Friday, 17 February 2012

1 लाख 17 हजार बालकांना पोलीओ लसीकरण करणार एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये - जिल्‍हाधिकारी



वर्धा,दि.17-राज्‍यात 1995 पासून पोलीओ निर्मुलनाचा कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे. येत्‍या 19 तारखेला पल्‍स पोलीओ लसीकरण मोहीम प्रारंभ होणार असून, प्रत्‍येक पालकांनी त्‍यांच्‍या 5 वर्षाखालील मुलांना पोलीओ डोज पाजण्‍यासाठी पोलीओ लसीकरण केंद्रावर घेवून जावे. या लसीकरण मोहीमेत एकही बालक वंचित राहणार नाही याची पुरेपूर काळजी घ्‍यावी असे आवाहन जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी केले.
     आज जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात पलस पोलीओ लसीकरणाच्‍या संदर्भात समन्‍वय सभा आयोजित करण्‍यात आली होती. त्‍याप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या. यावेळी जि.प.मुख्‍यकार्यकारी अधिकारी बि.एम.मोहन, वैद्यकिय अधिकारी डॉ. शर्मा, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. के.झेड.राठोड, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी आ.एस.भुयार, सेवाग्राम वैद्यकिय महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. अशोक मेंहदेळे, वैद्यकिय अधिकारी डॉ. एस.डी. निमगडे, रोटरी क्‍लबचे भारत सोमछत्रा व उत्‍तम कृपलानी, सावंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. ठाकरे, वैद्यकिय अधिकारी पि.आर.धाकटे  आदि मान्‍यवर बैठकीला उपस्थित होते.
     पल्‍स पोलीओ लसिकरणासाठी आरोग्‍य विभाग सज्‍ज असल्‍याची माहिती देवून जिल्‍हाधिकारी जयश्री भोज म्‍हणाल्‍या की या मोहीमेत आरोग्‍य विभाग, आयसीडीएस विभाग, शिक्षण विभाग, ग्रामसेवक, तलाठी व विशेषतः रोटरी क्‍लब, लॉयन्‍स क्‍लब, आय.एम.ए, जिल्‍हा होमगार्ड्स, स्‍काऊट गाईड, राष्‍ट्रीय सेवा योजना, जिल्‍ह्यातील दोन्‍ही वैद्यकिय महाविद्यालये, वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी याशिवाय अनेक स्‍वयंसेवी संस्‍थांचे मोलाचे योगदान लाभणार आहे.
     या मोहिमेकरीता जिल्‍ह्यात ग्रामीण क्षेत्रातील 86687 व शहरी क्षेत्रात 30454 असे एकूण 1 लाख 17 हजार 141 5 वर्षाखालील बालकांना पोलीओचा डोज पाजण्‍यात येणार असून यासाठी 1296 लसीकरण केंद्राची व्‍यवस्‍था करण्‍यात आली असुन यामध्‍ये ग्रामीण भागात 1114 शहरी क्षेत्रात 182 केंद्रे आहेत. या मोहीमेत एकुण 3163 कर्मचारी व 260 पर्यवेक्षक व अधिकारी कार्यरत राहणार आहेत.याशिवाय टोल नाके, फिरती पथके, ट्रान्‍झीट टिम्‍स,पर्यवेक्षकिय पथके,वाहन व्‍यवस्‍था पुरेशा प्रमाणात करण्‍यात आलेली आहे.
     जनतेनी दिनांक 19 फेब्रुवारी 2012 च्‍या सत्रात आपल्‍याकडील व परिसरातील 5 वर्षाचे आंतील बालकांना पोलीओ लसीकरण केंद्रावर नेऊन लस पाजून घेण्‍याचे राष्‍ट्रीय कर्तव्‍याचे पालन करावे असेही त्‍या म्‍हणाल्‍या.
      याप्रसंगी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                                  000000


Thursday, 16 February 2012

शालेय विद्यार्थ्‍यांचा सुरक्षित वाहतुकीसाठी बैठक


     वर्धा, दि. 17 – शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या सुरक्षित वाहतुकीच्‍या संबधीच्‍या स्‍कुल  बस धोरणानुसार स्‍कुल बस मध्‍ये सुरक्षितता समितीची बैठक दिनांक 18 फे‍ब्रुवारी 2012 रोजी 12 वाजता आर्शिवाद मंगल कार्यालय,वर्धा येथे सभा आयोजित करण्‍यात आलेली आहे. तरी सर्व शालेय विद्यार्थ्‍यांची वाहतुक   करणा-या वाहन मालक व चालक तसेच सर्व शाळेतील मुख्‍याध्‍यापकांनी सभेकरीता उपस्थित राहावे. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा कळवितात.
                            000000 

जिल्‍हा क्रीडा पुरस्‍कार 2012


        वर्धा,दि.17- महाराष्‍ट्र शासनाच्‍या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गुणवंत खेळाडू, मार्गदर्शक, संघटक यांच्‍या कार्याचे मुल्‍यमापन करुन त्‍यांच्‍या कार्याचा गौरव व्‍हावा या उद्देशाने दिनांक 1 मे 2012 रोजी महाराष्‍ट्र दिनी जिल्‍हा क्रीडा पुरस्‍कार जिल्‍ह्यातील गुणवंत खेळाडू, मार्गदर्शक , संघटक म्‍हणून प्रत्‍येकी एक पुरस्‍कार  प्रदान करण्‍यात येत असते.
     पुरस्‍कारा  बाबतचे निकष पुढील प्रमाणे आहे.
     पुरस्‍काराचे वर्ष 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीतील गत 3 वर्षाची कामगीरी, पात्रतेचे निकष पुरस्‍कारासाठी अर्ज करणा-या अर्जदाराचे त्‍या जिल्‍ह्यात सलग 10 वर्ष वास्‍तव्‍य असले पाहीजे. क्रीडा मार्गदर्शक म्‍हणून सतत 5 वर्ष संबंधीत जिल्‍ह्यात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले असले पाहीजे. क्रीडा संघटक किंवा कार्यकर्त्‍यांनी सलग 5 वर्षे त्‍या जिल्‍ह्यात क्रीडा विकासासाठी भरीव योगदान दिले असले पाहीजे. व खेळाडूंनी  सतत तीन वर्षे त्‍या जिल्‍ह्याचे मान्‍यताप्राप्‍त खेळांच्‍या अधिकृत स्‍पर्धेमध्‍ये प्रतीनिधीत्‍व केले असले पाहीजे.
    एका जिल्‍ह्यामध्‍ये जिल्‍हा क्रीडा पुरस्‍कार  प्राप्‍त  करणारी व्‍यक्‍ती जिल्‍ह्यातील अन्‍य जिल्‍ह्यात जिल्‍हा पुरस्‍कारासाठी अर्ज करण्‍यास पात्र राहणार नाही.  एकदा एका खेळामध्‍ये किंवा एका प्रवर्गामध्‍ये जिल्‍हा पुरस्‍कार  प्राप्‍त केलेली व्‍यक्‍ती  पुन्‍हा त्‍याच खेळात किंवा त्‍या प्रवर्गात जिल्‍हा क्रीडा पुरस्‍कार  मिळण्‍यास पात्र असणार नाही. संघटक कार्यकर्त्‍यांस किमान 10 वर्षाचा अनुभव असावा व त्‍याचे वय कीमान 50 वर्षे असावे. निकषांची पूर्तता करणा-या खेळाडू व्‍यक्‍तींनी आपला   आपला विहीत नमुना अर्ज दिनांक 28 फेब्रुवारी 2012 पर्यंत जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा येथून विनामूल्‍य  उपलब्‍ध करुन घ्‍यावे तसेच परीपूर्ण अर्ज भरुन व विहित नमुन्‍यात दर्शविलेल्‍या  कागद पत्रांची पूराव्‍यासह पूर्तता करुन जिलहा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा येथे सादर करण्‍याची अंतीम तारीख दिनांक 7 मार्च 2012 आहे.
    वर्धा जिल्‍ह्यातील खेळाडू व्‍यक्‍तींनी पुरस्‍काराबाबतचे विहीत नमुना अर्ज व संबंधीत पुरस्‍काराविषयी  अधिकची माहिती करीता जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय,वर्धा यांचेशी संपर्क साधावा, असे जिल्‍हा क्रीडा अधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.
                           000000 

Tuesday, 14 February 2012

महालोक अदालत 4 मार्च रोजी


     वर्धा, दि. 14- वर्धा जिल्‍ह्यातील मुख्‍यालयी व सर्व तालुका न्‍यायालये, कामगार न्‍यायालये तसेच धर्मदाय आयुक्‍त व इतर न्‍यायालये व न्‍यायाधिकरणे येथे दिनांक ४ मार्च २०१२  रोजी महालोकअदालत भरविण्‍यात  येणार आहे.
     दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे व इतर प्रकरणे सामंजस्‍याने सोडविण्‍याकरीता न्‍यायाधीश वर्ग व तज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे मंडळ (पॅनल) आपणास मदत करेल.
     न्‍यायालयात दाखल असलेली प्रकरणे महा-लोकअदालतीमध्‍ये ठेवणेकरीता संबंधितांनी आपली प्रकरणे ज्‍या न्‍यायालयात प्रलंबित असतील त्‍या न्‍यायालयात अर्ज करावा. तसेच दाखल पूर्व प्रकरणाबाबत जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरण वर्धा किंवा तालुका विधी सेवा समितीकडे अर्ज करावा व दिनांक 4 मार्च 2012 रोजी आयोजित करण्‍यात येणा-या महालोकअदालतीमध्‍ये आपली जास्‍तीत जास्‍त प्रकरणे सामंजस्‍याने व आपापसात तडजोडीने सोडवावीत. असे आवाहन जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्‍यक्ष अ.श्रा.शिवणकर यांनी केले आहे.
                           000000

आठवडी बाजार व डोंगाघाट लिलाव कार्यक्रम


     वर्धा,दि.14-वर्धा जिल्‍हा परिषद अंतर्गत सन 2012-13 या कालावधीसाठी आठवडी बाजार व डोंगाघाटाचा प्रथम लिलाव 21 फेब्रुवारी , दूबार लिलाव 27 फेब्रुवारी व तिबार लिलाव 5 मार्च 2012 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्‍हा परिषद सभागृहात आठवडी बाजाराचा तर संबधित पंचायत समिती सभागृहात डोंगाघाटाचा लिलाव होणार आहे.
    ज्‍या कुणाला या बाजाराचा लिलाव घ्‍यावयाचा आहे त्‍यांनी वरील तारखेला नियोजीत वेळी उपस्थित रहावे. त्‍याचप्रमाणे अधिक माहितीसाठी पंचायत विभाग, जिल्‍हा परिषद, वर्धा तथा संबधीत पंचायत समितीस संपर्क साधावा.
    ज्‍या बाजाराचा लिलाव करावयाचा आहे ते पुढील प्रमाणे आहे.
    आठवडी बाजाराचे नाव पंचायत समिती वर्धा अंतर्गत आंजी (मोठी), सालोड (हिरापूर), तराडा, मदनी. पंचायत समिती सेलु अंतर्गत सेलु. पंचायत समिती देवळी अंतर्गत सोनोरा, सावंगी (येंडे), शिरपूर (होरे), नागझारी. पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत खानगाव, पोहणा, शिरसगाव. पंचायत समिती समुद्रपूर अंतर्गत समुद्रपूर, मांडगाव, कोरा, वायगाव हळदया, कांढळी रोडवरील आंबा फळबहार. पंचायत समिती आर्वी अंतर्गत दहेगाव मुस्‍तफा रोडवरील आंबा फळबहार या गावाचा समावेश आहे.
     डोंगाघाटाचे नांव पंचायत समिती देवळी अंतर्गत हिवरा का., सावंगी (येंडे),खर्डा, सावंगी येंडे, तांबा, रोहणी, बोपापूर, निमगहान, कांदेगाव. पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत आजनसरा, कापशी, कान्‍होली, खानगाव, धोची, पोहणा, पोटी, साती, हिवरा, कान्‍हपुर, सावंगी ज. कात्री, कुटकी, पारडी, वाघोली. पंचायत समिती समुद्रपूर अंतर्गत नंदपूरा (सेवा). पंचायत समिती आर्वी अंतर्गत अंतरडोह, वडगाव(पां), दिघी, सालपुळ या गावाचा समावेश आहे.
    अटी व शर्ती ग्राम पंचायत विभाग, जिल्‍हा परिषद वर्धा तथा पंचायत समिती कार्यालयामध्‍ये कार्यालयीन वेळेमध्‍ये पहावयास मिळु शकेल असे मुख्‍य कार्यकारी अधिकारी जिल्‍हा परिषद,वर्धा कळवितात.

Monday, 13 February 2012

हिंदनगर येथे पोषण आहार कार्यक्रम


     वर्धा,दि.13-राष्‍ट्रीय  ग्रामीण आरोग्‍य अभियान नागरी प्रजनन व बाल आरोग्‍य कार्यक्रमांतर्गत नागरी आरोग्‍य केंद्र 1 सानेवाडी अंतर्गत हिंदनगर येथील अंगनवाडी क्रमांक 19 येथे दिनांक(7 फेब्रुवारी 2012 रोज मंगळवारला) नुकतेच समतोल पोषक आहार कार्यक्रम घेण्‍यात आला.
     कार्यक्रमाचे अध्‍यक्षस्‍थानी नगरसेविका कुत्‍तरमारे, प्रमुख अतिथी माजी मुख्‍याध्‍यापक भगत तसेच वैद्यकिय अधिकारी डॉ. शिल्‍पा वानखेडे उपस्थित होत्‍या. श्रीमती कुत्‍तरमारे यांनी डॉ.आंबेडकर यांच्‍या प्रतिमेला हारार्पण करुन दिपप्रज्‍वलन केले. डॉ. वानखेडे यांनी प्रास्‍ताविक भाशणामध्‍ये ज्‍या आहारामधुन विटॅमिन, मिनरल, प्रोटीन, कार्बोहायड्रेटस मिळतात तसे समतोल आहार आहे. तसेच या विटॅमिनचे प्रकार व त्‍यांच्‍या अभावी होणारे आजार याविषयी विस्‍तृत माहिती दिली.
     यावेळी बोलताना भगत म्‍हणाले की मुर्तीकार मातीला आकार देऊन मुर्ती घडवितो त्‍याचप्रमाणे समतोल आहाराव्‍दारे आईने मुलाला सुदृढ बनविले पाहजे. कार्यक्रमाचे शेवटी अंगणवाडीच्‍या मुलींनी नृत्‍य सादर केले. कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका नम्रता, ए.एन.एम. अर्चना भुरे, विलास भुरे व लिंक वर्कर्स आदिंनी सहकार्य केले. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
                             00000



गरोदर मातांनी समतोल आहार घेण्‍याची गरज - सभापती प्रा.बुटले


    वर्धा,दि.13–अज्ञानता व अशिक्षितपणामुळे गरोदर माता स्‍वततःकडे पोषण आहार घेण्‍यापासून अ‍नभिज्ञ असतात त्‍यामुळे गरोदर मातांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते परिणामी बाळावरही दुष्‍परिणामाची शक्‍यता असते. हे टाळण्‍यासाठी गरोदर मातांनी नियमितपणे समतोल व सकस आहार घेण्‍याची  गरज आहे. असे आवाहन नगर परिषदेचे सभापती प्रा. सिध्‍दार्थ बुटले यांनी केले.
     राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य अभियान नागरी प्रजनन व बाल आरोग्‍य कार्यक्रमांतर्गत नागरी भागातील मागास व झोपडपट्टी परिसरातील लोकांचे आरोग्‍यमान उंचावण्‍यासाठी नगर पालिका क्षेत्रातील नागरी आरोग्‍य केंद्र क्र. 2 पुलफैलच्‍या वतीने बौध्‍द विहार हनुमाननगर वर्धा येथे नुकतेच (दि. 30 जानेवारी 2012) ला पोषण आहार मार्गदर्शन शि‍बीर झाले. त्‍याप्रसंगी ते बोलत होते.
    या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी बालविकास प्रकल्‍प अधिकारी नि.ना.माहुर्ले, वैद्यकिय अधिकारी डॉ. उज्‍वला कांबळे तसेच परिसरातील माता उपस्थित होत्‍या.
    यावेळी उपस्थित पाहुण्‍यांनी पोषण आहाराविषयी मार्गदर्शन केले तसेच प्रत्‍येक गरोदर मातेने समतोल पोषण आहार कसा घ्‍यावा, तयाकरीता आपण जे अन्‍नपदार्थ सेवन करतो त्‍यामध्‍ये कोणते विटॅमिन किती प्रमाणात असावे व ते कसे शिजवायला पाहिजे तसेच प्रत्‍येक मातेने लसिकरण करणे का आवश्‍यक आहे व न केल्‍यास जन्‍माला येणा-या मुलांमध्‍ये काय दोष आढळून येतात. तसेच मुलांचे कुपोषणापासून संरक्षण करण्‍याकरीता लहान मुलांना आहार देतांना तो स्‍वच्‍छ व पोषक असायला पाहिजे. मुलांना समतोल पोषक आहार देतांना त्‍यामध्‍ये प्रतिने, कॅलरीज, विटॅमिन, मिनरल्‍स व इतर सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍य घटक युक्‍त आहार असायला पाहिजे. मुलांच्‍या वाढीसाठी ज्‍या पोषक आहाराची आवश्‍यकता आहे तो आहार वेळेत मिळाला नाही तर मुलं कुपोषणाकडे वळतात.
      त्‍यामुळे बालकाचा मानसिक, शारीरिक व बौध्‍दीक विकास योग्‍य प्रमाणात होत नाही. तसेच शासकिय स्‍तरावर गरोदर माता व बालक यांच्‍याकरीता विविध आरोग्‍य  विषयक शासकिय योजना राबविल्‍या जातात त्‍यांचा योग्‍य प्रकारे लाभ घेतला पाहिजे. तसेच समाजातील विविध गैरसमजुतीमुळे व अंधश्रध्‍देमुळे मातेच्‍या आरोग्‍यावर कशाप्रकारे वाईट परिणाम होतो याविषयी उपस्थित मातांना सखोल मार्गदर्शन केले.
     कार्यक्रमाचे संचालन अंजली थुल तर आभार प्रदर्शन अंगणवाडी सेवका बावणकर यांनी केले. आयोजनाकरीता अजय बोंदाडे, गजानन  उईके, लिंक वर्कर्स व अंगणवाडी सेविका ईत्‍यादी कर्मचा-यांनी सहकार्य केले.
                               0000