्व मतदान केंद्रावर दावे व हरकती दाखल करण्‍यासाठी व चुकीच्‍या नोंदीची दुरुस्‍ती करण्‍यासाठी विहित नमुन्‍यातील अर्ज विनामुल्‍य उपलब्‍ध करण्‍यात आले आहे. मतदार याद्या जास्‍तीत जास्‍त अचुक व  अद्यावत बनविण्‍याच्‍या दृष्‍टीने सक्रिय भाग घेवुन या कामामध्‍ये निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी केलेआहे.
                 सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेत पारदर्शकतेसाठी वाहनांना हिरवा रंग
Ø जिल्‍ह्यात एकाच कत्रांटदारामार्फत  वाहतूक
Ø धान्‍यवितरणासाठी 112 वाहनांची व्‍यवस्‍था
वर्धा,दि.16-सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेमध्‍ये सर्व टप्‍प्‍यांवर अधिक पारदर्शकता आणण्‍यासाठी सुधारित धान्‍य वितरण प्रणाली राबविण्‍यात येत आहे. यामध्‍ये जिल्‍ह्यात एकाच कंत्राटदारामार्फत सर्व स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारांना धान्‍य वितरणासोबतच धान्‍य वितरण करणा-या सर्व वाहनांना हिरव्‍या रंगाने रंगवण्‍यात आले आहे. या एकाच रंगामुळे आता सामान्‍य नागरिकांनाही असे वाहन ओळखणे शक्‍य झाले असुन धान्‍य वितरणामध्‍ये होणा-या गैरप्रकारांना यामुळे आळा बसणार आहे.
सार्वजनिक धान्‍य वितरण प्रणालीत बोगस लाभार्थी टाळण्‍यासाठी शासनाने सर्व लाभार्थ्‍यांचे आधार लिंकींग करणे सुरु केले आहे. जिल्‍ह्यात  एकुण 13 लाख 57 हजार 45 शिधापत्रिका धारक आहे. यामध्‍ये 65 टक्‍के आधार लिकींग  झाले आहे.राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा कायद्याअंतर्गत लाभ घेणा-या अंत्‍योदय व प्राधान्‍य गटामध्‍ये 8 लाख 82 हजार 367 लाभार्थी असून यातील   95 टक्‍के लाभार्थ्‍यांचे आधार कार्डाशी लिंकींग झाले आहे. याशिवाय राज्‍यशासनाने सर्व शेतक-यांना स्‍वस्‍त दराने धान्‍य वितरण सुरु केले असून अशा शेतक-यांची संख्‍या 2 लाख 49 हजार 916 ऐवढी आहे. या सर्व लाभार्थ्‍याना स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत  धान्‍य वितरण करण्‍यात येते. 
भारतीय खाद्य निगमचे गोदाम ते शासकीय गोदाम आणि शासकीय गोदाम ते स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार या प्रवासात होणारी धान्‍याची चोरी थांबविण्‍यासाठी जिल्‍ह्यात एकाच कंत्राटदारामार्फत धान्‍य वितरण सुरु करण्‍यात आले आहे. भारतीय खाद्य निगम ते शासकीय गोदामात धान्‍य पोहचविण्‍यासाठी 34 वाहने वापरण्‍यात येत आहेत. तर राज्‍य शासनाचे गोदाम ते रास्‍तभाव दुकानांपर्यंत 78 वाहनांमार्फत धान्‍य पोहचविण्‍यात येत आहे. या सर्व वाहनांना ओळखण्‍यासाठी हिरव्‍या रंगाने रंगवण्‍यात आले आहे. त्‍याचबरोबर ‘सुधारित धान्‍य वितरण प्रणाली, महाराष्‍ट्र शासन’ असा फलक वाहनाच्‍या समोरील भागावर लावण्‍यात आला आहे. त्‍यामुळे ही वाहने सहज ओळखता येणार आहेत.
जिल्‍ह्यातील सर्व नागरिकांनी अशा वाहनांमधील धान्‍य स्‍वस्‍त धान्‍य दुकानांच्‍या व्‍यतिरिक्‍त इतर ठिकाणी उतरत असल्‍याचे निदर्शनास आल्‍यास तात्‍काळ संबंधित तहसिलदार आणि जिल्‍हा पुरवठा अधिकारी यांना 243314 या दुरध्‍वनी क्रमांकावर संपर्क करण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेवर सामान्‍य नागरिकांचे लक्ष राहणार असून गैरप्रकारांना आळा बसण्‍यास निश्चितच मदत होईल.
                                                 



Friday, 26 August 2016

                         कार्यक्षम  अधिकां-यापासून प्रेरणा घ्‍यावी
                                                -जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल
वर्धा, दि.26 :- शासकिय कामे करतांना एकमेकांचे सहकार्य घेऊन कामे केल्‍यास प्रशासकिय कामात गतीमान येऊन नागरिकाची कामे चांगल्‍या प्रकारे करता यईल यासाठी चांगल्‍या अधिकां-यापासून कामाची प्रेरणा घ्‍यावी असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी विकास भवन येथे निवासी उपजिल्‍हाधिकारी वैभव नावडकर यांची चंद्रपूर येथे बदली झाल्‍यामुळे त्‍यांना प्रशासनाच्‍या वतीने निरोप समारंभ कार्यक्रमात केले.
या कार्यक्रमाला अपर जिल्‍हाधिकारी संजय दैने , निवासी उपजिल्‍हाधिकारी मंगेश जोशी, उपजिल्‍हाधिकारी श्री.लोणकर,यांची प्रमुख उप‍स्थिती होती.
यावेळी  निवासी उपजिल्‍हाधिकारी वैभव नावडकर यांची नुकतीच चंद्रपूर येथे बदली झाली  असल्‍यामुळे त्‍यांच्‍या जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांचे हस्‍ते शाल श्रीफळ व भेट वस्‍तू देऊन सत्‍कार करण्‍यात आला तर त्‍यांच्‍या जागे बदलून आलेले मंगेश जोशी यांचाही यावेळी सत्‍कार करण्‍यात आला. तसेच नव्‍याने रुजु झालेले उपजिल्‍हाधिकारी  श्री. लोणकर  यांचाही सत्‍कार करण्‍यात आला.
शासकिय कर्तव्‍य बजावतांना नागरिकांचे समाधान हीच आपल्‍या कामाच्‍या यशाची पावती आहे. शासकिय कामाचे  वैभव नावडकर मध्‍ये सर्व गुण होते त्‍यामुळे त्‍यांना नुकतेच नागपूर विभागाच्‍या वतीने उत्‍कृष्‍ट अधिकारी म्‍हणुन गौरविण्‍यात आले होते. हिच त्‍यांच्‍या यशाची पावती होती. यासाठी आपण सर्वानी अशा अधिकांपासुन प्रेरणा घ्‍यावी असेही ते म्‍हणाले.
वैभव नावडकर म्‍हणाले  सर्व कर्मचा-यांचे सहकार्य मिळाल्‍यामुळेच काम करण्‍यास उत्‍साह वाढला कारण शासकिय कामे करतांना एकटयाने कामे कधी च होत नसून सर्वानी मिळून एकजूटीने कामे केल्‍यामुळे  कामामध्‍ये पारदर्शकता आणता आली .
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक महसूल संघटनेचे अध्‍यक्ष श्री. लोखंडे यांनी केले. यावेळी  जिल्‍हा नियोजन अधिकारी टेंभुणे, लेखाधिकारी प्रतापराज मासाळ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, तालुक्‍यातील सर्व तहसिलदार, महसूल विभागाचे कर्मचारी मोठया संख्‍यने उपस्थित होते.
                                                0000

                            बचत गटानी उत्‍कृष्‍ट उद्योजक बनावे
                                                -जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल
वर्धा, दि.26 :-बचत गटानी बाजापेठेतील उत्‍पादकाशी स्‍पर्धा करुन लघु उद्योग निर्माण करावा व केवळ पैशाची देवाण घेवाण न करता उत्‍कृष्‍ठ उद्योजक बनावे. यासाठी त्‍यांनी तयार केलेल्‍या उत्‍पादनाला शासनाच्‍या वतीने बाजार पेठ मिळवून देण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍यात येईल  तसेच उद्योगाकरिता निधी सुध्‍दा उपलब्‍ध करण्‍यात येईल असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज विकास भवन येथे महाराष्‍ट्र ग्रामीण जिवनोन्‍न्‍ती अभियानांतर्गत उमेद,  माविम व कृषी समृध्‍दी समन्‍वयित कृषी विकास प्रकल्‍प यांच्‍या वतीने आयोजित वस्‍त्रोद्योग व शिवनकाम कार्यशाळेत  केले.
          या वस्‍त्रोद्योग व शिवनकाम कार्यशाळेच्‍या कार्यक्रमाला कृषी समृध्‍दी समन्‍वयित कृषी विकास प्रकल्‍प (केम) चे प्रकल्‍प संचालक गणेश चौधरी, जिल्‍हा परिषदचे उपमुख्‍यकार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, जिल्‍हा अग्रणी बँकेचे जिल्‍हा व्‍यवस्‍थापक जांगडा, नाबार्ड च्‍या व्‍यवस्‍थापक श्रीमती बन्‍सोड, रितेश ताजने, माविमच्‍या जिल्‍हा व्‍यवस्‍थापक दारोडकर, देवकुमार कांबळे, कृषी समृध्‍दी समन्‍वयित कृषी विकास प्रकल्‍पाचे जिल्‍हा प्रकल्‍प व्‍यवस्‍थापक  निलेश वावरे, प्रविण जयस्‍वाल व मिलींद भगत यांची प्रमुख उपस्थित होती.
पुढे बोलतांना शैलेश नवाल म्‍हणाले बचत गटानी आपला  कायमस्‍वरुपी उदरनिर्वाह चालविण्‍यासाठी शेती, दाल मिल, घरगुती कापड उद्योग यासारखे उद्योग सुरु करुन रोजगार  निर्मिती करुन कुशल उद्योग सुरु करावे. यासाठी शासनाच्‍या योजनांचा लाभ घेऊन  आपला उद्योग सुरु करावा व बाजारपेठेत आपल्‍या बचत गटाची ओळख निर्माण करावी. बचत गटानी उत्‍पादीत केलेल्‍या मालाला  शहरातील मध्‍यभागी दुकाणे सुरु करुन कमीशनवर विकण्‍यास प्रयत्‍न करण्‍यात येईल. गटानी शेतीवर आधारित आधुनिक उपकरणे खरेदी करुन शेतक-यांना भाडे तत्‍वार दयावी. या उपकरणामुळे शेतक-यांना आधुनिक शेती करण्‍यास मदत होईल बचत गटांना आर्थिक लाभ होऊन बचत गट सक्षम होण्‍यास मदत होईल.  तसेच बाजारपेठेतील उत्‍पादनांशी स्‍पर्धा करुन या स्‍पर्धेत उतरायला पाहिजे. असेही ते म्‍हणाले.
प्रमोद पवार म्‍हणाले बचत गटानी बाजारपेठेमध्‍ये ज्‍या वस्‍तुची जास्‍त मागणी असेल त्‍याच वस्‍तुचे उत्‍पादन करावे. जेणेकरुन गटाच्‍या उत्‍पादित मालाला  भाव मिळून  गटाचे आर्थिक उत्‍पन्‍न वाढेल पर्यायाने गट सक्षम होईल. तसेच कंपनी च्‍या मालाशी स्‍पर्धा करुन कमी दरात मालाची विक्री केल्‍यास जास्‍त प्रमाणात बाजारपेठ मिळण्‍यास मदत होईल.
यावेळी कृषी समृध्‍दी समन्‍वयित कृषी विकास प्रकल्‍प (केम) च्‍या वतिने प्रकाशित यशोगाथा या पुस्तिकेचे मान्‍यवरांचे हस्‍ते प्रकाशन करण्‍यात आले.
यावेळी केमचे प्रकल्‍प संचालक गणेश चौधरी व इतर मान्‍यवरांनी उपस्थित बचत गटाच्‍या महिलांना उद्योग सुरु करण्‍याविषयी मार्गदर्शन केले.





                                           


















Wednesday, 24 August 2016

                               भूसंपादनापेक्षा भूसंचयनाने
                                   शेतक-यांना जास्त फायदे
                                                                 -शैलेश नवाल
वर्धा:- नागपूर-मुंबई या द्रुतगती मार्गाना जोडणारा महाराष्ट्र समृध्दी महामार्ग हा सेलू तालुक्यातील  काही  गावामधून जाणार आहे. या प्रकल्पाकरिता लागणा-या जमिनीचे भूसंपादन नव्हे, तर भूसंचयन करण्यात येणार आहे. या  भूसंचयानामध्ये भूसंपादनापेक्षा जास्त फायदे आहे. भूसंचयन प्रकल्पात शेतकरी  हे भागीदारी स्वरुपात सहभागी असणार आहे. शेती-उद्योगाशी संबंधित अन्य सुविधा भूसंचयानामध्ये  शेतक-यांना मिळणार  असल्याची माहिती  जिल्हाधिकारी  शैलेश नवाल यांनी दिली.
          सेलू तालुक्यातील  कोटंबा येथील  ग्रामपंचायतीच्या  सभागृहात आयोजित  नागपूर -मुंबई सुपर एक्सप्रेस हायवे, महाराष्ट्र समृध्दी प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी शैलेश  नवाल हे शेतक-यांशी  संवाद साधतांना बोलत होते. यावेळी  उपविभागीय अधिकारी  धनश्याम भुगावकर, रस्ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता, डाबे, कार्यकारी अभियंता श्रीमती अंसारी, सेलूचे तहसिलदार रविंद्र होळी उपस्थित होते.      
          यावेळी जिल्हाधिकारी  यांनी  शेतक-यांशी  चर्चा करतांना  सांगितले की, शेतक-यांचे  समाधान झाल्याशिवाय जमिन घेणार नाही.शेतक-यांशी  याबाबत चर्चा सुरुच राहील. भूसंपादनाचा कायदा लागू आहे. तुमची जमीन शासन घेते ही शंका काढून टाका. भूसंचयानाबाबतचा आपला गैरसमज दूर करा, या नव्या प्रकल्पामध्ये  ज्या शेतक-यांच्या जमिनी जातील,त्या शेतक-यांना हेक्टरी 50 हजार रुपये व यावर दरवर्षी 10 टक्के वाढ देण्यात येणार आहे. जेवढी जमीन जाईल तेवढा मोबदला शेतक-यांना देण्यात येईल. असे  जिल्हाधिकारी  शैलेश नवाल यांनी यावेळी  सांगितले.
          महाराष्ट्र समृध्दी महामार्गामध्ये राज्यातील 24 जिल्ह्ये जोडले जात असून प्रकल्पाशेजारीच नवीन शहर बसविण्यात येत असून भूसंचयन मध्ये ज्या शेतक-यांनी जमिनीची गुंतवणूक केली असेल.त्या शेतक-यांना  त्यांच्या आवडिचा  कुठलाही व्यवसाय करता येईल.  शिवाय  या योजनेमुळे शेतक-यांच्या मालाला थेट बाजारपेठ उपलब्ध होईल.
          महाराष्ट्र समृध्दी महामार्गामध्ये शेतक-यांनी  भूसंपादनापेक्षा  भूसंचयन केल्यास जमिनीची गुंतवणूक होईलच त्याच बरोबर, यामध्ये शेतक-याना  शहरातल्या भूखंडाचीविना अट मालकी मिळेल, दहा वर्ष वाढते अनुदान, दहा वर्षानंतरच्या जमिनीच्या किंमतीची  हमी, सातबा-यावर  शिक्का  लावल्या जाणान नाही., शेतक-यांच्या मुलांना मोफत औद्योगिक  शिक्षण, इत्यादी  फायदे  भूसंचयन जमिनीची गुंतवणूक केल्यास मिळू शकेल.     

          यावेळी  शेतक-यांनी विचारलेल्या प्रश्नांचीही जिल्हाधिकारी शैलेश  नवाल यांनी समर्पक उत्तरे दिली. यावेळी महाराष्ट्र समृध्दी महामार्गामध्ये ज्यांच्या जमिनी  जाणारे व  या परिसरातील  इतर शेतकरी  मोठ्या संखेने  उपस्थित होते.


 

Monday, 22 August 2016

                  दिपालीला मिळाली उपजिल्‍हाधिकारी होण्‍याची प्रेरणा
Ø एक दिवस प्रशासनासोबत
Ø जिल्‍हाधिकारी यांचा नविन उपक्रम
Ø स्‍पर्धा परिक्षार्थीसाठी प्रेरणा प्रकल्‍प
वर्धा, दि.22 :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांना स्‍पर्धा परिक्षेची तयारी करण्‍यासाठी योग्‍य दिशा मिळावी यासाठी जिल्‍हा ग्रंथालय मध्‍ये येणा-या विद्यार्थ्‍यांसाठी महिन्‍याच्‍या पहिल्‍या शनिवारी जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्‍यात येत आहे. याचेच पुढचे पाऊल म्‍हणुन या शिबिरात येणा-या विद्याथ्‍यांमधुन  एका विद्यार्थ्‍याला तिस-या शनिवारी प्रशासनासोबत एक दिवस घालविण्‍याची संधी मिळणार आहे. दिपाली जयस्‍वाल ही अशी संधी मिळणारी पहिली विद्यार्थींनी ठरली असून यामुळे उपजिल्‍हाधिकारी होण्‍याची नवी प्रेरणा मिळाल्‍याचे मत दिपालीने व्‍यक्‍त केले.
आज प्रत्‍येक क्षेत्रात नोकरी  मिळण्‍यासाठी प्रंचड स्‍पर्धेचा सामना करावा लागतो. मोठया शहरांमध्‍ये स्‍पर्धा परिक्षेचे अनेक क्‍लसेस चालतात. मात्र ग्रामीण भागातील बेरोजगारांना शहरातील मुलांसारखी अशी क्‍लासेसची सुविधा उपलब्‍ध होत नाही. आहे त्‍या अपु-या सुविधांमधुनच ग्रामीण तरुण स्‍पर्धा परिक्षेची तयारी करतात. अशा अभावग्रस्‍ततेच्‍या तयारी वरच एमपीएससी व युपएससी सारख्‍या परिक्षांना सामोरा जातेा. ग्रामीण भागातील अशा  नाहीरेंच्‍यासाठी  जिल्‍हाधिकारी यांच्‍या पुढाकारातून जिल्‍हा  प्रशासन आणि जिल्‍हा ग्रंथालयाच्‍या वतीने मार्गदर्शन शिबिराचे आयोज‍न करण्‍यात येत आहे.
मागील दोन महिन्‍यापासून प्रत्‍येक महिन्‍याच्‍या पहिल्‍या शनिवारी सामाजिक न्‍याय भवन येथे दुपारी 2.30 ते 4.30 हे दोन तास विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करण्‍यात येते. आतापर्यंत जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल, पोलिस अधिक्षक अंकित गोयल. , बॅक प्रोबेशनरी ऑफीसर वैभव गांवडे परिविक्षाधिन उपजिल्‍हाधिकारी स्‍वप्‍नील तांगडे यांनी विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले आहे.
स्‍पर्धा परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्‍यांना प्रशासनाची तोंडओळख व्‍हावी आणि अधिका-यांच्‍या प्रत्‍यक्ष भेटीने त्‍यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने जिल्‍हाधिकारी यांनी विद्यार्थ्‍यांना एक दिवस प्रशासना सोबत घालवण्‍याची सुवर्ण संधी उपलब्‍ध करुन दिली आहे. महिन्‍याच्‍या तिस-या शनिवारी एका विद्यार्थ्‍याला ही संधी मिळणार आहे. दिपाली जयस्‍वाल ही या प्रेरणा प्रकल्‍पातील पहिली विद्यार्थीनी ठरली असून शनिवारी जिल्‍हाधिकारी यांनी तीच्‍याशी प्रत्‍यक्ष संवाद साधला. ग्रंथालयामध्‍ये येणा-या अडचणी तसेच मार्गदशन कार्यशाळेत कोणकोणत्‍या विषयाचे मार्गदर्शन करण्‍याची गरज आहे, यावर चर्चा केली. महसूल अधिका-यांच्‍या बैठकीत सहभागी होण्‍याची संधीही तीला मिळाली. अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी संजय दैने यांनी प्रश्‍नांचा भडीमार करुन दिपालीला मुलाखतीच्‍या वातारवरणाची जाणीव करुन दिली.

सामान्‍य माणसाला मोठया अधिकां-शी  बोलायची भिती वाटते तिथे आज मला जिल्‍हाधिका-याशी थेट संवाद साधायला मिळाला ही गोष्‍ट माझ्यासाठी  कल्‍पनेपलिकडची आहे. यामुळे प्रशानाबद्दलची माझी भिती दूर झाली  असून प्रशासकीय अधिका-यांकडे असलेले अधिकार आणि कर्त्‍यव्‍य याची जाणिव झाली आहे. यातून मला नविन उर्जा मिळाली असून उपजिल्‍हाधिकारी होण्‍यासाठी मी आता खूप अभ्‍यास करणार असल्‍याचे दिपालीने सांगितले यासाठी तीने जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांचे आभार मानुन सर्व तरुणांना अशी संधी मिळाल्‍यास ग्रामीण भागातील तरुण मोठया प्रमाणात प्रशासनात येतील असा आशावाद तिने व्‍यक्‍त केला.
                                                                             दिपाली जयस्‍वाल