Tuesday, 5 March 2013

श्रीसंत गजानन महाराजांचा प्रगटदिन उत्‍साहात साजरा



·       श्री.गजानन विजय ग्रंथावर आधारित प्रश्‍नमंजुषाचे आयोजन
·       प्रश्‍न मंजुषामध्‍ये 1200 विद्यार्थी व 300 भक्‍तांचा  सहभाग
वर्धाः- दि.5- लहानुजी नगर येथील माणकीकर यांचे श्रीसंत गजानन महाराज मंदीर येथे संत श्री. गजानन महाराज यांचा 135 वा प्रगटदिन उत्‍सव मोठ्या उत्‍साहकपूर्ण वातावरणात साजरा करण्‍यात आला. यानिमित्‍त  उत्‍सव स‍मिती तर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले.
श्री.संत गजानन महाराज मंदिरात 22 फेब्रुवारीपासून प्रगटदिन महोत्‍सवाला प्रारंभ करण्‍यात आला. महाराजांच्‍या प्रगटदिनी रविवार दि. 4 मार्च रोजी सकाळी 7.30 ते 9.30 पर्यन्‍त सुधाकर अजंटीवाले यांचे मार्गदर्शनाखाली आवर्तने व सामुहिक अथर्वशिर्ष पठनाने महाराजांच्‍या मुर्तीवर अभिषेक करण्‍यात आला.सकाळी 10 ते 10.30 पर्यन्‍त  महंत अंबिका भारती यांचे हस्‍ते गणेश याग यज्ञ स्‍वाहाकार व यज्ञाची पुर्णाहूती संपन्‍न झाली.11.30 ते दुपारी 1 पर्यंत यवतमाळ ह.भ.प.सौ.उमाताई पुल्‍लीवार ह्यांचे काल्‍याचे किर्तन  होवून  महाआरती करण्‍यात  आली. व महाप्रसादालाला सुरवात झाली. सायंकाळी 7 वाजता अभंग व भक्‍ती गीतांचा सुश्राव्‍य  भरगच्च  कार्यक्रमाने  महोत्‍सव  कार्यक्रमाची सांगता झाली.
 यावेळी समितीतर्फे नवीन उपक्रम म्‍हणजे श्री.गजानन विजय या ग्रंथावर आधारित प्रश्‍नमंजुषा घेण्‍यात आली. यामध्‍ये  विद्यार्थी गटात विविध शाळामधून 1200 विद्यार्थ्‍यां सहभागी झाले. व खुल्‍या गटामध्‍ये  300 भक्‍तांनी भाग घेतला होता. यात विद्यार्थी गटात कु.स्‍नेहा  जोशी, प्रणम्‍य  टोळ व शो झाडे हे अनुक्रमे प्रथम,व्दितीय व तृतीय क्रमांक घेवून विजयी झाले तर खुल्‍या गटात सौ. पल्‍लवी वखरे,सौ. सुलक्षणा देशमुख व शुभांगी  पाच्‍छाव  ह्या  परीक्ष्‍यार्थनी अनुक्रमे प्रथम ,व्दितीय व तृतीय क्रमांक घेवून विजयी झाल्‍या.
1 मार्च रोजी प्रश्‍नमंजुषा उपक्रमातील बक्षीस वितरणाचा कार्यक्रम बोपापूर येथील श्री.अंबिका भक्‍तीधामाच्‍या  महंत प.पु. अंबिका भारती यांच्‍या  अध्‍यक्षतेखाली आयोजित करण्‍यात आला. कार्यक्रमाला श्री.परमानंदजी तापडीया,प्रा. प्रशांतराव बोकारे, सुधाकर अजंटीवाले प्रा. लतिका नायगावकर,सुभाष राठी प्रमुख पाहुने म्‍हणून  उपस्थित हाते.यावेळी  सरस्‍वती व भरतज्ञान मंदिर विद्यालयाच्‍या  विद्यार्थी व शिक्षकांनी सामुहिक गणपती अथर्वशिर्षाचे सहस्‍त्रवर्तनाचे सामुहिक पठण केले. नंतर प्रश्‍नमंजुषा उपक्रमातील विजयी स्‍पर्धकांना मान्‍यवरांचे हस्‍ते बक्षिसे प्रदान करण्‍यात आली. सोबतच प्रश्‍नमंजुषा  परिक्षा मंडळ व समिती सदस्‍यांचा  स्‍मृतिचिन्‍ह देवून मान्‍यवरांचे हस्‍ते सत्‍कार  करण्‍यात आला. समितीतर्फे प्रश्‍नमंजुषा परीक्षा प्राप्‍त शुल्‍क रु.9335/- श्री.अनिल माणकीकर यांना उत्‍सवासाठी सुपूर्द करण्‍यात आले.
      महोत्‍सवात 22 ते 24 फेब्रुवारी दरम्‍यान दररोज सकाळी  9.3. ते 11.30 यावेळेत श्री.गजानन विजय ग्रंथाचे सामुहिक पारायणाचे आयोजन करण्‍यात आले.या पारायणाचा  72 स्‍त्री-पुरुष भक्‍तानी  लाभ घेतला. 25 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्‍यान चिन्‍मय  मिशनच्‍या  आचार्य स्‍वामिनी मंगलानंदा यांच्‍या प्रवचनांनी श्रीमत भागवत ज्ञान सप्‍ताह संपन्‍न झाला. संहिता वाचन ललिता नायगांवकर ह्यांनी  केले.  
     महोत्‍सवाचे आयोजन अनिल माणकीकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली संपन्‍न झाला. आसोलकर,नंदुभाऊ कुळकर्णी,प्रशांत दातार,विठ्ठलराव व्‍यवहारे,मुकूंद क्षिरसागर,सुभाष खंगण,अनिल व शरद देशपांडे,राम वखरे,देशमुख,बेडेकर प्रामुख्‍याने माणकीकर परिवारांनी व सर्व भक्‍तांनी  अथक परिश्रमाने सहभाग घेतला.
00000

Sunday, 24 February 2013

मृतक परिवाराच्‍या वारसदारांना एक लाखाचे सानुग्रह अनुदान -पालकमंत्री


वर्धा दि.14- वर्धा जिल्‍ह्यात काल संध्‍याकाळी वादळी वारे व पाऊसाने थैमान घातले होते.यामध्‍ये वर्धा तालुक्‍यातील बोरगांव (मेघे) येथे राहणारा राजेंद्र ठाकरे वय 50 वर्षे या इसमावर झाड कोसळून तर  वायफड येथे राहणारा वेदांत ढोंबरे वय 6 वर्षे यांचा भींत कोसळून दुदैवी  मृत्‍यू झाला. या मृतक परिवारांच्‍या वारसदारांना प्रत्‍येकी एक लाख रुपये सानुग्रह अनुदान तातडीने प्रदान करावे असे निर्देश वित्‍त व नियोजन राज्‍यमंत्री तथा पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिले.
          वायगांव निपाणी व वायफड येथे नैसर्गीक आपत्‍तीमुळे मृत्‍यू झालेल्‍यांच्‍या परिवारांचे मंत्रीमहोदयांनी त्‍यांचे घरी जावून सात्‍वन केले. यावेळी जिल्‍हाधिकारी एन.नवीन सोना,अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत,निवासी उपजिलहाधिकारी  सुनिल गाडे,उपजिल्‍हाधिकारी  बी.एस.मेश्राम, हिंगणघाट उपविभागीय अधिकारी उमेश काळे,आर्वी उपविभागीय अधिकारी सुनिल कोरर्डे,वर्धा तहसीलदार, माजी नगराध्‍यक्ष शेखर शेंडे,माजी गृहरक्षकदल अधिकारी प्रविण हिवरे आदी मान्‍यवर उपस्थित होते.
          जिल्‍ह्यात वादळी पाऊस  व गारपिटीमुळे प्राथमिक अंदाजानुसार तीन हजार 650 हेक्‍टर क्षेत्रातील गहू, हरभरा व संत्रा  पिकांचे नुकसान  झाले  असून   त्‍यामध्‍ये आर्वी व कारंजा तालुक्‍यातील पिकांचा समावेश नाही असे सांगून पालकमंत्री राजेंद्र मुळक म्‍हणाले की, सर्वात जास्‍त गाराचा पाऊस समुद्रपूर तालुक्‍यात झाला आहे.या तालुक्‍यातील शेतक-यांना शासकीय नियमानुसार शेतीच्‍या पिकांचे नुकसान भरपाई शासन देईल.वर्धा तालुक्‍यातील 20 गावातील 41 घरांचे अंशतः 9 घरांचे पूर्णतः अंदाजे 3.25 लाखाचे नुकसान झाले आहे. 94 गावातील 452 हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान 50 टक्‍याचे आत झाले आहे.   
          समुद्रपूर तालुक्‍यातील गापपीटीमुळे 17 गावे बाधित झाले असून 270.20 हेक्‍टर आर शेती  क्षेत्राचे नुकसान झाले आहे.यामध्‍ये 498 शेतकरी बाधित झाले आहे. 50 टक्‍याचे आतील 265.20 हेक्‍टर आर क्षेत्र व 50 टक्‍याचे वर 5 हेक्‍टर आरक्षेत्र हिरडी या मौजातील आहे. 22 घराचे अंशतः नुकसान झाले असून नुकसानीचा प्राथमिक अंदाज 15 हजार रुपये एवढा आहे. शासनाच्‍या निकषानुसार आपत्‍तीग्रस्‍तांना सहायता निधी दिली जाणार आहे.
                                                     
          वादळी पावसामुळे ज्‍या गावामध्‍ये विद्युत सेवा खंडीत झाली असेल अशा गावांना आजच विद्युत सेवा प्रदान करावी काही तांत्रीक कारणाने विद्युत सेवा पूर्ववत करण्‍यासाठी अडचणी असल्‍यास त्‍या गावातील विद्युत सेवा इतर गावांच्‍या फिडरवरुन घेवून विद्युतसेवा पूर्ववत करण्‍याच्‍या सुचना यावेळी त्‍यांनी दिल्‍या. ज्‍याचा घरचा कर्ता पुरुष गेला असेल अशा कुटूंबांना संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज भरुन घेण्‍यात यावे. तसेच ते अर्ज तातडीने मंजुर करण्‍यात यावे. नैसर्गीक आपत्‍ती ग्रस्‍तांना शासकीय मदत तातडीने प्रशासनाने पूरविण्‍यात यावी असे निर्देश देवून वादळी पावसामुळे पाच व्‍यक्‍ती गंभीर जखमी झाल्‍या असून त्‍यांना  रुग्‍णालयात दाखल केले आहे.त्‍यांच्‍यावर  औषोधोपचार करणे सुरु असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  
          यावेळी जिल्‍हा परिषदेचे सदस्‍य, संबंधित गावातील सरपंच, पदाधिकारी अधिकारी मोठ्या संखेत उपस्थित होते.
00000

Thursday, 21 February 2013


    दुर्मिळ  पिवळा पळस बहारला.....

          पळसाच्‍या   लाल,नारंगी  फुलांनी  वसंत ऋतूत फुलल्‍यानंतर  संपूर्ण  जंगल  लाल रंगाने  बहारुन  जाते.  पळस फुलांनी  बहारलेल्‍या  जंगलाला         ` फ्लेम ऑफ  फॉरेस्‍ट `  अशी  उपमा इंग्रजांनी  दिली आहे.  पळसाच्‍या  लाल, नारंगी फुलांच्‍या  प्रदेशात  दुर्मिळ अशा पिवळ्या  रंगाच्‍या बहारलेला   पळसवृक्ष  नागपूर-वर्धा  जिल्‍ह्याच्‍या  सिमेवरील जंगलात  बहारलेला  आहे. पिवळा पळस  क्‍वचितच  पहायला  मिळतो. वसंत ऋतूत   फुललेल्‍या   पळसाचे  झाड सर्वांचेच लक्ष  वेधून घेते.


          पळसाला  जसा  आकार नाही, तसाच त्‍याच्‍या  सुंदर रंगांना गंधही  नाही.  परंतू    फुललेला  पळस सर्वांनाच  आवडतो. कारण  पळस फुलला  की, संपूर्ण  जंगल लाल रंगांनी    न्‍हाऊन  निघते. आणि पळसाच्‍या  फुलातील  मध वेचण्‍याकरीता  पळस  मैनेसह  असंख्‍य  पक्षी  झाडावर येतात. वसंत पंचमीला पळसाच्‍या फुलांच्‍या  रंगालाही  विशेष  महत्‍व  आहे.
          लाल, नारंगी  रंगाचा पळस  सर्वत्र आढळतो परंतू  पिवळा  आणि  पांढरा पळस  हा  दूर्मिळ  असतो. नवेगावबांधच्‍या  जंगलात पांढरा  पळस प्रत्‍यक्ष  पाहिल्‍याचं  सुप्रसिध्‍द  निसर्ग  लेखक  व पक्षीतज्ञ  मारुती  चितमपल्‍ली   यांनी  सांगितले. पिवळा  पळस  सुध्‍दा  विदर्भातील  अगदी  मोजक्‍याच  ठिकाणी  आढळून  येतो . काळ्या  रंगाचा पळस सुध्‍दा   मध्‍य प्रदेशातील   शिवनीच्‍या  जंगलात असल्‍याचं   श्री.जोग  यांनी  बस्‍तरच्‍या   प्रवासात  सांगितले होतं.
          पिवळ्या पळसाबद्दल अद्यापपर्यंत  संशोधन झाले नाही. लाल, नारंगी, फुलांबद्दल  व त्‍याच्‍या  गुणधर्माबद्दल  आर्युवेदामध्‍ये   अभ्‍यास  झालेला आहे. पिवळ्या  व पांढ-या  पळसाच्‍या   झाडांचं संवर्धन   तसेच  संशोधनही  अत्‍यंत  आवश्‍यक   असल्‍याचे   मारुती  चितमपल्‍ली   यांनी सांगितलं. परंतू  40 वर्षे जंगलात राहून, प्रत्‍येक  वृक्षाचं  तसेच  निसर्गाचं  अभ्‍यास   करुन  संशोधन केलं. परंतू  झालेल्‍या  संशोधना नंतर  नवीन  संशोधन  होत नाही. त्‍यामुळे   तरुण  पिढीला  समृध्‍द   निर्सगाची  माहिती  होण्‍यासाठी   मोठ्या  प्रमाणात  संशोधनाची  आवश्‍यकताही  त्‍यांनी  व्‍यक्‍त  केली.
          पिवळा  व पांढरा  पळस  संवर्धन   करताना  त्‍याच्‍या   बियापासून   पिवळा  पळसच  निर्माण  होईल याची  शाश्‍वती  नसल्‍यामुळे  गुटी  कलमाव्‍दारे  या दुर्मिळ   वृक्षवल्‍लीचे  संशोधन व्‍हावे,अशी  मनोमन  इच्‍छाही  त्‍यांनी  व्‍यक्‍त  केली.
          पांढरा व पिवळा  पळस  संपूर्ण  जंगलात  क्‍वचीत  आढळतो. त्‍यामुळे  उत्‍सुकतेपोटी   त्‍या  झाडाची  मुळापासून  तोडणी   होते. संपूर्ण  जगात  केवळ  भारतातच  पळस  आढळतो. हिमालय  अथवा  राजस्‍थानच्‍या  वाळवंटात  पळस  आढळत  नाही. वसंत  ऋतूमध्‍ये  पळस फुलल्‍यानंतर  संपूर्ण  जंगल  लाल  रंगात  न्‍हाऊन   निघते. धुलीवंदनामध्‍ये   पळसाच्‍या  फुलांचाच   रंगाचा  वापर  होत होता.  त्‍यामुळे   शरीरालाही   हा रंग  पोषक  होता. पळसाच्‍या  झाडापासून  लाख  मोठ्या  प्रमाणात   येत  असल्‍यामुळे   शेतकरी   आपल्‍या  बांधावर  पळसाच्‍या  झाडाचे  संवर्धन  करतात.  पळसापासून मिळणा-या  बिया, फुले, पाने, यामध्‍ये  औषधी गुणधर्म  असल्‍यामुळे   त्‍याचा वापरही  औषधी  गुणधर्म  म्‍हणून   मोठ्या  प्रमाणात   करण्‍यात येतो.
          वर्धाच्‍या  जंगलात  आढळलेल्‍या   दुर्मिळ  पिवळ्या पळसाच्‍या  झाडाचे  संवर्धन  करण्‍यासाठी   सामाजिक   वनीकरण   विभागाचे उपसंचालक  प्रविनकुमार बडगे  यांनी  पुढाकार घेतला  आहे. मारुती   चितमपल्‍ली   यांनी   सुचविलेल्‍या   गुटी  कलमाव्‍दारे  पिवळ्या झाडांच्‍या  संवर्धनासाठी  शासकीय  नर्सरीमध्‍ये  विशेष प्रयत्‍न   सुरु आहेत. बिया पासून  पळसाच्‍या  झाडाला  25 ते 30 वर्षापर्यंतही  फुले  आलेले नाहीत.  परंतु   गुटी  कलमाव्‍दारे  अल्‍पावधीत  पळस  बहरु  शकतो.
          पळसाची  लाल,नारंगी  फुलं पोपटाच्‍या  चोचीसारखी  दिसतात.संपूर्ण  विदर्भातील जंगलात पळसाच्‍या   झाडाखाली पळसाच्‍या  फुलांचा सडा  पहायला  मिळतो.  तसेच  पळसाचा  संपूर्ण  झाड  सुध्‍दा  लाल  रंगाने न्‍हाऊन   निघालेल्‍या  असून,  सुध्‍दा  आपण  मुद्दाम   फुलोरा  पहायला  जात नाही.
             अनिल गडेकर
            9890157788
000000

Tuesday, 19 February 2013

ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्‍य सेवा देणार - जि.प.अध्‍यक्ष


वर्धा दि.19- बदलत्‍या वातावरणामुळे ग्रामीण क्षेत्रात अनेक आजार लोकांमध्‍ये आढळून येत असतात गाव निरोगी रहावे यासाठी प्रत्‍येक गावामध्‍ये स्‍वच्‍छता पाळणे गरजेचे असून ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्‍य केंद्र यापुढे सर्व सुविधेने सुसज्‍ज करण्‍याचा प्रयत्‍न राहणार आहे.वैद्यकीय अधिका-यांचे रिक्‍त पदे तसेच आरोग्‍य संस्‍थेचे इतर पदे भरण्‍यावर भर राहणार असून ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्‍य सेवा देण्‍याचा प्रयत्‍न असेल अशी माहिती जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे यांनी दिली.
समुद्रपूर तालुक्‍यातील मांडगाव या गावामध्‍ये जिल्‍हा नियोजन समितीच्‍या निधीमधून 3 कोटी 71 लक्ष रुपये खर्च करुण बांधण्‍यात येणा-या  नविन प्राथमिक आरोग्‍य केंद्राच्‍या इमारतीच्‍या बांधकामाचे  भुमिपूजन त्‍यांच्‍या हस्‍ते झाले त्‍यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने, जि.प. शिक्षण व आरोग्‍य सभापती प्रा. उषाकिरण थुटे,पंचायत समिती समुद्रपूरच्‍या सभापती नंदाताई साबळे,उपसभापती संध्‍याताई डांगरी, वर्धा पंचायत समितीचे उपसभापती संदेश किटे, सरपंच अर्चनाताई घुसे जि.प.सदस्‍य संगिताताई उईके, आदि मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.
          बदलत्‍या काळानुसार ग्रामीण क्षेत्रात कार्यरत आरोग्‍य यंत्रणा अद्यावत करण्‍याचा प्रयत्‍न असलयाचे सांगून जि.प.अध्‍यक्ष ढगे म्‍हणाले की येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्राची इमारत जिर्ण अवस्‍थेत असल्‍यामुळे नवीन इमारतीचे बांधकाम करण्‍याचा प्रस्‍ताव आरोग्‍य विभागाने सादर केला. या इमारतीमध्‍ये आवश्‍यक त्‍या सर्व सुविधा पुरविण्‍यात येतील. येत्‍या 9 महिन्‍याच्‍या आत या इमारतीचे बांधकाम करण्‍यात येईल. असा विश्‍वास व्‍यक्‍त करुण ढगे म्‍हणाले की, जिल्‍हा नियोजन समितीच्‍या निधीमधून यावर्षी 71 लक्ष रुपये उपलब्‍ध करुण देण्‍यात आले आहे. उर्वरित 3 कोटी रुपये येणा-या आर्थीक वर्षात उपलब्‍ध होतील जिल्‍ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्‍य सुदृढ रहावे यासाठी प्रयत्‍न करण्‍यात येणार असून गरोदर महिलांनी त्‍यांचे बाळंतपण प्राथमीक आरोग्‍य केंद्र किंवा शासकीय संस्‍थेत करावे असे आवाहन त्‍यांनी केले.
                                                                                                                                                  
          याप्रसंगी बोलतांना सभापती थुटे म्‍हणाल्‍या की, जनतेच्‍या आरोग्‍याकडे लक्ष ठेवून आरोग्‍य विभागाने वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.सुदृढ गाव,सुदृढ जिल्‍हा व सुदृढ महाराष्‍ट्र  असला पाहिजे अशी भावनाही त्‍यांनी यावेळी बोलून दाखविली.
यावेळी बोलतांना जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी चन्‍ने म्‍हणाले की जिल्‍ह्यातून कुपोषण आजार हद्दपार करण्‍यासाठी शासन प्रयत्‍नशिल असून नागरिकांनीसुध्‍दा या कार्यात सहकार्य करावे. शून्‍य ते सहावर्ष वयोगटापर्यंतच्‍या  मुलांच्‍या आरोग्‍याकडे लक्ष देण्‍यात यावे. बाळ पोटात असल्‍यास मातेने योग्‍य प्रमाणात व सुतुलीत आहार घ्‍यावा आपले बाळ कुपोषित होणार नाही याची दक्षता संबंधित कुटूंबांनी घ्‍यावी. राष्‍ट्रीय आरोग्‍य कार्यक्रमात महाराष्‍ट्रामध्‍ये वर्धा जिल्‍हा आघाडीवर असून अनेक कार्यक्रमामध्‍ये आतापर्यंतच्‍या सर्वेक्षणात अव्‍वल आहे. आरोग्‍य सेवा बळकट करण्‍यासाठी वैद्यकीय अधिका-यांचे रिक्‍तपदे भरण्‍याची कार्यवाही सुरु असून गुनात्‍मक व दर्जेदार आरोग्‍य सेवा देण्‍याचा मानस असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
          प्रास्‍ताविक  करतांना डॉ. दिलीप  माने  म्‍हणाले की, आरोग्‍य   विभागाच्‍या आराखड्यानुसार जिल्‍ह्यात 5 नवीन प्राथमिक आरोग्‍य केंद्र व 7 उपकेंद्र मंजुर झालेले आहे.वर्धा जिल्‍ह्याने नेत्रदिपक प्रगती साधली असून महाराष्‍ट्रात वर्धा जिल्‍हा शासनाच्‍या कार्यक्रमामध्‍ये आघाडीवर असून ही गुणाक्रमे ठरलेली आघाडी सतत कायम राहील यासाठी आरोग्‍य यंत्रणेचे प्रयत्‍न सुरु आहे.  पुढील वर्षाच्‍या जिल्‍हा नियोजन समितीच्‍या अनुदानातून ई.सी.जी. यंत्र घेण्‍यात येणार असून ग्रामीण भागातील ह्रृदय रुग्‍णांनाया यंत्राचा  मोठा दिलासा मिळू शकेल असेही ते म्‍हणाले.
          यावेळी डॉ.पोहाने यांनी सुध्‍दा आपले विचार व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे संचलन विजय कुंभलकर व आभार डॉ. शंभरकर यांनी मानले.यावेळी समुद्रपूर पंचायत समितीचे संवर्ग प्रकल्‍प अधिकारी एन.के.भांडारकर यांचेसह पं.स.व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी,सदस्‍य,अधिकारी व ग्रामस्‍थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
                                                    0000

Sunday, 10 February 2013

सेवाग्राम आश्रमाला संपूर्ण मदत -आर.आर.पाटील


                                       सेवाग्राम येथील विविध प्रकल्‍पांची पाहणी
                           महात्‍मा गांधींचे विचार जगाला मार्गदर्शक 
वर्धा दि.10- सेवाग्राम येथील महात्‍मा गांधी आश्रम परिसराच्‍या संवर्धनासाठी तसेच त्‍यांच्‍या कार्याचा व गांधी विचारांचा प्रसार करण्‍यासाठी आवश्‍यक संपूर्ण मदत देण्‍याची ग्‍वाही गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आज सेवाग्राम आश्रमाला भेटी प्रसंगी दिली.
          सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष अॅड. मा.म. गडकरी यांनी गृहमंत्र्यांचे सुतकताईच्‍या हाराने स्‍वागत केले तसेच सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानतर्फे सुरु असलेल्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली.यावेळी आमदार सुरेश देशमुख त्‍यांच्‍या समवेत उपस्थित होते.
          गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी महात्‍मा गांधी सर्वप्रथम सेवाग्राम येथे आले त्‍यावेळी ज्‍या विहीरीजवळ पहिल्‍यांदा मुक्‍काम केला त्‍याची पाहणी केली. तसेच सेवाग्राम येथील ऐतिहासीक भाषण अस्‍पृश्‍यता संपूर्णपणे दूर व्‍हावी याविचारांचा संदेश आदर्श गावके एकादश सिधांत ग्राम स्‍वाराज्‍य आदर्श गावाची संकल्‍पना आश्रम परिसरात सुरु असलेले गोपालन बेलापासून तयार करण्‍यात येणारे उत्‍पादन आदि बाबतही संपूर्ण माहिती घेतली.
          महात्‍मा गांधी यांची दिनचर्या काय होती  याबाबत अॅड. मा.म. गडकरी,सुमनताई पांडे, यांचेकडून संपूर्ण माहिती घेतली व आश्रम परिसरात दररोज होणा-या प्रार्थनेबाबतही चौकशी केली.तसेच  सर्वधर्म प्राथनेतही सहभागी झाले.
          यावेळी आदिनिवास,बा कुटी, आखिरी निवास,बापू कुटी, गांधीजी का दप्‍तर  या वास्‍तुंची पाहणी केली. बापूकुटी मधील मिराबेन यांनी काढलेले भिंतीवरील चित्रांचीही माहिती घेतली. सेवाग्राम आश्रमासाठी केंद्र व राज्‍य शासनाकडून आवश्‍यक मदत देण्‍यासंदर्भातही गृहमंत्र्यांनी आश्रम प्रतिष्‍ठानच्‍या पदाधिका-यासोबत चर्चा केली. यावेळी त्‍यांनी गांधीजींच्‍या जीवनावरील विविध पुस्‍तकांचीही खरेदी केली.
         
यावेळी सुनिल राऊत,माजी आमदार राजू तिमांडे, समीर देशमुखृ, शशांक घोडमारे, दादाराव खैरकर यांच्‍या सह  सेवाग्राम येथील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
0000

जेष्‍ठ गांधीवादी प्रा. ठाकूरदास बंग आयुष्‍यभर निरामय जीवण जगले - आर.आर.पाटील


                                             बंग कुटूंबियांचे गृहमंत्र्याकडून सांत्‍वन
             वर्धा दि.10- जेष्‍ठ गांधीवादी विचारवंत प्रा.ठाकूरदास बंग यांनी आयुष्‍यभर गांधी विचाराला वाहून घेतानांच समाजसेवेच्‍या माध्‍यमातून निरामय जीवन जगले अशा भावना गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आज चेतना विकास संस्‍थेच्‍या परिसरातील निवास्‍थानी श्रीमती सुमन बंग यांची भेट घेवून त्‍यांचे सांत्‍वन केले.  त्‍याप्रसंगी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या.
          जेष्‍ठ गांधीवादी विचारवंत प्रा. ठाकुरदास बंग यांचे नुकतेच अलोडी येथील अशोक बंग यांच्‍या निवास्‍थानी निधन झाले. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी सकाळी बंग कुटूंबियांचे सांत्‍वन करण्‍यासाठी त्‍यांच्‍या निवास्‍थानी भेट दिली.स्‍वर्गीय ठाकुरदास बंग यांच्‍या फोटोस गुलाबपुष्‍प अर्पण करुन आपली भावपूर्ण आदरांजली वाहिली.
 महात्‍मा गांधी यांचे विचार पुढे नेण्‍यामध्‍ये स्‍वर्गीय ठाकुरदास बंग यांचे महत्‍वाचे योगदान असून संपूर्ण आयुष्‍य समाजसेवेसाठी त्‍यांनी वाहिले असल्‍याची भावनाही यावेळी व्‍यक्‍त केली.
         स्‍वातंत्र्य चळवळी मध्‍ये सक्रीय सहभाग घेतांना आचार्य विनोबा भावे यांच्‍या भुदान चळवळीसोबत सर्वोदय कार्यासाठी  आपले जीवन वाहिले होते. संपूर्ण क्रांती आंदोलन,स्‍वातंत्र्य आंदोलन यामध्‍ये त्‍यांचा सक्रीय सहभाग होता.
        स्‍वर्गीय ठाकुरदास बंग यांच्‍या पत्‍नी सुमनताई बंग यांचे आशिर्वाद घेतल्‍यानंतर गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी मृत्‍यूपूर्वी त्‍यांच्‍या प्रकृती स्‍वास्‍थाची माहिती घेतली. तब्‍बल पंचवीसवर्षे मधुमेहासारखा आजार असूनही समाजसेवेत कधीही खंडपडू दिला नाही. महिन्‍यापूर्वी पडल्‍यामुळे पायाला फ्याक्‍चर झाले होते त्‍यामुळे त्‍यांची हालचाल बंद झाली होती. शेवटी आठ दिवस बोलने बंद होते आणि झोपेतच त्‍यांचे निधन झाले. आयुष्‍यात कुठलिही इच्‍छा किंवा अपेक्षा त्‍यांची नव्‍हती असे यावेळी अशोक बंग यांनी सांगितले.
        यावेळी डॉ. आकाश बंग श्रीमती निरंजना बंग व संपूर्ण बंग कुटूंबीय उपस्थित होते. आमदार सुरेश देशमुख, सुनिल राऊत आदिनीही स्‍वर्गीय ठाकुरदास बंग यांच्‍या प्रतिमेस गुलापुष्‍प अर्पण करुण आदरांजली वाहिली.
0000

होमगार्डना आवश्‍यक सुविधा व माणधनात भरीव वाढ -आर.आर.पाटील


                                       नागरी सुरक्षा जागृती अभियानाचे उदघाटन
वर्धा दि.10- राज्‍यातील 40 हजार होमगार्ड यांना अत्‍यंत कमी मानधन मिळत असून त्‍यांना मिळणा-या सुविधा व मानधनात भरीव वाढ करण्‍यात येईल अशी घोषणा गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आज केली.
          वर्धा गृहरक्षक दलातर्फे नागरी सुरक्षा जनजागृती अभियानाचे उदघाटन गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्‍या हस्‍ते झाले त्‍याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
          वर्धा येथील होमगार्ड जिल्‍हा प्रशिक्षण केंद्राच्‍या  परिसरात आयोजित कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्‍यक्ष आमदार प्रा. सुरेश देशमुख होते. यावेळी प्रहारचे कर्णल सुनिल देशपांडे,सुनिल राऊत, स‍मीर देशमुख, जिलहा समादेशक प्रा. मोहन गुजरकर, किशोर माथनकर, रामभाऊ सातव,विजय मुळे आदि उपस्थित होते.
          नैसर्गीक आपत्‍ती,कायदा व सुव्‍यवस्‍था आदि आपत्‍ती निवारणासाठी होमगार्ड सदैव पोलीसांच्‍या मदतीसाठी तत्‍पर असल्‍याचे सांगतांना गृहमंत्री आर.आर.पाटील म्‍हणाले की, होमगार्डना दिले जाणारे मानधन अत्‍यंत अपूरे असल्‍यामुळे त्‍यांच्‍या मानधनात व सुविधेत वाढ करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला असून लवकरच त्‍याला शासनाची मान्‍यता घेण्‍यात येईल. होमगार्डना पोलीस भरतीसाठी प्राधान्‍य असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगीतले.
          जनतेच्‍या जीवनाचे व मालमत्‍तेचे रक्षण करण्‍यासोबतच अतिरेकी हल्‍ल्‍्यासारख्‍या प्रसंगामध्‍येही सतर्कपणे पोलीसांना मदत करतांनाच वृध्‍द नागरीकांनाही सहाय्य करण्‍याचे धोरण स्विकारण्‍याचे आवाहन करतांना गृहमंत्री म्‍हणाले की, वृध्‍द व्‍यक्‍तींच्‍या असहायतेचा लाभ घेवून मुंबईसह मोठ्या शहरामध्‍ये
मालमत्‍तेच्‍या लुटीसोबत खून करण्‍याचेही प्रकरण होत असल्‍यामुळे त्‍यांच्‍या संरक्षणासाठी व त्‍यांना विश्‍वास देण्‍यासाठी मुंबई प्रमाणे महिन्‍यातून एक दिवस अशा वृध्‍दांची भेट घेवून त्‍यांना मदतीचा उपक्रम राबवावा अशा सूचनाही त्‍यांनी यावेळी दिल्‍या.                                        
          प्रारंभी नागरीसुरक्षा जागृती अभियाना अंतर्गत पथसंचलनाची मानवंदना स्विकारुन नैसर्गीक आपत्‍ती बॉम्‍बस्‍पोट आदि परिस्थिती हाताळतांना होमगार्डची भूमिका या विषयाच्‍या अनुषंगाने सादर केलेल्‍या प्रात्‍यक्षिकाची माहिती घेतली.तसेच समाज प्रहरी या स्‍मरणिकेचेही गृहमंत्र्यांनी विमोचन केले.
          होमगार्ड मधून उत्‍तम सेवा बजावणा-या नागरिकांचा यावेळी प्रमाणपत्र देवून गौरव करण्‍यात आला. तसेच निसर्ग सेवा समितीतर्फे स्‍वातंत्र्य सैनिकांच्‍या स्‍मृती प्रित्‍यर्थ लावण्‍यात आलेल्‍या वृक्षाचे रोपनही गृहमंत्र्यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.
          प्रारंभी जिल्‍हा समादेशक मोहन गुजरकर यांनी स्‍वागत करुण प्रास्‍ताविकात नागरी सुरक्षा जनजागृती अभियानाची माहिती दिली. गृहरक्षक दलात सातशे नागरीकांना भर्ती करण्‍यात आले असून त्‍यांना प्रशिक्षणही देण्‍यात आले आहे. बालगृह रक्षक दल,गृह रक्षक मैत्रीनी आदि उपक्रम राबवून नागरी चळवळ उभारण्‍याची संकल्‍पनाही त्‍यांनी यावेळी सांगितली. यावेळी मोठ्या संखेने नागरीक उपस्थित होते.
00000