Tuesday, 30 October 2012

एक दिवसीय रोजगार व स्‍वयंरोजगार मेळावा संपन्‍न


        वर्धा दि.30- स्‍थानिक शासकीय तंत्र माध्‍यमिक शाळा केंद्र तथा कनिष्‍ठ महाविद्यालय, वर्धा येथे एच.एस.सी.व्‍होकेशनल 11 वी व 12 वी च्‍या विद्यार्थ्‍यांकरीता 18 ऑक्‍टोंबर,2012 रोजी एक दिवसीय रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर संपन्‍न झाले.
          कार्यक्रमाचे अध्‍यक्ष जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्ष्‍ण अधिकारी आर.डी.भोयर उपस्थित होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्‍हणून जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, वर्धाचे गणराज यांनी विद्यार्थ्‍यांना रोजगार व स्‍वयंरोजगार तसेच व्‍यक्‍तीमत्‍व विकास याबाबत मार्गदर्शन केले. शिबीरास एकूण 90 विद्यार्थी उपस्थित होते.
            कार्यक्रमाचे प्रास्‍तविक व संचालन एस.एस.जगताप ह्यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन व्‍ही.डी.भगत ह्यांनी मानले. कार्यक्रमाकरीता टी.एस.भोयर, सौ.एम.एस.ठाकरे, पी.एन.चवडे, एस.एस.जगताप, पाटणकर,कामडी ह्यांनी मोलाचे सहकार्य केले.
          कार्यक्रमाकरीता संस्‍थेतील वर्ग 11 वी व 12 वी चे ऑटो इंजिनिअरींग टेक्‍नीशियन, मेकॅनिकल टेक्‍नॉलॉजी, मेंन्‍टेनंन्‍स अॅण्‍ड स्‍पेअर्स ऑफ इलेक्टि्कल डोमेस्टिक अप्‍लॉयन्‍सेस या अभ्‍यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.
0000

यशवंत नागरी सहकारी पतसंस्‍थेची वार्षिक सर्वसाधारण सभा 4 नोव्‍हेबर रोजी


         वर्धा दि. 30- यशवंत नागरी सहकारी पतसंस्‍था, वर्धा या संस्‍थेची वार्षिक सर्वसाधारण सभा 4 नोव्‍हेंबर,2012 रोजी एकनाथ मंदिर काळा मारोती जवळ शिवाजी चौक येथे रविवारी  सकाळी 10 वाजता घेण्‍याचे ठरविले आहे.
          या सभेला सर्व संबंधितांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन यशवंत नागरी सहकारी पतसंस्‍थाचे  प्रशासक डी.एस.रोहणकर यांनी केले आहे.
0000

Monday, 29 October 2012

110 ग्रामपंचायती व 28 ग्रामपंचायतीच्‍या पोट निवडणूका 26 नोव्‍हेंबर रोजी आचार संहिता आजपासून लागू


         वर्धा दि.29- वर्धा जिल्‍ह्यात माहे डिसेंबर,2012 या कालावधीत मुदती संपणा-या ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणूकीसाठी आयुक्‍त, राज्‍य निवडणूक आयोग,मुंबई यांचे पत्र दिनांक 29/10/2012 नुसार जाहिर केलेल्‍या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे वर्धा जिल्‍ह्यात 110 ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक व 28 ग्रामपंचायतीच्‍या पोट निवडणूका दिनांक 26 नोव्‍हेंबर,2012 रोजी होऊ घातलेल्‍या आहेत.
          सार्वत्रिक निवडणूक असलेल्‍या संबंधित ग्रामपंचायतीच्‍या संपूर्ण क्षेत्रात व पोट निवडणूका असलेल्‍या ग्रामपंचायतीच्‍या संबंधित प्रभागाच्‍या क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्‍यात येत आहे. ही आचार संहिता  निवडणूकीचा निकाल जाहिर होईपर्यंत अस्तित्‍वात राहील. व आचारसंहितेचा भंग होणार नाही.याची दक्षता घेण्‍यात यावी असे जिल्‍हाधिकारी वर्धा यांनी कळविले आहे.
                                          00000       

विदर्भातील ग्रामीण खेळाडूंनी राष्‍ट्रीय स्‍पर्धांची तयारी करावी - रणजित कांबळे


            *  39 वा विदर्भस्‍तरीय कबड्डी स्‍पर्धेतून विदर्भ संघाची निवड
       *  कुमारगट मुलांचे अमरावती तर मुलींमध्‍ये नागपूर जिल्‍हा अजिंक्‍य

           वर्धा दि. 29 - विदर्भातील ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्‍ट्रीय स्‍पर्धासाठी तयार करण्‍यासाठी प्रत्‍येक तालुका स्‍तरावर आवश्‍यक सुविधा निर्माण करण्‍याच्‍या दृष्‍टीने संपूर्ण सहकार्य करण्‍यात येईल अशी ग्‍वाही राज्‍याचे सार्वजनिक बांधकाम,पाणीपुरवठा राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांनी दिली.
          पुलगाव येथे आयोजित 39 व्‍या विदर्भस्‍तरीय कबड्डी स्‍पर्धाच्‍या उदघाटन  समारंभाप्रसंगी राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्‍छा देवून राज्‍य व राष्‍ट्रीय स्‍तरावर आपल्‍या दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करुन प्रतिनिधीत्‍व करा असेही त्‍यांनी सांगितले.
 स्‍वर्गिय प्रभाताई राव स्‍मृती प्रित्‍यर्थ नगर स्‍पोटींग क्‍लब,पुलगांव-नाचणगाव यांच्‍या वतीने 39 व्‍या विदर्भस्‍तरीय कबड्डी स्‍पर्धेचे आयोजन  येथील आर.के. हायस्‍कुलच्‍या प्रांगणात  आयोजित करण्‍यात आले होते.
या स्‍पर्धेत विदर्भातील कुमार गटातील 22 संघांनी सहभाग घेतला. यामध्‍ये मुलांचे 11 तर मुलींच्‍या 11 संघांचा सहभाग होता.उदघाटन समारंभात इंडियन मिलटरी स्‍कूलच्‍या जवानांनी व खेळाडूंनी मानवंदना दिली. स्‍पर्धेचे उदघाटन राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांच्‍याहस्‍ते दिप प्रज्‍वलनाने झाले.  कुमारगटातील  यवतमाळ- अमरावती या जिल्‍ह्यातील झालेल्‍या मुलांच्‍या अंतिम सामन्‍यात    अमरावतीच्‍या चमूने अजिंक्‍यपद पटकाविले.तर यवतमाळ व नागपूर जिल्‍ह्यातील झालेल्‍या मुलींच्‍या अंतिम सामण्‍यात नागपूर विभाग अजिंक्‍य ठरला.
विदर्भस्‍तरीय कबड्डी स्‍पर्धेमधून  विदर्भाचा संघ निवडला जाणार असल्‍याचे विदर्भ कबड्डी असोसिएशनचे अध्‍यक्ष विलासराव इंगोले यांनी यावेळी सांगितले.
          विदर्भातील ग्रामीण भागातून खेळाडू तयार होऊन तो  राज्‍य व राष्‍ट्रीय स्‍तरावर भरारी मारुन त्‍या खेळाडूने ऑलंपिकमध्‍ये देशाचे प्रतिनिधीत्‍व करावे,असा संदेश राज्‍याचे सार्वजनिक बांधकाम व पाणीपुरवठा राज्‍यमंत्री रणजीत कांबळे यांनी दिला.
कबड्डी खेळामुळे प्रत्‍येक जण मातीशी जुळतो.कबड्डी हा खेळ कमी खर्चात कमी जागेत उत्‍कृष्‍टरित्‍या   खेळता येतो.प्रत्‍येक खेळ हा खेळाडूंच्‍या भावनेशी निगडीत असून,कबड्डी खेळाकरीता खेळाडूंना प्रोत्‍साहित करण्‍याची गरज राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांनी व्‍यक्‍त केली.                                       
          सुरवातीला माता सरस्‍वती,हिमाचल प्रदेशच्‍या माजी राज्‍यपाल स्‍व. प्रभा राव यांच्‍या प्रतीमेचे पूजन व माल्‍यार्पण करण्‍यात आले. त्‍यानंतर तीन दिवसीय कबड्डी स्‍पर्धेचे उद्घाटन  करण्‍यात आले. शनिवारी सकाळी 8 ते 11 या वेळेत मुलींच्‍या गटाचे तर मुलांच्‍या गटाचे प्रत्‍येकी तीन असे  6 सामने खेळविण्‍यात आले.
         जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा  श्रीमती चारुताई राव टोकस यांनी अध्‍यक्षीय भाषणात विदर्भस्‍तरीय स्‍पर्धेच्‍या आयोजनासाठी संपूर्ण मदत करण्‍यात येईल व स्‍पर्धकांना प्रोत्‍साहनासाठी सदैव तत्‍पर असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.     जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष नानाभाऊ ढगे, श्रीमती चारुताई राव टोकस,वर्धा जिल्‍हा कॉग्रेस कमेटीचे अध्‍यक्ष किरणभाऊ उरकांदे यांच्‍या हस्‍ते विजयी संघांना बक्षिस देण्‍यात आले.
यावेळी विदर्भ कबड्डी असोसिएशनचे अध्‍यक्ष विलासराव इंगोले, सचिव, सुभाष पिसे,पुलगांव नगर परिषदेचे अध्‍यक्ष भगवानसिंग ठाकूर,उपाध्‍यक्ष,सुनिल ब्राम्‍हणकर, राजूभाऊ कोचर, रमेश सावरकर,आर.के. महाविद्यालयाचे बालकिसन टिबडीवाल,नाचणगावचे सरपंच शेकर राऊत विदर्भ कबड्डी असोसिएशन चेआयोजक आर.एस.साहू तसेच विदर्भातील क्रीडाप्रेमी मोठ्या संखेने उपस्थित होती.  
000

Thursday, 25 October 2012

सार्वजनीक वितरण व्‍यवस्‍था प्रणालीचे संगणकीकरण - अनिल देशमुख



                      सार्वजनीक वितरण व्‍यवस्‍थेचा आढावा

        वर्धा, दिनांक 25 –सार्वजनीक वितरण प्रणाली अधिक  गतीमान करण्‍यासाठी  तसेच शिधापत्रीकेवरील धान्‍य  शिधापत्रीका धारकांनाच वितरीत करण्‍याच्‍या दृष्‍टीने  वर्धा जिल्‍ह्यासाठी  शिधापत्रीका संगणकीरकरण  प्रकल्‍प नाविन्‍यपूर्ण योजने अंतर्गत राबविण्‍यात आला असून, शिधापत्रीका नोंदणीचे  काम पूर्ण झाले असल्‍याची माहिती अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी  आज दिली.
            शासकीय  विश्रामगृहाच्‍या सभागृहात  जिल्‍ह्यातील सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍था प्रणालीचा आढावा अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी घेतला. त्‍याप्रसंगी  ते बोलत होते. आमदार सुरेश देशमुख, जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री  भोज  आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
         शिधापत्रीका  संगणकीकरण  प्रणाली अंतर्गत आज्ञावलीत शिधापत्रीका नोंदणीचे काम पूर्ण  झाले असून, सुमारे  2 लक्ष 59 हजार 298 प्रपत्रांचे नोंदणी झाली आहे. शिधापत्रींकावर गॅस असल्‍याबाबतचे  75 हजार 784 नोंदणीचे काम पूर्ण झाले असून,  ही संपूर्ण माहिती संगणकीकृत करण्‍यात आली असल्‍याची माहिती  यावेळी  अनिल देशमुख यांनी दिली.  
            शिधापत्रीकेतील कुटूंब प्रमुखासह सर्व व्‍यक्‍तींच्‍या  नावाखाली आधारकार्ड क्रमांक व गॅस जोडणी क्रमांक त्‍यासोबतच बँक खाते क्रमांक नोंदविण्‍यात येत असल्‍यामुळे  सर्व नागरिकांनी  आधारकार्ड व बँके खाते बँकेत आपले खाते उघडून   त्‍याची माहिती  सार्वजनिक वितरण प्रणालीच्‍या  संगणकीकरणासाठी तसेच केरोसीनसह इतर लाभ मिळविण्‍यासाठी तात्‍काळ संबंधीत  तहसिलदारांकडे  तात्‍काळ जमा करावी असे आवाहनही   अन्‍न व नागरी पुरवठा  मंत्री अनिल देशमुख यांनी केले.
             जिवनावश्‍यक वस्‍तु कायद्या अंतर्गत जिल्‍ह्यात  विशेष मोहीम राबविण्‍यात आली असून, मागील वर्षी  71 प्रकरणांची  जिल्‍ह्यात नोंद झाली आहे त्‍यापैकी  90 व्‍यक्‍तींना अटक करण्‍यात आली असून 70 गुन्‍ह्याची  नोंद आली असल्‍याची माहिती यावेळी दिली.
केरोसीन, एलपीजी प्रकरणातही  11 धाडी टाकण्‍यात आल्‍या असून, सर्वांविरुध्‍द गुन्‍हे दाखल करण्‍यात आले आहे. या प्रकरणांमध्‍ये 16 व्‍यक्‍तींना अटक करण्‍यात आली आहे.
            केरोसीन वाटपातील अनियमितता व  जनतेच्‍या  तक्रारीवरुन जानेवारी पासून ऑगस्‍ट पर्यंत 821  दुकानांची तपासणी करण्‍यात आली असून, यामध्‍ये 5  घाऊक , 4 अर्धघाऊक व 461 किरकोळ व हॉकर्स परवानाधारक दोषी आढळण्‍यात आले असून, सुमारे  1 लक्ष 12 हजार 500 रुपये दंडाची रक्‍कम  वसुल करण्‍यात आली आहे. तसेच 12 परवाने निलंबीत करण्‍यात आले असल्‍याची माहितीही त्‍यांनी यावेळी दिली.
            यावेळी  धान्‍य हमी योजना,अन्‍नपुर्णा, अंत्‍यांदय,बिपीएल,एपीएल आदी योजनांचा आढावा  यावेळी त्‍यांनी घेतला.
            प्रारंभी जिल्‍हा पुरवठा अधिकारी आर.ए.अनभोरे यांनी प्रास्‍ताविकात जिल्‍ह्यातील वितरण व्‍यवस्‍थेची  माहिती  दिली.
                                                            00000000


विविध योजनांच्‍या लाभासाठी राष्‍ट्रीयकृत बँकेत खाते उघडा- जयश्री भोज





* पायलट जिल्‍हा म्‍हणून  वर्धा जिल्‍ह्याची निवड
* वैयक्तिक लाभांच्‍या  योजनांची सबसीडी थेट बँकेत जमा
* आधार कार्डासोबत बँकेचे खाते जोडणार
* केरोसीन वरील अनुदान महिलांच्‍या खात्‍यात जमा करणार

          वर्धा, दिनांक 25 – रासायनीक खतांच्‍या  अनुदानासह केरोसीन संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी  राष्‍ट्रीय वृध्‍दपकाळ योजनेसह  महात्‍मा गांधी  ग्रामीण रोजगार योजना व ई-स्‍कॉलरशीप  योजनांचा लाभ थेट लाभार्थ्‍यांच्‍या  बँकेत जमा करण्‍यासाठी  वर्धा जिल्‍ह्याची  प्रायोगीक तत्‍वावर निवड झाली आहे. शेतक-यांसह  इतर योजनांच्‍या  लाभार्थ्‍यांना  डिसेंबर पासून त्‍यांच्‍या  वैयक्तिक बँक खात्‍यात  थेट निधी  जमा होत असल्‍यामुळे  आधारकार्डासह राष्‍ट्रीयकृत बँकेत तात्‍काळ खाते उघडण्‍याचे आवाहन  जिल्‍हाधिकारी  जयश्री भोज यांनी  केले आहे.
          रासायनीक खतांचे अनुदान शेतक-यांच्‍या खात्‍यांवर  थेट जमा होणार आहे यासाठी वर्धा जिल्‍ह्याची   देशात पायलट प्रकल्‍पां अंतर्गत निवड झाली आहे. तसेच केरोसीन, स्‍वयंपाकाचा गॅस, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निवृत्‍ती योजना, इंदिरा गांधी राष्‍टीय वृध्‍दपकाळ  योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय अपंग, विधवा योजनेच्‍या  लाभार्थ्‍यांने  आधारकार्ड तसेच राष्‍ट्रीयकृत बँकेत खाते उघडून त्‍यांची  माहिती तात्‍काळ  संबंधीत  तहसिल कार्यालयाकडे  देण्‍याचे आवाहनही  यावेळी  जिल्‍हाधिका-याने  केले.
          आधारकार्ड नोंदणीमध्‍ये  राज्‍यात  वर्धा जिल्‍ह्याने  उत्‍कृष्‍ट  कार्य केले असून, 12 लक्ष 99 हजार 592 लोकसंख्‍येपैकी 10 लक्ष 54 हजार 743  लोकांची  आधारची नोंदणी झाली आहे. आधारकार्ड नोंदणीसाठी संबंधीत तहसिल कार्यालयामध्‍ये  विशेष कक्ष सुरु करण्‍यात आला असून, ज्‍यांनी अद्याप नोंदणी केली नाही. अशा सर्व नागरिकांनी आधारची नोंदणी करावी. असे आवाहनही  श्रीमती जयश्री भोज यांनी केले आहे.
           जिल्‍ह्यातील  सर्व राष्‍टीयकृत बँकांना विविध योजनांच्‍या लाभार्थ्‍यांचे  तसेच सर्व कुटूंबांचे  बँक खाते उघडण्‍यासाठी  आवाहन करण्‍यात आले असून, त्‍यांचा विविध बँकाचा  चांगले सहकार्य मिळत असल्‍याचेही  सांगतांना जिल्‍हाधिकारी  जयश्री भोज म्‍हणाल्‍या की  प्रत्‍येक  गावात  बँकेचे खाते उघडण्‍यासाठी  राष्‍ट्रीयकृत बँकांनी  विशेष व्‍यवस्‍था करावी  व डिसेंबर पूर्वी  सर्वांचे  बँकेत खाते उघडावे यासाठी  सहकार्याचे आवाहन करण्‍यात आले आहे.                      
          केरोसीन वरील  सबसीडी  थेट महिलांच्‍या खात्‍यात  जमा होत असल्‍यामुळे  महिलांनीही  बँकेत खाते उघडावे यासाठी  अंगणवाडी सेवीका तसेच आशा सेवीकेंची  मदत घेण्‍यात येत आहे. प्रत्‍येक महिलेचे बँकेत खाते उघडण्‍यासाठी त्‍यांना प्रत्‍येकी दहा रुपये प्रोत्‍साहन म्‍हणून  देण्‍यात येत असल्‍याचेही  यावेळी  जिल्‍हाधिका-याने  सांगितले.
           विविध योजनांचा लाभ डिसेंबर पासून  थेट लाभार्थ्‍यांच्‍या बँक खात्‍यात जमा होत असल्‍यामुळे गावातील प्रत्‍येकाचे खाते उघडण्‍यासोबत  आधारकार्ड काढण्‍यासाठी  दिनांक 30 व 31 ऑक्‍टोंबर व 1 नोव्‍हेंबर  या तीन  दिवशी  प्रत्‍येक गावात विशेष शिबीर आयोजीत करण्‍यात येणार असून, ग्राम पंचायत कार्यालयामध्‍ये  बँक खाते क्रमांक व  आधारकार्डाचा क्रमांक योजनांच्‍या लाभासाठी  उपलब्‍ध करुन द्यावा. अशी माहिती त्‍यांनी यावेळी दिली.
          रासायनीक खतांचे अनुदान शेतक-यांच्‍या खात्‍यात जमा करण्‍यासाठी  देशात वर्धा जिल्‍ह्याची निवड झाली असून, ही योजना तीन टप्‍प्‍यात  राबविण्‍यात येणार आहे. प्रथम जिल्‍ह्यातील सर्व ठोक व किरकोळ विक्रेत्‍यांचे  वेबसाईडवर  नोंदणी  करण्‍यात येणार असून, 81 ठोक व 596  किरकोळ  खत विक्रेत्‍यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. सर्व विक्रेत्‍यांना  आयडी, पासवर्ड व पिन क्रमांक देऊन त्‍या आधारे खताचा पुरवठा करण्‍यात येईल.
          तीस-या टप्‍प्‍यात  किरकोळ विक्रेत्‍यांनी शेतक-यांना खत विक्री केल्‍यानंतर  त्‍यांच्‍या  बँक खात्‍यामध्‍ये  खताचे अनुदान  थेट जमा करण्‍यात येणार आहे. खताच्‍या  विक्रीनंतर ऑनलाईन शेतक-यांना विक्री केलेल्‍या खताची नोंद घेऊन लगेचच अनुदान त्‍यांचे खात्‍यावर वर्ग करण्‍यात येणार आहे.  या योजनेचे प्रत्‍यक्ष  अंमलबजावनीचे काम  नागार्जून व आरसीएफ या कंपन्‍यांना देण्‍यात आले असल्‍याची माहितीही जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली.  
          जिल्‍ह्यातील  सर्व नागरिकांनी  आधारकार्डची नोंदणी करावी व आपला नोंदणी क्रमांक प्रशासनाकडे  राष्‍ट्रीयकृत बँकेतील खाते क्रमांकासह उपलब्‍ध   करुन द्यावा असे आवाहन जिल्‍हाधिकारी  जयश्री  भोज यांनी केले आहे.
          यावेळी  निवासी उपजिल्‍हाधिकारी  सुनील   गाडे, रोजगार हमी योजना विभागाचे  उपजिल्‍हाधिकारी जगदीश संगीतराव  उपस्थित होते.
                                                            000000



Monday, 22 October 2012

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री अनिल देशमुख यांचे गुरुवारी आगमण


सुधारीत दौरा कार्यक्रम      
      

       वर्धा, दि.22-  अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. अनिल देशमुख  यांचे  गुरुवार  दिनांक 25 ऑक्‍टोंबर  रोजी  नागपूर येथून  दुपारी 4.30 वाजता वर्धा येथे आगमण होईल.
           गुरुवार दिनांक 25 ऑक्‍टोंबर रोजी दुपारी 4.30 वाजता शासकीय विश्राम गृह, वर्धा येथे आगमन व जिल्‍ह्यातील सार्वजनिक वितरण प्रणाली संबंधाने जिल्‍हाधिकारी, जिल्‍हा पुरवठा अधिकारी व ग्राहक संरक्षण विभागाच्‍या अधिका-यांसमवेत चर्चा करतील.
        सांयकाळी 5 वाजता वर्धा जिल्‍हा  राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व्‍दारा  आयोजित जिल्‍ह्यातील जेष्‍ठ नेते, कार्यकारणी सदस्‍य व प्रमुख पदाधिकारी यांचेसमवेत आयोजित बैठकीस उपस्थित राहतील (स्‍थळ- पक्ष कार्यालय, वर्धा). त्‍यानंतर सोयीनुसार नागपूरकडे  प्रयाण करतील.
  0000