Tuesday, 14 August 2012

महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहीमे अंतर्गत 496 गावे तंटामुक्‍त



         
         वर्धा, दि. 14 – महात्‍मा  गांधी तंटामुक्‍त गांव मोहीमे अंतर्गत वर्धा जिल्‍ह्यात राबविण्‍यात आलेल्‍या  विशेष उपक्रमामुळे 496 गावे तंटामुक्‍त झाली असून जिल्‍ह्यातील गुन्‍हेगारीचे प्रमाणही कमी होण्‍यास मदत झाली असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी  शेखर चन्‍ने यांनी दिली.
       महात्‍मा गांधी तंटामुक्‍त  गाव मोहीमेचा शुभारंभ येत्‍या 15 ऑगस्‍ट पासून सुरु होत असून जिल्‍ह्यातील 51 गावामध्‍ये विशेष ग्रामसभा घेऊन महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहीम सहभागी  होण्‍याचा संकल्‍प करण्‍यात येणार आहे. तालुका व पोलीस स्‍टेशन स्‍तरावर या मोहीमेसाठी विविध समित्‍या गठित करण्‍यात आल्‍या असून 15 ऑगस्‍ट ते 30 एप्रिल पर्यंत तंटामुक्‍त गाव मोहीमे अंतर्गत विविध उपक्रम राबविण्‍यात येणार आहे.
       गाव तंटामुक्‍त व्‍हावे यासाठी  ग्रामीण भागातील जनतेची  मानसीकता बदलून गावातील तंटे सामोपचाराने  सोडविण्‍यासाठी तंटामुक्‍त  गाव मोहीमेतील  सदस्‍यांनी पुढाकार घ्‍यावा. असे आवाहनही जिल्‍हाधिकारी शेखर चन्‍ने यांनी यावेळी केले.
       महात्‍मा गांधी तंटामुक्‍त  गाव मोहीमे अंतर्गत 6 व्‍या मोहीमेची आखणी  व जिल्‍ह्यातील  51 गावे  तंटामुक्‍त करण्‍यासाठी  राब‍वायच्‍या मोहीमे संदर्भात जिल्‍हाधिकारी शेखर चन्‍ने यांच्‍या अध्‍यक्षतेखाली विशेष बैठक आयोजीत करण्‍यात आली होती. या बैठकीस अप्‍पर   पोलीस अधिक्षक टी.एस.गेडाम, निवासी उपजिल्‍हाधिकारी श्रीमती विजया बनकर, हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी उमेश काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज पाटील, पी.एस.देशमुख, पी.एन.बुरडे, एम.जे.नळे, जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर आदि उपस्थित होते.
        महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहीम  2007 पासून राबविण्‍यात येत असून मुल्‍यमापन समितीने तालुकानिहाय जिल्‍ह्यातील 496 गावे पात्र ठरविले असून 19 गावे अद्याप बाकी आहेत. मागील वर्षी 45 गावे तंटामुक्‍त पात्र ठरली होती.  ग्राम स्‍तरावर  तंटामुक्‍त गाव समितीने केलेल्‍या  विशेष कामगिरीमुळे  2010-11 या वर्षात 19 हजार 926 तंटे दाखल झाले होते त्‍यापैकी 10 हजार 36 तंट्याचा निपटारा झाला. 2011-12  या वर्षात 16 हजार 382 तंटे दाखल झाले होते त्‍यापैकी 5 हजार 998 तंटे सोडविल्‍या गेले. या तंट्यामध्‍ये दिवाणी, महसूल, फौजदारी व इतर गुन्‍ह्यांचा समावेश होता.
                   तंटामुक्‍त गावांना 4 कोटी 40 लाख रुपयाचे बक्षिस
      महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गांव मोहीमे अंतर्गत सन 10-11 या वर्षात 204 गावे पात्र ठरली होती. या  गावांना 4 कोटी 40 लाख रुपयाचे  बक्षिस मिळाले आहे. यामध्‍ये  सर्वाधिक बक्षिस आर्वी पंचायत समितीमध्‍ये  27 गावांना 63 लक्ष रुपये तर पुलगाव तालुक्‍यातील 23  गावांना 58 लाख रुपयाचा पुरस्‍कार मिळाला आहे.
      जिल्‍ह्यातील पात्र गावांना मिळालेल्‍या बक्षिसामध्‍ये आष्‍टी 17 गावे  36 लाख रुपये, कारंजा 23 गावे 43 लाख रुपये, खरांगना 21 गावे 38 लाख रुपये, देवळी 24 गावे 52 लाख रुपये , समुद्रपूर 13 गावे 27 लाख रुपये , वडनेर 12 गावे 28 लाख रुपये, हिंगणघाट 13 गावे 22 लाख रुपये,  दहेगाव 7 गावे 16 लाख रुपये , सिंदी  6 गावे 11 लाख रुपये , सेलू 7 गावे 22 लाख रुपये , सेवाग्राम 11 गावे  24 लाख रुपयाचे बक्षिस मिळणार आहे.
      महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहीमे अंतर्गत जिल्‍हास्‍तरावर कार्यकारी समिती गठीत करण्‍यात आली असून, तालुका व ग्रामस्‍तरावरही  समितीची स्‍थापना  31 ऑगस्‍ट पर्यंत करण्‍याच्‍या सुचना जिल्‍हाधिकारी शेखर चन्‍ने यांनी दिलेत.
      जिल्‍ह्यातील 19 गावे तंटामुक्‍त करायचे असून यामध्‍ये बोरगाव मेघे, सिंदी मेघे, नालवाडी, देऊळगाव, तरोडा, बोथुळा या गावांचा समावेश आहे. या गावांमध्‍ये तंटामुक्‍त गाव मोहीमे अंतर्गत राबवायच्‍या विविध उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहचवून गावातील तंटे गावातच सोडविण्‍याचे दृष्‍टीने विशेष मोहीम राबविण्‍यात येईल अशी माहिती अप्‍पर पोलीस अधिक्ष टी.एस. गेडाम यांनी दिली.
      यावेळी महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहीमेच्‍या समितीचे सर्व सदस्‍य उपस्थित होते.
                                                00000000


अनुसूचित जातीच्‍या प्रवर्गासाठी निःशुल्‍क वेल्डिंग फेब्रिकेशन प्रशिक्षण



     वर्धा, दि.14- जिल्‍ह्यातील विशेष घटक योजने अंतर्गत अनुसूचित जातीच्‍या प्रवर्गातील बेरोजगार युवक-युवती ज्‍यांना स्‍वतःचा उद्योग सुरु करण्‍याची व शासनाच्‍या विविध कर्ज योजनेमध्‍ये भाग घेऊन स्‍वतःचा उद्योग  करता यावा यासाठी वर्धा येथे दिनांक  27 ऑगस्‍ट ते 11 ऑक्‍टोंबर 2012 पर्यंत निःशुल्‍क वेल्डिंग फेब्रिकेशन प्रशिक्षणाचे आयोजन महाराष्‍ट्र उद्योजकता विकास केन्‍द्र मार्फत करण्‍यात येत आहे. हे प्रशिक्षण जिल्‍हा उद्योग केन्‍द्र आणि समाजकल्‍याण कार्यालयाव्‍दारे प्रायोजित आहे. प्रशिक्षणात वेल्डिंग फेब्रिकेशन प्रशिक्षणा व्‍यतिरिकत व्‍यक्तिमत्‍व विकास, वेळेचे नियेाजन, बाजारपेठ पाहणी, प्रकल्‍प अहवाल, ध्‍येयसिध्‍दी प्रेरणा प्रशिक्षण, अकाऊंटिंग व्‍यवसायाची निवड कशी करावी  या विषयावर तज्ञ व अधिकारी वर्गाव्‍दारे मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे.
     या प्रशिक्षाणासाठी उमेदवार हा सुशिक्षीत बेरोजगार असावा, त्‍याचे शिक्षण चालू नसावे. त्‍याचे वय 18 ते 40 वर्षा दरम्‍यान असावे. 10 वा वर्ग पास अथवा नापास किंवा आय.टी.आय. असावे. उमेदवारांनी अधिक माहितीकरीता सौ. मालती अडतकर, 07152-244123 यांचेशी  संपर्क करावा. दि. 21 ऑगस्‍ट 2012 रोजी सकाळी 11 वाजता जिल्‍हा उद्योग केन्‍द्र वर्धा येथे एक दिवसीय प्रशिक्षणात अर्ज सादर करु इच्छिणा-यांनी हजर राहावे व सोबत वयाचा दाखला(टी.सी.), शैक्षणिक पात्रतेचा दाखला(मार्कशिट), जातीचा दाखला, सेवायोजन कार्ड, एक फोटो झेरॉक्‍स प्रतीसह सोबत आणावे. अर्ज केलेल्‍या उमेदवारोन दि. 23 ऑगस्‍ट रोजी दुपारी 11 वाजता कार्यबल समितीपुढे मुलाखतीसाठी  जिल्‍हा उद्योग केन्‍द्र,वर्धा येथे हजर राहावे.निवड झालेल्‍या प्रशिक्षणार्थ्‍यांची  यादी दि. 24 ऑगस्‍ट 2012 रोजी सुचना फलकावर लावण्‍यात येईल. व प्रशिक्षण पूर्ण करणा-या प्रशिक्षणार्थ्‍यांना 1 हजार 500 रुपये महाराष्‍ट्र उद्योजक विकास केन्‍द्र, वर्धा व्‍दारे धनादेशाव्‍दारे विद्यावेतन देण्‍यात येईल. प्रशिक्षण पूर्ण करणा-यांना प्रमाणपत्र देण्‍यात येईल. असे प्रकल्‍प अधिकारी, महाराष्‍ट्र  उद्योजकता विकास केन्‍द्र, वर्धा कळवितात.
                                                  0000000

भारतीय स्‍वातंत्र्याचा वर्धापन दिन पालकमंत्री राजेंद्र मुळक यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहन


                               
     वर्धा, दि. 14- भारतीय स्‍वातंत्र्य दिनाच्‍या 65 वा वर्धापन दिनाचा मुख्‍य सोहळा  जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या प्रांगणात  बुधवार दि. 15 ऑगस्‍ट रोजी  सकाळी  9.05 वाजता आयोजीत करण्‍यात आला आहे.
      स्‍वातंत्र्य दिनाच्‍या वर्धापन दिनी  राज्‍याचे वित्‍त व नियेाजन, उर्जा, जलसंपादन, संसदीय कार्य, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क राज्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री  राजेंद्र मुळक यांच्‍या हस्‍ते सकाळी 9.05 वाजता ध्‍वजारोहन होईल.  
      स्‍वातंत्र्य दिनाच्‍या  मुख्‍य शासकीय समारंभास सर्व लोकप्रतिनिधी, स्‍त्रातंत्र्य संग्राम सैनिक, गणमान्‍य नागरिकांनी  उपस्थित राहण्‍याची  विनंती जिल्‍हाधिकारी  शेखर चन्‍ने  यांनी केली आहे.
                                                000000

महालोकअदालतीमध्‍ये तडजोडीने प्रलंबीत प्रकरणांचा निपटारा - न्‍या. एस.एस.शिवणकर


                      
                                         जनतेनी लाभ घ्‍यावा
        वर्धा, दि.14- जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश तसेच  जिल्‍हा विधी सेवा प्राधीकरणातर्फे  रविवार  दिनांक  19 सप्‍टेंबर रोजी जिल्‍हा व तालुका स्‍तरावर महालोकअदालतीचे आयोजन करण्‍यात आले असून जनतेनी  न्‍यायालयात प्रलंबीत असलेली व दखलपूर्ण प्रकरणे  महालोकअदालतमध्‍ये ठेवून आपला वाद कायमचा संपुष्‍टात आणावा असे आवाहन जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश ए.एस.शिवणकर यांनी केले आहे.
      न्‍यायालयात  प्रलंबीत असलेली प्रकरणे तडजोडीने त्‍वरीत निकाली काढण्‍याची सुवर्णसंधी महालोकअदालतच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध होणार आहे. त्‍यामुळे जनतेनी  महालोकअदालतीचा लाभ घेवून  तहसिल स्‍तरावर तसेच जिल्‍हा  व सत्र न्‍यायालयात आयेाजित महालोकअदालतीमध्‍ये न्‍यायालयात प्रलंबीत असलेली व दखलपुर्व प्रकरणे ठेवावी व आपला वाद कायमचा संपुष्‍टात  आणावा असे आवाहनही न्‍या. ए.एस.शिवणकर यांनी  केल आहे.
                                                 000000

अपंग व्‍यक्‍तींना राष्‍ट्रीय पुरस्‍कार जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी यांच्‍याकडे अर्ज पाठवा



  वर्धा,दि.14-केन्‍द्र शासनाच्‍या सामाजिक न्‍याय व अधिकारीता विभागातर्फे अपंग व्‍यक्‍तींना 2012 चे राष्‍ट्रीय पुरस्‍कार  देण्‍यात येणार आहे. या पुरस्‍कारासाठी  अर्ज मागविण्‍यात येत असून, पुरस्‍कारा संबधीचा संपूर्ण तपशिल व त्‍यासाठी  करावयाच्‍या अर्जाचा नमुना सामाजिक न्‍याय विभागाच्‍या www.socialjuspice.nic.in या वेबसाईटवर उपलबध आहे.
 अपंग व्‍यक्‍ती पुरस्‍कारासाठीचे प्रस्‍ताव 15 ऑगस्‍ट पर्यंत जिल्‍हा समाजकल्‍याण अधिकारी जि.प.वर्धा यांच्‍या कार्यालयात सादर करावयाचे आहे.
      राष्‍ट्रीय पुरस्‍कारासाठी उत्‍कृष्‍ट कर्मचारी स्‍वयंउद्योजक अपंग व्‍यक्‍ती, उत्‍कृष्‍ट नियुक्‍त अधिकारी आणि सेवायोजन अधिकारी किंवा संस्‍था, अपंग व्‍यक्‍तीसाठी कार्य करणा-या उत्‍कृष्‍ट व्‍यक्‍ती (व्‍यवसायिकासह) व उत्‍कृष्‍ट संस्‍था, प्रतीथ यश व्‍यक्‍ती, अपंग व्‍यक्‍तींचे जीवन मान सुधारण्‍याच्‍या उद्देशाने केलेले उत्‍कृष्‍ट संशोधन उत्‍पादन किंवा निर्माती, अपंगत्‍व व्‍यक्‍तीच्‍या सक्षमीकरणासाठी अडथळा विरहीत वातावरण निर्मिती करणारे कार्यालय, किंवा संस्‍था, अपंग व्‍यक्‍तींना पुनर्वसन सेवा पुरविणारा उत्‍कृष्‍ट जिल्‍हा, आत्‍ममग्‍न, मेंदूचा पक्षाघात, मंतिमंदत्‍व व बहुविकलांग व्‍यक्‍तींच्‍या कल्‍याणासाठी राष्‍ट्रीय न्‍यास अधिनियमांतर्गत कार्य करणारी स्‍थानिकस्‍तर समिती, राष्‍ट्रीय अपंग वित्‍त व विकास महामंडळाचे कार्य करणारी राज्‍य यंत्रणा, उत्‍कृष्‍ट कार्य करणारा प्रौढ अपंग व्‍यक्‍ती, उत्‍कृष्‍ट कार्य करणारे अपंग बालक, उत्‍कृष्‍ट ब्रेल छापखाना, उत्‍कृष्‍ट सहजसाध्‍य संकेतस्‍थळ असावे. असे जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी, जिल्‍हा परिषद, वर्धा यांनी कळविले आहे.
                       000000

वाढत्‍या किंमती नियमीत ठेवण्‍यासाठी गहू व तांदळाची खुल्‍या बाजारातून विक्री



     वर्धा,दि.14- राज्‍यात वाढत्‍या किंमती नियंत्रीत करण्‍याकरीता महाराष्‍ट्र शासनोन खुल्‍या  बाजार विक्री योजने अंतर्गत गहु 94.88 मे.टन व तांदुळ 8.52 मे.टन भारतीय अन्न  महामंडळा मार्फत उपलब्‍ध करुन दिलेला आहे.
      त्‍याकरीता महामंडळ, सहकारी संस्‍था, फेडरेशन, स्‍वयंसहाय्यता बचत गट अथवा इतर शासकीय किंवा निमशासकीय संस्‍थांच्‍या माध्‍यमातून वितरीत करावयाचा आहे. तसेच राज्‍य शासनाच्‍या शैक्षणिक संस्‍था, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, स्त्रियांचे वसतीगृह इत्‍यादी साठी करता येईल. त्‍याचप्रमाणे मासिक उपभोग 30 मे. टनापेक्षा गव्‍हाचे छोटे प्रक्रियादार उदा.चक्‍की, बेकरी  यांना जो प्रथम येर्इल त्‍यास प्रथम वितरण या तत्‍वावर वितरीत करता येईल.
     केंद्र शासनाचे गहु रु. 1170 व तांदुळ (कच्चा) अ प्रत रु. 1537.31, साधारण रु. 1492.54 हे खरेदी दर आहे. उपरोक्‍त  दरावर एपीएमसी चार्जेस, ऑक्‍ट्राय, वाहतूक हाताळणूक व अनुषंगीक बाबीसह समाविष्‍ट करुन विक्री दर ठरविण्‍यात येईल परंतु विक्री दर प्रति क्विंटल गहु रु. 1395  ब व तांदुळ (कच्‍चा) अ प्रत रु. 1762.31, साधारण रु. 1717.54 यापेक्षा जास्‍त असणार नाही. जिल्‍हाधिकारी यांनी निश्चित केलेल्‍या किंमतीने सदर गहु व तांदळाची विक्री करण्‍यात येईल.  नमुद केल्‍यापेक्षा जास्‍त  दराने गहु व तांदळाची विक्री करता येणार नाही. विक्री करतांना शिधापत्रिकेची आवश्‍यकता भासणार नाही. गहु व तांदुळ अनुदानीत किमतीचा फायदा सर्व सामान्‍य ग्राहकांना मिहावा हा शासनाचा मुख्‍य उद्देश असल्‍याने सामान्‍य ग्राहकांना उपलब्‍ध होईल याची  दक्षता घ्‍यावी. याबाबत दर, शर्ती व अटीची माहिती त्‍या त्‍या तालुक्‍यातील तहसिलदार यांचे कार्यालयाकडून उपलब्‍ध होईल. गहु व तांदळाची मागणी तहसिलदार यांचेकडे आवश्‍यक कागदपत्रासह त्‍वरीत नोंदवावी. असे जिल्‍हा पुरवठा अधिकारी, वर्धा कळवितात.
                                                 000000

Monday, 13 August 2012

रविवार 16 सप्‍टेंबर रोजी महालोकअदालत


      वर्धा, दि. 13- महालोक अदालतीचे माध्‍यमातून जिल्‍ह्यातील  तहसिल  न्‍यायालयात महालोक अदालती चे आयोजन रविवार दि. 16 सप्‍टेंबर 2012 रोजी करण्‍यात आले आहे.
         या महालोक अदालत मध्‍ये न्‍यायालयात प्रलंबित असलेली व दाखलपुर्व प्रकरणे आपसी तडजोडीने झटपट निकाली काढण्‍याची  संधी उपलब्‍ध आहे. ज्‍या न्‍यायालयात वाद सुरु आहे  तिथे एक साधा अर्ज करुन आपले प्रकरण महालोकअदालत मध्‍ये ठेवून आपला वाद कायमचा संपुष्‍टात आणता येईल. असे प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश तसेच अध्‍यक्ष जिल्‍हा  विधी सेवाप्राधिकरण, वर्धा यांनी  आवाहन केल आहे.
                                                  00000